लढा मानव मुक्तीचा…….

होतो हिंदू, जातीने महार,
हाकलले आम्हाला , वेशीच्या बाहेर,
इतरे जनांसी होता, आमचा बाट,
टाळून सावली , करीतसे अलग वाट.!
पिढ्या न पिढ्या, पुजले देवाला,
केले उपास , दिले बकरे नवसाला,
होता नमस्कार, लांबूनच ईश्वराला,
लावण्यास बोट मंदिराला , बंदी होती आम्हाला,
स्पर्शाचा आमच्या , होता बाट देवाला.!
रहात होत्या, तिष्ठत उभ्या,
माय भगिनी, तासन् तास,
विहिरीच्या कडेला,
पाण्यासाठी पिण्याच्या,
याचकागत,
येती दया कोणा, आया बायास,
वाढी पाणी, वरूनी,
हंडा , अर्धा हंडा .!
देता आदेश बाबांनी, सत्याग्रहाचा,
जमल्या आया बाया, बापे,
अन् पोरं तरणीबांड,
फुलला परिसर,,
महाडच्या चवदार तळ्याचा,
घेऊनी ओंजळीत , घोट घेतला पाण्याचा,
झाला जयजयकार, बाबांच्या नावाचा,
फुटला नारळ, मानव मुक्तीच्या लढ्याचा.!
होऊनी जळफळाट जातांध्यांचा,
केला निष्ठुर हल्ला, निघताना परतीला,
विसरुनी मानवता, लावली माती अन्नाला,
केले जखमी अगनिक, होऊनी पडले रक्तबंबाळ धरणीला,
झाला कोर्ट कज्जा, पण मिळाला न न्याय ,
होऊन अस्वस्थ, रडले बाबा मोकलून धाय . !
प्रश्न दलितांच्या, न्याय हक्कांचे, मांडले बाबांनी, गोलमेज परिषदेत,
झाली मान्यता , इंग्रज सरकारात,
शीख, मुस्लिम,अन् दलितां करिता,
वेगळ्या राखीव मतदार संघाची.!
करून विरोध गांधीजी ,
बसले प्राणांतिक उपोशनासी,
म्हणती , ती लेकरे हरीची, दलीत हिंदूच असती ,
त्यांच्यासाठी,
अलग राखीव मतदार संघाची,
गरज काहीही नसती.!
खालावता तब्बेत गांधींजींची,
बाबांवर उठली , झोड टीकेची,
न डर त्यांसी दबावाची,
राहुन ठाम, न केली तडजोड, आपल्या भूमिकेची.!
टेकता गांधीजी मरणाला,
विचार केला बाबांनी,
चहूकडे पसरलेल्या आपल्या,
गोर गरीब,अज्ञानी, लेकरांचा,
नाईलाजाने केली,
पुणे करारावर सही,
रडल्या केविलवाण्या भिंती,
तुरुंगातील येरवड्याच्या.!
आदेश दिला बाबांनी, सत्याग्रहाचा,
करण्या मंदिर प्रवेश , काळया रामाचा,
झाला जमावडा , बाबांच्या लेकरांचा,
केला उभा , लढा संघर्षाचा,
लागला कस, कर्मवीरांच्या नेतृत्वाचा.!
करुनी दारे मंदिराचे,बडव्यांनी बंद,
देती पहारा सत्याग्रही, चार ही दरवाजांवरी,
न जाऊ देत , कोणासही आतवरी
उठले वळ माराचे, शरीरावरी,
जाती कैक तुरुंगादारी,
पण हटेनात सत्याग्रही,
फळी दुसरी, उतरे मैदानावरी.!
देती साथ , माय भगिनी ,
पर्वा न करता जीवाची,
सोसली मारहाण, घेतले दगड धोंडे, अंगावरी,
न डगमगता लढल्या, त्या मर्दापरी,
वीरांगना समरांगणावरी.!
अविरत चालला सत्याग्रह,
वर्षे पांच, अन् अकरा महिने, ं
कंटाळले पोलिस अन् प्रशासन ही,
न आली दया काळया रामाला, ना त्याच्या भक्तांना, ना न्याय दिला सरकारने.!
कडाडले बाबा, येवला मुक्कामी,
ज्या पाण्यात म्हशी भादरता,
त्यासी आम्हाला तरसवता?
का आहोंत आम्ही,जनावराहूनी ही हिन?
न चाले सावली, दाखवलीत वेशी
बाहेरची वाट,
बाटतो देव तुमचा ,आमच्या स्पर्शाने,
काय उपयोग अशा देवाचा?
अन् त्याच्या धर्माचा ?
जो ना समजे, माणूस आम्हाला,
ठेवा तो देव, तुमचा तुम्हाला ,
अन् धर्मही,
होवो लखलाभ, दोन्हीही,
तुमचे तुम्हाला.!
” मी जन्मलो हिंदू, परंतु मरणार नाही
हिंदू म्हणून”,
करुनी अभ्यास अनेक धर्माचा,
दिला मार्ग बुध्द धम्माचा,
माणसाला माणूस , म्हणून जगण्याचा,
अहिंसा, शांती, समतेचा.!
अहिंसा, शांती, समतेचा.!!
अहिंसा, शांती, समतेचा.!!!
आपला,
अरुण निकम,
9323249487.
मुंबई.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत