दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

” आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही.!”

कालच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ह्या देशातील सनातनी प्रवृत्तीच्या मनात आंबेडकर द्वेष अजूनही किती ओतप्रोत भरलेला आहे, हे दर्शविणार्‍या दोन घटना घडल्या आहेत.
त्यातील पहिली घटना नाशिक येथे सरकारी झेंडावंदन कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश महाजन ह्यांनी भाषण करतांना अनेक नेत्यांचा नामोल्लेख केला .परंतु ज्या घटनाकारांनी दोन वर्षे अकरा महिने शरीर साथ देत नसतांनाही अतोनात कष्ट घेऊन जगातील सर्वात मोठी लिखित घटना या देशाला दिली आणि गेली 77 वर्षे निरंतर या देशाचा कारभार सुरू आहे. त्या घटनाकाराचा नामोल्लेख करू नये.यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी असू शकत नाही. परंतु बाबासाहेब सांगून गेलेत की, जो शिक्षण रुपी वाघिणीचे दूध प्राशन करील,तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आम्हा आंबेडकरी समाजाच्या नसानसात भिनली आहे. म्हणुन तर आम्ही कोणत्याही क्षणी न डगमगता जाब विचारण्यासाठी ठामपणे उभे राहतो. या कार्यक्रमात देखील मंत्री महोदयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले नाही म्हणुन भीमाची वाघीण सरकारी कर्तव्यावर असलेली वन संरक्षक माधवी जाधव हिला हा प्रकार सहन झाला नाही. म्हणुन तिने मंत्री महोदय ह्यांच्या समक्ष ” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो ” अशा जोरजोराने घोषणा द्यायला सुरुवात केली. आजच्या दिवशी बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधाना नुसार देशाचा कारभार सुरू आहे. म्हणुन आपण हा दिवस ” प्रजासत्ताक दिन ” म्हणुन साजरा करतो. तुम्ही इतर नेत्यांची नावे घेता. पण संविधानाकारांचे नाव मुद्दामहून टाळता. हा घटनाकारांचा अपमान आहे. म्हणुन मंत्री गिरीश महाजनांनी जाहीर माफी मागावी. अशी मागणी केली. तुम्ही मला बडतर्फ करा किंवा नोकरीतून काढून टाका. मी घाबरत नाही. परंतु जोपर्यंत गिरीश महाजन हे जाहीर माफी मागणार नाहीत, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.

ह्या भीम निष्ठेचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. म्हणुन तूर्त ह्या भीम कन्येला मानाचा कडक जयभीम.!
दुसरी घटना घडली ती बारामती नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍याच्या हस्ते झेंडावंदन कार्यक्रम स्थळी अनेक नेत्यांचे फोटो होते. नव्हता तो फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो. ह्याचा जाब तेथे उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते यांनी विचारला. त्यामुळे कार्यक्रमात थोडा गोंधळ उडाला. परंतु त्यावर कुणीही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याचा निषेध करतांना आंबेडकरी अनुयायांनी बारामती नगराध्यक्ष सचिन सावंत ह्यांच्या अंगावर शाई फेकली.
हे सर्व हेतुपुरस्सर केले जाते असा माझा ठाम विश्वास आहे.
त्यासाठी आपल्याला मागील काही काळाच्या घटनांचा आढावा घेणे प्राप्त आहे. गेल्या काही काळापासून भारतीय संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने लिहिले नाही .अशा कागाळ्या वरचेवर ऐकायला मिळतात. त्या बाबतची विश्लेषणात्मक गोष्ट इथे नमूद करणे आवश्यक आहे. दिनांक 25/03/2025 रोजी संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात, त्यानिमित्ताने महाराष्ट्र विधानसभेत बोलतांना छगन भुजबळ ह्यांनी ह्या संदर्भित लोकसभेत व्ही. टी. कृष्णम्माचारी ह्यांनी केलेल्या भाषणाचा पुरावा देतांना सांगितले की, हल्ली जो तो उठतो आणि बोलतो की, संविधानाचा मसुदा एकट्या बाबासाहेबांनी लिहिला नाही. त्या समितीवर अनेक सदस्य होते. हीच गोष्ट कृष्णम्माचारी ह्यांनी ह्यावर विश्लेषण करतांना आवर्जून सांगितले की, मसुदा समिती मध्ये सात सदस्य होते . त्यापैकी एक अमेरिकेला गेला. एकाचा मृत्यू झाला. एक सदस्य त्याच्या मनात राजकिय कामात असल्यामुळे वेळ देऊ शकला नाही. दोन सदस्य दूर वास्तव्यास असल्यामुळे प्रकृती अस्वस्थ्य असल्यामुळे बैठकीत हजर राहू शकले नाही. ह्याचा परिणाम असा झाला की, संविधान सभेतील प्रमुख असलेल्या मसुदा समितीचे संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी एकट्या बाबासाहेबांच्या अंगावर आली. आणि ती त्यांनी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसांत समर्थपणे पूर्ण केली. ह्यात तिळमात्र शंका नाही. ह्याबद्दल देश त्यांचा कायम ऋणी राहील. त्यांचे हे भाषण लोकसभेच्या वाचनालयात उपलब्ध आहे. आता यापेक्षा अधिक पुरावा देण्याची गरज आहे काय? मुळात ह्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची अ‍ॅलर्जी आहे. त्या द्वेषातून ह्यांचे संत, महंत आणि संघाच्या विविध शाखांमार्फत संविधान बदलण्याची भाषा केली जाते. अशाच एका बागेश्वर बाबाला प्रश्न विचारला की,तुम्ही संविधाना ला मानता की गीतेला? त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,निःसंदिग्ध गीतेला. ह्यावरून ह्यांचे संविधान प्रेम दिसून येते. ह्या देशाच्या राजधानी दिल्लीत संविधानाची होळी केली जाते. एव्हढेच काय तर, ह्या देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील भर लोकसभेत बरळले की, आंबेडकर, आंबेडकर नाव घ्यायची सध्या फॅशन झाली आहे. जर इतक्यांदा देवाचे नाव घेतले असते तर तो ही प्रसन्न झाला असता.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीं पासून ते निम्न स्तरावरील संघोट्यांकडून गळा सुकेपर्यंत बाबांची स्तुती करायची परंतु कृती नेमकी उलट करायची. कारण त्यांना पक्के ठाऊक आहे की, ह्या देशात गांधी, नेहरू, टिळक, सावरकर ह्यांच्यावर उघडपणे टीका केली तर फरक पडत नाही.परंतु जर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी
अपशब्द वापरल्यास सत्तेच्या खुर्चीला सुरुंग लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणुन ते छुप्या पद्धतीने बाबांचा अपमान करण्याचा उद्योग करतात.
संविधान तयार करण्यात बाबांचेच सगळ्यात जास्त योगदान आहे. त्याचा पुरावा म्हणुन प्रथम ” प्रजासत्ताक दिनाच्या” निमित्ताने एक छायाचित्र कायम बघण्यात येते. ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधानाची प्रत तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद ह्यांना सुपूर्द करीत आहेत. त्याप्रसंगी पंतप्रधान पंडित नेहरू, गृहमंत्री वल्लभ भाई पटेल,आणि व्ही. टी. कृष्णम्माचारी
उपस्थित होते.
दुर्दैवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असताना अभेद्य असलेली चळवळ, त्यांच्या महा परीनिर्वाणानंतर ,त्यांच्या अनुयायी पुढाऱ्यांच्या स्वकेंद्रित राजकारणामुळे अनेक गटात विभागली गेल्यामुळे शक्तिहीन झाली. परंतु ज्या ज्या वेळी, दलित जनतेवरील अन्याय,अत्याचारांच्या घटना घडल्या. त्या त्या वेळी दलित पँथरने त्याला निकराने विरोध करीत जनआंदोलन करून सरकारला कठोर कारवाई करण्यास भाग पाडले. परंतु इथेही दुर्दैव आड आले. आणि लढाऊ अभेद्य संघटनेचे तुकडे झाले. त्यानंतर सुद्धा आंबेडकरी जनतेच्या रेट्यामुळे अनेकदा ऐक्याचे प्रयोग झाले. परंतु ते देखील अल्पकालीन ठरले.
ह्या देशात अनेक कर्तुत्ववान
महापुरुष होऊन गेले. त्यांचे असंख्य अनुयायी देखील आहेत. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या नसानसात आंबेडकरी विचार भिनले आहेत. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे, ते भरकटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येते.
म्हणुन मी वारंवार नम्रपणे
आवाहन करतो की, जगात आंबेडकरी अनुयायां सारखा कट्टर अनुयायी शोधून सापडणार नाही. फक्त त्याला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. म्हणुन मी सर्व नेत्यांना कळकळीची विनंती करतो की, तुम्ही एकत्रित येणे काळाची आणि आंबेडकरी चळवळ वाचविण्याची गरज आहे .तुमच्या आंबेडकरी एकजुटीची ताकद दाखवून दिली तर भविष्यात वर उल्लेख केलेले प्रसंग घडणार तर नाहीच परंतु पुतळा विटंबना, बहिष्कार, अन्याय, अत्याचाराच्या
घटना घडविण्याचे कुणी धाडस करू शकणार नाही. ह्यापेक्षा वेगळी
गोष्ट अशी घडेल की, निवडणुकीत तुम्हाला कुणाच्याही मागे युतीसाठी
फिरावे लागणार नाही .उलट तुमच्या ऐक्याचे बळ पाहून सगळेच युतीसाठी तुमच्या मागे फिरतील. त्यामुळे तुमच्या अटींवर युती करता येऊन स्वाभिमानाने तुम्ही सत्तेच्या खुर्चीत विराजमान व्हाल. त्यामुळे जनतेची कामे विनासायास होतील.
पुन्हा एकदा माधवी जाधव, अनिकेत मोहिते ह्यांना मानाचा कडक जयभीम.!

अरुण निकम.
9323249487.
दिनांक …31/01/2026.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!