रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान

लेखक वैभव छाया
आज १ एप्रिल ! नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात १ एप्रिल पासून होते. रिझर्व बँकेची स्थापना याच दिवशी झाली होती. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ आणि ‘रिझर्व्ह बँकेची संकल्पना’ याविषयी लिहिताहेत लेखक वैभव छाया…
आज आपण रिझर्व बँकेवर विश्वास ठेवून आर्थिक कारभार करतो. देश स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शोधनिबंधात भारतात रिझर्व बँकेची संकल्पना मांडली होती.
आज आपण संघीय क्षेत्राबद्दल बोलतो, वित्त आयोग, राज्यांची मागणी असते, इतके पैसे कोणाला हवे आहेत , इतके पैसे कोण देईल , पैसे वाटपाचे निकष काय असतील , कोणते राज्य कोणत्या क्रमाने चालेल ? वित्त आयोग आणि संपत्तीची वाटणी केंद्र आणि राज्यांमध्ये कशी असावी ? याचे सखोल विवेचन त्यांनी केले होते. यााबाबत देश स्वतंत्र होण्यापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार मांडले होते आणि या विचारांच्या प्रकाशात आज हा वित्त आयोग, आरबीआय अशा अनेक संस्था कार्यरत आहेत.
रिजर्व बँक ही एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिकनीती यांवर नियंत्रण ठेवते. तसेच भारत सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजना ठरवते. भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण ठेवताना महत्वाचे निर्णय घेते.
रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया १ एप्रिल १९३५ साली ब्रिटीश राजवटीत स्थापन झाली. १९३५ साली स्थापन झालेल्या रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या संकल्पनेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांवर आधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्टचा आधार घेण्यात आला. रिजर्व बँक ऑफ इंडिया ही संपूर्णपणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या संकल्पनांवर आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषेवर सुरळीतपणे अव्याहत सुरु आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ मध्ये केलेलं विवेचन इतकं जबरदस्त होतं की ब्रिटीश सरकारने वसाहतवादाच्या नावाखाली भारतातील परंपरागत व्यवसायांचं चालवलेलं शोषण जगासमोर उघडं पडलं. तत्कालीन काँग्रेसने डॉ आंबेडकरांच्या या मांडणीला उचलून धरत ब्रिटीशांना ताणून धरलं. त्याचीच परिणीती लंडनहून एकुण प्रकरण तपासण्यासाठी रॉयल कमिशनच्या स्थापनेत झाली.
१९३५ साली पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटीश राजवटीतील भारतीय अर्थ व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून रिजर्व बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याचे ठरले. या बॅंकेने भारतातील इतर वित्तीय संस्था आणि बँकांवर अंकुश ठेवून आर्थिक कारभार सुरळीत ठेवणे अभिप्रेत होते. रिजर्व बँक १९२५ साली भारतात नेमलेल्या रोयल कमिशन म्हणजेच हिल्टन कमिशनच्या रिपोर्टवरून बनवण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या तीनही आर्थिक ग्रंथांचा उपयोग करून तसेच त्यांच्या संकल्पना आणि कामकाजाची पद्धत रिजर्व बँकेच्या स्थापनेचा पाया ठरला. १९४९ पासून रिजर्व बँक ही अधिकृत आणि संपूर्णपणे भारत सरकारच्या अंमलाखाली आहे.
१९३५ मध्ये जेव्हा रिजर्व बँकेची स्थापना झाली तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जीवनात सक्रिय होते. मोर्चे, आंदोलने, पक्ष बांधणी अशी धावपळ सुरु होती. याच वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले. याच वर्षी माता रमाई डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सोडून गेल्या. याच वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला नाशिक इथे मोठी सभा घेतली आणि ‘मी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी प्रतिज्ञा घेतली आणि याच वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ रिजर्व बँकेचा पाया रचण्यासाठी वापरले जात होते ! इतर देशात अर्थ व्यवस्था ढासळत ढासळत असताना सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली यांवर आज सुद्धा भारतीय रिजर्व बँक आणि भारतीय अर्थव्यवस्था डौलाने मार्गक्रमण करीत आहे.
भारतीय रिजर्व बँकच्या स्थापनेत जरी डॉ बाबासाहेब आंबेडकर नसले तरी संकल्पना आणि रूपरेषा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिलेली आहे. परंतु रिजर्व बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर ही माहिती कुठेही नाही, ही शोकांतिका आहे.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या प्रबंधाच्या संकल्पनेनुसार १ एप्रिल १९३४ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. रिझर्व्ह बँकेंच्या ९० व्या स्थापना दिनानिमित्त जागतिक “अर्थतज्ज्ञ” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाला कोटी कोटी अभिवादन…!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत