उष्माघातापासुन बचावासाठी

उष्माघातापासुन बचावासाठी नागरिकांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ
राज्यासह सांगली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून राज्यातील पुणे ,सांगली,सोलापूर,जळगांव,अकोला व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा तडाखा मोठया प्रमाणात जानवत आहे.रविवारचे सांगली जिल्हयाचे कमाल तापमान 39 अंशावर गेले होते.राज्यात यंदा मार्चच्या प हिल्या आठवडयातच उष्णतेची लाट आली असुन हा तडाखा मंगळवारपर्यंत राहणार असल्याची पूर्वसुचना भारतीय हवामान विभागामार्फत वर्तवली जात आहे. उष्णतेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊ नये, याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उष्णतेच्या काळात उष्माघात होऊ नये, याकरीता काय करावे व काय करु नये याबाबत मार्गदर्शक सुचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने निर्गमीत करण्यात येत आहे.
राज्यात बऱ्याच भागात उष्णतेचे प्रमाण वाढत असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तींला उष्माघात होण्याची शक्यता असल्याने तीव्र उन्हात फिरु नये तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे , ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये येथे उष्माघात कक्ष सुरू केले आहेत.
सांगली जिल्ह्यामध्ये यावर्षी मार्चच्या पहिल्याच आठवडयात तापमान 39 अंश इतके झाले आहे.माहे एप्रिल व मे मध्ये कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा 40अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट हि एक आपत्ती आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारी जिवित हानी लक्षात घेता उष्णतेमुळे होणारी हानी टाळणे करिता सांगली जिल्हयातील सर्व तालुक्यातील आरोग्य संस्थामार्फत व इतर शासकीय कार्यालये व संस्थांमार्फत उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे,ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये येथे उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. प्रत्येक कक्षात लागणाऱ्या प्राथमिक गरजेची पूर्तता करण्यात आली आहे.
सध्या शेतीची कामे सुरू असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात. त्यामुळे त्यांना उष्माघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते. अशा रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन या सह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारांसह होणारे दुष्परिणामाबाबत जन जागृतीही करण्यात येत आहे.
उष्माघात होण्याची कारणे : शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे,घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.
लक्षणे :मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे क्वचित लाल होणे, घाम न येणे, डि-हायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्त दाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था इ.अति जोखमीच्या व्यक्तीबालके, लहान मुले, खेळाडू,
सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदय रोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिडाचे विकार .
प्रतिबंधात्मक उपाय :वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे.,कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सूती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेरजाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे. पाणी भरपूरप्यावे. डि-हायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे.उन्हात बाहेर जाताना गॉगल्स डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादीचा वापर करावा.घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा. पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्याना सोडू नका. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.
उपचार : रुग्णास प्रथम सावलीत आणावे,रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत,
रुग्णाचे कपडे सैल करुन त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे.रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत. रुग्ण शुद्धीवर आसल्यास त्यास थंड पाणी, जल संजीवनी द्यावे व डि-हायड्रोशन टाळावे. चहा, कॉफी देवू नये . रुग्णाच्या काखेखाली आईस पॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्टया ठेवाव्यात .थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व ३६.८ सेल्सिअस तापमान होई पर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत.
सांगली जिल्हयात अध्याप उष्माघाताचा एकही रुग्ण आढळून आला नसुन कोणाला उष्माघाताचा त्रास जाणवू लागला तर नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व रुग्णास रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास १०८ ॲम्बुलन्ससाठी कॉल करावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत