घरे गावठाण शेतजमिनी आणि महिलांचे मालकी अधिकार..- राजाराम पाटील.

कोणगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे गावठाण विस्तार विषयावर एका ग्राम सभेचे आयोजन दिनांक २७फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत कोण गाव (कल्याण )यांनी केले होते.
व्यवसायाने बिल्डर असलेल्या शोभाताई म्हात्रे आणि निवृत्त पोलिस अधिकारी (पोलिस सब इन्स्पेक्टर)रमेश मुकादम यांनी प्रचंड मेहनत घेऊन, या ग्राम सभेचे यशस्वी आयोजन केले होते.
आगरी समाजातील महिला बांधकाम व्यवसायात यशस्वी झेप घेते? ही अभिमानास्पद कामगिरी आहे.
या व्यवसायातील प्रचंड स्पर्धा आणि पुरुषसत्ताक पद्धत मोडून काढत आई एकवीरा मातृसत्ताक संस्कृती साकार करणाऱ्या या माझ्या मोठ्या बहिणीने, मला मी मांडत असलेल्या आगरी कोळी संस्कृतीबद्दल नवा धाडसी व्यावसायिक आदर्श दिला.
कोणगाव ग्रामसभा सन्माननीय सरपंच रेखाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
उपसरपंच महिलाच होती.सौ दीपालीताई कराले.
ग्रामपंचायत सदस्या रजनीताई पाटील.
रेखाताई मुकादम.मधुताई म्हात्रे.श्वेता नाईक अशा लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या भगिनी भारतीय लोकशाहीचे दैदिप्यमान यश आहे.
ही कोणगाव कल्याण येथील सभा मनुस्मृतीचा काळाकुट्ट इतिहास पुसून नव्या लोकशाहीची स्त्री पुरुष समतेची ग्वाही देणारी सभा ठरली.
स्त्रियांनी शेतीचा शोध लावला.
हे जगातील सारे इतिहासकार सांगतात.मी माझी आई आजी मावशी आत्या चिंचोटी (अलिबाग) गावातल्या साऱ्या स्त्रियांना शेतीतील ८० टक्के कामे करताना प्रत्यक्ष पाहिले आहे.
किंबहुना वडील नोकरीनिमित्त मुंबईत असताना माझी आई आमची शेती अत्यंत कष्टाने करीत आहे.तिच्या या कर्तृत्वाने माझ्या मनात स्त्रियांविषयी प्रचंड आदराचे स्थान नैसर्गिकपणे तयार झाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील स्त्री शूद्र अतिशूद्र यांना मनुस्मृती हिंदू चातुर्वर्ण्य यातून बाहेर काढण्यासाठी महात्मा जोतिबा फुले सावित्री माई फुले यांना आदर्श मानले.
शिक्षणाची सुरुवात स्त्री शिक्षणाने झाली पाहिजे.
या निर्णयातील दूरदृष्टी मला मनातील मातृसत्ता विचारधारा मजबूत करून गेली.
पुढे माझ्या आगरी कोळी समाजाची आधुनिक मांडणी करताना मातृसत्ताक विचारसरणी मी स्वीकारली. ती याच मातीतून याच सागरी आगरी कोळी संस्कृतीतून.
आगरी कोळी कराडी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन संस्कृतील मला भेटलेल्या आया मावश्या आज्या बहिणी जे त्यांच्या स्त्री संस्कृतीतून शिकवून गेल्या. ते जगाच्या संस्कृतीत अत्यंत वेगळे निराळे तत्वद्न्यान होते.
विवाहात विधवा महिला पुरोहित धवला गाणारी माझी मोठी हालूआज्जी ,अत्यंत विद्वान होती.
याच आगरी कोळी संस्कृतीत विधवा पुनर्विवाह होत आहेत.
लग्नात हुंडा घेतला जात नाही.
आगरी कोळी भंडारी कराडी जातीत आंतरजातीय विवाह होतात .
अलीकडे अन्य जातींच्या सोबत आंतर जातीय विवाहाचे स्वागत होते आहे.
मी स्वतः आगरी बौद्ध, आगरी जैन, आगरी मुस्लिम, अशा आंतर धर्मीय विवाहाचा साक्षीदार आहे.
मुलींच्या जन्माचे स्वागत हे वरातीत जन्मा अगोदरच होते.
कोळीवाड्यातील सारे आर्थिक व्यवहार हे स्त्रियांच्या हाती आहेत.मुंबईची मासळी मार्केट ही साऱ्या जगात महिला अर्थसतेचा आजही नावलौकिक वाढवित आहेत.मुंबई शहर हे मूळचे मातृसत्ताक आहे.
हजारो वर्षांच्या या मातृसत्ताक संस्कृतीचे मूळ कार्ला बौद्ध लेण्यातील कोळीय बुद्ध माता महामाया एकवीरा संस्कृतीत आहे. हे मी आजपर्यंत मांडत आलो.
आगरी कोळी संस्कृतीतील विधवा महिलांची सर्व धार्मिक अधिकारांची जननी बुद्धांची मावशी महाप्रजापती जी प्रथम महिला संन्यास घेणारी भिक्कुनी आहे.
आगरी कोळ्यांच्या मागील २००० ते २५०० वर्षांचे सागरावरील सागर किनाऱ्यावरील अस्तित्व हे त्यांच्या परकीय आक्रमक लोकांशी केलेल्या संघर्षाचा इतिहास आहे.
यातही हाती काती कोयते भाले घेऊन आपल्या कोळीवाडे गावठाणे यांचे रक्षण करणाऱ्या स्त्रिया या महिलाना “शूद्र” म्हणून शस्त्राचा,राजकीय सत्तेचा अधिकार नाकारणाऱ्या मनुस्मृती च्या थोबाडीत मारणारा लढाऊ मातृसत्ताक इतिहास आहे.
स्त्रियांच्या गुलामीला आव्हान भगवान बुद्धांनी भिक्कुनी संघात महिलाना समान स्थान देऊन केले.आपल्या संविधानातील स्त्री पुरुष समानतेचा तो.ऐतिहासिक पाया आहे.
कोकण हा प्रदेश मातृसत्ताक आहे.आईला ठार करणाऱ्या परशुरामाची पुरुषसत्ताक संस्कृती इथल्या बलवान लढाऊ स्त्रियांनी कायम नाकारली आहे.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची संकल्पना स्त्रियांच्या आदराने,सन्मानात मांडली आहे.
राजमाता जिजाऊना देवापेक्षा जास्त आदर देणारा राजा.स्त्रियांच्या प्रतिष्ठेला जपणारा राजा. ही छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड म्हणजे मातृसत्ताक कोकणात का आहे? हे सांस्कृतिक कारण आपणास सांगते.
आज इग्रज पोर्तुगीज मोघल फ्रेंच यांच्या काळात नव्हता ?असा धोका भारताच्या स्वातंत्र्यानंतर साविधानिक कायदे असताना. आगरी कोळी गावठाण घरे जमिनी यांना जाणवत आहे.
खोत सावकार यांच्या विरोधात लढणाऱ्या डॉ बाबासाहेब आबेडकर.ना ना पाटील यांनी आम्हास कुळ कायदा दिला.चरी शेतकरी संप,चिरनेर जंगल सत्याग्रह यात ,आगरी.कोळी भंडारी कराडी महिला लढल्या.परंतु सिडको विरुद्ध आंदोलनात लोकनेते दि बा पाटील यांच्या आदिलनात अंगावर बंदुकीच्या गोळ्या झेलणाऱ्या आमच्या महिला आजही अजरामर आहेत.
मुंबई ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग इथल्या जमिनी विकासाच्या नावे लुटू पाहणारे नवे सरकारी खाजगी धोरण येत आहे.
या विरोधात स्त्रियांचा सहभाग कोकण वाचवू शकतो.
माझ्या या मताचे प्रत्यंतर गावठाण कोळीवाडा चळवळीत मला येत आहे.हिंदू कोड बिल संविधान सभेत सादर करताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जो संघर्ष हिंदू कट्टर मनुवादी लोकांशी करावा लागला तो समस्त स्त्रियांनी वाचलाच पाहिजे.
अलीकडे जो हिंदुराष्ट्राचा विचार देशात फोफावतोय तो ओबीसी एससी एसटी मुस्लिम ख्रिश्चन या अल्पांख्यक यांच्याविरोधी आहे.त्यापेक्षा पन्नास टक्के स्त्रियांच्या विरोधी अधिक आहे.
म्हणूनच प्रत्येक सण उत्सवात लग्न साखरपुडे वाढदिवस यात भारतीय संविधान आपल्या मुली बहिणी महिला यांना भेट द्यावे .अशी माझी विनंती आहे.
महात्मा फुले सावित्रीमाई डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य घरातील.महिला यांच्यापर्यंत सर्वच पुरुषांनी पोहचविले पाहिजे.अर्थात आई हीच आपली गुरू आहे.स्त्री शिकली तरच आम्ही मुले सुसंस्कृत होऊ.
महिलांच्या अधिकारातील साविधानिक कायदे ग्रामीण भागात अजूनही पोहचले नाहीत.पुरुषसत्ताक प्रशासन राजकारण मिडिया पोलिस स्टेशन महसूल विभाग यात आजही महिलांची प्रचंड फसवणूक होत आहे.अन्याय अत्याचार होत आहेत.
केवळ कायद्याने समाज बदलत नाही.भारताला मनुसंकृती सोडून महिला अधिकारांच्या साविधानिक संस्कृतीकडे न्यायचे आहे.आपल्या आजी आई बहिणी साठी ज्यांना मनात कृतज्ञतेची भावना आहे.त्यांनी तत्काळ व्यक्त व्हा.बोलते व्हा.
भारतात महिलाना घर जमीन आणि गावठाण मालमत्तेत पुरुषा इतकाच समान कायदेशीर हक्क दिला आहे.मुख्यत्वे हिंदू वारसा सुधारणा कायदा २००६ नुसार मुलींना वडिलोपार्जित जमीन घर रुपये पैसे सोने गाडी यात समान हिस्सा मिळतो.या बरोबरच हिंदू वारसा कायदा १९५६ नुसार घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करतो.शासकीय गृहनिर्माण धोरणात महिलाना हक्कांचे घर आणि जमीनही मिळवून देतो.
हिंदू वारसा कायदा २००५ कायद्यानुसार विवाहित किंवा अविवाहित मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत (जमीन आणि घर) मुलांप्रमाणेच जन्मजात समान हक्क देत आहे.
हिंदू वारसा कायदा १९५६ कलम १४ प्रमाणे हिंदू महिलेला स्वतःची खरेदी केलेली मिळकत किंवा वारसा हक्काने मिळालेली मिळकत.तिच्या मालकीची असते.ज्यावर तिचा पूर्ण अधिकार आहे.
पी डब्ल्यू डी व्ही ये या कायद्याच्या कलम १७नुसार महिलेला सदरच्या घरात राहण्याचा( राईट टू रेसिडन्स)हा कायदेशीर हक्क आहे.ते घर तिचे स्वतःचे नसले तरीही.
गावठाण किंवा शासकीय जमीन नियमन GR १६फेब्रुवारी २०१८ महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागात घर नसलेल्या गरजू महिलाना तसेच विधवा महिलाना सरकारी किंवा ग्राम पंचायतीच्या जागेवर अतिक्रमण नियमित करून घर बांधण्यासाठी हक्क देण्याची तरतूद आहे.
महिलांच्या नावे मालमत्ता.नोंदणी करताना स्टँप ड्युटी मध्ये सवलत दिली आहे.त्यामध्ये महिलाना मालमत्तेचे मालक बनण्यासाठी कायद्याने प्रोत्साहन मिळते.
मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क कायदा १९८६ या कायद्या अंतर्गत महिलाना त्यांच्या मालमत्तेवर कायदेशीर अधिकार दिले आहेत.
अशी माहिती महिलाना मिळावी यासाठी गावठाण चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी सहकार्य करा.अशी नम्र विनंती आहे.
जय एकवीरा.
जय जिजाऊ.
जय सावित्री.
राजाराम पाटील.
उरण रायगड.
८२८६०३१४६३.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



