देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

नाती -प्रा.डाॅ.दिलीपकुमार कसबे

मानवी समाजात नाती फार महत्वाची असतात.ती जपावी लागतात. आणि प्रत्येक नात्याचा सुगंध वेगवेगळा असतो.तो दरवळत असतो. त्याचा सुगंध आपण प्रत्येकाने प्रत्येक उंबरठ्यावर घेतला पाहिजे.म्हणून छोट्या छोट्या घटना, प्रसंगानी लोकांनी तुटता कामा नये.एकमेकांपासून दुरावता कामा नये.वेळ गेल्यावर भानावर येऊन उपयोग होईलच असे नाही.कारण जीवन हे पाण्याच्या थेंबा प्रमाणे आहे.कबीरांनी मटलेले आहे “पानी केरा बुदबुदा, अस मानस की जात बुंद पडै धुल जाना है I पाण्याचा थेंब जमीनीवर पडला की तो मातीत विलीन होतो.म्हणजेच मानवी जीवन हे क्षणभंगुर आहे . जन्म झाल्यावर जी जीवनाची संधी मिळते तीचा पुरेपूर आनंद मिळविता आला पाहिजे याच्यासाठी आपल्या रागावर ही आपले नियंत्रण हवे. लोकांना लोकांशी जोडण्याचे काम करायला हवे.जो पर्यंत आहोत तो पर्यंत लोकांना जोडून ही ठेवता यायला हवं. एखादी गोष्ट तडजोडीने सोडविता येते.काही लोक तोंडावर कमी बोलतात. पण कानात खूप कुजबुजत असतात. काही लोक तोंडात साखर घेऊनच असतात. काही सत्य बोलणारी.,तर काही काही अति स्तुती सामने उधळणारी असतात. केवळ आपला फायदा पहातात. तर काही लोक केवळ कामांची मतलब ठेवतात व स्तुती करणारांच्या तुलनेत,भेट वस्तु देणार्यांच्या बाबतीत कमी पडतात.व बाजूला जातात.

नाती, घरातील वेगळी,बाहेरची वेगळी ,ऑफिस मधील वेगळी ती सांभाळता आली पाहिजेत. जपता आली पाहिजेत .बालपणातील एखादा मित्र आणि आपण एकाच कार्यालयात ऑफिसात असल्यास आप आपल्या पदांचा भान ठेवला पाहिजे .एक मॅनेजर आणि दुसरा लिपिक आहे तर इथे गल्लत होता कामा नये.ऑफिस मधील मॅनेजर मित्राचा रिस्पेक्ट आपण ठेवला पाहिजे.ते आपले साहेब आहेत.व आपण लिपिक आहोत हे विसरता कामा नये.आपल्या बालपणातील सध्या मॅनेजर असणाऱ्यां मित्राचे त्यावेळचे चुकीचे किस्से ऑफिस मधील इतरासमोर मांडणे अयोग्य ठरते. आपल्याकडे गावची रचना प्राचीन काळापासून ठरली गेली आहे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक रहात असतात. उच्च, मध्य,निम्न. इथे मध्य व निम्न वर्गातील लोकांना एकेरी नावाने बोलविण्याची पध्दत आहे.पण जर त्यातील एखादा उच्चशिक्षित, उच्च पदस्थ झाल्यास त्याचा मान सन्मान राखता यायला हवा.तरच कुठेतरी आपल्यातील संस्काराची प्रचिती येते.लहानांच्या समोर एक आदर्श उभा करता यायला हवा.लोक गरीबीत मिळून मिसळून राहतात. जाती भेदा पलीकडे जाऊन वागतात, पण पैसा,पद या गोष्टी दरी निर्माण करतात . आपण याबाबतीत विचार केला आहे की कार्यालयात या गोष्टीचे पालन जरूर झाले पाहिजे.

आई,वडील, भाऊ, बहीण, मावशी, काका, चुलते,आजोबा, आजी, आत्या, पत्नी, मेव्हणे,मेव्हणा, दाजी,भाऊजी, ननंद,थोरली जाऊ,धाकटी जाऊ, मधली जाऊ, मित्र,मानलेला भाऊ, मानलेली बहीण ,सून,सासू – सासरे दीर ,मामा- मामी,भाचा,भाची,नवरा-बायको,मुलें अशी कितीतरी नाती आहेत या नात्यावर विचार केला पाहिजे जास्तीत जास्त जतन करता आली पाहिजेत. सासू ने सुनेशी नातं जपलं पाहिजे आपल्या स्वभावाला मुरड घातली पाहिजे. शिकलेले आणि न शिकलेले दोघांनी न्यूनगंड कमी केला पाहिजे .सासू सू ,सून सासू ही नाती चांगली टिकवणे गरजेचे असते अन्यत: नात्यातील प्रेम जिव्हाळा कमी होतो.लोक शिकलेले असतात पण शिकून नात्यातील जिव्हाळा सांभाळायला कुठे तरी त्यांच्यात उणीव जाणवते. केवळ सुशिक्षित आहे म्हणणे म्हणजे नेमके काय ? अलिकडे यातील बरीचशी नाती नाहिशी होऊ लागलेली आहेत.महाभारत, रामायण ही महाकाव्ये आपण पहातो भावा भावात वैमनस्य, प्रेम ही पाहिले आहे.म्हणून नात्यांमध्ये ओढ,जिव्हाळा,आपलेपणा हवा पण अतिशयोक्ति नको.काही मर्यादा ही असायला हवेत.एकमेकाच्या सुख-दु:खात सहभागी व्हायला हवे.मनात नसेल तर जाणूनबुजून काही तरी कारणे पुढे करून लोक अलिप्त राहतात. असे हळू हळू व्हायला लागले की लोक तीच कारणे सांगत राहतात कि मागे आमच्यात कार्यक्रम होता आणि हे काही तरी जुजबी कारण देऊन आलेच नाहीत. दु:खात सर्वजण असतात पण सुखात सुद्धा जायला हवे.त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला हवे.म्हणून नाती सांभाळता आली पाहिजेत. पैसा सुद्धा नाती तोडतो, नाती जोडतो पण देणारे व घेणारे दोघांनी ही त्याची जपणूक केली पाहिजे.गरजेला एक जण उभा राहतो पण परतफेड करणारा कडून वेळ सांभाळली गेली नाही तर वितुष्ण वाढू लागते .ऋणको अलिप्त राहतो जवळचे नातेवाईक असतील तर वेळेत व्यवहार ही व्हायला हवेत.कधी कधी परतफेडी दरम्यान ऋणको च एवढे बोलतो कि धनको ला गप्प बसावे लागते.धनको एकमुठी रक्कम देतो व ऋणको त्याचे हफ्ते करत राहतो. इथे काही व्याजाचा धंदा नसतो पण यामुळे ही धनको दुरावण्याची शक्यता असते.जरी ऋणको ने सर्व परतफेड केली तरी ही पुढच्या अतिशय महत्वाच्या गरजेच्या वेळी धनको म्हणतो “आता माझ्याकडे पैसे नाहीत असते तर दिले असते,तुम्हास माहित आहेच की मी गरजेला उभा राहतो की नाही.” काही काही वेळा पैसा जवळ आला तरी ऋणको च्या गरजा समोर उभ्या ठाकतात आणि देणे होत नाही.कारण अर्थशास्त्रात मटले आहेच अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालणे म्हणजे अर्थशास्त्र होय. पण समाजात रहायचे मटले की समाजशास्त्र ही पहायला हवे.म्हणून देणे घेणे व्हायला हवे व वेळांचे पालन ही वेळेत व्हायला हवे तर नाती दृढ होतात विश्वास वाढून त्यात घट्टपणा येतो.म्हणून नातेवाईकांनी अशा व्यवहारात सावध असायला हवे.अन्यत:धनको ला ऐकावे लागते.”फार मोठा पैसेवाला झाला. काही घर सोडून जात नाही.तुझे सर्व देणं देणारच आहे,असे मी अनेक व्यवहार केले पण तुमच्या सारखा माणूस मी पाहिला नाही.” अशा बोलण्याने लोक तुटतात. इथे ऋणको मध्ये नम्रपणा हवा .पण काही काही वेळा फार कमी लोक असे समजूतदार भेटतात. म्हणून व्यवहारात काळजी घेतली जावी.तर नाती टिकतात.

नाती फार नाजूक असतात. यासाठी प्रेम,स्नेह,आपलेपणा,प्रामाणिकता, वेळ,तोंडातील शब्दावर नियंत्रण या गोष्टी फार महत्वाच्या आहेत.पण माझं माझं करण्याने ही नाती तुटतात. रामायणात रामाच्या राज्याभिषेक च्या वेळी. प्रभू रामावर प्रेम करणारी माता कैकयी केवळ मंथरामुळे उचकटली आणि स्वामी दशरथाला म्हणाली मला माझे दोन वर आत्ता हवेत १) भरत यास अयोध्ये चे राज्य द्यावे.२)रामा स चौदा वर्षाचा वनवास

म्हणजे एका बाजूला राज्याभिषेक व दुसर्‍या बाजूला वरा ची मागणी.यामुळे नाते तुटलेच म्हणावे लागते. श्रीरामा वरती आतोनात वात्सल्य असणारी कैकयी एकदम भरता विषयी प्रेम दाखवून राज्याभिषेक ची मागणी करते.पण राम मात्र आईच्या इच्छेनुसार वनवास पत्करतो.सत्तेसाठी, संपत्तीसाठी ,मान अपमान साठी आपण जिव्हाळ्याची नाती तोडतो इतिहास काळापासून पाहिल्यास स्वत:च्या फायद्यासाठी किती तरी जिव्हाळ्याची नाती छुटपुट कारणापायी तोडून शत्रूला मिळून आपण आपलीच माणसे शत्रू ला पकडून दिली . महाभारतात सुयोधन (धर्म) आणि दुर्योधन चुलत भाऊ होते पण आपण पाहिले कौरव पांडवांचे महाभयानक असे युद्ध.जेव्हा अर्जुन कुरूभूमी वरती लढण्यासाठी आला तेव्हा पहातो तर त्यांचेच गुरू, आजोबा चुलत भाऊ विरोधात लढण्यासाठी आलेले होते.हे पाहून तो पाठीमागे फिरला होता पण केवळ श्रीकृष्ण यांच्या समजावण्या मुळे थांबला व लढला. मानव प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे.त्याच्याजवळ बुद्धी आहे त्यामुळे तो नाती तोडतो,नाती जोडतो. आज लोकशाहीत ही अशीच स्थिती आहे.अनेक नातेवाईक वेगवेळ्या पक्षात काम करतात त्यामुळे नाती तुटतात, दुरावतात प्रसंगी सुख दु:खात ही एकमेकांपासून बाजूला राहतात. जिव्हाळ्याची नाती असून ही अबोल होतात.नाती जुनी होतील तशी बाजूला ही जातात. नवीन नाती निर्माण होतात. मुलाचे लग्न झाले की सासरवाडी ची नाती दृढ होतात.त्यामध्ये मेव्हणा, मेव्हणी सासु सासरे पत्नीचे मामा,मामी, पत्नीची आजी,आजोबा तर आपले आजोळचे आजोबा, आजी ,मामा मामी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर प्रसंगी जाणे येणे कमी होते त्यातच मामा मामींच्या मुलांची लग्ने झाल्यावर ही संबंध कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मामांची मुले आत्या असेल तर येतात पण त्यांना ही देवाज्ञा झालीच असेल तर येणे जाणे कमी होते.फक्त पाहुणे आहेत असे मटले जाते व शक्यतो महत्वाच्या वेळी जाणे होते.अशा पद्धतीने जुनी नाती कमी होऊन नव-नवीन नाती निर्माण होतात. मुलांचे मित्र, मैत्रिणी अशी कितीतरी नवीन नाती निर्माण होत असतात.आजोबा आजी असे पर्यंत चुलता चुलतीची नाती, चुलत भाऊ बहिण यांची नाती फार जवळची असतात. पण चुलत्यांच्या मुलांची लग्ने झाली की त्यांची तिकडची नाती दृढ होतात. व आपली कमी होतात. काही वेळा नोकरी करणारे चुलते आणि गावाकडील भाऊ यांचे ही संबंध हळू हळू आप आपल्या व्यापामुळे कमी होत राहतात. त्यातच,पैसा,शेत,घर यांची वाटणी ही नाती तुटण्यास जबाबदार राहतात.

जोपर्यंत मोबाईल नव्हते,दळणवळणाची साधने कमी होती तोपर्यंत नाती मजबूत होती. सुख-दु:खाच्या प्रसंतात लोक वेळ काढून एकमेकाकडे जात होते त्यामुळे नाती आणखी घट्ट होत होती.पण अलिकडे मोबाईल च्या जमान्यात एकमेकांकडे जाणे-येणे थोडे कमी झालेले आहे असे जाणवते.अलिकडे तर बोलणे ही कमी झालेले आहे.केवळ मेसेज पाठवायचा. दोन निळ्या रेषा दिसल्या की मेसेज पाहिला आहे असे समजायचे बोलायचे नाहीच मग नाती तुटतील तर काय होईल. पूर्वी लोक वेळ काढून जायचे,पत्रे पाठवायचे एकमेकांकाकडे जाऊन मुक्काम करायचे.सुख-दुख:च्या गप्पा व्हायच्या,स्वयंपाक तयार होईपर्यंत गप्पा व्हायच्या यामधून जिव्हाळा, प्रेम वाढायचे.नाती मजबूत होत होती. चुलत भाऊ बहिण आत्या काकू चुलते मोठी कुटुंबे एकत्र कुटुंबे असायची. त्यामुळे खूप नाती असायची पण आता चुलते मावशा आत्या बहिणी, भाऊ यांची संख्या ही कमी झाली आहेत .कोणाला बहिण नाही तर कोणाला भाऊ नाही तर कोणाला काका नाही तर कोणाला आत्या नाही अशी स्थिती झालेली आहे.काळ बदलू लागलेला आहे वाढणारी विभक्त कुटुंबांची संख्या, वाढती शहरे यामुळे संपर्क तुटणे,प्रेम जिव्हाळा कमी होणे ,मग दु:खाच्या प्रसंगात ही नात्यातील कमतरता समोर येते.यामधून नाती कमी होतात. तंत्रज्ञान च्या काळात आपण जवळ आलो तितकेच दुरावलो आहे.मी पणा वाढताना दिसतोय. तो आला नाही. मग मी पण जाणार नाही. भाऊ असून काय करणार? दारातून गेला पण मला हाक मारली नाही,बोलाविले नाही.मी त्यांच्या कार्यक्रम ला जाणार नाही. तो स्वत:ला मोठा समजतोय,मोठा श्रीमंत झालाय. अशी विधाने सुरू होतात. त्याप्रमाणे विद्यार्थी शिक्षक एकमेकाच्या खूप जवळ आलेले आहेत.ज्ञानदानाची साधने वाढू लागलेली असल्यामुळे कुठेतरी अंतर पडल्यासारखे ही दिसते आहे याच्यासाठी सिनेमा, धारावाहिक,मालिका मधून गुरूशिष्य या बाबतील दाखविली गेलेली दृश्ये बहिणी बहिणी मधील संसार उद्ध्वस्त करण्याच्या कुरघोड्या.एक मेकाविषयी चोरून बोलणे चोरून ऐकणे अशा गोष्टी ही जबाबदार राहतात. कारण संस्कार मिळवायाला खूप वर्षे जातात. तोडायला कमी वेळ लागतो.म्हणून जीवनात नम्रता, आदर संस्कार फार महत्वाच्या गोष्टी आहेत.थोरा मोठ्या विषयी आदर युक्त भीती असायची ती आजही आहे पण कुठेतरी उणीव दिसते आहे. यावर लोकांनी विचार करून दुरावणारी नाती,तुटणारी नाती कशी जोडता येतील हे ही पाहिले पाहिजे .एक मेकांसाठी वेळ ही दिला पाहिजे तरच नाती मजबूत, दृढ होतील असा विश्वास वाटतो.आणि माणूस हे करू शकतो.

प्रा.डाॅ.दिलीपकुमार कसबे

स.गा.म.काॅलेज, कराड

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!