दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

कुणाल कामराची कमाल…!


जागर

महाराष्ट्राने कुणाल कामरा याची काॅमेडी एक राजकीय विडंबन म्हणून स्वीकारली पाहिजे. धुव्र राठी सारखा तरुण जर्मनीत बसून युट्यूबवर तपशीलवार व्हिडीओ टाकत असेल तर ताेडफाेड करायला जर्मनीला जाणार का? आता कुणाल कामरा किंवा ध्रुव राठी फार पुढे गेले आहेत, तुमचे राजकारण मागे पडत आहे.

वसंत भोसले
संपादक, कोल्हापूर

स्टॅंडअप काॅमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्रातील तथा कथित प्रसिद्ध राजकीय पक्ष आणि त्या पक्षांच्या नेत्यांना हालवून टाकले आहे. काॅमेडियन, व्यंगचित्रकार, वात्रटिकाकार किंवा विडंबनकार यांची हीच कमाल सार्वजनिक जीवनात धमाल उडवून देत असते. महाराष्ट्राला ही सांस्कृतिक, तसेच साहित्यिक कला नवीन नाही. राजकीय पक्षांवर किंवा नेत्यांवर टीकाटिपण्णी करताना अशी भाषा, अभिनय किंवा चित्रकलेचा वापर नेहमीच करण्यात आलेला आहे. त्याने धमाल उडवून देण्यात येत होती. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण, एवढेच काय तमाशापटात रंगत आणणारे काळू-बाळू ते एक काळ मराठी चित्रपटसृष्टीचा पडदा गाजविणारे दादा कोंडके यांच्यापर्यंतची पिढी ज्यांना अनुभवता आली. ते भाग्यवानच म्हटले पाहिजेत.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा टिपेला पोहाेचला होता. तेव्हा आचार्य अत्रे यांचा तोफखाना बारुद भरून मराठी माणसाला अंघोळ घालत होता. त्या तोफखान्याचे कोणी तोडफोड करीत नव्हते. अलीकडचे म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी एकदा विधानभवनात धमाल उडवून दिली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा – गगनबावड्याचे आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचा किस्सा दिलीप सोपल यांच्याकडूनच ऐकायला हवा. यशवंत एकनाथ तिसऱ्यांदा निवडून आले होते. रांगडा गडी. मंत्री व्हावे, असे त्यांनाही वाटणं गैर नव्हते. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना एक पत्र तयार केले. विषय : मंत्रिपदी निवड करण्याबाबत. पत्र घेऊन आमदारांच्या सह्या घेण्यासाठी विधानभवनात फिरत होते. अनेकांच्या सह्या घेतल्या. समोरून दिलीप सोपल आले. ते विरोधी पक्षात होते. त्यांच्या हातात पत्र देऊन सही कर रे! असा दम दिला. तेवढ्यात समोरून जाणाऱ्या पाच-सहा आमदारांना बोलाविण्यासाठी यशवंत एकनाथ बाजूला गेले. सोपलांनी सही करता-करता पत्र न्याहाळले. पेन काढला आणि ‘‘मंत्रिपदी’’ या शब्दाच्या पुढे ‘‘मुख्य’’ असा शब्द लिहिला. यशवंत एकनाथ यांनी पत्र देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय गाठले. वसंतदादांच्या हातात पत्र देऊन हात जोडले. दादांची नजर थेट विषयावर गेली आणि म्हणाले, ‘अरे यशवंता, माझ्या खुर्चीवर का उठलास!’ यशवंत एकनाथ यांना काही समजेना. दादा म्हणाले, माझी खुर्ची तुला पाहिजे होय! नाही, नाही, दादा मला राज्यमंत्री तरी करा, असे म्हणाले. तेव्हा दादांनी सांगितले, पत्रात काय लिहिले आहेस ते बघ! हा किस्सा दिलीप सोपल यांच्याकडूनच ऐकावा. कुणाल कामरा याच्यावर सोपल मात करतील. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीवर विधानसभेत जोरदार चर्चा चालू होती. आचार्य अत्रे यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र समितीचे आमदार घोषणा देत होते की, बेळगाव-कारवार-बीदर-भालकी-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उठून म्हणाले, तुमच्या मागणीशी सहमत आहे, पण झाला पाहिजे म्हणा! ‘झालाच’ पाहिजे असे म्हणत ‘च’ कशाला जोडता? अत्रे हजरजबाबी. ते म्हणाले, ‘च’ ला फार महत्त्व आहे. तुमच्या आडनावातील ‘च’ काढून बघा!, चव्हाण याचे व्हाण होईल. सर्वच जण हास्यकल्लोळात लोटपोट झाले. अशा गंमती-जमती सार्वजनिक जीवनात असतात.
आता नव्या माध्यमांचा आधार घेत नकला केल्या जातात. बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार होते. त्यांची अनेक व्यंगचित्रे गाजली आहेत. आर. के. लक्ष्मण यांनी तर टाइम्स वृत्तसमूहात पाच दशके गाजविलेली आहेत. जागतिक कीर्तीची आणि अत्यंत खोचक, बोचरी टीका करणारी त्यांची व्यंगचित्रे असायची. अनेक संपादक अग्रलेखातून किंवा स्तंभातून जोरदार टीका-टिपण्णी करीत असायचे. तसे राजकीय नेत्यांनी आजवर चिंगूसपणा केलेला नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचा सामना गाजला आहे. पवार यांना मैद्याचे पोते किंवा बारामतीची टेकडी वगैरे म्हणून झाले आहे. ठाकरे यांनी छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी बंड केले तेव्हा टीकेची नीचतम पातळी गाठली होती. गोपीनाथ मुंडे हे अशीच जहरी टीका करीत होते. त्यापैकी कांही सत्य समोर आले नाही, पण अनेकांची प्रतिमा डागाळल्या गेल्या.
कुणाल कामरा याचे स्टॅंडअप काॅमेडी त्या मानाने खूपच कमाल आहे. त्याला एक दर्जा पण आहे. शिवीगाळ नाही. अंबानी पुत्राच्या लग्नसमारंभाच्यावेळी सारे प्रसिद्ध तथाकथित लोक गोळा होत होते. कांही हजार कोटी त्या लग्नावर खर्च करण्यात आल्याची चर्चा झाली होती. एकेकाळी अकलूजच्या शंकरराव मोहिते-पाटलांच्या पुत्राचे लग्न गाजले होते. भोजनावळीवरून सारा महाराष्ट्र गदागदा हालवून टाकावा, अशी टीका-टिपण्णी झाली होती. पाहुण्यांना थंडगार पाणी पिण्यास देण्यासाठी विहिरीतच बर्फाच्या लाद्या टाकण्यात आल्या होत्या. असे वर्णन करण्यात आले होते. अंबानी यांच्या पुत्राच्या लग्नास परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांची सोय व्हावी म्हणून गुजरातमधील सौराष्ट्रातील एका संरक्षणदलाच्या विमानतळास आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला होता. आणि तेथे इमिग्रेशनची सोय करण्यात आली होती.
विहिरीत बर्फ टाकण्यापासून आपण हवाई दलाचे विमानतळ पाहुण्यांसाठी वापरण्यास देण्यापर्यंत आलाे आहाेत. ना त्याची चर्चा झाली ना टीका-टीप्पणी झाली. काळ बदलला आहे. आचार्य अत्रे किंवा मार्मिककार बाळ ठाकरे पचविणाऱ्या महाराष्ट्राचे पाेट कुणाल कामरा याच्या स्टॅंडअप काॅमेडीने दुखू लागले आहे. त्याच्या सुमारे पंचेचाळीस मिनिटांच्या स्टॅंडअप काॅमेडीमध्ये दाेन-तीन मिनिटेच एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता वाट्याला आले आहेत. उपराेधिक मात्र टीकाच म्हणता येईल. त्याला हिंदी गाण्याची चाल लावली हाेती. त्यातील प्रत्येक शब्द अन् शब्द जून २०२२ मध्ये बाेलून बाेलून बाेथट झाले हाेते. विधिमंडळाच्या सभागृहात ‘पन्नास खाेके, एकदम ओके’ अशा घाेषणाही झाल्या हाेत्या. कामरा याने त्याचा आधार घेत काेणाचे नाव न घेता व्यंगात्मक काव्य गायिले, तर आकाश पाताळ एक करण्याचे कारण नव्हते. शिवाय त्याला उत्तर देण्याचे अनेक संवैधानिक मार्ग असताना ज्या स्टुडिओमध्ये हा कार्यक्रम झाला ताे फाेडून टाकण्याचे कृत्य कशात बसवायचे? काही महिन्यांपूर्वी पर्यंत महाराष्ट्रासारख्या माेठ्या राज्याचे नेतृत्व केलेल्या नेत्यांच्या अनुयायांना दीड-दाेन मिनिटांच्या व्यंगात्मक टीका सहन हाेऊ नये? कुणाल कामरा यांच्या माध्यमाची ही कमाल म्हणावे लागेल. केवळ चार-पाचशे जणांसमाेर केलेली स्टॅंडअप काॅमेडी आता पाऊण काेटी जणांनी तीन दिवसांत पाहिली. युट्यूबच्या माध्यमातून कुणाल कामरा याने कमाल केली आहे. हा मजकूर छापून येईपर्यंत हा व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या एक काेटीचा आकडा पार करेल, इतका त्याच्या प्रसाराचा वेग आहे. नव्या युगात विविध प्रसारमाध्यमे विकसित आणि विस्तारित हाेत आहेत. त्यांचा स्वीकार करावाच लागेल. ॲलन मस्क याच्या एआय तंत्रज्ञानाने जे प्रश्न भाजपच्या राजकारणाला उद्देशून विचारले गेले त्याची उत्तरे ऐकून भाजपचा संताप झाला हाेता. आता सार्वजनिक जीवन आक्राळ-विक्राळ रूप घेते आहे. त्याला याेग्य वळण देऊन सामाजिक सभ्यता किमान टिकेल याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
नाशिकमध्ये कुंभमेळा हाेणार आहे. उत्तर प्रदेशाचा आदर्श समाेर ठेवून नियाेजन करण्याचा निर्धार करण्यात येत आहे. गंगेच्या खाेऱ्यात असलेला उत्तर प्रदेश दारिद्र्याच्या खाईत आहे. सुमारे एक काेटी तरुण दाेनवेळचे पाेट भरण्यासाठी आणि किमान पाच हजार रुपये दरमहा घरी पाठविण्यासाठी देशभर कामासाठी भटकताे आहे. गावगुंडांची दादागिरी, जातीयवाद, धर्मवाद आणि कर्मकांडात अडकलेल्या उत्तर प्रदेशाचा आदर्श कशासाठी घ्यायचा? गॅंग ऑफ मिर्झापूर की वासेपूर अशा प्रकारचे सिनेमे येतात ते उत्तर प्रदेशाचे भयाण वास्तव दर्शविणारे असतात. अशावेळी टीका टीप्पणी झाली तर ती झेलावी आणि बाजूला ठेवावी. महाराष्ट्राने कुणाल कामरा याची काॅमेडी एक राजकीय विडंबन म्हणून स्वीकारले पाहिजे. धुव्र राठी सारखा तरुण जर्मनीत बसून युट्यूबवर तपशीलवार व्हिडीओ टाकत असेल तर ताेडफाेड करायला जर्मनीला जाणार का? त्याच्या व्हिडीओचा दर्जा जसा आंतरराष्ट्रीय पातळीवरील आहे, तसे राजकारणाचा दर्जा सुधारून दाखवा. सामान्य माणसाला जगायला लागते तेवढेच नेत्यांनाही लागते. त्यांचे पोट तीन मणाचे नाही. राजकीय कामे करण्यासाठी थाेडी साधने गाेळा करावी लागतात. तुम्हाला जाईल त्या गावात किंवा शहरात माेठमाेठ्याल्या बंगल्यांची, फाॅर्महाऊसची काय गरज आहे? राजकारणातून मिळालेल्या साधनांचा वापर करून समाजासाठी असंख्य कामे करता येतात. त्यांचे पुढील पिढी नाव काढते. महात्मा गांधी यांचा साधेपणा गर्भश्रीमंत हाेता. जगभरातून सर्वाधिक पुस्तके ज्यांच्यावर लिहिली गेली ताे मानव जातीच्या इतिहासातील सर्वांत श्रीमंत माणूस महात्मा गांधी हाेता.
महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते आणि राजकीय घराण्यांचा वारसा तयार झाला आहे. आपल्या समाजजीवनात वारसा किंवा वारसा हक्काला खूप महत्त्व आहे. त्यांच्या मुलांनी संसद गाजवावी, अत्यंत परखड मांडणी करावी, त्यांना साधन संपत्तीची तादाद नाही. उत्तम भाषा वैभव मिळवावे. विधिमंडळ किंवा संसदेत जावे, देशाचे नेतृत्व करण्याची आकांक्षा मनी असावी. प्रमाेद महाजन किंवा गाेपीनाथ मुंडे यांनी घराणेशाहीवर सतत ओरखडे काढले, पण त्याच वाटेवर जाणारे त्यांच्या पुढील पिढीची क्षमता (पात्रता) काय आहे, काेठे आहेत त्यांचे वारसदार? हे एक उदाहरण दिले. कुणाल कामरा उत्तम स्टॅंडअप काॅमेडी करताे. ताे आता ज्यांच्या विराेधात बाेलताे, त्यांना राग येणे समजू शकताे. त्याच ताेडीचे लिखाण, भाषण, व्यंगचित्र किंवा संशाेधन करण्याचे सामर्थ्य ताेडफाेड करणाऱ्यांच्या अंगी येण्यासाठी काय करावे लागेल? याचे उत्तर कधी देणार आहात? ज्या काळात साधनसंंपत्ती नव्हती तेव्हा अनेक नेत्यांच्या समाेर लाखाेंचा जमाव कान देऊन ऐकण्यासाठी तासनतास तिष्टत बसून असायचा. पंडित जवाहरलाल नेहरू यांना पाहायला आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषण ऐकायला लाखाेंच्या सभा हाेत हाेत्या. आता कमाल करा आणि पुढे जा ! कुणाल कामरा किंवा ध्रुव राठी फार पुढे गेले आहेत, तुमचे राजकारण मागे पडत चालले आहे. त्याचा दर्जा उंचवा, उंची वाढेल !

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!