देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

खरच टिळक एवढे मोठे होते काय ?- एस एम मुश्रीफ


आय पी एस (निवृत्त)
माजी पोलीस महानिरीक्षक

नुकताच १ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे टिळक जयंती निमित्त एक मोठा कार्यक्रम झाला. प्रत्येक वर्षी देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधानाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे हस्ते देण्यात आला व त्याला नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी मिळाली.
१९८३ पासून प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देशाच्या प्रगती, विकास आणि राष्ट्रसेवा यांमध्ये असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. आजपर्यंत ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला त्यामध्ये एस्.एम्. जोशी, अटल बिहारी वाजपेयी, श्रीपाद अमृत डांगे, सॅम पिट्रोडा, मनमोहन सिंग, टी.एन्. शेषण, प्रणव मुखर्जी, सुधा मूर्ती, नरेंद्र मोदी वगैरेंचा समावेश आहे. हा पुरस्कार दुसऱ्या एखाद्या प्रसिध्द व्यक्तींच्या हस्ते देण्यात येतो. दरवर्षी टिळक जयंतीला न चूकता हा कार्यक्रम केला जातो व त्याला महाराष्ट्रात व देशभर भरपूर प्रसिध्दी देण्यात येते. यामागे टिळकांचे मोठेपण अधोरेखित करणे व ते जनतेच्या मनावर कायम स्वरूपी बिंबविणे हाच उद्देश असावा असे दिसते. मग प्रश्न पडतो की, दरवर्षी इतका मोठा कार्यक्रम करणे व दरवर्षी त्यांच्या नावाचा पुरस्कार देशातील मोठमोठ्या व्यक्तींना देणे, त्यांचे पुतळे बसविणे,अनेक संस्थांना, रस्त्याने, चौकाना त्यांचे नाव देणे इतके टिळक मोठे होते काय? त्याचे उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करू.
टिळकांच्या सर्व चरित्रांमध्ये परिमला राव यांनी लिहीलेले इंग्रजीतील चरित्र Foundation of Tilak’s Nationalism – Disrimination, Education and Religion हे जास्त वास्तववादी आहे. (येथून पुढे आपण संक्षिप्तमध्ये त्याला FoTN असे म्हणू). इतर चरित्रकारांनी टिळकांचे दोष जाणिवपूर्वक झाकून ठेवले आहेत. पण परिमला राव यांनी (त्या स्वत: ब्राह्मण असून सुध्दा) टिळकांचे सर्व गुण-दोष स्पष्टपणे नमूद केलेले आहेत. टिळकांचे चरित्र लिहीण्यापूर्वी त्यांनी टिळकांच्या केसरी या मराठी व दि मराठा या इंग्रजी वर्तमानपत्रांचे महत्वाचे अंक एकत्र केले होते. पण त्या आंध्र प्रदेशच्या असल्यामुळे त्यांना मराठी येत नव्हते. म्हणून त्यांनी केसरीचे अंक इंग्रजीत भाषांतर करण्यासाठी कांही मराठी अनुवादकांकडे दिले. त्यानी भाषांतर केलेच नाही, उलट परिमला राव यांना टिळकांचे वस्तुनिष्ठ चरित्र लिहीण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. कित्येक महीने त्यानी अंक ठेवून घेतले व ते परतही केले नाहीत.(हे लोक कोण असतील याचा आपण अंदाज करु शकतो).

त्यामुळे नाईलाजाने लेखिकेने मुख्यत्वेकरून दि मराठा या टिळकांच्या इंग्रजी वर्तमानपत्रातील माहिती व इतर काही पुरावे या आधारे हे पुस्तक लिहीले आहे.पुस्तकाच्या प्रस्तावनेतच लेखिकेने ही माहीती दिली आहे. या पुस्तकातील मजकूराचा व इतर पुराव्यांचा आधार घेऊन टिळकांच्या विचारांचे व कार्याचे एक एक पैलू आपण उघडत जाऊ.
१) अस्पृश्यांच्या शिक्षणाला विरोध
त्या काळी अस्पृश्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना कोणत्याही शाळेत प्रवेश नव्हता. महात्मा फुले यांनी पाठपुरावा केल्यानंतर इंग्रज सरकारने अस्पृश्यांना शाळेत प्रवेश देणे सुरू केले. त्याला टिळकांचा प्रखर विरोध होता. ‘द मराठा’ या इंग्रजी वर्तमानपत्राच्या दि. २६ मार्च १८८२ च्या अंकात त्यांनी “Mahar boys in Govt School” या नावाचा अग्रलेख लिहीला. त्यांत त्यांनी लिहीले की, “इंग्लंडच्या राणीने १८५८ मध्ये जो जाहीरनामा काढला आहे त्यामध्ये त्यांनी आपण भारतीयांच्या धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करणार नाही असे आश्वासन दिले आहे व आता इंग्रज सरकार अस्पृश्यांना शाळेत प्रवेश देत आहे. ही आमच्या धार्मिक बाबतीत ढवळाढवळ आहे”. याचा अर्थ टिळकांच्या मते अस्पृश्यांना शिक्षण देणे हे धर्माच्या विरूध्द होते.

२) इतर बहुजनांच्या इंग्रजी शिक्षणाला विरोध
इतर बहुजनांच्या बाबतीत टिळकांचे मत होते की, त्यांना फार तर लिहिता-वाचता येण्याइतके जुजबी प्राथमिक शिक्षण द्यावे; इंग्रजी किंवा उच्च शिक्षण देऊ नये. जेव्हा इंग्रज सरकारने सर्वांना उच्च शिक्षणाची दारे उघडी केली त्यावेळी टिळकांनी ‘द मराठा’ च्या दि. १५ मे १८८१च्या अंकात ‘Our Education System’ या नावाचा अग्रलेख लिहून ब्रिटिशांच्या शिक्षण विषयक धोरणांवर टिका केली. त्या लेखात ते म्हणतात “सर्वांनाच इंग्रजी शिक्षण दिले तर शेतकऱ्यांचा नांगर कोण चालविणार? लोहाराचा भाता कोण चालविणार? चांभाराची रापी कोण चालविणार? या पारंपारिक व्यावसायिकांच्या मुलांना उच्च शिक्षण दिल्यास हातातोंडाला आलेली मुले त्यांच्या वयस्कर आई-वडिलांपासून दूर लोटल्यासारखे होईल व पुढे ही मुले नोकरीसाठी आपल्याच (सरकारच्याच) मागे लागतील”. थोडक्यात बहुजनांनी आपापला पारंपारिक व्यवसायच करावा, त्यांनी उच्च शिक्षण घेऊन इतर क्षेत्रात प्रगती करू नये असे टिळकांचे मत होते.
अशाच प्रकारचे विचार त्यांनी कोल्हापूर जवळ अथणी येथिल सभेत व्यक्त केले होते. जेव्हा इंग्रज सरकारने विधीमंडळात बहुजनांचे प्रतिनिधी पाठविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अथणीच्या सभेत टिळक म्हणाले होते “कुणब्यांना विधीमंडळात जाऊन नांगर चालवायचा आहे काय? तेल्यांना घाणा चालवायचा आहे काय? शिंप्यांना कपडे शिवायचे आहेत काय? लोहाराला भाता चालवायचा आहे काय?” यावरून टिळक हे बहुजन-उध्दारणाच्या किती उलट होते हे स्पष्ट होते.

३) स्त्री शिक्षणाला विरोध
टिळकांचा स्त्रीयांच्या शिक्षणाला तिव्र विरोध होता. त्यांनी पुणे नगरपालीकेच्या स्त्री शिक्षण विषयक ठरावाला विरोध केला होता हे सर्वश्रृतच आहे. त्यांनी ‘द मराठा’ च्या दि. ७ सप्टेंबर १८८७ व दि. १८ सप्टेंबर १८८७ च्या अंकात ‘Higher Female Education’ आणि ‘Cirriculum of the Female High School; Is it in the right direction?’ हे दोन लेख लिहिले. त्यात ते म्हणतात “शिक्षित महिला या रखमाबाई (त्यावेळची एक समाज सुधारक महिला) व रमाबाई (रानडे) यांच्या सारख्या स्वतंत्र बाण्याच्या व स्वतंत्र विचारांच्या होतील व त्या वैदिक धर्म पाळणार नाहीत व सनातनी धर्माच्या रिती-रिवाजांना विरोध करू लागतील.”
टिळकांचे स्त्री विषयक धोरण हे अत्यंत सनातनी होते. दि. १२ फेब्रुवारी १८८२ च्या ‘द मराठा’ च्या अंकात ते म्हणतात की पेशवाईच्या काळात जे स्त्री विषयक धोरण होते ते योग्य होते. पेशवाईच्या काळाचा आपण विचार केल्यास असे दिसून येते की वडिल किंवा भाऊ यांचेवर मुलींचे लग्न ९ वर्षे वयाच्या पूर्वी करण्याचे बंधन होते. त्यांनी ९ वर्षापर्यंत मुलीचे किंवा बहिणीचे लग्न न केल्यास त्यांना जबर शिक्षा होती. यासबंधी नाना फडणवीस यांनी २० आदेश काढले होते. मुलींचे लग्न लवकर न केल्याबद्दल व विधवांशी सहानुभुतीने वागल्याबद्दल किंवा त्यांचे केस वपन न केल्याबद्दल अनेक पुरूषांना शिक्षा झाल्या होत्या. टिळकांना अशा प्रकारचे स्त्री विषयक धोरण अभिप्रेत होते.

४) शेतकरी विरोधी धोरण
पेशवाईमध्ये बहुतेक सावकार ब्राह्मण होते व ते शेतकऱ्यांचे शोषण करीत. दुष्काळ पडला तरी शेतकऱ्यांना सावकाराला कर्जाचे हप्ते देणे बंधनकारक होते. त्यांनी हप्ते दिले नाहीत तर त्यांना कैदेची शिक्षा होती. ब्रिटिशांनी ही पध्दत बंद केली. त्याला टिळकांनी कडाडून विरोध केला. कर्जाचे हप्ते न देणाऱ्या शेतकऱ्यांना कैदेत टाकण्याची पध्दत बंद केली तर सावकार बरबाद होतील असे त्यांना वाटत होते. त्यांच्या मते सावकार हे शेतकऱ्यांचे देव आहेत (‘द मराठा’ दि. ३ डिसेंबर १८८२). त्यांनी सतत सावकारांची बाजू घेतली व शेतकऱ्यांना विरोध केला. शेतीची सुधारणा करण्याच्या व शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून कृषी बँक स्थापन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना टिळकांनी प्रखर विरोध केला (‘द मराठा’ दि. ६ मार्च १८८१, २६ मार्च १८८१, ८ मे १८८१, १५ मे १८८१, २९ मे १८८१, ५ जून १८८१, २६ जून १८८१, ३१ जुलै १८८१).
FoTN च्या लेखिका परिमला राव यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे की, टिळक हे 40 वर्षे बहुजन व महीला यांच्या शिक्षणाविरूध्द व २५ वर्षे शेतकर्‍याविरूध्द सतत भूमिका घेत असतानासुध्दा ही बाब त्यांच्या कोणत्याही चरित्रात कशी आली नाही. परिमला राव यांना काय माहित की ही सर्व चरित्रे ब्राह्मण्यवाद्यांनीच लिहीली आहेत. (परिमला राव यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशकावर दबाव आणून ब्राह्मण्यवाद्यांनी त्याची छपाई कायमची बंद केली आहे.)
५) स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याबाद्दल टिळकांना एकदाही अटक नाही किंवा शिक्षा नाही
टिळकांनी एकाही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही व त्याबद्दल त्यांना एकदाही अटक झाली नाही किंवा एकही शिक्षा झाली नाही. त्यांना एकूण चार वेळा अटक झाली, पण ती वेगळ्या कारणांसाठी होती. त्यापैकी तीन प्रकरणी त्यांना शिक्षा झाली व एका केस मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली. त्या संबंधीची माहिती खालील प्रमाणे:
अ) जातीच्या खोट्या धार्मिक भावना भडकावून प्लेग कमिशनर रँड यांच्या खूनाच्या चिथावणी दिली.
एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस पुण्यामध्ये प्लेग या रोगाने थैमान घातले होते व त्यामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडत होते. त्याला आळा घालण्यासाठी प्लेग कमिशनर म्हणून वॉल्टर चार्लस रँड या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची खास नेमणुक झाली होती. प्लेग या रोगाचा प्रसार उंदीर व डास यामुळे होत असल्यामुळे रँड ने प्रत्येक घरामध्ये उंदीर व डास मारण्याचे औषध फवारण्याचे काम सुरू केले होते. जेथे विरोध झाला तेथे बळाचा वापर करून त्याने हे काम केले. त्याने तसे केले नसते तर पुण्यात आणखी हजारो लोक मेले असते. पण टिळकांनी रँडच्या कारवाईला जोरदार विरोध केला. हे काम करीत असताना ब्राह्मणांच्या देवघराची व स्त्रीयांची विटंबना होते असे त्यांचे मत होते व या कामी महार सैनिक वापरले जातात याचा त्यांना सक्त विरोध होता. त्यासंबंधी टिळकांनी केसरी मध्ये तीन व दि मराठा मध्ये एक अग्रलेख लिहिले व ब्राह्मण जातीच्या खोट्या धार्मिक भावना भडकावून हिंसाचाराला चिथावणी दिली. त्याचाच परिणाम म्हणून दामोदर चापेकर व बाळकृष्ण चापेकर या दोन ब्राह्मण बंधूंनी दि. १७ जून १८९७ रोजी रँडची गोळी घालून हत्या केली. या खूनाला चिथावणी दिली म्हणून टिळकांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला व त्यात त्यांना १८ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली.
ब) एका व्यक्तीचे बनावट फोटो केसरीमध्ये छापले
कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे हे संस्थानचे दत्तक राजपुत्र यांना वेडा ठरविण्यासाठी कारस्थाने करीत आहेत असा दोषारोप करणारी लेखमाला केसरीतून प्रसिध्द झाली होती. हा आरोप बर्वे यांनी फेटाळला व त्यांना बदनाम करण्यासाठी वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेली पत्रे बनावट आहेत असा दावा करून त्यांनी केसरीचे संपादक व प्रकाशक यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा निकाल दि. १७ जुलै १८८२ रोजी उच्च न्यायालयात लागला व टिळकांना चार महिने तुरूंगवासाची शिक्षा झाली.
क) ताई महाराज प्रकरणी कोर्टात खोटी साक्ष दिली व खोटी कागदपत्रे सादर केली
पुण्याच्या सरदार बाबा महाराज यांनी टिळक, जी. एस्. खापर्डे वगैरेंची आपल्या प्रॉपर्टीचे ट्रस्टी म्हणून १८९७ साली नेमणुक केली. त्यांच्या मृत्युनंतर १९०१ मध्ये बाबा महाराजांच्या विधवा ताई महाराज यांना घेऊन ट्रस्टी औरंगाबादला गेले व तेथे त्यांच्याच घराण्यातल्या एका मुलाला दत्तक घेण्यास त्याना भाग पाडून दत्तकविधान विधी पार पाडला. पण पुण्याला परत आल्यानंतर ताई महाराज व ट्रस्टी यांच्यात वाद झाला. ताई महाराजांनी औरंगाबाद येथिल दत्तक विधान वैध नाही अशी तक्रार करून ते रद्द केले व पुणे येथे दुसरा मुलगा दत्तक घेतला. तसेच त्यांनी टिळकांना दिलेले इच्छापत्राचे अधिकार (प्रोबेट) रद्द करण्यासाठी दावा केला. त्या दाव्याच्या सुनावणीच्या वेळी टिळकांनी खोटी साक्ष दिली व बनावट कागदपत्रे सादर केली असा टिळकांवर आरोप करण्यात आला व या प्रकरणी कोर्टात केस चालून त्यांना १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. सत्र न्यायालयाने ती कमी करून ६ महीने केली. पण हायकोर्टात ती रद्द झाली.
ड) मुझफ्फरपूर (बंगाल) येथिल १९०८ चे बॉम्बस्फोट प्रकरण
दि. ३० एप्रिल १९०८ रोजी बंगालमधील मुझफ्फरपूर येथे खुदीराम बोस व प्रफुल्ल चक्रवर्ती या दोन तरूणांनी बॉम्बस्फोट केला. त्यात दोन ब्रिटीश महिलांचा मृत्यु झाला. त्यामुळे ब्रिटीश सरकार हादरून गेले. टिळकांनी दि. १६ मे रोजी केसरीमध्ये या विषयासंबंधी ‘देशाचे दुर्देव’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहीला. त्यामध्ये त्यांनी ‘’बॉम्बस्फोटाने हवा तो उद्देश साध्य केला,” “रशियामध्येही बॉम्बस्फोट फेकल्यावर हीच गोष्ट घडली होती,” “पण बेत तडीस नेण्याची धडाडी व कौशल्याचा विचार करता बंगालमधील बॉम्बवाल्यापेक्षा चापेकर बंधू वरच्या श्रेणीत बसतात” अशी वाक्ये लिहीली होती. अशा प्रकारचे लिखाण हे बॉम्बस्फोटाला उत्तेजन देणारे आहे व तो राजद्रोह आहे या आरोपाखाली त्यांचेवर खटला भरण्यात आला व त्यात त्यांना ६ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. टिळकांना झालेल्या फक्त या शिक्षेला देशभक्तीची थोडी किनार आहे असे फार तर म्हणता येईल.

६) ब्राह्मण टिळकांचा उदो उदो का करतात?
टिळकांचे कोणत्याही क्षेत्रातील काम तसे महान नाही. तरी सुध्दा सर्व ब्राह्मण त्यांचे दोष लपविण्याचा व त्यांचे उदात्तीकरण करण्याचा सतत प्रयत्न का करीत असतात असा प्रश्न पडतो. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्य शोधक समाजाच्या चळवळीत मिळू शकते.
महात्मा जोतीराव फुले हे पहीले समाज सुधारक होते की ज्यांनी बहुजन व दलीत यांना पटवून दिले की, त्यांच्या हजारो वर्षांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक मागासलेपणासाठी फक्त विषमतावादी ब्राह्मणी व्यवस्थाच कारणीभूत आहे. त्यांनी सांगितले की, ब्राह्मणांनी स्वत:च धर्मशास्त्रे लिहून ती देवाने लिहीली आहेत असा भोळ्या भाबड्या बहुजन समाजाचा गैरसमज करून दिला आहे. या धर्मशास्त्राप्रमाणे शूद्रांना शिक्षणाचा व धन-संचय करण्याचा अधिकार नाही असे सांगून ब्राह्मणांनी त्यांना शिक्षणापासून व धनापासून वंचित ठेवले व त्यांना कर्मकांडात गुंतवून संपूर्णपणे गुलाम बनविले. आपल्या ‘गुलामगिरी’ या ग्रंथात म. फुले यांनी हे स्पष्टपणे लिहून बहुजनांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली व अनेक पुस्तके. पोवाडे, गाणी, नाटके, मेळे याद्वारे बहुजन समाजाचे प्रबोधन केले. पहिल्यांदाच बहुजन समाज जागृत झाला व ब्राह्मणांविरूध्द बंड करू लागला.
सत्यशोधक समाजाच्या या झंझावातामुळे ब्राह्मण समाजात भीतीचे वातावरण परसले. ही चळवळ जर देशभर पसरली आणि हजारो वर्षाच्या आपल्या हाल अपेष्टांसाठी ब्राह्मणच कारणीभूत आहेत हे जर सर्वसामान्य हिंदुंना पटले तर ते आपल्याला सोडणार नाहीत व आज ना उद्या, विशेषत: ब्रिटीश भारत सोडून गेल्यानंतर, त्याचा बदला जरुर घेतील अशी त्यांना भीती वाटू लागली. या संकटातून मार्ग शोधण्यासाठी ब्राह्मण्यवादी म्होरके व विचारवंत यांच्यात खलबते होऊ लागली. आपण केलेले अन्याय व जूलूम सर्वसामान्य जनता विसरून जाईल व समाजावरील आपले वर्चस्व कायम राहील असा उपाय ते शोधू लागले. त्यावेळी टिळकांच्या डोक्यात एक अफलातून कल्पना आली. ती म्हणजे बहुजन जनतेचे लक्ष परिवर्तनवादी चळवळीपासून विचलीत करण्याचा एकच मार्ग आहे व तो म्हणजे हिंदु मुस्लिम यांच्यात वाद निर्माण करून बहुजनांना मुस्लीमांच्या मागे लावणे. यासंबंधी ते विचार करीत असतानाच १८९० साली म. फुलेंचे निधन झाले. त्यामुळे टिळकांचा मार्ग सोपा झाला व ते त्वरीत कामाला लागले. आपला उद्देश त्यांनी खालीलप्रमाणे साध्य केला :
जातीय दंगलीच्या खोट्या व भडक बातम्या
१८९० मध्ये कल्याण येथे मोहरमचे ताबूत व ताजिया बसविलेल्या भागातून बालाजीची मिरवणुक नेण्याच्या आग्रहावरून निर्माण झालेला जातीय तणाव, १८९० मध्ये बेळगांव येथे होळी-रंगपंचमीच्या वेळी मिरवणुकीच्या मार्गाच्या मुद्यावरून झालेली हिंदु-मुस्लिम दंगल, १८९३ मध्ये उत्तर-पश्चिम प्रांतातील बालीया व आझमगड येथिल दंगली, जुनागढ़ (सौराष्ट्र) येथिल प्रभासपट्टम येथे गो-रक्षकांच्या अति उत्साही मोहीमेमुळे झालेली दंगल, त्याचा परिणाम म्हणून गो-रक्षक समितीच्या चिथावणीमुळे मुंबईत ऑगस्ट १८९३ मध्ये झालेली मोठी दंगल, १८९३/९४ मध्ये येवला जि. नाशिक येथे मिरवणुकीच्या मार्गावरून झालेली दंगल याच्या भडक व अतिशयोक्तीपूर्ण बातम्या टिळक हे आपल्या द मराठा व केसरी या वर्तमानपत्रात देत असत (दि मराठा १२ जाने १८९०, ७ सप्टें १८९०, ५ ऑक्टो १८९०, २० ऑगस्ट १८९३, २७ ऑगस्ट १८९३, २२ ऑक्टो १८९३, १८ मार्च १८९४, ११ नोव्हे १८९४, १८ नोव्हे १८९४; केसरी १५ ऑगस्ट १८९३; Home/Public ऑक्टो १८९३, जून १८९४, सप्टें १८९४).
मशीदीसमोर वाद्य वाजविण्यास चिथावणी
बेळगाव येथे १८९० मध्ये झालेल्या दंगलीचा अभ्यास केल्यानंतर दंगल कशी सुरू होते व कशी वाढते यासंबंधीचे बारकावे टिळकांच्या लक्षात आले व त्यानंतर त्यांनी हिंदुच्या मिरवणुकीचे मार्ग व मुस्लीमांच्या प्राथनास्थळासमोर वाद्ये वाजविण्याचा मुद्दा यासंबंधी सविस्तर विचार करुन पुढील रणनीती तयार केली (FoTN पान न १९१). त्यानंतर त्यांनी हिंदुंना मशीदीसमोर वाद्ये वाजविण्याचा हक्क आहे असे वारंवार दि मराठा मध्ये लिहीण्यास सुरुवात केली व हिंदु तरूणांना मशीदीसमोर वाद्य वाजविण्यासाठी चिथावणी देत राहीले [दि मराठा २२ ऑक्टो १८९३, २५ मार्च १८९४, २९ एप्रिल १८९४, २० मे १८९४, २६ ऑगस्ट १८९४, १६ सप्टें १८९४, २३ सप्टें १८९४, १६ डिसेंबर १८९४, २७ ऑक्टो १८९४ वगैरे;
London Times : ‘Indian Affairs, Hindu Mahomedan’ (दि मराठा च्या १६ डिसेंबर १८९४ च्या अंकात याचा उल्लेख आहे);
Embree : ‘India’s search for National Identity’, page 34, 35]. टिळकांच्या या चिथावणीमुळे हिन्दु-मुस्लीम दंगे होतील असा इशारा गोखले व रानडे यांनी टिळकांना दिला होता (FoTN पान 203; Walpert: ‘Tilak and Gokhale’ पान 66). पण टिळकांनी त्यांचे न ऐकता आपले काम सुरूच ठेवले.याचा परिणाम व्हायचा तोच झाला व प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रभर जातीय दंगली होऊ लागल्या. (FoTN पान न १९१) या सततच्या जाणीवपूर्वक घडवून आणलेल्या दंगलीमुळे बहुजन आपली हजारो वर्षांची गुलामगिरी विसरले व मुस्लिमांना ते आपला शत्रू मानू लागले. अशा रितीने म. फुलेंच्या सत्यशोधक चळवळीच्या झंझावातातही ब्राह्मणांचे ब्राह्मण्य टिकून राहीले. हे टिळकांमुळे शक्य झाले असे ब्राह्मणांना वाटते व म्हणून ते टिळकांना देव मानतात.
टिळकांच्या मृत्युनंतर काही वर्षांनी त्यांचे पट्टशिष्य डॉ. हेडगेवार यांनी १९२५ साली आर्.एस्.एस्. ची स्थापना केली व हिंदु-मुस्लिम तणाव वाढविण्याचे टिळकांचे काम पुढे चालू ठेवले. देशात झालेल्या अनेक हिंदु-मुस्लिम दंगली, रामजन्मभूमी रथयात्रा, बाबरी मशीद विध्वंस, वगैरे त्याचाच परिणाम आहे. याच तंत्राचा वापर करून आर्.एस्.एस्. व बी.जे.पी. ने केंद्रात व अनेक राज्यांत सत्ता प्राप्त केली आहे.

७) जाती व्यवस्थेचे कट्टर समर्थक
हिंदु धर्मातील जात व्यवस्थेबाबत टिळकांची मते खालील प्रमाणे होती
1) जात व्यवस्थेची अंमलबजावणी न करून उच्च जातींचे श्रेष्ठत्व राखण्यात व कनिष्ठ जातींवर मर्यादा घालण्यात अपयशी ठरल्याबद्दल ते इंग्रज सरकारवर टीका करीत असत (दि मराठा २१ ऑगस्ट १८८१).
2) १८५८ च्या जाहीरनाम्यात इंग्लंडच्या राणीने धार्मिक बाबतीत ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन दिले होते. पण ब्राह्मणेतरांना इंग्रजी शिक्षण देऊन व मुलींना इंग्रजी, गणित व सायन्स यांचे शिक्षण देऊन त्यांनी या आश्वासनाचा भंग केला आहे, असे टिळकांचे मत होते. (द मराठा २१ ऑगस्ट १८८१, २६ मार्च १८८२, केसरी १० मे १८८७)
3) त्यांच्या मते सुधारणावादी नेत्यांनी जाती व्यवस्था नष्ट केली आहे व त्यामुळे ते हिंदु राहीलेले नाहीत. (दि मराठा २२ मार्च १८९१)
4) वेदांचे शिक्षण सर्व जातींच्या मुलांना देण्याचा आर्य समाजाचा आग्रह म्हणजे हिंदु धर्म नष्ट करण्यासारखे आहे असे टिळकांना वाटे(FoTN पान197)
अशा प्रकारे टिळक हे जाती व्यवस्थेचे कट्टर समर्थक होते. म्हणजेच ते कट्टर ब्राह्मणवादी होते.

८) टिळकांची स्वराज्याची व्याख्या
“स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे व तो मी मिळवणारच” हे टिळकांचे वाक्य सुप्रसिध्द आहे. पण टिळकांची स्वराज्याची व्याख्या आपण समजतो तशी नसून ती वेगळी होती. टिळकांच्या मते जात व्यवस्था हा हिंदु राष्ट्रीयत्वाचा पाया आहे व हिंदु समाजाची ही व्यवस्था आंतून नियंत्रित करण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच स्वराज्य (दि मराठा १० जुलै १८८१, १० मे १८९१, २६ एप्रिल १८९१ व ६ मार्च १८९२). हि टिळकांची स्वराज्याची व्याख्या अधिक स्पष्ट करण्यासाठी FoTN च्या लेखिकेने दि मराठाच्या वरील अंकांचा संदर्भ देऊन या संबंधीचे जे इंग्रजी वाक्य त्यांच्या पुस्तकाच्या पान न. २८२ व २८३ वर लिहीले आहे ते मी जसेच्या तसे देत आहे: “Tilak considered ‘caste as the basis of Hindu nationality and the right to control Hindu society from within was Swaraj.’” थोडक्यात, टिळकांच्या मते जात व्यवस्था कायम टिकवून ठेवण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच स्वराज्य. पण जात व्यवस्था मान्य करणे म्हणजे ब्राह्मणांचे वर्चस्व मान्य करणे. याचाच अर्थ टिळकांच्या मते स्वराज्य म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेचे राज्य.

९) टिळकांचे मोठेपण टिकविण्यासाठी ब्राह्मणांची जिद्द व चिकाटी
टिळक हे उघड उघड दलीत विरोधी, बहुजन विरोधी, शेतकरी विरोधी, महिला विरोधी होते; ते हिन्दु-मुस्लीम दंगलीनां जाणीवपूर्वक चिथावणी देत होते; त्यांनी कोणत्याही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नव्हता. तरीसुद्धा ब्राह्मणांनी त्यांना ‘लोकमान्य’ केले व त्यांचा ते नेहमी उदो उदो करतात, कारण
महात्मा फुलेंच्या सत्यशोधक झंझावातातून टिळकांनीच आपले ब्राह्मण्य टिकविले असा त्यांचा ठाम विश्वास आहे. तसेचआज देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वगैरे सर्वच क्षेत्रात ब्राह्मण्यवाद्यांनी जे वर्चस्व प्रस्थापित केले आहे त्याचे श्रेय ते टिळकांनाच देतात. त्यामुळे ब्राह्मण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असले व त्यांची इतर विषयावर काहीही मते असली तरी टिळकांच्या बाबतीत त्यांचे एकमत असते.
मी गेल्या २० वर्षांपासून परिवर्तनवादी चळवळीशी जोडला गेलेलो आहे. या चळवळीशी संबंधीत अनेक पुरोगामी ब्राह्मणांच्या मी संपर्कात आलो. त्यांच्याशी चर्चा करताना जाणवते की ते इतर सर्व बाबतीत पुरोगामी असू शकतील पण टिळकांच्या विषयावर ते समझौता करीत नाहीत. एकतर ते नुकत्याच झालेल्या समारंभात अजित डोवाल यांनी म्हटल्याप्रमाणे “टिळकांचे विचार समजून घेण्यासाठी त्यांच्या काळाची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे”, असे काही तरी बोलून टिळकांच्या विचारांचे समर्थन करतात किंवा तो विषयच टाळतात. काहीही असले तरी टिळकांचे सर्व दोष झाकून त्यांचा मोठेपणा अबाधित ठेवण्याबद्दलची ब्राह्मणांची जिद्द व चिकाटी अचंबित करणारी आहे.

पुणे (एस्.एम्. मुश्रीफ)
दि. १२ ऑगस्ट २०२६

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!