मागास वर्गीय आरक्षणाचे उप वर्गीकरण की जात अस्मितेचे वर्गीकरण,,,,?

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ऍड अविनाश टी काले , अकलूज
9960178213
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमुर्ती भूषण गवई यांनी मागासवर्गीय आरक्षणाचे उप वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य शासनाला दिले ,
या लढाईच्या मुळात मी फार खोलवर जाणार नाही , याचे कारण अनेक मान्यवर लेखकांनी , यावर आपली मते व्यक्त केली आहेत , आणि हा विषय आज महाराष्ट्रातील मागासवर्गीयांच्या घरा घरात चर्चिला जात आहे ,,
मी यावर फारशी चर्चा केली नाही ,, याचे कारण या चर्चा जात अस्मितेत रूपांतरित झाल्या आणि त्या इतक्या कडवट झाल्या की दोन जाती समूह पुन्हा एकदा परस्पर विरोधी गोटात विभाजित झाले ,,
त्या तश्या होणारच होत्या ,,
केवळ आरक्षणाच्या आर्थिक हित संबंधाने जाती चे वर्गात रुपांतर होत नाही ,, ही बाब इथे स्पष्ट होते ,,
कार्ल मार्क्स प्रणित भांडवलदार व श्रमिक या दोन वर्गाचे विभाजन भारतात का लागू झाले नाही याचे कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले , आणि श्रमिकात ही जात विभाजन असते हे त्यांनी सांगितले ,,
भारतात साम्यवादी क्रांती जरी यशस्वी करायची म्हणले तरी त्यांना अगोदर जात व्यवस्था उध्वस्त करावी लागेल अशी वैचारिक मांडणी त्यांनी केली होती ,,
इथे याही पुढे जाऊन मी एक उदाहरण देऊ इच्छितो की ही जात मानसिकता , श्रेष्ठ कनिष्ठता हा जात व्यवस्थेचा उपजत दुर्गुण आहे तो देह विक्रय करणाऱ्या महिला मध्ये ही आढळतो ,,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू हा वर्ण व्यवस्था असलेल्या व बंदिस्त कप्पे बंद जात व्यवस्थेची इमारत असल्याचे सांगताना
यातील जाती या स्व केंद्रित असतात , जसे बटाट्याचे पोते असते तसे असंख्य जाती ची बटाटे भरून हिंदू धर्म नावाच्या पोत्यात ते भरलेले आहे ,,
आणि या पोत्याची विण उसवून यातील बटाटे विकेंद्रित होऊ नयेत याची खबरदारी त्याचा लाभार्थी घेत असतो ,,
वर्ण व जात व्यवस्थेत जन्म घेऊन च शिरकाव करता येतो ,, आणि त्या व्यवस्थेतून बाहेर पडायचे झाले तर समग्र चौकट त्यागून त्यातून बाहेर पडावे लागते , त्याला ” धर्मांतर ” असे म्हणतात .
हे धर्मांतर होऊ नये म्हणून कोण कासावीस होतो याचा शोध ही घ्यावा लागणार नाही इतके ते दृश्य स्पष्ट आहे ,,
जात व्यवस्था ही “होमो जिनियस” नाही म्हणजेच ती “एकजिनसी”नाही
तर ती” हेट्रोजिनियस “आहे
म्हणजे ती एकमेकांचा तिरस्कार करते ,,
पण यातील मुख्य गंमत ही आहे की समान दुःखी असलेले स्पर्धक व एकमेकांचा द्वेष करणारे तर आपल्या पेक्षा वरच्या जातीचे असलेल्यांची भक्ती करणारे असतात ,,
आपल्या जातीचा नेता असेल तरच तो स्विकारहार्य असतो ,, अन्यथा तो नेहमीच परका असतो ,, स्व जातीचा नेता आणि महापुरुष स्व जातीतून शोधणे याची पार्श्व भूमी याच उपजत गुणातून आलेली आहे ,,
म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर किती ही महान असले , त्यांनी राज्य घटना लिहिली असली तरी , ते राष्ट्र पुरुष म्हणून मान्यते ला पोहचत नाहीत , त्यांचा ही तिरस्कार उच्च वर्णीय करतात
याचे कारण त्यांनी ज्या चिकित्सा केल्या आणि निष्कर्ष काढले त्या वरील उपाय योजना शोधली या मुळे ज्यांच्या श्रेष्ठत्वा ला आव्हान मिळाले ते कसे उदार मत वादी होतील?
परंतु त्यांनी लढलेले ऐतिहासिक बौध्दीक युद्ध आणि त्यामुळे अस्पृश्य समाजाला मिळालेले हक्क आणि अधिकार , घटनात्मक कायदेशीर संरक्षण हे स्पष्टपणे दिसत असल्याने ते नाकारता ही येत नाही ,, यातून एक कोंडी झाली ,
ही कोंडी अस्वस्थ करत होती ,, म्हणून त्यांना पर्याय देणारी आपली नेतृत्व शोधायची ही अहमिका चालू झाली ,,
गाव कुसाच्या बाहेर राहणाऱ्या दोनच जाती मुख्यत्वे महाराष्ट्रात होत्या किंवा आहेत त्या “महार”आणि” मातंग “
बलुतेदारी व्यवस्थेत महारा ना महारकी म्हणून जमिनी होत्या ,, आणि मृत जनावरे उचलून नेण्याचे अधिकार ही होते ,,
जात व्यवस्थेच्या जुलमाने या दोन जातीवर मृत मास भक्षणाची सक्ती लादलेली होती ,,
या दोन्ही जाती या मृत गो मास भक्षक होत्या ,, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांती ने ती रूढ पद्धत त्यागली गेली ,,
त्या काळी या मृत मासाचे अधिकार “महार” समाजा कडे होते , आणि मातंग समाज हा त्यांच्या वितरणाच्या दये वर अवलंबून होता ,
” ब्रिटिश राजवटीत1938साली ज्या क्रिमिनल जाती चे संकलन केले होते त्यात त्या त्या जातीची वैशिष्ठे , त्यांची हत्यारे , त्यांची कोड वर्गीय असलेली भाषा याचा उल्लेख आहे
ज्यात महाराष्ट्रातील कांहीं जाती या गुन्हेगार म्हणून घोषित होत्या ,, त्यात “मातंग” समाज होता ,
या समाजाची एक कोड भाषा आहे ,, त्या भाषेत
ते स्वतःला “अंबुज” म्हणवून घेतात , ज्याचा अर्थ “कमळ ” होतो ,
तर महार समाजाला ते “भोकुर” म्हणतात ,,
ग्रामीण भागात भोकराचे किंवा शेलवट चे झाड ज्यांना ज्ञात आहे , ते जाणतात की त्याची गोल पिवळी फळे ही चिकट असतात ,,
मारवाडी हे चिकट असतात कशासाठी? तर ते एक पैसा सोडत नाहीत ,,
मग महार का चिकट होते ? तर अपेक्षित मास ते देत नव्हते म्हणून ,,
असो
हा संघर्ष असा इतिहास कालीन संघर्ष आहे
जात संघर्षाच्या या लढाईत फार थोड्या मातंग नेत्यांनी डॉबाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारले
परंतु बहुतेक मातंग पुढारी हे काँग्रेस कडे राहिले हा इतिहास आहे
1941साली मराठवाडा विभागातील परभणी येथील पाथरी गावचे देविदासराव नामदेवराव कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना एक पत्र लिहिले होते ज्यात त्यांचे अनेक आक्षेप डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वर आणि महार समाजावर होते , ज्याची सविस्तर उत्तरे त्यांना हवी होती , जी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अग्रलेख लिहून दिली
चांगदेव खैरमोडे संकलित आणि संपादित डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र खंड 8 मध्ये त्याचे सविस्तर उत्तर आहे
त्यात ते शेवटी म्हणतात
“मांगानी आपली उन्नती करताना महारांशी काडीमोड करून केवळ हिंदू सनातनी आणि काँग्रेस यांची गुलामी करण्याची चूक करू नये “
या उपवर्गिकरण चळवळीचे सुकानु ज्यांच्या हातात आहे ते विष्णू कसबे हे संघ प्रमुख मोहनराव भागवत यांचे मांडीला मांडी लावून बसले होते ही एकच बाब पुरेशी आहे
आत्ता फक्त एक बदल यात झाला आहे , काँग्रेस चे गुलामी ऐवजी ते भाजप ची गुलामी करत आहेत ,,
त्यांनी शोधलेले महापुरुष त्यांच्या उपयोगाचे ठरले नाहीत
लहुजी वस्ताद यांचा इतिहास हा महात्मा फुले यांचे शी जोडला जातो ,,
त्यांची नात मुक्ता साळवे यांनी जो निबंध लिहिला त्यात धर्म मार्तंड मांगाच्या शिराचे चेंडू करून दांड पट्ट्याचे खेळ पर्वतीच्या पायथ्याला खेळायचे ,, आमचा धर्म कोणता ? असा प्रश्न त्यांनी विचारला च नसता
कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे तर लाल बावटा पथकातील क्रांतिकारक ,,
वर्ग संघर्षाची वैचारिक मांडणी करताना ते जात व्यवस्थेच्या शोषणा विरोधात ही लिहिते झाले
“धनवंतानी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले
मगराने जणू माणिक गिळले
चोर जाहले साव !
ठरवून आम्हा हिन कलंकित
जन्मोजन्मी करुनी अंकित
जिणे लादूनी वर अवमानित !
निर्मुन हा भेदभाव!
एकजुटीच्या या रथावरी ! आरूढ होऊनी चल बा पुढती ,,!
नव महाराष्ट्र निर्मुणी जगती !
करी प्रगट नीज नाव!
जग बदल घालुनी घाव ! सांगून गेले मज भीमराव!!
हे हिनत्व मातंगाना कुणी दिले होते ? महारा ना कुणी दिले होते ?
जन्मो जन्मीचे अंकित कुणी केले होते?
दोन्ही समाज हे व्यवस्थेचे बळी आहेत ,,
पण ही प्रस्थापित व्यवस्था चलाख आहे ,, त्यांना ज्ञात आहे , हे दोन्ही समाज पूर्वी मृत मासा साठी झगडत होते ,,
आरक्षण ही सुध्दा एक भाकरी आहे , जी शिक्षण आणि नोकरीची संधी देते , प्रशासनातील आणि राजकारणातील हिस्सेदारी देते
त्यावरून पुन्हा एकदा जुंपू शकते,,,
त्यांनी तो डाव टाकला ,,
हे एकमेकावर इतके घसरले की
उध्दार कर्त्या वर ही त्यांनी टीका सुरू केल्या ,,
अर्थात आंबेडकरी समाज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति संवेदनशील आहे , तो हे सहन करणार नाही हे ते जाणून होते
आता आपण समारोपा कडे जाऊ ,,
जे आरक्षण शिक्षण आणि नौकरी याची हमी देत होते , प्रशासनातील हिस्सेदारी ठरवत होते ,, ते आत्ता या शासनाने ठेवले आहे काय?
शिक्षणाचे खाजगीकरण , त्याचा व्यापार झाल्याने प्रंचंड डोनेशन आणि तितकीच फी भरून हे शिक्षण घ्यावे लागत आहे ,
पहिली ते चौथी एक शिक्षकी शाळा ,, आणि पट संख्या कारण दर्शवून अनेक जिल्हा परिषद शाळा बंद केल्या जात आहेत , जवळपास १लाख प्रा शाळा बंद झाल्या आहेत
शिक्षकांना अवांतर कामे सोपवून शिक्षणाचे तास कमी केले जात आहेत ,
विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पास केले जात आहे ,,
एका बाजूने दर्जेदार खाजगी शिक्षण आणि दुसऱ्या बाजूने अनास्था असलेले कमी दर्जाचे शिक्षण
यातून ही एखादा विद्यार्थी स्पर्धेत आला तर सीएटी नीट सारख्या पूर्व परीक्षा ,, त्यांचे ही पेपर लीक केले जात आहेत ,
सगळ्या सार्वजनिक सेवा बंद करून त्याचे खाजगीकरण केले आहे , अगदी बंदरे , विमान सेवा , खाणी याचे खाजगीकरण झाले आहे ,
शासकीय नोकर भरती ऐवजी करार कॉन्ट्रॅक्ट भरती चालू आहे , ज्यात ना पगाराची हमी ना पेन्शन ची हमी ,
प्रशासनातील सहभाग म्हणावा तर मागच्या दाराने थेट केंद्रीय सचिव म्हणून भरती करून घेतले गेले आहे त्यांचे साठी कोणतीच परीक्षा नव्हती
पण हा गदारोळ मुद्दाम भाजपा शासनाने चालू केला आहे हे मात्र नक्की
आत्ता एस आर आय आले आहे ज्यात मतदारांची छाननी सुरू आहे ,,
सी ए ए हा कायदा निर्माण झाला आहे ,, सिटिझनशिप एमेंडमेंट ॲक्ट असे त्याचे नाव आहे ,
भारताचे नागरिक ठरवण्याचा तो कायदा आहे ,,
ते नागरिकत्व तुमचे रेशन कार्ड , सध्या तुम्ही राहता ते घर , तुमच्या कडे असलेली जमीन , तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स , तुमचे वीज बिल , तुमचे मतदान कार्ड , तुमचे आधार कार्ड हे ठरवणार नाही
त्या साठी तुमच्या कडे 1947पूर्वीचे महसुली पुरावे असावे लागतील ,
ज्यात तुमच्या जमिनीचा सारा पावती , इमारती ची कर पावती , तुमच्या बापजाद्या च्या जन्म नोंदी असणे आवश्यक आहे ,,
भटके विमुक्त , आदिवासी , मागास जाती यातील या ही पिढीतील किती तरी लोक आहेत ज्यांची जन्म तारीख 1जून आहे , कित्येक जण असे आहेत ज्यांच्या जन्म नोंदी नाहीत , त्यांच्या बाप जाद्यांच्या थोड्याच असणार आहेत ?
जर तुम्ही नागरिकच राहणार नसाल तर आरक्षणाच्या लढाईला तर काय अर्थ उरणार आहे ?
आज तुमच्या हातात असलेला मतदानाचा अधिकार ही हिरावून घेतला जाणार आहे , तुमची जमीन तुमचे घर ही हिसकावून घेतले जाणार आहे , डीटेनशंन कॅम्प मध्ये अनेकांना जावे लागणार आहे ,,
आणि हे सर्व दृष्ट काम ज्यांच्या मांडीवर विष्णू कसबे , रामदास आठवले बसले आहेत ती भाजपा करणार आहे ,,
आपले खरे शत्रू ओळखा एवढीच
विनंती आमच्या सारखे लोक करू शकतात अन्यथा विनाश अटळ आहे ,,,,
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



