
🌻रणजित मेश्राम लेखक जेष्ठ विचारवंत अभ्यासक साहित्यिक समीक्षक आहेत
यूपी तील इटावा ने चर्चा ओढली. जनमनात आग लावली. थांबायचे नाव घेत नाही. ओबीसी मोठ्याने व्यक्त होतायत. पहिल्यांदाच !
घटना तशी संवेदिनी आहे. ब्राह्मणांच्या गावात हे घडले. दांदरपूर गाव.इटावा जिल्ह्यात येते. घटना परवा २१ ची.
कथावाचक यादव (अहिर) निघाल्याने ब्राह्मण तडकले. शूद्र आम्हाला कथा सांगणार ? भडका उडाला. शीव शीव. भडका थांबेना. समूहकुटाई झाली. सिगरेटचा चटका दिला. खर्च वसूल केला गेला. शेंडी (चोटी) छाटली. मुंडण केले. शिव्यांची लाखोली वाहिली. असे मनसोक्त घडले.
बिचारे कथावाचक , मुकूटमणी यादव , संतसिंह यादव व आंधळा ढोलवादक असहाय होते. गावापूढे काय करणार ?
‘शूद्र असतांना ब्राह्मणांच्या गावात कथा वाचणार ? हा अधिकार दिला कुणी ? ही शेंडी कशी काय ? आधी ती कापली जाईल. मुकूटमणीची शेंडी कापली गेली. चांगली हातभर होती. आणि तू दूसरा ? तू तर चमार दिसतोस ? तू याचा सहयोगी. तुला पण शेंडी ? माजलात तुम्ही.
नाही मी चमार नाही. यादव आहे. आधार कार्ड दाखव. आणला नाही. घरच्यांचा नंबर दे. हा घ्या. मी शिक्षक होतो. शाळा बंद झाली. मग कथावाचनाकडे वळलो. मुकूटमणींचा सहकारी झालो. खोटे बोलतोस. चलाख दिसतोस. याचे मुंडण करा. केस कापले गेले.
सर्वांच्या पाया पडायला लावले. कथा घेणाऱ्या पंडिताईनच्या पायावर नाक रगडायला लावले. सारे केले गेले.
शेवटी पंडिताईनचे मूत्र शिंपडून पवित्र केले गेले. त्यानंतर सुटका झाली.
गुन्हा काय ? तिघेही यादव निघाले. तरीही कथावाचनाचे कर्म करतात. चोटी ठेवतात. म्हणजेच नकली पंडित आहेत. यावर कथावाचक सांगतात , आम्ही जात लपविलीच नाही. आम्हाला विचारली नाही. आम्ही सांगितली नाही. कथा ठरवली तेंव्हाही विचारले नव्हते. सकाळचे कथावाचन सुरळीत झाले. सायंकाळी कुभांड उठले. नंतर प्रताडणा झाली. हार्मोनियम तोडले. ढोलही फोडले.
पोलिसात तक्रार झाली. मुंडण करणाऱ्या चारांवर गुन्हा दाखल झाला.
दरम्यान , आता वेगळे वळण मिळत आहे. मुकूटमणी स्वतःला अग्निहोत्री लिहायचा. पंडित सांगायचा. संबंधित महिला तक्रार करतेय. तो स्पर्श करीत होता. उशिरा या तक्रारी होत आहेत.
अशा अनेक अंगांनी हे प्रकरण गाजतेय. यादवांत 'करंट' मोठा आहे. बिहार निवडणुकीच्या तोंडावर हे घडलेय. सोशल मीडिया याप्रकरणी भरून आहे. अखिलेश यादव च्या पीडीए ने प्रकरण उचलले. नवे मंथन सुरू झालेय.
‘बटेंगे तो कटेंगे’ वा ‘धर्म विचारून गोळी दागली’ ची चिरफाड होतेय.
इथे तर जात विचारली जाते. एकाच धर्माचे असतांना. उचनीच हाच आधार आहे. हेच जगणे इथे. हिंदू राष्ट्राची समीक्षा होत आहे. ‘कायदेमे (धर्माच्या) रहोंगे तो फायदेमे रहोंगे’. ते हेच का ? असे सर्रास विचारले जातेय.
हे विचारणे. ओबीसींचे असे जागणे. चेतणे. स्वस्थ संकेत आहेत.
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत