दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपान

जागतिक महिला दिनानिमित्त- अशोक सवाई

आजचा हा माझा लेख जागतिक नारी शक्तीला समर्पित!

            महिलांचा जागतिक इतिहास पाहिला तरी लक्षात येते की, जगातील देशात देखील महिलांना दुय्यम दर्जाचेच स्थान होते. मग ते पुढारलेले देश अमेरिका असो की युरोपातील देश. महिलांचे स्थान तेथे दुय्यमच होते. आपल्या देशात महिलांना आजही पुरुषी अंतर्मनातून दासी, गुलाम समजले जाते. 'घर सांभाळणारी गृहलक्ष्मी' असे गोंडस नावही देतात. भले ती कमावती का असेना. वरील देशातील महिलांना आपल्या अधिकाराची जाणीव झाली आणि आपल्याला दुय्यम स्थान दिले जात आहे हे लक्षात आल्यावर तेथील महिलांनी उठाव केला, तिथल्या व्यवस्थेशी झगडल्या, आंदोलने केली, आपल्या हक्क अधिकारासाठी तिथल्या व्यवस्थेशी विविध स्तरावर संघर्ष केला. त्यांच्या संघर्षाला ८ मार्च १९७५ ला यश आले आणि UNO=United  Nation Organization म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघाने  ८ मार्च  हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून घोषित केला. तेव्हापासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळला जातो. या दिवसाचे उद्देश आणि महत्त्व पुढीलप्रमाणे आहेत. 

१) महिलांना पुरुषां बरोबरीचा दर्जा देणे. २) कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा महिलांसोबत भेदभाव न करणे. ३) समाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात त्यांना समान न्याय देणे. ४) महिलांसाठी पुरुषांमध्ये जागृती आणणे. ५) महिलांसाठी हिंसा, बलात्कार व दुर्व्यवहारा विरोधात आवाज उठवणे. ६) महिलांसाठी प्रत्येक क्षेत्रात अधिकार व भागीदारी असणे आवश्यक. ७) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांना सन्मान मिळावा. तिचा कुठेही आणि कोणत्याही प्रकारचा अपमान होवू नये याची दक्षता घेणे. ८ मार्च दिनाचे हे वरील उद्देश व महत्त्व आहे. जगातील प्रगत देश जसे अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रान्स, जर्मनी, युरोप ऑस्ट्रेलिया,जपान चीन वगैरे देश, त्या त्या देशातील स्त्रियांचा त्या देशाच्या प्रगतीत अर्धा वाटा आहे. म्हणून ते देश प्रगती पथावर आहेत. आपल्या देशातील ‘प्रगती’ कुठे हरवली कुणास ठाऊक? आतापर्यंत जी प्रगती झाली तीही आता आकुंचित होत चालली आहे. बेरोजगारी वाढत चालली, शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था ढासळत चालल्या, महिलांवरील अन्याय/अत्याचार कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत. आपल्या देशातील समस्त आदरणीय महिलांनो लक्षात घ्या. वरील देशातील महिलांना त्यांच्या अधिकारांसाठी झगडावे लागले. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना तयार होत असतानाच वरील महिलांच्या अधिकारां सहीत कितीतरी जास्त हक्क अधिकार घटनेच्या मूलभूत चौकटीत टाकून ठेवले आहेत. ते सुद्धा तुम्हाला कवडीचा संघर्ष न करता अगदी आयते म्हणा. तुमचे अधिकार घटनेच्या मूलभूत चौकटीत टाकण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता की भविष्यात तुमच्या अधिकाराला कोणीही हात लावू नये. तरीही २०१४ पासून तुमच्या अधिकारांचे जरा जास्तच हनन होत चालले आहे, हेही लक्षात घ्या व जागरूक व्हा. नाही तर पुढे तुमच्यावर पुन्हा पुरुषाची दासी/गुलाम बनण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. सर्व भारतीय महिलांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एससी/एसटी/ओबीसी पुरुषांपेक्षाही कितीतरी अधिकचे अधिकार डॉ. बाबासाहेबांनी तुमच्या पदरात टाकले. फक्त तो पदर तुम्ही फाटू देवू नका. म्हणून तुमच्या सर्व भारतीय नारीचे कर्तव्य ठरते की डॉ. बाबासाहेबांच्या जन्मदिनी व महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या प्रतिमेसमोर निदान एखादे फूल ठेवून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करावी. (अर्थात घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही, त्या पाण्याला स्वतःचा स्त्रोत असावा लागतो हेही तितकेच खरे आहे) भारतीय समाजाला इशारा देताना बाबांनी एके ठिकाणी म्हटले होते ‘स्त्री ही समाजाचा बहुमूल्य अलंकार आहे समाजाने त्याला जपलं पाहिजे.’ खरच त्यांच हे विधान किती सार्थक होतं, जसे पाने, फुले, फळे हे त्या वृक्षाचे अभिन्न अंग आहेत तसेच स्त्री ही समाज शरीराचा अर्धा भाग आहे.

            स्वातंत्र पुर्व काळात वैदिक धर्म मार्तंडांनी समाजातील शुद्र पुरुष व सर्व स्तरातील स्त्रियांयांसाठी खुळचट धर्म व्यवस्थेच्या नियमाप्रमाणे नीती नियम, रिवाज ठरवून ते अक्षरशः बळजबरीने लोकांवर लादत असत. त्यांनी लोकांवर दैनंदिन आचरणासाठी भयंकर निर्बंध लावले होते. एक प्रकारे मानसिक गुलाम करून टाकले होते. जे त्यांच्या फायद्याचे होते तर शुद्र स्त्री-परुषांसाठी जुलम होता. त्यातही स्त्रियांसाठी जास्तच. जणू काही तिच्यासाठी नजरकैदेची शिक्षाच होती म्हणा. जो तो पुरुष तिच्यावर नजर ठेवून होता. ती आपली मर्यादा सोडते की काय म्हणून. स्त्रिच्यांच्या शरीराला व मनाला सांकेतिक अर्थाने बांधून ठेवले होते. व आजही काही प्रमाणात त्या अदृश्यपणे तनामनाने बांधूनच आहेत. (अर्थात काही अपवाद सोडून) स्त्रियांचे बंधन आज थोड्या प्रमाणात जरी सैल झाले असले तरी पण अजून पूर्णपणे मुक्तता नाही. अगदी घरापासून ते तिच्या कामाच्या ठिकाणापर्यंत. स्त्री सांकेतिक अर्थाने तनामनाने कशी बांधली गेली हे पुढीलप्रमाणे लक्षात येईल. 

१) पायातील जोडवी व पैंजण: (त्याचा सांकेतिक अर्थ पाय बांधून ठेवणे) म्हणजेच विचारल्या शिवाय कुठेही जावू नकोस. गेल्यास परिणाम वाईट. आम्ही गावभर व यथेच्छ हिंडू फिरू, दारूच्या/जुगाराच्या/सट्ट्याच्या अड्ड्यावर जावू. (कारण आम्ही पुरुष)

२) हातातील बांगड्या: (हात बांधून ठेवणे) सांगीतल्या शिवाय नसत्या कामात हस्तक्षेप करू नकोस आम्ही वाटेल ते करू (कारण आम्ही पुरुष)

३) कान टोचणे: (तंबी देवून ठेवणे) सांगितले तेवढे ऐक जास्तीचे नाही. नाही तर बघ…आम्ही मात्र तुझे ऐकणार नाही मनाला येईल ती मनमानी करू. (कारण आम्ही पुरुष)

४) मंगळसूत्र: (पुरुषाच्या दावणीला बांधून ठेवणे) तू एका पुरुषाशी बांधली गेली आहेस. किंवा त्या पुरुषाने तुला बंधक बनून ठेवले आहे. त्याची तू दासी आहेस गुलाम आहे. ही गुलामीची ओळख तू सर्वांना दाखव किंवा दिसू दे. (मोठ्या हौसेने दिसू देतातच म्हणा) किंवा ती सर्वांमध्ये मिरव आम्ही मुक्त. (कारण आम्ही पुरुष)

५) वस्त्र: (तुझ्या पसंतीला महत्त्व नाही) तू वस्त्र आमच्या पसंतीचे परिधान करायचे तुझी पसंती नाही. आम्ही कोणतेही कपडे वापरू नाही तर चड्डीवर फिरू. (कारण आम्ही पुरुष)

६) सर्वात महत्त्वाचे म्हणजे कपाळावरील लाल कुंकू किंवा टिकली: (लाक्षणिक अर्थाने धोक्याचा इशारा) टिकली लावणे म्हणजे तुझ्या स्वतंत्र विचारांना पूर्ण वीराम, एकदम फूलस्टाॅप. आपले कोणतेही विचार किंवा मत मांडायचे नाही. किंवा आपली अक्कल पाजळायची नाही. पुर्वी महिलांच्या कपाळावर कुंकवाची आडवी लाल लकीर होती (सावित्री माईचा फोटो पहा) ती म्हणजे महिलांच्या मर्यादांची लक्ष्मण रेखा होती. त्या काळी ती रेखा ओलांडून जाणे म्हणजे मरण यातनांनी मरण जवळ करणे होते. बरं हे त्या काळातील बायांच्या कपाळावर लाल आडव्या रेषेच्या रूपात कुंकू आले तरी कुठून? किंवा यामागे मनुवादी कर्मठ ब्राह्मणांचा तर्क काय असावा? त्यासाठी आपला तर्क लावून त्याचा उलगडा करण्यासाठी आपल्याला फारसी पराकाष्ठा करावी लागत नाही. तर्क असा आहे की, त्यांच्या काल्पनिक रामायणात सीतेला पर्णकुटीतून बाहेर न पडण्यासाठी लक्ष्मणाने जी आपल्या बाणाने कुटीच्या बाहेर रेषा खेचून ठेवली होती ती म्हणजेच लक्षण रेखा. तिच रेषा धर्म मार्तंडांनी बाईच्या कपाळावर तिच्या कुंकवाच्या रूपात आडवी ओढली. म्हणजेच ती बाईची मर्यादा रेषा होती. बाईने आपल्या घराचा उंबरठा ओलांडून कुठेही जावू नये. आपली मर्यादा ओलांडू नये. मर्यादा ओलांडण्यास गंभीर परिणाम होतील. धर्म मार्तंडाचा असा एक प्रकारचा गर्भित इशारा बाईच्या कपाळावरील लाल आडव्या रेषेत होता. आम्हाला कोणत्याही मर्यादा नाहीत. (कारण आम्ही पुरुष)

            आजही तिच कुजकट व हलकट वृती संभाजी भिडे च्या (मनोहर कुलकर्णी)   अंगात भिनली आहे. म्हणूनच तो एका महिला पत्रकाराला म्हणतो 'आधी टिकली लाव मगच माझ्याशी बोल' हा त्या महिला पत्रकाराला ऑर्डर देणारा कोण? अशांना तिथल्या तिथे जाब विचारून थंड करायला पाहिजे. महिलांच्या पुढच्या पिढ्या गुलामीच्या बंधनातून मुक्त व्हाव्यात म्हणून माता सावित्रीबाईंनीच स्वतःहून पहिले ती आडवी रेखा ओलांडून स्त्री शिक्षणातून स्त्रियांना मुक्तीचा मार्ग दाखवला होता. तो आजही तितकाच प्रासंगिक आहे.  सावित्रीबाईंचा त्याग, त्यांचे शिक्षण कार्य, महिलांचे नाजूक प्रश्न सोडवण्याची त्यांची संवेदनशील वृती यासाठी महात्मा फुले सावित्रीबाईंच्या पाठीशी एखाद्या पहाडासारखे खंबीरपणे उभे होते. हे आजच्या किती महिलांना माहित आहे? नसेल तर माहीत करून घ्या. व फुले दांपत्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करा. 

७) नाक टोचणे: (सांकेतिक निर्वाणीचा इशारा) जर तू आम्हाला सहन झाली नाहीच तर आम्ही वेळ प्रसंगी तुझा श्वास बंद करू शकतो. मात्र तशी तू करू शकणार नाही. (कारण आम्ही पुरुष) अर्थात वरील स्त्री च्या बंधनाला बुद्धीजीवी किंवा सहिष्णुतावादी वर्ग अपवाद असेल. सरसकट म्हणता येणार नाही.

            पायातील जोडवी, हातातील बांगड्या, गळ्यातील मंगळसूत्र, कानातले रींग, नाकातील नथनी, कपाळावर टिकली. हे स्त्रियांचे स्त्री धन मानतात. किंवा स्त्री दागीने म्हणतात, परंतु हे दागीने, दागीने नसून दागीन्याच्या रूपात स्त्री मनाला घातलेल्या अदृश्य बेड्या आहेत. दागदागीन्यांनी स्त्री सुंदर दिसते हे खरे आहे. आणि सुंदर दिसने कोणत्या स्त्री ला आवडणार नाही बरं? नव्हे, तो तिचा निसर्गदत्त हक्क/अधिकारच  आहे. त्यासाठी स्त्रिया सुद्धा सुंदर दिसण्याच्या हौसेने या मानसिक गुलामीच्या अदृश्य बेड्या स्वतःहुन स्वतःच घालून घेतात. पण सुंदर दिसण्या बरोबरच आपण आपल्याला या पुरूषी मनमानी बंधनात किती अडकून घ्यावे याचेही भान स्त्रियांनी ठेवावे. जेणेकरून तुमच्या स्वतंत्र विचारांना, स्वतंत्र विचारांच्या जगण्याला एक सामाजिक महत्त्व प्राप्त झाले पाहिजे. व त्या विचारातून एक सशक्त वैचारिक भारतीय समाज निर्माण झाला पाहिजे. साऱ्या स्त्रियांनी आपल्या मुलांच्या मनात देव दैवत, कर्मकांडाचे विचार पेरू नयेत. त्यापासून त्यांना कोसो दूर ठेवून त्यांच्यावर विज्ञानवादी बनण्याचे संस्कार करावेत. हे साऱ्या स्त्रियांनी लक्षात घ्यायला पाहिजे. पुरुषप्रधान संस्कृतीतही पुरुषप्रधान संस्कृतीला नैतिक गोष्टीसाठी झुकवणारी असी स्त्रियांनी आपापल्या पुरती स्वतंत्र व सक्षम स्त्रीप्रधान संकृती निर्माण केली पाहिजे. स्त्रीप्रधान संकृती म्हणजे उठ सूठ नवऱ्यावर डाफरणे नव्हे. तर पुरुषी अहंकाराला आपल्या तात्विक विचाराने मुरड घालणे होय. 

            वरील स्त्री बंधनाचे उल्लंघन केल्यावर  कौटुंबिक हिंसाचार होतो किंवा मानसिक अत्याचार होत असतो. किंवा अगदी छोट्या छोट्या कारणावरूनही महिलांना मानसिक ताण किंवा त्रास दिला जातो. यासाठी तणाव मुक्त कुटुंब घडविण्या साठीच्या दिशेने राष्ट्रीय महिला आयोगाला काम करावे लागेल. (पण त्यासाठी आयोगाचे नेतृत्व कोणाच्याही दबावात न येणारे कणखर असले पाहिजे. नेतृत्व महिलांच्या हिताची जपणूक करणारे सक्षम, दक्ष व कल्पक पाहिजे) तसे काम सुरू केल्यावर 'पड आंबा पटकन मी गिळतो गटकन' असे लगेच परिणाम दिसणार नाहीत पण सक्षम रितीने नियोजनबद्ध सुरवात केली की, परिणामही दिसून येतील. आदरणीय स्त्रियांनो आपल्या बाबांच्या घटनेमुळे तुम्ही या जगात मुक्त आहात, मोकळा श्वास घेत आहात. आज तुमच्या गळ्यात टेथस्कोप आहे, डोक्यावर इंजीनियरची कॅप आहे, काळ्या डगल्यात तुम्ही न्याय/हक्कासाठी राखणदार आहात. तुमच्या डोक्यावर देशाची राजमुद्रा असलेली व गुन्हेगाराला दरदरून घाम फोडणारी दरारायुक्त मानची  टोपी आहे. जी देशाच्या राष्ट्रपती/प्रधानमंत्री यांच्याकडेही नसते. तुमच्याजवळ  रोलिंग चेअर व हातात पेन आहे. ज्या चेअरवर बसून तुम्ही पूर्ण जिल्ह्याचा करभार सांभाळू शकता. आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी तुम्ही सर्वेसर्वा आहात. देशासाठी भावी  आदर्श नागरिक घडवण्यासाठी तुमच्या हातात पुस्तक व खडू आहे. देशाचे कोणतेही सर्वोच्च पद तुम्ही लिलया भूषवू शकता. उडण खटोले उडवू शकता त्यात उडू शकता. देशाच्या सीमेवर हातात मशीनगन घेऊन चट्टानासारख्या उभ्या आहात. फायटर जेट उडवून तुम्ही दुश्मनांच्या छातीत धडकी भरवत आहात, त्यामुळे देशाची जनता सुखाची झोप घेवू शकते. असे तमाम अधिकार तुमच्याकडे आहेत. बाबांनी तुमच्यासाठी दिलेलं हे लाखमोलाचं स्वातंत्र्य गाफील न राहता अबाधित ठेवा. अरे हो! एक विसरलोच होतो बघा! खाली माना घालून तासनतास मोबाईल पहात बसण्यापेक्षा त्यातून किमान तासभर वेळ काढून आपल्या महामानव व महामातांना वाचा. वाचनाने तुम्हाला तुमचा खरा इतिहास माहीत होईल. व त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढून तुम्ही बोलण्यातून समोरच्याला वैचारिक मात देवू शकाल आणि तुमचे व्यक्तीमत्व सुद्धा अधिक भारदस्त होवू शकेल. नाही तर ज्याच्या मागे लढायला जाल तोच तुम्हाला कापायला निघे ही आजची परिस्थिती आहे. म्हणून मी कळकळीने सांगीतलेल्या गोष्टी गाठ बांधून ठेवा. तुमच्या हितासाठी वरील चार गोष्टी सांगितल्या. पुढे त्यावर अंमल करणे न करणे हे तुमचे काम आहे. कारण आता तुमची लढाई  लढायला कोणीही बहुजन महापुरुष येणार नाही. तुमची लढाई खुद्द तुमच्या जयमतीवर लढावी लागणार आहे आणि जिंकली लागणार आहे. 

आज जागतिक महिला दिवसाच्या सर्व आदरणीय महिलांना हार्दिक शुभेच्छा!

अशोक सवाई.
९१ ५६१७ ०६९९

लेख समाप्त.

लेख समीक्षा.
नागसेन वाकोडे.
लेखक, समीक्षक, संकलक, अनुवादक, विश्लेषक, कंटेंट क्रिऐटर.

१६-०४-२०२५

पुरुषप्रधान संस्कृतीवरील अशोक सवाई यांच्या लेखावर समीक्षण.

अशोक सवाई यांचा “पुरुषप्रधान संस्कृती” हा लेख जागतिक महिला दिनानिमित्त लिहिलेला एक प्रभावी, विचारप्रवर्तक आणि समाजाच्या जखमांना उघड करणारा दस्तऐवज आहे. हा लेख केवळ महिलांच्या संघर्षाची आणि त्यांच्या हक्काची गाथा सांगत नाही, तर पुरुषप्रधान संस्कृतीच्या गुलामगिरीच्या बेड्यांना छेद देण्याचा आग्रह धरतो. लेखाचा प्रत्येक शब्द सामाजिक परिवर्तनाची आग पेटवणारा आहे, आणि तो भारतीय समाजातील स्त्रियांच्या स्थितीवर तीक्ष्ण भाष्य करतो. या समीक्षणात, सवाई यांच्या लेखातील मध्यवर्ती विचारांना बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, शाहू महाराज आणि पेरियार यांच्या क्रांतिकारी कार्याशी जोडून, त्याची खोली आणि प्रभाव अधिक तीव्रतेने उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

सवाई यांचा लेख पुरुषप्रधान संस्कृतीच्या जाचक बंधनांना उघड करतो आणि त्यांनी स्त्रियांवर लादलेल्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक गुलामगिरीचा कच्चा चेहरा समोर आणतो. लेखातील पायातील पैंजण, हातातील बांगड्या, मंगळसूत्र, कपाळावरील कुंकू यांसारख्या प्रतीकांचे सांकेतिक विश्लेषण अत्यंत मार्मिक आहे. ही प्रतीके, जी सामान्यतः स्त्रीत्वाचे अलंकार मानली जातात, खरेतर पुरुषप्रधान व्यवस्थेने स्त्रियांच्या स्वातंत्र्याला लावलेल्या बेड्या आहेत, हे सवाई यांनी प्रभावीपणे मांडले आहे. येथे लेखक केवळ परंपरांचा पडदा हटवत नाही, तर त्यामागील नियत आणि नियंत्रणाचा हेतू उघड करतो.

बाबासाहेब आंबेडकर यांनीही याच प्रकारच्या सामाजिक बंधनांविरुद्ध लढा दिला होता. त्यांनी “मनुस्मृती”च्या दमनकारी नीतिमूल्यांना आव्हान देताना, स्त्रियांच्या गुलामगिरीचा पर्दाफाश केला. बाबासाहेबांनी सांगितले होते, “स्त्री ही समाजाचा आधार आहे, आणि तिच्या मुक्तीशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे.” सवाई यांचा लेख बाबासाहेबांच्या या विचाराला पुढे नेताना दिसतो, विशेषतः जेव्हा ते भारतीय संविधानातील स्त्रियांच्या हक्कांचा उल्लेख करतात. बाबासाहेबांनी संविधानात स्त्रियांना समान हक्क बहाल करून, त्यांना कायदेशीरदृष्ट्या सक्षम केले; परंतु सवाई यांनी ठामपणे नमूद केल्याप्रमाणे, 2014 पासून या हक्कांचे हनन वाढत आहे. येथे लेखकाचा इशारा स्पष्ट आहे: जर स्त्रियांनी जागरूकता दाखवली नाही, तर पुन्हा गुलामगिरीची खाई त्यांची वाट पाहत आहे.

सवाई यांनी सावित्रीबाई फुलेंच्या क्रांतिकारी कार्याचा उल्लेख करताना, त्यांनी त्या काळातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी दिलेल्या लढ्याला सलाम केला आहे. जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी 19व्या शतकात, जेव्हा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारही नाकारला जात होता, तेव्हा मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंना यासाठी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले, त्यांच्यावर दगडफेक झाली, परंतु त्यांनी हार मानली नाही. सवाई यांनी सावित्रीबाईंनी “लक्ष्मण रेखा” ओलांडून स्त्रियांसाठी मुक्तीचा मार्ग प्रशस्त केल्याचे सांगितले आहे, आणि हा उल्लेख अत्यंत समर्पक आहे. जोतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पुरुषप्रधान ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान दिले आणि स्त्रियांच्या समानतेचा पाया रचला. सवाई यांचा लेख या विचारसरणीला पुढे नेताना, आजच्या स्त्रियांना सावित्रीबाईंच्या त्यागाची आठवण करून देतो आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन करतो.

शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात अस्पृश्य आणि स्त्रियांसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधी खुल्या केल्या होत्या. त्यांनी विधवाविवाहाला प्रोत्साहन दिले आणि स्त्रियांच्या सामाजिक सुधारणांसाठी कायदे लागू केले. शाहू महाराजांचा हा समतेचा लढा सवाई यांच्या लेखातील “स्त्रियांना समान न्याय देणे” या उद्देशाशी सुसंगत आहे. शाहू महाराजांनी म्हटले होते, “जो समाज आपल्या स्त्रियांना मागे ठेवतो, तो कधीच प्रगती करू शकत नाही.” सवाई यांनीही लेखात प्रगत देशांच्या उदाहरणाद्वारे हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, ज्या देशांनी स्त्रियांना समान संधी दिल्या, तेच देश आज प्रगतीच्या शिखरावर आहेत. येथे शाहू महाराजांचा विचार आणि सवाई यांचा लेख एकमेकांना पूरक ठरतात.

पेरियार रामास्वामी यांनी धर्म आणि परंपरेच्या नावाखाली स्त्रियांवर लादल्या जाणाऱ्या बंधनांविरुद्ध कडाडून हल्ला चढवला होता. त्यांनी मंगळसूत्रासारख्या प्रथांना “स्त्रियांच्या गुलामगिरीचे प्रतीक” म्हटले आणि त्यांना नष्ट करण्याचे आवाहन केले. सवाई यांनी लेखात मंगळसूत्राचा उल्लेख करताना, त्याला “पुरुषाच्या दावणीला बांधून ठेवणे” असे संबोधले आहे, आणि येथे पेरियार यांचा निर्भय बंडखोर स्वर लेखात प्रतिध्वनित होतो. पेरियार यांनी स्त्रियांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा मंत्र दिला, आणि सवाई यांनीही लेखात स्त्रियांना त्यांच्या अधिकारांसाठी जागरूक राहण्याचा आणि स्वतंत्र विचारांचा आग्रह धरण्याचा सल्ला दिला आहे. पेरियार यांनी धर्माच्या नावाखाली स्त्रियांच्या मर्यादांची “लक्ष्मण रेखा” खेचणाऱ्या व्यवस्थेला धक्का दिला, आणि सवाई यांनीही त्या रेखेचा उल्लेख करताना तिच्या मागील मनुवादी हेतू उघड केला आहे.

लेखातील सर्वात प्रभावी भाग म्हणजे सांकेतिक बंधनांचे विश्लेषण. पायातील पैंजण, हातातील बांगड्या, मंगळसूत्र, कपाळावरील कुंकू यांसारख्या प्रतीकांचा अर्थ लावताना, सवाई यांनी पुरुषप्रधान संस्कृतीच्या नियंत्रण यंत्रणेला उघडे पाडले आहे. येथे लेखकाचा दृष्टिकोन अत्यंत क्रांतिकारी आहे, कारण तो सामान्यतः स्वीकारल्या जाणाऱ्या परंपरांना प्रश्न विचारतो आणि त्यामागील गुलामगिरीचा इतिहास उजागर करतो. येथे पेरियार यांचा एक विचार आठवतो: “स्त्रियांच्या गुलामगिरीला धर्म आणि परंपरेचा आधार आहे, आणि त्या आधाराला नष्ट केल्याशिवाय मुक्ती अशक्य आहे.” सवाई यांचा लेख या विचाराला प्रत्यक्ष कृतीत उतरवतो, कारण तो परंपरेच्या पवित्रतेचा मुखवटा फाडून त्यामागील वास्तव दाखवतो.

लेखातील कुंकवाच्या आडव्या रेखेचा उल्लेख आणि त्याचा रामायणातील “लक्ष्मण रेखेशी” संबंध जोडणे, हा लेखाचा सर्वात टोकदार भाग आहे. येथे लेखकाने मनुवादी विचारसरणीच्या मुळाशी घाव घातला आहे. ही आडवी रेखा, जी स्त्रियांच्या मर्यादांचे प्रतीक आहे, ती मनुस्मृतीच्या काळापासून स्त्रियांच्या स्वातंत्र्याला बांधून ठेवणारी आहे. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून त्या बंधनांना आव्हान दिले होते, आणि सवाई यांनीही या लेखात त्या बंधनांना छेदण्याचा प्रयत्न केला आहे.

सवाई यांनी लेखात स्त्रियांना जागरूक राहण्याचा आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचा आग्रह केला आहे. येथे त्यांनी बाबासाहेबांनी संविधानात दिलेल्या हक्कांचा उल्लेख करताना, स्त्रियांना त्यांच्या कायदेशीर सामर्थ्याची जाणीव करून दिली आहे. परंतु, लेखाचा खरा प्रभाव त्याच्या आव्हानात आहे: “तुमचा पदर फाटू देऊ नका.” हे वाक्य केवळ साहित्यिक नाही, तर एक क्रांतिकारी घोषणा आहे. येथे लेखक स्त्रियांना त्यांच्या स्वातंत्र्याचे आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची जबाबदारी देतो. बाबासाहेबांनीही असेच सांगितले होते: “तुमचे हक्क तुम्ही स्वतः मागा, कोणीही ते तुम्हाला थाळीत वाढून देणार नाही.”

लेखातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, स्त्रियांनी आपल्या मुलांवर विज्ञानवादी संस्कार करावेत आणि त्यांना कर्मकांडापासून दूर ठेवावे. येथे लेखकाने पेरियार यांच्या तर्कशुद्ध विचारसरणीला उजागर केले आहे. पेरियार यांनी धर्म आणि अंधश्रद्धेच्या विरोधात लढा देताना, स्त्रियांना तर्क आणि विज्ञानाच्या आधारावर स्वतंत्र विचार करण्याचे आवाहन केले होते. सवाई यांनीही याच विचाराला पुढे नेले आहे, आणि हा मुद्दा आजच्या काळात अत्यंत प्रासंगिक आहे, जेव्हा अंधश्रद्धा आणि कर्मकांड पुन्हा डोके वर काढत आहेत.

सवाई यांचा लेख अत्यंत प्रभावी असला, तरी त्यात काही मर्यादा आहेत. लेखात पुरुषप्रधान संस्कृतीच्या बंधनांचा पर्दाफाश केला आहे, परंतु या बंधनांपासून मुक्तीचा ठोस मार्ग दाखवण्यात लेख काहीसा कमी पडतो. उदाहरणार्थ, राष्ट्रीय महिला आयोगाला सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचा उल्लेख आहे, परंतु त्यासाठी नेमके काय पावले उचलली जावीत, याबाबत स्पष्टता नाही. येथे शाहू महाराजांचे उदाहरण उपयुक्त ठरते. त्यांनी केवळ सुधारणांचा पुरस्कार केला नाही, तर कायदे आणि धोरणे लागू करून प्रत्यक्ष बदल घडवले. सवाई यांच्या लेखात अशा ठोस उपाययोजनांचा उल्लेख असता, तर त्याचा प्रभाव अधिक गहन झाला असता.

तसेच, लेखात पुरुषांना जबाबदार धरण्याचा मुद्दा आहे, परंतु पुरुषांनाही या क्रांतीत सहभागी करून घेण्याबाबत फारसे मार्गदर्शन नाही. जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजात पुरुष आणि स्त्रिया दोघांना एकत्र आणून सामाजिक परिवर्तन घडवले होते. सवाई यांच्या लेखातही अशा समावेशक दृष्टिकोनाचा समावेश असता, तर तो अधिक सर्वसमावेशक झाला असता.

अशोक सवाई यांचा हा लेख केवळ एक लेख नाही, तर पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्धचा एक लढा आहे. हा लेख बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा-सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि पेरियार यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा पुढे नेत आहे. लेखातील प्रत्येक शब्द समाजाला जागृत करण्याची ताकद बाळगतो, आणि तो स्त्रियांना त्यांच्या स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची जाणीव करून देतो. लेखातील सांकेतिक बंधनांचे विश्लेषण, बाबासाहेबांच्या संविधानातील हक्कांचा उल्लेख, आणि सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव यामुळे हा लेख अत्यंत प्रभावी ठरतो.

या लेखाचे समीक्षण करताना एक गोष्ट स्पष्ट होते: सवाई यांनी केवळ पुरुषप्रधान संस्कृतीवर हल्ला चढवला नाही, तर स्त्रियांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आहे. हा लेख प्रत्येक भारतीय स्त्रीला आणि पुरुषाला वाचायला हवा, कारण यातूनच एक सशक्त, समतावादी आणि वैज्ञानिक समाजाची निर्मिती होऊ शकते. बाबासाहेबांनी म्हटले होते, “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.” सवाई यांचा हा लेख त्या त्रिसूत्रीचा प्रत्यक्ष आविष्कार आहे. या लेखाला वाचून कोणत्याही संवेदनशील मनाला भारावून जावे लागेल, आणि त्यातून क्रांतीची ठिणगी पडावी लागेल.

नागसेन वाकोडे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!