‘हलाल’ आणि ‘झटका’ मटण

‘हलाल’ आणि ‘झटका’ मटण अथवा चिकन हा वाद मुळातच केवळ राजकीय पोळी भाजणाऱ्यांचा आहे. बहुसंख्य मांस विकणारे आणि मांस खाणारे यांना अशा राजकीय चिखलफेकीने काही फरक पडत नाही. तसा फरक पडत असता तर हलाल मांस विकणारी दुकाने गिऱ्हाईक नसल्याने बंद करावी लागली असती.
मुस्लीम धर्मातील कसाई जात ‘कस्साब’ या उर्दु शब्दापासून आली आहे. कस्बाब म्हणजे मांस कापणे, विक्री करणे हा पेशा. त्याचप्रमाणे हिंदू धर्मात खाटीक जात आहे. खाटिक हा शब्द संस्कृत मधील खट्टक (कौतिक) या शब्दापासून आला आहे. कसाई या शब्दाचे मराठी भाषांतर खाटीक असेही केले जाते.
तसे पाहता हिंदू खाटीक हे क्षत्रिय. परंतू पशूबळी आणि मांस विक्री व्यवसायामुळे त्यांना उर्वरित हिंदू जाती कनिष्ठ स्तराचे मानतात. याचप्रमाणे मुस्लीम धर्मात कसाई जात आली. मुद्दा इतकाच की, मुस्लीम धर्मातील कसाई व हिंदू धर्मातील खाटीक दोघेही पशूबळी देवून मांसविक्री करणारे लोक.
आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. मुळात मांसाची ‘झटका’ पध्दत म्हणजे सूऱ्याच्या एकाच झटक्यात संबंधित पशू अथवा पक्षाची मान शरीरापासून विलग करणे. एका झटक्यात मान कापल्याने बळीच्या शरीरातील संपूर्ण रक्त शरीराच्या बाहेर येत नाही. त्यामुळे मांस अधिक रुचकर होते. परंतू जास्त दिवस टिकत नाही. हे यामागील शास्त्रीय कारण.
झटका या पध्दतीचा उगम हिंदू धर्मात नसून याचा उगम शीख धर्मात २० व्या शतकात झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत मागे सविस्तर संशोधन केले होते. शीख धर्म हिंदू धर्मातीलच विभक्त झालेली शाखा. पण त्यांच्या नावे गळे काढणाऱ्यांनीच त्यांची पध्दती स्विकारली. आता याच पध्दतीचे राजकारण करुन स्वतःची पोळी भाजत आहेत.
आता मुद्दा ‘हलाल’ म्हणजे काय?
हलाल हा शब्द मूळचा अरबी (पर्शियन) आहे. हलाल शब्दाचा मराठीतील अर्थ ‘अधिकृत प्रमाणित / कायदेशीर परवानगी असलेले’ असा होतो. हलाल पध्दतीने पशूबळी दिला जाताना संबंधित पशूच्या गळ्यावर सुरा फिरवून संपूर्ण रक्त बाजूला काढले जाते.
आता सर्वात महत्वाचा मुद्दा…
“हिंदू देवतांना दिला जाणारा पशूबळी कोणत्या पध्दतीचा असतो?”
तर क्वचित अपवाद वगळता हिंदू धर्मातील देवतांना, गणांना दिला जाणारा पशूबळी हा झटका पध्दतीचा नसून हलाल पध्दतीचाच असतो. आजही गावगाड्यात, ज्या गावात मुस्लीम-कसाई नसतात तिथे मुस्लीम-मुलाणी जातीच्या व्यक्तीस हिंदू देवतांना व त्यांच्या गणांना बळी देण्यासाठी बोलावले जाते. त्याचे रितसर मानधन दिले जाते.
अगोदर मुस्लीम मुलाणी-कसाई बळी देतो. त्यानंतर संबंधित पशू सोलणे, स्वच्छ करणे, कापणे वगैरे कामे हिंदू खाटीक करतात. किंवा हिंदू यजमान करतात. त्यानंतर ठराविक अवयवांचा भाग शिजवून नैवेद्य विधी पार पडतो. उर्वरित मांस कुटुंबीय, भावकी, आप्तेष्ट, स्नेही यांना खाण्यासाठी दिला जातो. याबाबत प्रत्येक गावात, जातीत, भावकीत देवतानिहाय वेगवेगळ्या प्रथा आहेत. पण सर्वच ठिकाणी बळी हा मुस्लीम कसाई अथवा मुलाणी देतो.
अपवाद तुळजाभवानी! तुळजाभवानीला दिला जाणारा बळी हिंदू मानकरी देतो. दरवर्षी नवरात्राच्या शेवटी तुळजाभवानीचा जुना पलंग होमकुंडात समिधा म्हणून अर्पण केला जातो. त्याच होमकुंडात बोकडबळी दिला जातो. मात्र या बोकडाची मान कापली जात नाही. तर हा बोकड अर्ध्यातून कापून होमकुंडात समिधा म्हणूनच अर्पण करतात. याबाबत अनेक दंतकथा आहेत. पण तो पोस्टचा भाग नाही.
त्यामुळे हिंदू समाजाला सातत्याने काही लोकांकडून मूर्ख ठरवले जाते. त्यात २०१४ नंतर एकाच राजकीय पक्षाचे चमचे (थुंकीउचले) आघाडीवर आहेत.
आता या पोस्टवर घाईघाईने बोकडबळी चूक ठरवणारे धावून येतील. येताना संस्कृत सुभाषित आणतील…
अश्व नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।
अजा पुत्रो बलि दध्यात दैवो दुर्बल घातक।।
याचा अर्थ अस्मादिकांस ठाऊक आहे. घोडा नाही, हत्ती नाही, वाघ तर नाहीच नाही. बळी हा फक्त बोकडाचाच दिला जातो. त्या दुबळ्या प्राण्याला देव सुद्धा वाचवत नाही. तर हि संकल्पना चूक आहे.
आपले पूर्वज शहाणे होते. त्यांनी बळीसाठी बोकडच निवडला कारण बोकड हा प्राणी मादीच्या परवानगीशिवाय संभोग करतो. इतर प्राणी मादीच्या संमतीशिवाय संभोग करत नाहीत. माणूस वगळता! त्यामुळे बोकडबळी चूक ठरवणारांना गोड गोड पापा. बोकड बळी चूक नसून ‘गर्भार मेंढीचा’ (आटकुरी मेंढी) बळी दिला जातो ती प्रथा आसुरी आहे.
- तुषार गायकवाड
Tushar Gaikwad
🌹🌹🌹
हलाल #झटका #मटण #मांस #खाटीक #कसाई #बळी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत