आधुनिक सुसंस्कृत मुखवटे घातलेली विकृत माणसं..?

वासुदेव, पिंगळा, पोतराज इत्यादी पात्रे मला कधीच संस्कृती वाटली नाही.. उलट भटक्यांच्या पिळवणुकीची सांस्कृतिक व्यवस्थाच वाटत आलीय.
संस्कृतीच्या तथाकथित उच्चजातीतील ठेकेदारांनी कधीतरी आठवड्यातून एखादा दिवस पोतराज, पिंगळा, वासुदेव होऊन भीक मागावं. मग समजेल संस्कृती जपणे किती अवघड आहे ?” वसुदेवाच गाणंच फक्त सुंदर असतं हो … जगणं नसतं.
पोतराजाचा आशीर्वाद चांगला असतो हो … आयुष्य अजिबात चांगलं नसतं.
सोसायट्यांमध्ये तर पाट्या असतात “फेरीवाल्यांना बंदी अन्यथा कारवाई केली जाईल” (या वाक्यात वासुदेव, पिंगळा, पोतराज इत्यादी सायलेंट आहेत)
‘काही ठिकाणी त्यांना ठेचून मारण्या इतपत ही कारवाई केलेली आहे’ ज्यांना तुम्ही तुमच्या सोसायटीत एंट्री देत नाहीत ते तुमच्या समाजाच्या संस्कृतीचे वाहक कसे असतील..?
एवढंच काय तर स्वतः वासुदेव, पिंगळा, पोतराज यांना सुद्धा आपल्या पोरांनी आपण जे करतो ते करू नये असंच वाटतं.. मग ? यात नेमकी कोणती संस्कृती आहे.?
अभिनय म्हणून ही पात्र साकारून पैसे कमावणे आणि मजबुरीत उदरनिर्वाहासाठी हे आयुष्य जगणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.. मासे मटण आवडीने खाणारे ज्यांच्याकडून ते विकत घेतात त्यांचा व त्यांच्या जातीजमातीचा व त्यांच्या वस्तीचा तिरस्कार करतात. ही वस्तुस्थिती तरी कशी नाकारता येईल ? आपल्या घरातील पोरांनी फॅशन म्हणून केस वाढवले तर लगेच वाक्य असतं काय पोतराज व्हायचं का.?सहजच लहान पोराने बोटांनी काही वाजवल तर काय डफड घेऊन देऊ का? वासुदेवाची वारी नेहमीच तुमच्या दारावर येते पण कधीतरी तुमचीही वारी वासुदेवाच्या दारावर जाऊ द्या आणि पहा त्या रुखमाईच्या डोळ्यात समजेल तुम्हाला तिचा पांडुरंग किती फाटका आहे.जा जाऊन पहा मरीआईचा गाडा ओढणाऱ्या पोतराजाच्या संसाराचा गाडा कसा मोडकळीस आलाय, पहा जागे होऊन तुम्हाला झोपेतून उठवणाऱ्या पिंगळ्याच्या आयुष्यातील काळोखी रात्र तशीच आहे,तुम्हाला प्रसन्न पिंगळावेळ देणाऱ्या पिंगळ्याची अजूनही चांगली वेळ आलेली नाही. सिग्नल वर भीक देतो, खाऊ देतो आणि त्याच्या बदल्यात तोच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून स्वतःच कौतुक करून घेतो, साधी भीक सुद्धा फुकट न देणारे आपण लोककला जपा म्हणून गळा का काढतोय..?
लोककला जपा म्हणून आपण एका खूप मोठ्या लोकसमूहाचाच गळा दाबत आहोत हे आपल्या कधी लक्षात येणार ?
लोकांच्या (भटक्यांच्या) झेंड्यावर पंढरपूर करण्यापेक्षा स्वतःचा झेंडा घ्या, एक तरी लेकरू संस्कृतीला जोडा.
पोतराज व्हा मरीआईचा गाडा ओढा, पिंगळा व्हा पहाटे गाणं म्हणत फिरा, वासुदेव व्हा, अंगावर चिंद्या बांधून भीक मागा घरातील स्त्री मुरुळी सोडा, संस्कृती जपायची म्हणजे हे तर करावच लागेल…_
जमेल ना माझ्या प्रिय ठेकेदारांनो?
आमचा सांता हरवलेला नाही आमचा विवेक हरवलाय. आमच्या संस्कृतीची तुळस हरवलेली नाही आमचा विकृतीचा कळस झालाय. से आपण सुसंस्कृत मुखवटे घातलेली विकृत माणसं आहोत..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत