महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-२२ (२७ जुन २०२४)

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,


(डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जातींच्या उत्पत्तीचा सिद्धांत, भाग क्र. २१ वरुन पुढे.. क्रमशः)

जातीअंतर्गत विवाह हेच जातीचे एकमेव वैशिष्ट होय. समाजात नेहमीच वर्गाचा समावेश असतो. वर्गाच्या समावेशानेच समाज तयार होतो. समाजामध्ये निश्चित असे वर्ग असतात. त्यांचा आधार वेगळा असू शकतो. ते आर्थिक, बौद्धिक किंवा सामाजिक असतील. परंतु, समाजातील व्यक्ति ही नेहमीच कोणत्या तरी वर्गाचा घटक असते. ही सर्वमान्य वस्तुस्थिती असून हिंदू समाजाही या नियमाला अपवाद नाही. म्हणून, जातीमध्ये प्रथम रूपांतर झाले असा वर्ग कोणता, हे प्रथम ठरवायचे आहे. कारण, जाती आणि वर्ग हे दरवाज्यासमोर दरवाजा असलेले शेजारी असून फारच थोड्या भेदांमुळे त्यांचे अस्तित्व वेगळे ठरते. म्हणूनच, बाबासाहेब म्हणतात की, “जाती हा एक स्वयंमर्यादित वर्ग होय”.

सती, सक्तीचे वैधव्य आणि बाल विवाहसारख्या रूढी हिंदू समाजात प्रचलित आहेत. या रूढी केवळ ब्राह्मण जातीत फार कडक होत्या. हिंदू समाजात ब्राम्हणांचा दर्जा सर्वात श्रेष्ठ होता. त्यामुळे अब्राम्हण जातीत देखील या सर्व रूढी अनुकरणाद्वारे पाळण्यात येत असल्या तरी, त्या कडकपणे व सर्वच्या सर्व पाळल्या जात नाहीत. जर अब्राम्हण जातीत एखादी प्रथा अनुकरनाद्वारे आली असेल, तर हे सहजगत्या सिद्ध करण्यासारखे आहे. जातीव्यवस्थेचा जनक कोण हे सिद्ध करण्यास कसल्याच युक्तिवादाची आवश्यकता शिल्लक राहत नाही. या रूढींचे कडकपणे पालन आणि ब्राह्मण वर्गाने उपभोगलेली सामाजिक श्रेष्ठता हे दोन पुरावे या कृत्रिम संस्थेचे जनक आहेत.

जगातील इतर समाजाप्रमानेच भारतीय समाज देखील सुरवातीच्या काळात अनेक वर्गांमिळून बनला होता. प्राचीन काळात पुढील वर्ग होते:
१. ब्राह्मण किंवा उपाध्यायांचा वर्ग,
२. क्षत्रिय किंवा सैनिक वर्ग,
३. वैश्य किंवा व्यापारी वर्ग,
४. शूद्र किंवा शेतकरी व मंजुरांचा वर्ग.

या वर्ग पद्धतीत व्यक्तिनी पात्रता मिळवल्यानंतर त्यांना वर्ग बादलवता येवू शकत होता, त्यामुळे या वर्गातील व्यक्ति बदलत राहत असत. हिंदूंच्या इतिहासात केव्हातरी उपाध्याय वर्गाने सामाजिक संबंधांच्या बाबतीत बाकीच्या जनतेपासून स्वतःला वेगळे तोडून घेतले. सैनिकी पेशा स्वभावत:च अशा पोटविभागणीस अनुकूल नसल्यामुळे क्षत्रिय वर्गाचे विभाजन राज्यकर्ते व सैनिक आशा प्रकारच्या दोन भागात होऊ शकले. एका समाजाचे आशा तऱ्हेने पोटविभाग पाडण्याची प्रक्रिया पूर्णतः स्वाभाविक आहे. या पोटविभागासंबंधीची अस्वाभाविक गोष्ट म्हणजे त्यांनी वर्ग पद्धतीतील मुक्त प्रवेशपद्धती गमावली आणि ते स्वयंमर्यादित वर्ग बनले. त्यांनाच जाती असे म्हणतात.

गॅब्रिअल ट्रेड या विचारवंताच्या अनुकरणप्रवृत्ती (Propensity to imitate) या पहिल्या नियमानुसार, अनुकरणाचा प्रवाह हा श्रेष्ठ दर्ज्यांच्या लोकांकडून कमी दर्ज्यांच्या लोकांकडे वाहतो (Imitation flows from the higher to lower).

भारतीय समाजात ब्राह्मण हा केवळ अर्धामुर्धा देवांसारखा नव्हता, तर तो भूदेव होतो. तो एखादी प्रथा सुरू करतो व बाकीच्यांनाही तसाच घडवतो. त्याचा अधिकार नि:संशय असून आशीर्वाद व कल्याणाचा तो मुख्य जरा आहे. आशा तऱ्हेने धर्म ग्रंथांनी पवित्र बनविलेला व पुरोहितधार्जिण्या लोकांनी पूज्य बनविलेले देहधारी प्राणी आपले वर्चस्व समाजातील इतर लोकांवर प्रस्थापित करणार यात शंकाच नाही. गॅब्रिअल ट्रेड यांच्या अनुकरणप्रवृत्ती नियमानुसार, अनुकरणाच्या या वृत्तीमुळेच जातींची घडण झाली आहे.

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर (६६) या ग्रंथातून)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!