
“मंदिर म्हणजे नुसतेच ब्राम्हण भट पुरोहितांचे पोट भरणारे कारखाने नाहीत तर गाडी पार्किंग वाला, फळ, प्रसाद, वस्तू विकणारे, चपरासी, गार्ड, पुजारी, सफाई कर्मचारी, मंदिराचा जीर्णोद्धार करणारा गवंडी आणि त्याचे सहकारी, गंध लावणारी मुलं, आणि हॉटेल मालक, इत्यादि मंदिर परिसरातील या सगळ्या व्यवसायिकांची पोटे मंदिरामुळेच भरत असतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे.” अशा अर्थाचे प्रतिपादन अंधभक्त मंडळींकडून केले जाते.
या विश्लेषणात मोठी लबाडी आहे. यांद्वारे मानसिक गुलाम बनवणाऱ्या धार्मिक प्रथा व रीतीरिवाज यांचे हुशारीने समर्थन केले आहे. नास्तिक व विचारवंत अभ्यासक सोडून सामान्य जनतेला ते योग्य देखील वाटू शकते. मुळात ज्यांचे देवळात हितसंबंध गुंतलेले आहेत अशी पिलावळच असे समर्थन करू शकते. खरे तर मंदिरामुळे मिळणारा रोजगार हा विकास विरोधी असून माणसाला वैचारिकदृष्ट्या मागास ठेवणारा असतो.
जरा खोलात जाऊन विचार केल्यास लक्षात येते कि, समाजातील गरिबाला गरीब, अज्ञानी, अवलंबित, मागास ठेवण्याची व्यवस्था कायम ठेवण्यासाठी ही धडपड आहे. कारण देवळे , मंदिरे चालू राहिली तर सांस्कृतिक पिळवणूक, जात, धर्म व्यवस्था बळकट होऊन शोषण अबाधितपणे चालू राहते. या शोषणाचा ज्यांना सरळ सरळ फायदा, लाभ मिळतो ते असे समर्थन करणारच !
तथापि , करोना काळात जे देवळाच्या परिसरात व्यवसाय करणारे खरे व्यवसायिक होते त्यांनी देवळाच्या व्यवसायावरच अवलंबून न राहता भाजीविक्रेत्यापासून किराणा मालाच्या वितरण व्यवस्थेपर्यंत अनेक नवीन व्यवसाय सुरू करून उत्तमरीत्या आपला चरितार्थ चालवला. त्यामुळे देवळाच्या परिसरातील व्यावसायिक (ज्यांची प्रारंभी भलामण केली आहे !) फक्त देवळावर अवलंबून नाहीत , हे लक्षात यावे. पण जे आळशी फक्त देवळावरच अवलंबून आहेत त्यांची मात्र कोरोना काळात बोंब उडाली हे नक्की ! यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुजारी वर्ग आणि मंदिर व्यवस्थापनाने नेमलेला पगारी वर्ग होता.
त्याचप्रमाणे मंदिरांमुळे ज्यांना रोजगार मिळतो त्यांची आणि मंदिरांमुळे ज्यांना लुटले जाते त्या भक्तांची संख्या पाहिली तर लुटले गेलेल्या भक्तांचीच संख्या अमाप आहे, हे लक्षात येते. विशेष म्हणजे या अमाप लोकांपैकी अनेकजण शिक्षण आणि आरोग्यासाठी पैसा खर्च करू शकत नाहीत. त्या लोकांनी असेच अंधश्रद्ध राहावे आणि त्यांच्यामध्ये नवा विचार वा पर्याय उभा राहू नये यासाठीच ‘मंदिरामुळे अनेक लोकांना रोजगार मिळतो’ अशी कोल्हेकुई करण्याचे हे षडयंत्र आहे. यात लोकांच्या धार्मिक अस्मितेला फुंकर घालून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी धर्मांध गुडघ्याला बाशिंग बांधून एका पायावर तयार आहेतच !
तेव्हा सामान्य जनहो ! जागे व्हा आणि या षडयंत्राला बळी पडू नका !!
उठसुठ संतांचे दाखले देणारे तथाकथित देवभक्त ‘भाव तोचि देव’ हे संत वचन विसरले काय ? किंवा सतत ‘देव चराचरात असतो …कणाकणात असतो’, असे तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांना मात्र आता ‘देव फक्त देवळात असतो’, असे वाटायला लागले काय काय ? गाडगे बाबा म्हणायचे, ‘देवळात देव नसते तर पुजाऱ्याचे पोट असते.’ हे आपण केव्हा लक्षात घेणार ? आणि कुठपर्यंत या किडूकमिडूक अर्थव्यवस्थेचे समर्थन करत बसणार ?
आज अनेक बड्या देवळामध्ये अब्जावधी रुपयांची संपत्ती कुजत पडलेली आहे. ती एवढी प्रचंड आहे कि , त्यांत भारताचे अनेक अर्थसंकल्प तयार होऊ शकतात ! ही संपत्ती कुठल्याही प्रकारे अर्थव्यवस्थेला चालना देत नाही. दुसरीकडे आपण पाहतो कि , आता राम मंदिरापासून अनेक देवळामध्ये देवाच्या डोळ्यासमोर दानपेठ्या चोरल्या जात आहेत. अर्थात , ‘दानपेट्यांची चोरी करणारे बाहेर प्रचंड खर्च करतात, यावरून अर्थव्यवस्थेला चालना मिळते असे जर तुम्हाला म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी !’
— जगदिश काबरे (JK)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

