“आंबेडकरी चळवळीतील निस्वार्थीभीमसैनिक ,भाई प्रकाश ननावरे. “

” प्रकाश बळवंत ननावरे ह्यांचं वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. ह्या तहहयात आंबेडकरी चळवळीत झोकून देऊन काम करणार्या, आंबेडकरी विचार निष्ठापूर्वक खेड्या पाड्यात पोहोचणाऱ्या पँथरला नम्रता पूर्वक अखेरचा जयभीम करीत अभिवादन करतांना सद्गतीत झालो आहे. ते दुःख शब्दातीत आहे.
ननावरे कुटुंबाला आंबेडकरी चळवळीची दीर्घ परंपरा आहे. बळवंत ननावरे हे बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान अनुयायी तर होतेच, त्याच्याबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड ह्यांचे विश्वासू सहकारी होते. काळा राम मंदिर सत्याग्रहाच्या दीर्घ काळात त्यांनी कर्मवीरांना सातत्यपूर्ण साथ दिली. त्यांच्यासह सहकार्यांच्या सततच्या मागणीनुसार नाशिक मधील ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ” ही वसाहत पूर्णत्वास आली.
ननावरे कुटुंबाचे आमचे फार जुने नाते आहे.प्रकाश भाईचे मामा पी. एल. पगारे हे माझी मावस बहीण जिजाबाई ह्यांचे यजमान. त्यामुळे वर्षानुवर्षे आमचा कौटुंबिक जिव्हाळा आहे. प्रकाश भाई आणि पी. एल. प्रेसमध्ये कामाला होते. तसेच पी. एल. ह्यांचा दुसरा भाचा विजय जगताप येच. ए. ए ल. मध्ये कामाला होते. परंतु ज्या ज्या वेळी मी नाशिकला जात असे किंवा ते मुंबईला आले की, संध्याकाळच्या
बैठकीला वेळेकाळेचे भान नसायचे.
त्यात चळवळ, त्यातील सहभाग,,
सध्यस्थिती ह्यावर चर्चा असायची. कारण आम्ही सर्वच चळवळीशी
निगडित होतो. बर्याचदा आमची जाहीर कार्यक्रमानिमित्त ही भेट होत असे.
त्यांचे शिक्षण छत्रपती शाहू बोर्डिंग मध्ये झाले. तेव्हापासूनच ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड ह्यांच्या नेतृत्वाखाली चळवळीत काम करू लागले.
ते “दलित पँथर” च्या स्थापनेपासून सक्रिय होते. जिथे जिथे अन्याय, अत्याचाराची घटना
घडली की, प्रकाश भाई कार्यकर्त्यांसह जाऊन आंदोलन करीत. त्यामुळे त्यांना अनेकदा पोलिसांचा मार सहन करावा लागला. आणि तुरुंगवास ही भोगावा लागला.
आंबेडकरी चळवळीतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे ” मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ “. ह्यात त्यांनी नोकरीची पर्वा न करता, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहभाग घेतला.
जेव्हा प्रा. जोगेंद्र कवाडे सरांनी ” दलित मुक्ती सेना ” नावाची संघटना काढली. तेव्हा प्रकाश भाई
” नाशिक जिल्हा अध्यक्ष ” होते. त्या काळात संघटना वाढवी म्हणुन त्यांनी नाशिक जिल्ह्यात संघटना वाढवलिच. हे कुणी नाकारू शकत नाही. पण त्याचबरोबर सर्वांसोबत देखील महाराष्ट्रभर फिरले.
आपण नेहमी म्हणतो की “सदासर्वगुणसंपन्न” गुण असलेली व्यक्ती लाखोंमध्ये एखादी असते.
त्यांच्या पैकी हे व्यक्तिमत्त्व होते.
ह्या माणसाने आयुष्यात काय काय केले? ह्यावर नुसती नजर जरी टाकली तर अचंबा वाटतो.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात शाहीर अमर शेख, शाहीर साबळे ह्यांच्या कला पथकामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
सन 1965 साली ह्या भारत मातेच्या सुपुत्राने राम लीला नाट्य पथक घेऊन बॉर्डरवर दोन महिने सैनिकां मध्ये उत्साह वाढावा म्हणुन
त्यांचे मनोरंजन केले. गोवा मुक्ती संग्रामात पोर्तुगीजांच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे सहा महिने तुरुंगवास भोगला. मराठीतील दिग्गज कलाकार निळू भाऊफुले, लक्ष्मीकांत बेर्डे, राम नगरकर, प्रेमा किरण, आत्माराम भेंडे, गणपत पाटील, वगैरे अनेक कलावंतां सोबत लोकनाट्य , कला पथक, नाटक, सिनेमामध्ये अभिनयाची ही क्षमता असल्याचे दाखवून दिले.
ते सतत 15 वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीचे अध्यक्ष होते. त्या काळात त्यांनी अनेक सुधारणा केल्याच, पण त्याचबरोबर सोसायटीच्या कामात पारदर्शीकता आणण्याचे मोठे काम केले. त्यांच्या पारदर्शक कामामुळे सोसायटीचा सदस्यांनी त्यांना पुन्हा अध्यक्ष होण्याचा आग्रह केला. परंतु प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी नम्रपणे नकार दिला .
त्यांची शेवटची भेट त्यांचे छोटे बंधू विकास ह्यांच्या घरी झाली. दोघांची घरे शेजारीच आहेत. मी आणि माझी पत्नी दुःखाच्या सांत्वनासाठी गेलो होतो.
परंतु आमच्या गप्पा इतक्या रंगल्या की, आमचे दुपारचे जेवण रात्री आठ वाजता झाले.
शेवटी दुःख एव्हढेच वाटते की, अशा हरहुन्नरी कलावंतांला, त्याच्या गुणवत्तेनुसार संधी का देण्यात आली नाही ?
मला तर असे वाटते की, वडिलांचा आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचा वारसा त्यांना अधिक महत्वाचा वाटल्यामुळे, त्यांनी त्यांच्यातील उपजत अन्य कलांपेक्षा चळवळीत काम करण्याला प्राधान्य दिले. अन्यथा ते आपल्याला नाट्य, सिनेमा सृष्टीतील मोठे कलाकार असल्याचे दिसले असते.
पुन्हा एकदा दुःखीत अंतःकरणाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली करतो.
जयभीम.
अरुण निकम,
9323249487.
मुंबई.
दिनांक…16/02/2026.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



