” कोल्हापूर संस्थानात आरक्षण देणारा पहिला छत्रपती.!”

“आज महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस
कोटी कोटी प्रणाम.!”
थोर समाज सुधारक, मागासवर्गीयांना आरक्षणाची तरतूद करणारा पहिला छत्रपती, प्रजाहीत दक्ष, कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजश्री शाहू महाराज परंपरेनुसार , मेव्हणे, भाऊ व मित्र रामशास्त्री भागवत ह्यांच्यासह कार्तिक स्नानासाठी पंचगंगेेवर गेले होते. महाराजांच्या स्नान समयी नारायण भटजी स्नान न करताच “वेदोक्त मंत्रा” ऐवजी “पुराणोक्त मंत्र” उच्चारत असल्याचे रामशास्त्री भागवतांनी महाराजांना सांगितले. म्हणून त्यांनी भटजीस विचारणा केली असता भटजींनी उत्तर दिले की, शूद्राला “पुराणोक्तमंत्र” सांगावे लागतात . स्नानाशिवाय “शुद्राना पुराणोक्त” पद्धतीचा अनुग्रह करता येतो . वैदिक मंत्र मात्र, स्नान केल्याशिवाय उच्चारता येत नाही .( वेद हे अपौरुषेय आहेत. ते देवाने निर्माण केले आहेत .म्हणून त्याचे श्रवण क्षुद्राने केल्यास, त्याच्या कानात उकळते शिसे टाकण्याची शिक्षा मनुस्मृतीत दिली आहे. वेद हे फक्त ब्राह्मणांनीच श्रवण करायचे .) छत्रपतींना एका सामान्य भटजींनी “शूद्र” म्हणून हिणवावे, हा विचारच महाराजांना असह्य झाला. पण त्यावेळी ते काहीच बोलले नाही. मात्र हा प्रसंग त्यांच्या जीवनाला, विचाराला कलाटणी देणारा ठरला. जातीयता, सामाजिक न्याय, निती, संस्कार, आणि सत्याला आव्हान देणारा हा प्रसंग होता. सामाजिक न्यायाला सुरुवात इथूनच झाली. असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.
.या प्रकरणाबाबत खूप वादंग निर्माण झाला होता. लोकमान्य टिळकांनी ” केसरी” मधून “वेदोक्त खूळ” या शीर्षकाने दोन अग्रलेख लिहिले. त्यात ते म्हणतात की, वैदिक मंत्राने संस्कार झाले म्हणजे मराठे व ब्राह्मण एका जातीचे होतील अशी जर कोणाची कल्पना असेल तर ती चुकीची आहे. भोसल्यांच्या कुलापेक्षा ज्यांचे कुळ कर्तबगारीने, जातीने व मानाने कमी आहे अशा मराठ्यांनी वेदोक्तचा आग्रह धरणे जातीस व न्यायास अनुसरून नाही . शिवछत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. त्यामुळे त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही अशी स्पष्ट भूमिका टिळकांची होती. विशेष म्हणजे ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांचा, ते “शूद्र” आहेत म्हणून, राज्याभिषेक नाकारला होता. शेवटी शिवाजी महाराजांनी काशीहून गागाभट्ट ह्यांना बोलावून, त्यांच्याकडून राज्याभिषेक करून घेतला. ही गोष्ट टिळक अग्रलेख लिहिताना विसरले होते की काय? वेदोक्त संघर्ष हा ब्राहमणविरोधी वर्गाच्या सर्वांगीण विकासाला कारणीभूत ठरला. आपल्या देशात पूर्वापार शिक्षणाची मक्तेदारी ब्राह्मण पुरोहितांकडेच होती. त्यामुळे राजा कुणी का असेना, पण संपूर्ण प्रशासनावर ताबा ह्यांचाच होता. पुन्हा ब्राह्मण म्हणजे देवाची लेकरे. त्यामुळे सत्ताधारी ह्यांना वचकून असायचे.
ह्याचाच परिणाम म्हणजे शाहू महाराजांनी स्वताच्या जन्मदिवशी २६ जून १९०२ रोजी एक क्रांतिकारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. संस्थानच्या नोकरीत पन्नास टक्के जागा “मागासवर्गीयांसाठी आरक्षित” ठेवण्यात आल्या. तसेच खाते प्रमुखांनी या हुकुमानंतर भरलेल्या जागांचा तिमाही अहवाल सादर केला पाहिजे. अशी सक्ती केली .ह्यामुळे ब्राह्मण वर्गाला त्यांच्या प्रशासनातील मक्तेदारीला प्रचंड हादरा बसला. आंघोळ करताना वेदोक्त मंत्र उच्चारले काय अन् पुराणोक्त मंत्र उच्चारले काय, काहीही फरक पडत नाही .आणि जर फरक पडत असेल तर तो, आंघोळ करताना शरीर व्यवस्थित घासून पुसून स्वच्छ न करण्याने पडतो. इतकी ही साधी गोष्ट आहे. परंतु धार्मिक बंधनांनी पुरोहित वर्गाने समस्त बहुजन समाज मानसिक गुलाम करून ठेवला होता. पण त्यामुळे एक बरे झाले, ब्राह्मणेतरांना नोकरीमध्ये पन्नास टक्के आरक्षण मिळाले. नाहीतर तीन टक्केवाले सत्त्यांनव टक्के नोकऱ्या गिळंकृत करून बसायचे. एकूणच १९०२ हे वर्ष आणि त्यावेळी चातुर्वर्ण्य समाज व्यवस्थेचा समाजावर असलेला घट्ट पगडा, ह्यांचा विचार केल्यास सध्या जो मागासवर्गीय समाज म्हणून ओळखला जातोय , तो त्यावेळी शिक्षणापासून वंचित तर होताच, परंतु स्वातंत्र्यानंतरही त्यांना वर्गाबाहेर बसविले जात असे. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे ब्राह्मण वर्गाचे प्रशासनातील वर्चस्व रोखणे त्यांना शक्यच नव्हते. त्याकाळात क्षत्रिय व वैश्य थोडे फार शिक्षित होते.आणि तेच ब्राह्मणांना प्रशासनात वरच्या जागा मिळवुन, त्यांची मक्तेदारी मोडून काढू शकत होते .
अशा प्रकारे शाहू राजांनी शुद्रांचा नोकऱ्यांचा मार्ग मोकळा केलाच पण त्याच बरोबर बहुजन समाजालाही त्यात सामील करून घेतले. ब्राह्मण, पुरोहित वर्गाने ब्राह्मण सोडून इतर सर्व शूद्र असे जे दोनच वर्ग पाडले होते , त्याचा महाराजांनी इथे यथोचित उपयोग करून घेतल्याचे दिसते. महाराजांच्या जाहीरनाम्यात “मागासवर्गीयांना पन्नास टक्के नोकरीत आरक्षण” असे म्हंटले आहे. त्यावेळच्या एकूणच सामाजिक परिस्थितीचा विचार केल्यास तेव्हा मनुस्मृती नुसार समाजव्यवस्थेत काम आणि जात एकत्र हातात हात घालून चालायचे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज ह्यांच्यातील सबंध केवळ राजकिय नव्हते, तर ते भारतातील सामाजिक समतेच्या क्रांतीचे एक ऐतिहासिक आणि वैचारिक प्रतीक होते . त्यामुळे ह्या दोन क्रांतिकारक व्यक्तिमत्त्वाच्या
भेटीनंतरचा इतिहास, त्याच्या संदर्भासह एका लेखामध्ये मांडणे, केवळ अशक्य आहे. त्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
जाता जाता फक्त दोन गोष्टींचा उल्लेख करतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरां बद्धल त्यांना विशेष आदर होता. जेव्हां त्यांना समजले कि,
महार समाजाची व्यक्ति परदेशात शिक्षण घेऊन आलीआहे. तेव्हा त्यांनी स्वखर्चाने बाबांना खास कोल्हापूरला बोलावून घेतले. त्यांचा आदर सत्कार केला़. बाबांशी चर्चा करतांना त्यांना समजले की, मुकनायक निधी अभावी बंद पडले आहे, त्यांनी ताबडतोब अडीच हजारांची देणगी देऊन
“मूकनायकाला” बोलता केला.
भारतीय समाज व्यवस्थेतील जातीभेदाच्या भिंती पाडण्यासाठी आणि शोषित आणि वंचितांना आत्मभान मिळवून देण्यासाठी दिनांक 21/ 22 मार्च 1920 ह्या दोन दिवशी त्यांनी कोल्हापुर जिल्ह्यातील कागल संस्थानातील माणगाव येथे मागासवर्गीयांची पहिली परिषद आयोजित करून तिचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले. व एव्हढेच करून ते थांबले नाही, तर आपल्या भाषणात महाराज म्हणाले की, तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे. डॉ. आंबेडकर हेच तुमचे खरे पुढारी आहेत.
पुन्हा एकदा छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त, त्यांना कोटी कोटी प्रणाम.!
जयभीम.
अरुण निकम.
९३२३२४९४८७
संदर्भ .
राजश्री शाहू छत्रपती,
जीवन व शिक्षणकर्य
प्रा. रा.तू. भगत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



