दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

छ. शिवरायांची खरी जन्मतारीख कोणती?-अशोक सवाई

आपण इतिहासात मागे वळून पाहिले तर छ. शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा व त्यांच्या जन्म तारखेचा जेवढा घोळ व जेवढी अवहेलना ब्राह्मणी कलमकसायांनी करून ठेवली किंवा आपले वर्चस्व व मोठेपण दाखवण्यासाठी त्यांच्या इतिहासाची जेवढी मोडतोड केली तेवढी आजपर्यंत कोणत्याही महापुरुषांची झालेली नाही. हे प्रकर्षाने जाणवते. नुसता छ. शिवरायांचाच नाही तर एकूण संपूर्ण भारताच्या इतिहासाची मूठभर ब्राह्मण्यवाद्यांनी मोडतोड करून ठेवली आहे. आणि त्या खोट्या इतिहासाचे वाहक आजपर्यंत आपण बहुजन ठरत आलो आहोत. कारण आपल्यावर तेव्हा शिक्षणाची बंदी घालण्यात आली होती. पण जेव्हा काळाने आपली कुस बदलली आणि ११ एप्रिल १८२७ रोजी महात्मा फुले जन्माला आले. पुढे त्यांनी बहुजनांसाठी शिक्षणाची दारे उघडली तेव्हा बहुजन हळूहळू शिकून सवरून शहाणा होवून आपल्या खराखुऱ्यी इतिहासाचा शोध घेऊन लिहू लागला, बोलू लागला. आणि मूठभर मनुवादी कलमकसाई उघडे पडू लागले. खरे तर महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडावर छ. शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला नसता तर आज आपल्याला छ. राजे कळलेच नसते. आणि पुण्यातील षडयंत्रकारी मंडळींनी कळूही दिले नसते. महाराजांच्या इतिहासात मनुवाद्यांनी आपल्या मतलबी मोठेपणासाठी हेतुपुरस्सर भयंकर घोळ करून ठेवला होता. आजही या ना त्या कारणाने त्यांचा अश्लाघ्य प्रकार सुरूच आहे. त्यासाठी ते मोठे गोंडस नाव देतात ते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. परंतु निबर किंवा कोडगे महाशय हे विसरतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्या बरोबरच लेखनी संहिता/वाणी संहिता सुध्दा पाळावी लागते. बहुजन इतिहास तज्ञांनी/इतिहासकारांनी महाराजांचा खरा इतिहास समोर आणला. व तो सर्वमान्य होऊनही घोळ, अवहेलना मनुवाद्यांद्वारे ठराविक दिवसांच्या अंतराने राजेंचा अपमान अजूनही सुरूच आहे. या बाबी आम्हा बहुजनांसाठी अतिशय क्लेशदायक आहे.

महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः पुस्तके/ग्रंथ लिहिले. राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात स्वतः कारभार सांभाळला त्यांचा दस्तऐवज उपलब्ध आहे. म्हणून या महापुरुषांच्या इतिहासात मनुवादी ब्राह्मण्यवाद्यांना घुसखोरी करता आली नाही. परंतु छ. शिवरायांच्या इतिहासाबद्दल तसे घडले नाही. कारण त्यांच्या समकालीन बहुजन वर्ग शिक्षित नव्हता किंवा त्यावेळी बहुजनांपैकी कोणीही महाराजांच्या बहुमुल्य कार्याची खरी नोंद करून ठेवली नाही. आणि म्हणून महाराजांच्या इतिहासात घुसखोरी करण्यसाठी मूठभर मनुवादी लोकांना मनसोक्त वाव मिळाला व त्यांचा इतिहास बिघडवून ठेवला. तो बहुजन लेखकांनी व इतिहास तज्ञांनी दुरूस्त करून खरा इतिहास समोर आणला. यात प्रबोधनकार ठाकरे असतील, वा. सी. बेंद्रे असतील, आत्ताचे इंद्रजित सावंत असतील, प्रा. विलास खरात, डॉ. प्रताप चाटसे, अशोक राणा, किंवा ॲड. अनंत दारवटकर असे तमाम बहुजन इतिहासकार/लेखक असतील की त्यांनी आपला व आपल्या महापुरुषांचा खरा इतिहास शोधून काढला.

आज बहुजन समाज छ. शिवरायांची जयंती दोन वेळा साजरी करतो एक शासनाने ठरविल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी या तारखेला व दुसरी मार्च महिन्यात येणाऱ्या तिथी प्रमाणे. परंतु माणसाच्या कधी दोन-दोन जन्मतारखा असतात का? राजे ना अवतारी पुरुष होते ना ही नाॅन बायलाॅजिकल. ते फक्त पुरुष होते. परंतु ते आपल्या अतुलनीय शौर्य, पराक्रम व स्वतः मानवी नीतीमूल्यांचे कसोशीने पालन करणारे होते. व तीच मूल्ये ते आपल्या रयतेत रुजवत असत रयतेचे हित जपत होते. म्हणून ते महापुरुष ठरले. आज उणेपूरे चारशे वर्षा नंतर सुद्धा त्यांचे महत्त्व कमी होत नाही म्हणून की काय? षडयंत्रकारी मंडळी आता त्यांच्या प्रतिमांच्या आरत्या करताना दिसतात. कुठे त्यांचे मंदिरे उभारण्याचा घाट घातला जातो. हे कशासाठी तर इतिहासातील त्यांची अतुलनीय कर्तबगारी पुसून जावी म्हणून. व बहुजनांची येणारी पुढची पिढी पुन्हा देव देव करून देवाधर्माच्या नादी लागावी. हे सर्व निंदनीय प्रकार आहेत. त्यांच्या अशा कृत्यांचा तिरस्कार वाटतो. आमचे काही भैताड बहुजन लोक वरील दिवसाप्रमाणे महाराजांच्या दोन दोन जयंत्या साजऱ्या करू लागले. या दोन्ही जयंतीनिमित्त बहुजन समाज आपसात विभागला गेल्यावर त्यांचा पैसा, उर्जा, व वेळ खर्च होतो. आणि हेच मनुवादींना अपेक्षित असते. बहुजन विभाजित राहावा हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो. यामुळे त्यांचे गुपीत इंगीत साध्य होते. बुजनातील फुटीरतावाद हे मनुवाद्यांच्या वर्चस्ववादाचे गमक आहे. या गोष्टी बहुजनांनी गाठ बांधून ठेवल्या पाहिजेत. दोन जयंत्या अलग अलग करण्यापेक्षा एकत्रित जयंती साजरी केली तर जयंती निमित्त सामाजिक ऐकोपाचा संदेश देवून व सामाजिक जागृती आणून, लायटिंग व डीजेचा सौम्य वापर करून भव्य दिव्य स्वरूपात जयंती साजरी होवून समाजही एकत्रित येऊ शकतो. हे निदान आमच्या सर्व बहुजन सामाजिक संघटनांनी लक्षात घेतले पाहिजे.

राजकारण्यांनी आपल्या राजकीय हट्टापायी अशा दोन जयंत्या घडवून आणल्या. व साजऱ्या करण्यात येऊ लागल्या. तिथी प्रमाणे मार्च महिन्यात येणारी जयंतीची तारीख व दिवस बदलत राहतात. शिवाय शासनाने घोषित केलेली तारीख आहे १९ फेब्रुवारी. महाराजांच्या जयंती विषयी हा किती घोळ व अवहेलना? महाराजांची जयंती एकाच दिवशी व एकाच तारखेला साऱ्या देशभर साजरी व्हायला पाहिजे असे वाटते. महाराजां विषयी साऱ्या बहुजनांची अस्मिता जरी एक असली तरी श्रेय वादापायी मनं दुभंगली जातात हो… बड्या बड्या राजकारण्यांनी आपल्या राजकीय हट्टापायी राजकीय खेळ खेळला असला तरी समाज मनाचा खेळ खंडोबा करून ठेवला. हे मोठ्या खेदाने म्हणावे लागते.

ॲड. अनंत वि. दारवटकर आपल्या ‘अद्वितीय छत्रपती श्रीसंभाजी महाराज खंड-१ पान क्र. ५८ वर लिहितात

“वैशाख शु. ३, अक्षय तृतीया, शके १५४९ रविवार; म्हणजेच ८ एप्रिल १६२७” हिच छ. शिवाजी महाराजांची खरी जन्मतिथी/जन्म तारीख आहे. परंतु ब्राह्मणी मंडळींनी फाल्गुन व. ३, शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० ही महाराजांची जन्म तारीख निश्चित केली”. व सरकारने ही याच जन्म तारखेला मान्यता दिली. आणि शिवजयंती १९ फेब्रुवारीला मानण्यात येवू लागली. “अक्षय तृतीयेला शिवाजी महाराजांचा जन्म होईलच कसा? कारण त्या दिवशी परशुरामाचा जन्म झाला आहे” असा उपरोधिक टोला वरील पुस्तकाच्या लेखकांनी लगावला. पुढे ते म्हणतात “परशुरामाच्या जन्म दिवशी छ. शिवाजी महाराजांचा जन्म दिवस नको म्हणून हा खटाटोप. दुसरे असे की महाराजांची जन्मतिथी फाल्गुनी तिथीस म्हणजे १९ फेब्रुवारीला नेऊन याच दिवशी रा. स्व. सं. चे एक दिवंगत प्रमुख गोळवलकर व नाना फडणवीसांची जयंती साजरी करायची व प्रचार, प्रसार माध्यमातून दैनिकांमध्ये पानेच्या पाने भरभरून त्यांच्यावर स्तुती सुमनांच्या जाहिराती देऊन हळूहळू शिवाजी महाराजांच्या व पर्यायाने महाराजांच्या राष्ट्रीय प्रगल्भतेच्या कार्यास पडद्यामागे टाकायचे आणि तेही नाही जमले तर महाराजांच्या आवरणाखाली निदान १९ फेब्रुवारीला येणारी गोळवलकर यांची जयंती साजरी करून घ्यायची व त्या आधारे जनतेचा मेंदू धुवून काढायचा. असे हे षडयंत्र आहे”.

           ॲड. अनंत दारवटकर हे पेशाने वकील असल्यामुळे त्यांनी सतत ३० ते ३५ वर्षे स्वतः व सहकाऱ्यांच्या मदतीने गडकोट, सह्याद्रीच्या कडे कपारीतून फिरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. आणि असंख्य इतिहासाचे साहित्य चाळून महाराजांच्या खऱ्या इतिहासाचा शोध लावला. छ. शिवाजी महाराजां पासुन ते छ. संभाजी महाराजां पर्यंत १ ते ५ या खंडात आधीच्या ब्राह्मणी इतिहासकारांचे (?) ऐतिहासिक शकावल्या व बखरींचे पूर्ण खंडन करून पुन्हा नव्या पुराव्यासह नव्याने इतिहास लिहिला. त्याला आजपर्यंत कोणीही आव्हान देवू शकले नाही. हे सर्व बहुजनांनी समजून घेतले पाहिजे. बहुजनांच्या सर्व महापुरुषांचा  खरा इतिहास वाचला पाहिजे. वाचन हे 'शैक्षणिक वरदान' आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. 

            ॲड. अनंत दारवटकर यांच्या वरील नवीने इतिहास संशोधनाने वाटायला लागले की, महाराजांच्या जन्म तारखे विषयी पुन्हा नव्याने पुनर्विचार करून महाराजांची एकच जन्म तारीख व साऱ्या देशभर एकच जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी. 

           महाराजांची एकाच तारखेला एकच जयंती साजरी व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने यावर पुन्हा पुनर्विचार करण्यासाठी, वाटल्यास पुरातत्त्व विभागाची मदत घेऊन बहुजन इतिहास तज्ञ व इतिहास लेखक यांच्या एका समितीचे गठन करावे. परंतु त्या समितीत एकाही  'घाल मोड्या दादा'चा समावेश करू नये अशी सर्व बहुजन सामाजिक संघटनांनी अट घालायला पाहिजे. म्हणजे साऱ्या देशभर महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात व उत्साहाने साजरी होईल यामुळे बहुजनांचा पैसा, वेळ, शक्ती वाचेल. व सारा समाज एकत्रित राहिल. 

            जर महाराष्ट्र सरकारने आपली चूक दुरूस्त करून ८ एप्रिल छ. शिवाजी महाराजांची जन्मतारीख  घोषित करून मान्यता दिली तर ८ एप्रिल ला शिवजयंती नंतर दोन दिवस मध्ये गेले की, ११ एप्रिल ला महात्मा जोतिबा फुले जयंती त्यानंतर पुन्हा दोन दिवस मध्ये गेले की १४ एप्रिल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. म्हणजे जशी वरील महापुरुषांच्या विचारधारेची मजबूत साखळी आहे तशीच त्यांच्या जयंतीची सुध्दा साखळी निर्माण होईल. या निमित्ताने एप्रिल महिन्यात ठिकठिकाणी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होवून कालांतराने हा महिना सामाजिक एकतेचा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठीचा पारंपरिक महिना ठरेल. (जर मनुवाद्यांनी यात काही छल कपट करण्याचा प्रयत्न केला नाही तर...) 

संदर्भ: ‘अद्वितीय छत्रपती श्रीसंभाजी महाराज’ खंड-१
लेखक ॲड. अनंत वि. दारवटकर.

अशोक सवाई.
91 5617 0699.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!