दिन विशेषदेशमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

जनार्दन वाघमारे यांना कृतज्ञतांजली… डॉ यशवंत मनोहर

डॉ.जनार्दन वाघमारे यांचा २ मार्च २०२६ ला देहान्त झाला.‌त्यांच्या बौद्धिक आणि भावनिक निर्मितीमधील मनान्त कधीही होणार नाही. उलट हे विचार झालेले मन आता अधिकच अन्वर्थक होत लोकांना शहाणीव वाटत राहील..त्यांचे असणे आता देहाचे नसेल पण त्यांचे असणे यापुढे त्यांच्या सदुसष्ट ग्रंथांचे असणे असेल.

*
डॉ.जनार्दन वाघमारे नावाचे आंतरराष्ट्रीय ज्ञानपीठ कालपर्यंत लातूर नावाच्या गावात मुक्कामी होते.वाघमारे वैश्विक परिप्रेक्ष्यात विचार करीत होते. ‘ स्वायत्त ‘ माणूस अजिंक्य व्हावा यासाठी त्यांनी सुसभ्य विचारवास्तूचे भव्य बांधकाम केले यामागे फुले -शाहू आंबेडकरांचे महान.लाॅजिक उभे आहे.

*
डॉ.वाघमारे इंग्रजीचे प्राध्यापक होते.ते पुढे प्राचार्य झाले.कुलगुरू झाले.राज्यसभेचे सदस्य झाले,पण वाघमारे या पदांमुळे मोठे झाले नाहीत तर वाघमारे यांनीच या सर्व पदांना मोठे केले.त्यांचा लातूर पॅटर्न जितका मोलाचा आहे त्याहून कितीतरी पटीने त्यांनी केलेला फुले-शाहू .आंबेडकर समाजाच्या पॅटर्नचा पाठपुरावा मोलाचा आहे .

*
साहित्य,समाज, शिक्षण, राजकारण, प्रशासन अशा सर्वच क्षेत्रांच्या हातात परिवर्तनाचे बॅनर्स देणारा हा विचारवंत प्रकृतीने पूर्ण बंडखोरच आहे. त्यांनी अन्यायाची मनुस्मृती जाळणारे सत्य लिहिले. त्यांनी अविचार उद्ध्वस्त करणारा विचार लिहिला .समरसतेवर फुल्या मारून त्यांनी समतेचा कार्यक्रम लिहिला.निरामय उजेड हेच त्यांच्या विराट चर्चाविश्वाचे प्रमाणशास्त्र आहे. आपल्याकडे जातींचा रोग नसता तर महाराष्ट्राने त्यांना अग्रगण्य विचारवंत मानले असते
.
*
‘ अमेरिकन निग्रो: साहित्य आणि संस्कृती ‘ हे त्यांचे पहिले पुस्तक! ते मी झपाटलेल्या मनाने वाचले. या पुस्तकाने मला जगातील ज्वालामुखी पाहणारे डोळे दिले.पुढे त्यांच्यासोबत मुंबई सातारा ,सुरत,अशा अनेक ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये भाषणे दिली.

*
मी त्यांच्या लहान भावासारखा पण त्यांनी यशवंत मनोहर प्रतिष्ठानचा पुरस्कार मोठ्या मनाने स्वीकारला. माझ्या इंग्रजी आणि मराठी अशा दोन कवितासंग्रहांना त्यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या.इतरही दोनतीन लेख माझ्या साहित्यावर लिहिले‌. काटोलच्या कार्यक्रमासाठी आले असताना नागपूरच्या घरी आमच्यासोबत जेवण केले.’ सत्ता,समाज आणि संस्कृती ‘हे त्यांचे मौलिक पुस्तक त्यांनी मला अर्पण केले .या त्यांच्या निरपेक्ष प्रेमाने मला समृद्धही केले आणि विनम्रही केले.

*
जीवनाचे अनिवार्य आणि कटू सत्य सांगण्यासाठी जीवनाला त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा हिशेब दिला.
*
या सुसंस्कृत ज्ञानअर्हताला विनम्र कृतज्ञतांजली!

यशवंत मनोहर
२मार्च २०२६

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!