देशदेश-विदेशमुख्यपानविचारपीठसामान्य ज्ञान

उपवर्गीकरण हे दलितात दुही व आरक्षण संपवण्याचे षडयंत्र : विचारवंतांच्या ऑनलाइन चर्चासत्रातील सूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सर्व अस्पृश्य जातींना एकसंघ करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी विविध परिषदेचे आयोजन केले. कारण सर्व अस्पृश्य जाती संघटित असल्याशिवाय त्या आपल्यावरील अन्याय अत्याचारांचा प्रतिकार करू शकणार नाहीत, ही त्याच्या मागीलत्यांची भूमिका होती. या भूमिकेतूनच त्यांना सर्व अस्पृश्य जातींनी संघटितपणे धर्मांतर करावे असे वाटत होते. त्याला मातंग समाजाने दोन जून 1936 रोजी दादर नायगाव येथे मातंग परिषद घेऊन धर्मांतरास पाठिंबा दिला होता पण तत्कालीन हिंदू महासभेच्या लोकानी त्यांना प्रलोभन दाखवून त्यांच्यात व डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतराविषयी गैरसमज करून दिला. परिणामी मातंग समाज धर्मांतरापासून दूर गेला. त्याचप्रमाणे आज शासन वर्गीकरणाच्या माध्यमातून अस्पृश्य जातीत दुही, द्वेष निर्माण करून असलेले आरक्षण अप्रत्यक्षरीत्या संपवण्याचे षडयंत्र रचत आहे असा सूर लातूर येथे झालेल्या विचारवंतांच्या ऑनलाइन चर्चा सत्रात उमटला.

उपवर्गीकरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात मातंग व बौद्ध चर्मकार समाजात परस्पर द्वेष, संघर्ष यातून तणाव निर्माण झाला होता यातून सामाजिक सलोखा धोक्यात आला होता. तो कमी करावा व उपवर्गीकरण विरोध म्हणजे विशिष्ट जातीला विरोध नाही तर यामागे षडयंत्र रचण्याचा शासनाच्या विरोध या भूमिकेतून डॉ. सुरेश वाघमारे यांच्या पुढाकारातून हे चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात राहुल खांडेकर यांनी प्रास्ताविक केल्यानंतर भिक्खू पय्यानंद यांनी चर्चा सत्राविषयीची भूमिका मांडली नंतर या चर्चा सत्रात आनंदराज आंबेडकर, आमदार नितीन राऊत, न्यायमूर्ती अनिल वैद्य, लोकसत्ताचे उपसंपादक मधु कांबळे, माझी आयएएस अधिकारी इ. झेड खोब्रागडे, डॉ. प्रदीप आगलावे, मुंबई विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख डॉ. संदेश वाघ, पुणे विद्यापीठातील प्रा. डॉ. संजय कुमार कांबळे व डॉ. जी. के. डोंगरगावकर (मुंबई) इत्यादींनी आपली मतं मांडली. 

या चर्चेत असाही विचार मांडला गेला की उपवर्गीकरण आणण्याचा शासनाचा फोडा आणि सत्ता मिळवा असा राजकीय हेतू आहे. ज्याप्रमाणे आज महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम, मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवून परस्परात द्वेशाची भावना पेटवली गेली. त्याचप्रमाणे शासनउपवर्गीकरणांच्या माध्यमातून मातंग विरुद्ध बौद्ध व तत्सम जाती यांच्यात वाद निर्माण करू पाहत आहे. शासनाची मागास दलिता विषयीची भावना प्रामाणिक असती तर अस्पृश्य समाजाच्या कल्याणासाठी ठेवलेला निधी त्यांच्यावर खर्च केला असता, तो लाडक्या बहिणीसाठी वळवला नसता, त्यांना खरंच दलितांचे कल्याण करायचे असेल तर त्यांनी खाजगी क्षेत्रात आरक्षण सुरू करावे, नोकऱ्यातील बॅकलॉग भरावा, वर्गीकरणच करायचे असेल तर ब्राह्मण, मराठा व तत्सम जातीचे करावे. प्रत्येक जातीला त्यांच्या जातीच्या प्रमाणात नोकरीत संधी द्यावी. आज विविध महामंडळे आहेत. त्यांना निधी देऊन सक्षम करावे; परंतु शासनाला समाजहितापेक्षा समाजात वितुष्ट निर्माण करण्यात रस आहे. अस्पृश्य समाजातील संघशक्ती तोडण्यात रस आहे. म्हणून शासनाच्या वर्गीकरण धोरणास विरोध आहे. हा विरोध कोण्या जातीला नाही. आजच्या शासनाला सामाजिक समतेपेक्षा समरसता महत्त्वाची वाटते. त्यामुळे सर्व अस्पृश्य जातींनी या अस्पृश्यद्रोही, मुस्लिमद्रोही शासनाचा विरोध केला पाहिजे.

दलितांनी आता ‘सिता’ साठी नाही तर शेतासाठी संघर्ष करायला शिकले पाहिजे. त्यासाठी एकसंघ राहिले पाहिजे. खरंतर आज सर्व अस्पृश्य जातींना ‘बटेंगे तो कटेंगे’ या विचारावर लक्ष देण्याची गरज आहे. 

हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी पूजयनीय भंते पय्यानंद महाथेरो,  डॉ.सुरेश वाघमारे, तसेच डॉ. बाळासाहेब गोडबोले, वन अधिकारी जी एस. साबळे, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांनी परिश्रम घेतले. शेवटी राहुल खांडेकर यांनी आभार मानले. 

या अभिनव चर्चासत्रास संपूर्ण महाराष्ट्रातून अद्भुत प्रतिसाद मिळाला. 1000 पेक्षा अधिक लोक क्या ऑनलाइन चर्चासत्राला जोडले गेले होते.

डॉ. सुरेश वाघमारे

लातूर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!