भगवान बुद्धांची शिकवण भाग ४३

आर्यसत्याबाबत स्पष्टीकरण…
या लेखातील सुरूवातीचे काही भाग वाचून त्यावर पूर्वी माझे बामसेफमध्ये काम करणारे माझे सहकारी, अभ्यासू व्यक्तीने ‘चार आर्यसत्या’बाबत हरकत घेतली होती. म्हणून या लेखाचा शेवट करण्यापूर्वी त्या प्रश्नाची उकल करणे आवश्यक वाटले. म्हणून हा भाग जोडला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या ‘परिचय’ मध्ये भगवान बुद्धांचे जीवन व शिकवण सुसंगतपणे व संपूर्णतः सादर व्हावे म्हणून चार प्रश्न उपस्थित केले. हे प्रश्न उपस्थित करण्यामागे त्यांचा हेतू हा होता की, यावर जे बौद्धधर्मीय आहेत त्यांनी चर्चा करून त्यांची उकल करण्यासाठी हातभार लावावे. या चार प्रश्नांपैकी एका प्रश्नात ते म्हणतात की, “चार आर्यसत्याचा भगवान बुध्दाच्या मूळ शिकवणीत अंतर्भाव होता काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे? कारण ही चार आर्यसत्ये मानवाला आशा नाकारतात. ही चार आर्यसत्ये बुध्दाच्या आचारतत्त्वांना निराशावादी ठरवतात.” याबाबतीतचा उल्लेख प्रस्तुत लेखात ‘भगवान बुद्ध – नव्या प्रकाशाच्या शोधात’ या भागात आलेला आहे. परंतु हा मुद्दा त्याठिकाणी स्पष्ट करण्यात आलेला नाही, म्हणून त्याबाबत स्पष्टीकरण देणे आवश्यक वाटल्याने हे परिशिष्ट जोडले आहे.
बाबासाहेबांनी १९५६ साली १४ ऑक्टोबरला नागपूर येथे बौद्ध धम्माची स्वतः जेव्हा दीक्षा घेतली व आपल्या लक्षावधी अनुयायांना दीक्षा दिली, त्यापूर्वी हा धम्म कसा अपूर्व आहे व त्याचे संस्थापक गौतम बुद्ध ह्यांचे जीवन, त्याग, प्रज्ञा, करूणा, शील व मैत्रीभावना ह्या आदर्श गुणांनी कसे परिपूर्ण आहे ह्याचे दिग्दर्शन करणारा ग्रंथ ‘The Buddha And His Dhamma’ हा ग्रंथ लिहीला होता. हा इंग्रजी ग्रंथ १९५७ साली म्हणजे बाबासाहेबांच्या महापरिनीर्वानानंतर प्रकाशित झाला. या ग्रंथाची हिंदी आवृत्ती १९६१ मध्ये निघाली तर मराठी भाषेतील आवृत्ती १९७० साली निघाली. बाबासाहेबांनी जे प्रश्न या ग्रंथात उपस्थित केले होते, तो ग्रंथ वाचकांच्या हातात पडण्यापूर्वीच बाबासाहेबांचे महापरिनीर्वान अवघ्या दोन महिन्यात म्हणजे ६ डिसेंबर १९५६ रोजी झाल्याने ते प्रश्न अनुत्तरीतच राहीले. बाबासाहेब आणखी जगले असते तर त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी त्यांनीच शोध घेतला असता.
या ग्रंथात बाबासाहेब पारंपारिक चार आर्यसत्याऐवजी दोनच आर्यसत्य मानतात.
१) या जगात दुःख आहे आणि
२) ते मानवी उपायांनी दूर करता येते.
परंतु बौद्ध धर्माच्या पारंपारिक मांडणीत आढळणारे चार आर्यसत्यांचे सूत्र असे आहेत.
१) माणूस जन्मास येतो. (जन्म)
२) माणूस आजारी पडतो. (आजारपण)
३) माणूस म्हातारा होतो. (म्हातारपण)
४) माणूस मृत्यू पावतो. (मृत्यू)
वस्तुतः वरील चारही प्रक्रिया ह्या नैसर्गिक आहेत. म्हणून त्यास दुःख म्हणून बुद्धाने मान्य करणे कसे शक्य आहे? एके ठिकाणी बुद्ध सांगतात की, “मानव जन्म ही एक अमोल वस्तू आहे.” यावरून बुद्धाचा मानवी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होता. मनुष्य जीवन हे सुंदर आहे, आशावादी आहे. जगाला आशेचे प्रकाशकिरण दाखविणारा बुद्ध हे नैसर्गिक प्रक्रियांना दुःख म्हणून मान्य करणे अशक्यच वाटते.
म्हणून ह्या चारही बाबी जरी वैश्विक सत्य असल्या तरी याच बाबींना दुःख मानून बुद्धाच्या धम्माची पायाभरणी केल्यामुळे बुद्धाच्या धम्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा निराशावादी झाला आहे, अशी बाबासाहेबांनी मांडणी केली असल्याचे दिसून येते. बाबासाहेबांना नेमकी हीच बाब (दुःख सूत्र) बुद्धाच्या खऱ्या धम्माच्या मुळावरच आघात करणारी वाटते. जीवन हे जर दु:ख आहे, मृत्यू हे जर दु:ख आहे आणि पुनर्जन्म (पृथ्वी, आप, तेज आणि वायू या भौतिक पदार्थाद्वारे शरीर घटकाचे होणारे पुनर्जीवन, आत्म्याचे पुनर्जन्म नव्हे) हे जर दु:ख आहे तर सर्वकाही संपलेच म्हणावे लागेल, असे ते म्हणतात. पुढे ते म्हणतात, “मग धर्म किंवा तत्त्वज्ञान माणसाला या जगात सुख प्राप्तीसाठी कधीच उपयोगी पडणार नाही. जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धर्म काय करू शकेल? जन्मापासून जे दुःख अस्तित्वात येते अशा दु:खापासून मानवाची सुटका करण्यासाठी बुद्ध तरी काय करू शकेल?”
बाबासाहेबांच्या या म्हणण्याला गहन अर्थ आहे. उदाहरणार्थ- समजा एखादा व्यक्ती जन्मतःच आंधळा असेल तर डॉक्टर तरी काय करू शकेल? अगदी बाबासाहेबांना हेच सांगावयाचे आहे. दुःख हे जर जन्मतःच सोबत येत असेल तर त्यात बुद्ध तरी काय करू शकणार? खरे तर, जन्मताच आलेल्या नैसर्गिक दुःखातून मुक्ती मिळवून देणे हा बुद्धाच्या धम्माचा विषयच नाही. तेव्हा दु:खाबाबतची ही चारही आर्यसत्ये मूळ बौद्ध धर्मात अंतर्भूत आहेत की ती भिक्खूंनी मागाहून जोडली? असा बाबासाहेबांनी उपस्थित केलेला प्रश्न अनाठायी वाटत नाही.
बुद्धाने वैयक्तिक व सामाजिक दुःखावर मुक्तीचा मार्ग सांगितला. म्हणून सिद्धार्थाने हे ‘दुःख सूत्र’ बघून गृहत्याग केला, ही मांडणी तर्कसंगत व बुद्धीस पटणारी नाही. कारण बाबासाहेबांनी बुद्ध वचन ओळखण्याच्या तीन कसोट्या सांगितल्या आहेत. त्या म्हणजे-
१. बुद्धीसंगत, तर्कसंगत जो विचार आहे तो बुद्धांचा आहे.
२. बहुजन हिताय, बहुजन सुखाय जो विचार आहे तो बुद्धांचा आहे.
३. ज्यावर आपण भाष्य करू शकतो आणि ज्यावर नाही करू शकत या दोन्हीवर तथागत बुद्धांनी विचार मांडले आहेत. या तीन कसोट्यात दु:ख सूत्र बसत नाही.
म्हणून बाबासाहेबांनी सखोलपणे अभ्यास व संशोधन करून सिद्धार्थाच्या गृहत्यागाचे खरे कारण हे रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य व कोलीय यांच्यात उद्भवलेल्या युद्धसमस्येत मांडलेले आहे. युद्धसमस्या ही मूलतः कलहसमस्या असून एका अधिक विशाल समस्येचा, एका मोठ्या सामाजिक संघर्षाचा तो केवळ एक भाग आहे, याची सिद्धार्थास जाणीव झाली होती. यातूनच पुढे सिद्धार्थ गौतमाचा बुद्धत्वाकडे प्रवास सुरू झाला.
सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त करून दु:ख मुक्तीचा मार्ग शोधून काढला. जगात दु:ख आहे व ते कसे नाहीसे करावे या समस्यांवर चिंतन करून त्यांना एक नवा मार्ग दिसला. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धांच्या धम्माचा पाया आहे. हिच ती दोन आर्यसत्ये होत.
पहिले आर्यसत्य हे दु:खाचे अस्तित्व स्पष्ट करते, तर दुसरे आर्यसत्य हे ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविते. म्हणून मानवाला जीवन जगण्यास आशा प्रदान करते. बुद्धाने मानवी दुःखातून मुक्ती मिळविण्याचा मार्ग म्हणजे अष्टांगिकमार्ग दाखवून मनुष्यमात्रास आशा प्रदान केली आहे. बाबासाहेब लिहितात, “बुद्धाच्या धम्मात मानवी जीवनाचा उद्देश व आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे. धम्माचा हेतू अविद्या म्हणजेच दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान नष्ट करणे हा आहे. बुद्धाच्या धम्मात आशा आहे, कारण तो मानवी दु:खाचा अंत करण्याचा मार्ग दाखवितो.” अशाप्रकारे बाबासाहेबांनी उद्देश व आशा यावर आधारलेल्या या दोनच आर्यसत्यांची मांडणी केली आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२५.१.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत