भगवान बुद्धांची शिकवण-भाग ५३
बौद्ध जीवनमार्ग
मागील भागात ‘सत्, असत् आणि पाप,
लोभ व तृष्णा, क्लेश आणि द्वेष, क्रोध आणि वैर आणि मनुष्याचे मन आणि मनोविकार’ याबाबतीत माहिती घेतली. या भागात ‘आपण(स्वत्व) आणि आत्मविजय’ याबाबतीत माहिती घेणार आहोत.
आपण(स्वत्व) आणि आत्मविजय
जर स्वतःला स्वत्व, मीपणा असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळविण्याचा (आत्मविजय) परिपाठ ठेवावा. हा बौद्ध जीवनमार्ग आहे.
मनुष्य हा स्वतःचाच स्वामी आहे. दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार? मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो, तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण.
जो मूर्ख मनुष्य अर्हत, आर्य, शीलवान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्मसिद्धान्ताच्या मागे लागतो, त्याचे ते दुष्कृत्य कथ्थक बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत होते.
आपणच अकुशल कर्म (पाप) करतो आणि आपणच त्यामुळे मलीन होतो. आपणच पापाचा त्याग करतो आणि आपणच आपणाला शुद्ध करू शकतो; शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःवरच अवलंबून असतात. कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही.
जो केवळ सुखोपभोगांसाठी हपापलेला आहे, जो असंयमित, खादाड, आळशी आणि दुबळा आहे, तो आपल्याच आतताईपणाने नाश पावेल. ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे.
ज्याच्या ठिकाणी भोगलालसा नाही, ज्याने इंद्रियदमन केलेले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो, जो विश्वासार्ह व बळकट असतो, तो ज्याप्रमाणे वज्रकायपर्वत वाऱ्याने उलथून पडत नाही, त्याप्रमाणे तो पतन पावत नाही.
जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वत:वर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे.
प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी. मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये.
स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो.
स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भूर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःला स्वतःच शुद्ध करू शकतो. तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही.
युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून, जो आत्मविजय मिळवितो तोच परमवीर होय.
प्रथम स्वतःचीच सन्मार्गावर स्थापना करावी व मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये.
मनुष्य हा स्वतःच स्वतःचा संरक्षक असतो. त्याला दुसरा कोण संरक्षक असणार? जो स्वत:च स्वत:चे रक्षण करू शकतो, त्याला स्वत:सारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे.
जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे.
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड चवथा भाग तिसरा
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.४.२.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत