“मरणाही आधी राहिलो मरोनी | मग केले मनीं होते तैसे ||” संत तुकाराम महाराज

“मरणाही आधी राहिलो मरोनी | मग केले मनी होते तैसे ||”
“मोक्षाच्या मस्तकावर आम्ही लाथा हाणू.”
“माझं वैकुंठ हे माझ्या घरातच आहे. मी वैकुंठ घरात आणलेलं आहे.”
“रिद्धी-सिद्धी मला अजिबात नको.”
– जगद्गुरू, संत तुकोबाराय
“मरणाही आधी राहिलो मरोनी | मग केले मनीं होते तैसे ||”
माझ्या मनात जे होतं, ते मी केलं. पण, ते करताना माझ्या मरणाच्याही अगोदर मला माझं मरण मरावं लागलं. प्रत्येक स्वातंत्र्योद्ध्याला आपल्या शारीरिक मरणाच्या अगोदर त्या मरणाची तयारी करून मगच स्वातंत्र्याच्या युद्धात उतरावं लागतं हे तुकारामांनी या अभंगातून सांगितलं. ते का सांगितलं? याचा आपण विचार करावा. आणि मग तुकारामांचा मृत्यू कसा झाला असावा याविषयी आपल्या अभ्यासकांच्या प्रतिभा अनेक मार्गांनी फुललेल्या आहेत. अनेक कल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत.
तुकाराम वैकुंठाला गेले हे आग्रहानं सांगितलं जातं. स्वतः तुकाराम “मोक्षाच्या मस्तकावर आम्ही लाथा हाणू.” “माझं वैकुंठ हे माझ्या घरातच आहे, मी वैकुंठ घरात आणलेलं आहे,” असं म्हणत होते. “रिद्धी-सिद्धी मला अजिबात नको,” असं म्हणत होते. त्यामुळं पारलौकिक वैकुंठाची स्वतः तुकारामांना अजिबात अभिलाषा नव्हती हे तुकारामांनी वारंवार.. एकदोनदा नव्हे, तर वारंवार सांगितलेलं आहे असं आपल्याला दिसतं.
तुकारामांनी सदेह वैकुंठगमन केलं अशी ज्यांची श्रद्धा असेल, त्यांच्यापुढं आणखी काही प्रश्न निर्माण होतात ते असे, की तुकाराम पाच दिवस रोज पत्र पाठवत होते आणि मी सुखरूप आहे असं सांगत होते? याही गोष्टींवर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल मग. मग ही पत्रं कोण लिहीत होतं? पत्रं ही खोटी निर्माण करण्याची का आवश्यकता पडली? याचा आपल्याला विचार करावा लागेल.
तिसऱ्या दिवशी त्यांची टाळ आणि गोधडी सापडली. म्हणजे नदीच्या काठी, डोहाच्या काठी ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी गोधडी आणि टाळ नव्हतं, पण तिसऱ्या दिवशी आले. आता मला गरज नाही म्हणून त्यांनी वैकुंठातून पाठवलं हे सांगितलं जातं, त्याचं आपण काय करायचं नेमकं? याचा आपल्याला विचार करावा लागेल.
तुकारामांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी, त्यांचे बंधू, त्यांची मुलं ही कायमची देहू सोडून गेली. ती का गेली? याचा आपल्याला विचार करावा लागेल.
तुकारामांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करू नयेत, असं रामेश्वर भटानी सांगितलं. कानोबांना, हे सांगताना ते सदेह वैकुंठाला गेलेले असल्यामुळं तसं करू नये असं सांगितलं. असं जरी म्हटलं जात असलं, तरी आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. तुकाराम सदेह वैकुंठाला गेले ही बातमी महाराष्ट्राला पहिल्यांदा जर कुणी सांगितली असेल, तर ती रामेश्वर भटानं. हे रामेश्वर भट म्हणजे ज्यांनी तुकाराम शूद्र असल्यामुळं त्यांना अभंग लिहिण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांची गाथा बुडवायला भाग पाडलं, तेच हे रामेश्वर भट. नंतर ते बदलले आणि शिष्य झाले असं कितीही सांगितलं जात असलं, तरी आपण त्याच्यावर विचार करावा, की जो मनुष्य दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांची शूद्र म्हणून गाथा बुडवत होता, तो मनुष्य ज्यावेळेला तुकाराम सदेह वैकुंठाला गेले असं सांगतो, त्यावेळेला ह्या साक्षीचं नेमकं काय करायचं?
त्याच्या डोक्यात ते वैदिक पंडित होते. आणि ‘गौतम धर्मसूत्र’ वगैरेमध्ये जे नियम सांगितलेत, तो नियम मी आवर्जून आपल्यापुढं सांगू इच्छितो.. माझ्या पुस्तकात परिशिष्ट म्हणून मूळ वाक्य सगळी संस्कृतमधली दिलेली आहेत. शांतपणानं आपण त्याचा कोणत्याही संस्कृत विद्वानांच्याकडून अर्थ लावून घ्यावा – त्यामध्ये स्पष्टपणानं असं सांगितलेलं आहे, की एखाद्या ब्राह्मण व्यक्तीकडून जर कुणाची हत्या झाली. तर ज्याची हत्या झालेली असेल त्याचे अंत्यसंस्कार करू नयेत. त्याच्या नातेवाईकांनी सुतक पाळू नये. त्याच्यासाठी अश्रू ढाळू नयेत. त्याचे नातेवाईक त्याच्या सुतकातून ताबडतोब मुक्त होतात. इतरांना जसं काही दिवस सुतक असतं, तसं नसतं. याचं कारण काय? तर स्पष्ट आहे, की ज्याची हत्या झाली तो पापी मानला जातो. इतर उदाहरणांत असं नसतं, जो हत्या करेल तो पापी. पण, इथं ज्याची हत्या झालेली आहे तो पापी. कारण ब्राह्मणानं ज्याअर्थी ज्याची हत्या केली आहे तो पापी आणि त्या पाप्याशी माझं नातं मी सांगता कामा नये. माझं त्याच्याशी नातच नसेल, तर मग सुतक पाळण्याचं कारण नाही असं धर्मशास्त्र सांगते. असं धर्मशास्त्र आहे हे निःसंदिग्ध आहे. याचं आपण काय करायचं? याचा आपण विचार करावा.
मी हे सगळं का मांडतोय? आमचा धर्म आम्हाला काय सांगतोय? आमचा धर्म आम्हाला काय अधिकार देतोय? आमचा धर्म आमच्या महापुरुषांना कोणत्या पद्धतीनं वागवतोय? त्या धर्माची धर्मशास्त्रं कोणते नियम सांगतात? हे जर आमचं आम्हालाच माहीत नसेल, आणि त्यांचं विश्लेषण करण्याचा आम्हाला जर अधिकार नसेल, तर मग आम्ही त्यांना आमचे धर्मशास्त्र कसं म्हणायचे? ते जर माझे धर्मग्रंथ असतील, तर ते धर्मग्रंथ असं का सांगतात? ते का असा विचार करतात? ते असं नियम का करतात? यामध्ये पक्षपात नाही का? यामध्ये विषमता नाही का? यामध्ये अन्याय नाही का? या प्रकारची भावना अभ्यास करताना जर माझ्यासारख्याच्या मनात उभी राहिली, तर ती भावना गैर आहे काय? याचाही आपण शांतपणानं विचार करू शकता.
आणि मग या सगळ्या परिस्थितीत तुकारामांची अखेर कोणत्या पद्धतीनं झालेली असेल याचा आपण अंदाज घेऊ शकता? पण, मला यापेक्षा एक अधिक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती अशी, की मला शारीरिक हत्या किंवा शारीरिक मृत्यू याच्यापेक्षा वैचारिक हत्या ही जास्त घातक वाटते हे मी आपल्याला आवर्जून सांगतो.
शरीराचा मृत्यू हा अटळ असतो. तुकाराम बेचाळीसाव्या वर्षी गेले नसते, तर बावन्नाव्या वर्षी गेले असते? नाहीतर बाहत्तराव्या वर्षी गेले असते? नाहीतर एकशेदोनाव्या वर्षी गेले असते? आज तर ते नसते नक्कीच? शरीर आहे. निसर्गाचे नियम आहेत. त्यापुढं कोणी कोणी राजापासून रंकापर्यंत, महापुरुषांपासून सामान्य स्त्री-पुरुषांपर्यंत कोणी कोणी विजय मिळवू शकत नाही हे अगदी उघड आहे.
तेव्हा शारीरिक मृत्यूवर जास्त रेंगाळण्यात.. मी खरं म्हणजे व्याख्यानामध्ये हे सगळं जास्त मांडत नाही. याचं कारण माझी इच्छा अशी असते, की मी तुकारामांच्या चरित्राची आधी जी मांडणी केलेली आहे, ती सगळी मनामध्ये रुजावी आणि मृत्यूची चर्चा करत लोकांनी बाहेर पडण्याच्याऐवजी तुकारामांनी वेदांविषयी काय म्हटलंय? चातुर्वर्ण्याविषयी काय म्हटलंय? कर्मकांडांविषयी काय म्हटलंय? खऱ्या संतांविषयी काय म्हटलंय? आणि धर्माला एक नवा आशय कसा नैतिकतेचा दिलेला आहे ते मनात लोकांच्या रुजावं ही माझी भावना असते. म्हणून मला मृत्यूविषयी विवेचन करायचं म्हणून मांडलं पाहिजे, म्हणून जरी मांडत असलो, तरी मी त्याच्यावर भर देत नाही. त्याचीच चर्चा करायची आणि तोच एक चर्चेचा विषय व्हावा, ते खरं की खोटं याच्यावर चर्चा व्हावी हे फार महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे ते – त्यांनी विचार काय मांडले? कार्य कोणतं केलं? हे महत्त्वाचं आहे.
आणि वाईट गोष्ट काय झाली. तुकारामांचे विचारच लोकांच्यापर्यंत पोचणार नाहीत याची व्यवस्था केली गेली. आणि ती केव्हा झाली? तुकारामांच्या हयातीतच झाली. तुकारामांच्या अभंगांत इतकं घुसडलं गेलं. बेंद्रेंनी तर त्याच्यावर फार फार विस्तारानं लिहिलं. शेंदूर किती फासला गेलेला आहे त्यांच्या चरित्रावर. त्याविषयी वा. सी. बेंद्रे यांनी फार सुरेख विवेचन केलं. ते सगळं खरवडून तुकारामांचं चरित्र कसं शोधलं पाहिजे ते त्यांनी सांगितलं.
पण, स्वतः संत तुकारामांनी आठ अभंग लिलिलेले आहेत आणि त्या अभंगांमध्ये त्यांनी सांगितलंय की, “हे कसं काय चाललेलं आहे?” “हे लोक आंगडं फाडून घोंगडं शिवण्याचं काम कसं करायला लागलेले आहेत?” “हे आपल्या ताकामध्ये दुसऱ्याचं लोणी आणून कसं घुसळताहेत?” हे तुकारामांनी स्वतः आठ अभंगांतून सांगितलेलं आहे असं दिसेल. “हे धान्यामध्ये भुसकट मिसळत आहेत?” “निवडलेल्या धान्यामध्ये खडे मिसळत आहेत?” “हे अमृतामध्ये विष कालवत आहेत?”
आणि मग काय? नेमकं तेच झालं. तुकारामांनी जे मांडलं नाही, जे म्हटलं नाही ते तुकारामांच्या नावावर घुसडण्यात आलं. याचं कारण असं, जेव्हा एखादा मनुष्य मोडून काढता येत नाही हे सिद्ध होतं. सुरुवातीला त्याची उपेक्षा केली जाते. नंतर त्याला विरोध करून मोडून काढण्याचा प्रयत्न केला जातो. पण, ज्यावेळेला त्याला मोडून काढणं अशक्य आहे, तो अत्यंत लोकप्रिय आहे, लोकांच्या हृदयात त्याला स्थान प्राप्त झालेलं आहे असं दिसतं. त्यावेळेला त्याला मोडून काढण्याचा एक वेगळा डावपेच आखला जातो. आणि तो डावपेच म्हणजे तो आमचा विरोधक आहे असं म्हणायच्याऐवजी, तो आमचा शत्रू आहे असं म्हणायच्याऐवजी तो आमचाच आहे असं म्हणायचं आणि त्याला गिळंकृत करून टाकायचं. आणि ते गिळंकृत करताना मात्र त्याच्या चरित्राला साजेशी चौकट निर्माण करायची नाही. तर आपल्या परंपरेची जी चौकट आहे, त्या चौकटीमध्ये त्याचं चरित्र तासून बसवायचं. आणि ते बसवताना त्याच्या तोंडी आपले विचार घालायचे. त्याच्या चरित्रामध्ये विसंगती निर्माण झाल्या तरी चालतील? आणि तुकारामांच्या बाबतीत तर ‘तुका म्हणे’ असं म्हणून काहीही म्हणावं आणि तुकारामांच्या विरोधी अशाप्रकारचे विचार त्यांच्या नावावर घुसडावेत हे प्रचंड प्रमाणामध्ये नंतर झालं. हे बेंद्रेंच्या सारख्यांनीदेखील दाखवून दिलं.
म्हणून आपल्याला डोळसपणानं तुकारामांचे चरित्र पाहावं लागतं. हा अत्यंत उंचीचा महापुरुष होता आणि हा काय सांगत होता? हा चमत्कार करत नव्हता. चमत्कारांमध्ये अडकलेला नव्हता, तर आपल्या समाजाला हा एका वेगळ्या दिशेनं घेऊन जावू इच्छित होता. आपल्या समाजामध्ये आपलं डबकं बनवणारं, आपल्या विचाराला संकुचित बनवणारं, आपल्या समाजामध्ये फूट पाडणारं, माणसा-माणसांमध्ये भेद करणारं असं जे जे अनिष्ट होतं, असं जे जे किल्मिष होतं, असं जे जे कलंकित होतं ते ते सगळं धुऊन काढण्याचा, ते दूर करण्याचा हा मनुष्य प्रयत्न करत होता असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून त्याचं मोठेपण जर शोधायचं असेल, तर त्याच्या ह्या विचारांमध्ये, त्याच्या ह्या आचारामध्ये आपण शोधलं पाहिजे असं मला वाटतं.
आज मला हे सगळं आपल्यापुढं मांडण्याची संधी मिळाली त्या निमित्तानं जणू काही संत तुकारामांच्या सहवासामध्ये मला वावरायला मिळालं. मी संयोजकांचा अत्यंत आभारी आहे. आपण अत्यंत शांतपणानं हे सर्व ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपलासुद्धा आभारी आहे. धन्यवाद!
( संत तुकाराम : सामाजिक विचार, डॉ. आ. ह. साळुंखे )
_९. ( समारोप )_
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत