शेतकऱ्यांनो ,डोळस व्हा!ज्ञानी व्हा!

शेतकरी अधिकतम अस्मानी पावसावर अवलंबून होता.आता बराच स्वावलंबी झाला आहे.धरण,कालवे,विहीर,इंधन पंप,बोर विहीर ,सबमर्शियल पंप या मुळे पावसावर अवलंबून राहाणे, विसंबून राहाणे कमी झाले आहे.
आधी लढाया होत.शेती उध्वस्त होत असे.शिवाय सैनिक लुटमार करीत असत.राजा , बादशहा, सुलतान बळजबरीने वसुली करीत असत.आता ते प्रमाण कमी झाले आहे.पेंढारे,डाकूंचा बंदोबस्त झाला आहे.ते आता राजकारण करायला लागले आहेत.आमदार, खासदार मंत्री बनलेत.
शेतकरी आधी स्वताकडे असलेले बीज पेरत असे.आता तो बाजारातून संकरीत बीज घेतो.पण याचे ज्ञान ,परीक्षण त्याला नसल्याने तो पुन्हा परावलंबी झाला आहे.यात फसवणूक होऊ शकते.होते.हे असे करणे ऐच्छिक आहे.
शेतकरी आधी गाई गुरांचे शेण खत म्हणून वापरत होता.त्यात फसवणूक नव्हती.पण आता रासायनिक खते वापरत आहे.या खतांबाबत शेतकऱ्यांना ज्ञान,परीक्षण नसते.म्हणून यात सुद्धा तो परावलंबी झाला आहे.यात सुद्धा फसवणूक होऊ शकते.हे ऐच्छिक आहे.
आता किटकनाशके बाजारातून घेतो.त्याचे ज्ञान आणि परीक्षण शेतकऱ्यांना करता येत नाही.यातही तो परावलंबी झाला आहे.हे ऐच्छिक आहे.
शेतकरी आधी गरज पडली तर सावकारांकडून कर्ज घेत असे.ते फेडावे लागते.नाही फेडले तर जमीन,घर , दागिने हिरावून घेत असत.म्हणून फेडत होता.आता सरकारने बॅंकचे कर्ज देणे सुरू केले.यात हिशोब असतो.सवलत असते.यातही शेतकरी अज्ञानी असतो.बॅंकेचे हिशोब शेतकऱ्यांनी शिकून घेतले पाहिजे.पण शेतकरी यासाठी मेंदू वापरत नाही.कर्ज घेऊन अनाठायी खर्च केल्याने कर्ज वाढते.शिवाय शेती,घर हिरावून घेण्याची भीती उरली नाही.म्हणून कर्ज फेडण्याची चिंता करीत नाही.ते वाढत जाते.तर मग पुन्हा कर्ज मिळणे बंद होते.शेतकरी कर्जबाजारी तर होतोच शिवाय पुढील आर्थिक व्यवहार ठप्प होतो.अशा परिस्थितीत शेतकरी टिकत नाही.म्हणून सरकार कर्जमाफी करते.एकदा,दोनदा,तिनदा . वारंवार कर्जमाफी केल्याने शेतकऱ्यांना सवय पडली आहे.कर्ज काढणे आणि परतफेड न करणे.अनेकदा तर कर्ज न फेडण्यासाठीच काढतात.देणे असेल तर भीती असेल.यामुळे कर्जाचे ,कर्जदाराचे भय संपले.यामुळे बाजारात शेतकऱ्यांची पत खराब झाली.बाजारात ,भाऊबंदकीत ,नातेवाईकात शेतकऱ्यांवर विश्वास राहिला नाही.यामुळे आर्थिक कोंडी झाली आहे.जशी श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश यांची झाली आहे.
शेतकऱ्यांना जर जगाबरोबर जगायचे असेल,बदलत्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा असेल तर तसे चालण्याचा,पळण्याचा अभ्यास करावा लागेल.असा अभ्यास शेतकरी करीत नाही.ज्यांनी केला ते शेतकऱ्यांना सोडून पुढे निघून गेले.
शेतकरी अन्नधान्य पिकवतो.हे जिवनाश्यक आहेच.मानवाची प्रथम गरज अन्न आहे.जर इतके आवश्यक आहे तर तितकेच मौल्यवान असले पाहिजे.तरीही का नाही?कारण साधन,श्रम , खर्च, उत्पादन, बाजार आणि मोबदला यांचे नियोजन नाही.शेती साधन आहे.शेतकरी श्रम करतो.पैसा खर्च करतो.उत्पादन चांगले घेतो.बाजारात नेतो.पण साधन मुल्य, श्रम मुल्य,खर्च,उत्पादन मुल्य बाजारात मिळत नाही.का?
कारण शेती आपली.श्रम आपले.खर्च आपला.उत्पादन आपले.पण बाजार मात्र आपला नाही.तो विकणारा, खरेदी करणारा, उपभोग घेणारा यांच्यावर चालतो.विकणारा शेतकरी आहे.खरेदी करणारा मात्र व्यवसाय म्हणून बाजारात उतरतो.तो धर्मादायी नसतो.त्याची खरेदी आणि मालाची किंमत ही तिसराच कोणी उपभोक्ता याच्यावर अवलंबून असते.व्यापारी स्वतासाठी शेतकऱ्यांचा माल घेत नाही.त्यावर प्रक्रिया करून विकण्यासाठीच माल घेतो.तर तो उपभोक्ताचा अभ्यास करुनच माल घेतो, प्रक्रिया करतो.या उपभोक्ता घटकावर शेतकऱ्यांच्या मालाची किंमत अवलंबून असते.त्याची गरज कोणती,किती , केंव्हा याचा अभ्यास शेतकऱ्यांनी केला पाहिजे.व्यापारी करतो.तो आधी खपाचा आणि विक्रीचा अभ्यास करतो नंतर खरेदीचे नियोजन करतो.शेतकऱ्यांनी सुद्धा शेती उत्पन्न मालाचा खप कसा,किती,कुठे होईल,याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.तरच आपला शेती व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.
आता शेतकऱ्यांची मुले शिकलीत.मोबाईल, कम्प्युटर चालवू लागलीत.तर साधन,श्रम,खर्च, उत्पन्न, बाजार, मोबदला याचा अभ्यास केलाच पाहिजे.याची सांगड घातलीच पाहिजे.याचा अभ्यास दुसरा, तिसरा कोणी करील आणि मला फायदा मिळवून देईल या भ्रमात राहू नये.
अद्यावत साधनाचा,सुख सोयींचा लाभ घेणार असाल तर अद्यावत ज्ञान घेणे आवश्यक आहे.आंधळा माणूस डोळस झाल्याशिवाय सौंदर्य दिसणार नाही.शेतकऱ्यांनी डोळस व्हावे.ज्ञानी व्हावे.हाच रामबाण उपाय आहे.
…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत