समता सैनिक दलापुढील आव्हाने…!
समता सैनिक दल
(संस्थापक – विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर)
००००००००००००००००००००
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मुंबई बैठकीच्या निमित्ताने…
(वाचा आणि विचार करा.)
समता सैनिक दलाची ही नियोजित बैठक ठरल्याप्रमाणे संपन्न होणार आहे. या निमित्ताने समता सैनिक दलाचे ध्येय आणि सद्य परिस्थितीत उभी ठाकलेली आव्हाने याबाबत चिंतन होणे आवश्यक आहे. त्याबाबत जनतेत साधक बाधक चर्चा व्हावी. माहिती व्हावी म्हणून हा प्रपंच करीत आहे.
समता सैनिक दल ही महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले लढाऊ , शिस्तबध्द , निस्वार्थी आणि प्रामाणिक लोकांची संघटना आहे.
सामाजिक , राजकीय आणि एकंदरीत मानवी जीवनाशी निगडित असलेल्या , विकासाच्या आणि उत्कर्षाच्या सर्व बाबींना केंद्रीभूत ठेवून जनजागृती करणे हे कार्य समता सैनिक दलास पार पाडायचे आहे.
मानवी जीवन प्रगतिशील आणि सन्मानजनक अवस्थेत आणण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या महान तत्त्वांची आपल्या देशात अत्यंत आवश्यकता आहे. कारण विषमता, जातीय उच्चनिचता, जातीय भेदभाव, धार्मिकद्वेष, श्रध्दा – अंधश्रध्देच्या नावाने लोकांचे होणारे मानसिक, बौद्धिक, शारिरीक, आर्थिक शोषण तसेच संस्कृती व प्रथा – परंपरा या नावाने लोकांवर लादली जाणारी धार्मिक आणि सामाजिक बंधने ही गुलामगिरीच आहे…ही परिस्थिती भारतात…जागोजागी आढळून येते. या परिस्थितीत परिवर्तन आणणे आवश्यक आहे. हे आव्हान आजच्या समता सैनिक दलाला पेलावे लागणार आहे.
” जात , धर्म ,वंश , लिंग यावरून निर्माण झालेली विषमता किंवा भेदभाव नष्ट करून समग्र समता निर्माण करणे हेच समता सैनिक दलाचे ध्येय आहे.”
हे महान ध्येय घेवून समता सैनिक दलास लोक जागृतीचा ज्वालामुखी पुनश्च जागृत करावा लागणार आहे. हे आव्हान खूप कठीण आहे याची आम्हास जाणीव आहे.तरीही आपणास लढावे लागणार आहे. हार मानून चालणार नाही. हातात हात घालून , खाली मान घालून जगायचे आम्हास मान्य नाही.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कठोर संघर्षामुळे देशातील 2000 वर्षापासून मानवी जीवनाला नरक यातना देणारी मनुवादी संस्कृती नष्ट झाली होती.15 ऑगस्ट 47 रोजी देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 50 रोजी संविधानाचा स्वीकार करून देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्वांना केंद्रस्थानी मानणारी व्यवस्था निर्माण करण्यात आली.
परंतु आज , 74 वर्षानंतर ही संविधानिक व्यवस्था पुन्हा डगमळीत केली जात आहे, नव्हे केली गेली आहे हे अद्याप सर्वांच्या लक्षात आलेलेच आहे.
गेल्या 30 ते 40 वर्षात देशात विषमतेचा पुरस्कार करणारी कट्टर, सनातनी, मनुवादी धर्मशक्ती बळकट झाली आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यासाठी ते सुमारे शंभर वर्षापासून प्रयत्नशील होते.आज ते यशस्वी होताना दिसत आहेत.
या उलट महामानव डॉ.बाबासाहेबांनी 100 वर्षापूर्वी मानवी उत्थानाची चळवळ सुरू केली आहे 40 वर्षात यशस्वी करून दाखविली. मात्र त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या नावाने ज्या चळवळी, संघटना , राजकीय पक्ष निर्माण झाले आणि कार्यरत होते त्यांना त्यांच्या बळावर हे आंबेडकरी मिशन एक इंच देखील पुढे नेता आले नाही. हे कोणताही अभ्यासू व समंजस व्यक्ती मान्य केल्याशिवाय राहणार नाही.देशातील आव्हानाचा , परिस्थितीचा वेध या तथाकथित नेत्यांना घेता आला नाही असे नाईलाजाने मान्य केल्यावाचून पर्याय नाही.
एकीकडे देशात मनुवादी शक्ती आपली ताकद वाढवीत असताना , सक्षम होत असताना पावलोपावली बाबासाहेबांचे नाव जपणाऱ्या संघटना देशातील असंख्य जाती धर्माच्या लोकांना समतेच्या मार्गाने नेण्यास कमी का पडल्या हे शोधणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे देशात कट्टर सनातनी धर्मशक्ती आपले जाळे घट्ट करीत असताना त्यांना रोखण्याचे काम कोणत्याही आंबेडकरी संघटना किंवा नेत्यांनी का केले नाही याचे उत्तर आपल्याला शोधावे लागणार आहे.
सर्वात महत्वाचे असे की, परमपूज्य बाबासाहेबांची मानवतावादी चळवळ ही एका जातीची नसून भारतातील सर्व जातींसाठी ही विचारधारा अत्यंत उपयुक्त व महत्वाची आहे. हे समजावून सांगण्यात 1956 नंतरच्या आंबेडकरी संघटनांना , चळवळीला आणि त्यांच्या नेत्यांना प्रचंड अपयश आले आहे हे सर्वांनी नि:संकोचपणे मान्य केलेच पाहिजे.
दुसरीकडे ब्राम्हणीधर्माचे मनुवादी विचार भारतातील हिंदू समाजाला स्वीकारायला भाग पाडण्यात आले.आणि संविधानिक भारतात धर्माच्या नावाने राजकारण सुरू झाले आणि दुसरीकडे आंबेडकरवादी संघटना आणि चळवळ आज देखील एका जातीच्या बाहेर आलेल्या नाहीत. तसा प्रयत्न देखील जाणीवपूर्वक कोणी करीत आहे असे दिसत नाही. नजीकच्या काळात देखील अशी आशादायी परिस्थिती निर्माण होईल याची फारशी शास्वती नाही.
युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाबाबत 1924 पासून प्रयत्न चालू केले होते.आणि सर्व बांधणी आणि मांडणी झाल्यावर 1927 मध्ये रीतसर स्थापना केली होती.त्याच काळात आरएसएस ची स्थापना करण्यात आली होती.पण आज आरएसएस देशावर नियंत्रण करीत आहे आणि समता सैनिक दल मोजके लोक सोडता कोणालाही माहिती देखील नाही.याचे अर्थ आणि गांभीर्य सर्वांनी समजुन घेतले पाहिजे.
एकंदरीत वरील परिस्थितीचा विचार केला तर समता सैनिक दलावर खूप मोठी जबाबदारी येवून पडली आहे हे मान्य करावेच लागेल.
यासाठी किमान आंबेडकरी संघर्षामुळे ज्यांना या देशात सन्मानजनक जीवन प्राप्त झाले आहे अशा एससी, एसटी, एनटी , ओबीसी , अल्पसंख्यांक बांधवांनी आणि सर्व जातीधर्माच्या महिला शक्तीने आंबेडकरी मिशनचा स्वीकार करून त्यात आपला सहयोग दिला पाहिजे.
समता सैनिक दल , त्याचे ध्येय आणि तत्व हेच खरे आंबेडकरी मिशन आहे.हे समजून घ्यावे आणि समता सैनिक दलात सामील व्हावे असे कळकळीचे आवाहन करून…. थांबतो.
जयभीम
जयभारत
आपला
धर्मभुषण बागुल
राज्य अध्यक्ष
समता सैनिक दल
9921323281/7020558011
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत