दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

चाकरवाडीत भक्तांची माऊली, तिथे का हवी धनाची पावली!

सांय दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दिनांक 22 मे रोजी चे बिनधास्त नक्की वाचा


तुका म्हणे द्रव्य घेती। देती तेही नरका जाती॥

गणेश सावंत 9422742810
संत कोणाला म्हणावे? साधू कोणाला म्हणावे? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले त्याला संत म्हणा, त्याला साधू म्हणा, ज्याचे अंतकरण लोण्यासारखे मऊ आहे तो साधू, जो निराश्रितांना हृदयी धरतो तो साधू, आपल्या नोकरावर पुत्रवत प्रेम करतो तो साधू, जो भौतिक सुखापासून कोसो दूर तो साधू असे साधू संतांची व्याख्या जगद्गुरू संत तुकोबांच्या अभंगात पहायला मिळते. 17 व्या शतकामध्ये जी परिस्थिती तिच परिस्थिती 21 व्या शतकामध्ये तुकोबांनी ज्यांना साधू आणि संताची उपमा दिली ते तुम्ही, आम्ही याचीदेही याची डोळा साक्षात माऊली समान आम्ही चाकरवाडीत पाहिले, गेल्या दोन दशकापूर्वी जेव्हा चाकरवाडीचे माऊली महाराज वाडी-वस्ती तांड्यावर आणि गावा गावात किर्तनं करायचे तेव्हा ज्ञानोबा, तुकारामांच्या नावाचा गजर व्हायचा, विठ्ठल नामाने गाव कूस दणाणून जायचे आणि जो तो हरिनामामध्ये मंत्रमुग्ध होत जायचा. माऊली महाराजांनी आधी उत्रेश्‍वर पिंपरी येथे आपले अधिष्ठाण ठेवले आणि तेथून ते चाकरवाडीला आले. अनंत काळापासून श्रीक्षेत्र चाकरवाडीमध्ये भक्तांची साक्षात माऊली तिथे विसावलेली आहे. तिथे कोणी उपाशी आला मग तो गरिब असो की श्रीमंत, राजा असो की रंक, स्त्री असो की पुरुष, बालक असो की बालीका, नर असो की नारी अथवा असो अर्धनारी तो प्रसाद रुपाने पोटभर जेवण केल्याशिवाय कधीच गेला नाही. चाकरवाडीचे माऊली महाराज इहलोकी गेले तेव्हापासून भक्तांची मांदीआळी चाकरवाडीत मोठ्या प्रमाणावर वाढली. एक दिवसही असा गेला नसेल चाकरवाडीमध्ये अन्नदान झाले नसेल इथे अन्नदानासाठी सामान येते कोठून, जाते कोठे हे कोणालाही माहित नसते. कारण देणारा ईश्‍वर आहे आणि श्रवण करणारा भक्त आहे. गेल्या दीड दशकभराच्या कालखंडात न भुतो न भविष्यती असे हरिनाम सप्ताह झाले. लाखोच्या नव्हे पाच लाखाच्या घरात भक्तांचा मेळा नव्हे नव्हे तर जमवाडा चाकरवाडीत जमा होत राहिला. प्रत्येकाला पोटभर अन्न आणि पाणी मिळत गेले. तेव्हा कधीही निधी जमा करण्याची वेळ आली नाही. पैशाला तिथे कधीही महत्त्व प्राप्त झाले नाही. धनी असो की निर्धनी जो तो तिथे माऊलींचा भक्त, मग आज
करोडो रुपयांची गरज का?
हा आमचा सवाल नाही, माऊली महाराजांवर निस्सीम भक्ती करणार्‍या भक्तांची ही कुजबूज आहे. महाराष्ट्रात श्रद्धा आणि भक्तीला कधीच पैशात मोजले गेले नाही. हा साधूसंतांचा आणि सुफींचा महाराष्ट्र आहे. थोर समाजसुधारकांबरोबर हाच तो क्रांतिकार्‍यांचा महाराष्ट्र आहे. इथे संत नामदेवांपासून संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकोबांच्या भक्तीमय अभंगरुपी रसातून मिळालेल्या अमृततुल्य विचारांचा महाराष्ट्र आहे. इथे किर्तनासाठी बिदागी घेणार्‍यांना थारा नाही. इथे दिखाव्याच्या भक्तीला थारा नाही. इथे फक्त ईश्‍वराच्या नामस्मरणाला विठ्ठलाच्या नामजपाला अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्याप्रमाणे संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वरांनी नामजपातून भक्तांना चालण्याची, बोलण्याची दिशा दिली. त्याप्रमाणे चाकरवाडीच्या महाराजांनीही नामजपाला अनन्य साधारण महत्त्व दिले. त्यांनी कधी बिदागी मागितली नाही, वर्गणी मागितली नाही मात्र आज त्याच चाकरवाडीत ह.भ.प. महादेव महाराज यांचे नाव पुढे करत ‘शिवपुराणा’ला ‘पुरण’ जमा करण्याचं काम काहीजण करत आहेत. जिथे भक्तीला, नामजपाला महत्त्व दिलं पाहिजे तिथे शंभराला, हजाराला, लाखाला अन् कोटीला महत्त्व दिलं जातं तेव्हा, संत परंपरेतल्या महाराष्ट्राच्या संतांचा यांना विसर पडलाय का? हे बोलावं लागतं,
शिवपुराण
शिवपुराणाची कथा सांगत अखंड देशात प्रकाशझोतात आलेले प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराणाच्या कथेचा कार्यक्रम चाकरवाडीत योजिला आहे. त्या निमित्ताने गावागावातून आणि शहराशहरातून मोठ्या प्रमाणावर निधी जमा करण्यात येत आहे. प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखातून शिवभक्ती ओसंडून वाहताना दिसतेय. मिश्रा यांचे देशभरात लाखो अनुयायी आहेत. तेच मिश्रा शिवपुराणाच्या माध्यमातून धर्मप्रचार करतात, त्यांच्या धर्मप्रचाराला आणि भक्तीभावाला कोणीही प्रणाम करेल मात्र डोक्याखाली बेल ठेवल्याने मुलगा पास होणार नाही आणि कृष्णाच्या राधेला नाव ठेवल्याने शिवनिनाद होणार नाही, इथे फक्त हर हर महादेवाचा निनाद व्हावा, त्या निनादात निस्सीम भक्ती असावी, कुठे जाण्यासाठी अथवा विसावा घेण्यासाठी जलप्राशन करण्यासाठी अथवा दुग्ध प्राशनासाठी निधीची अट नसावी, कारण या महाराष्ट्राने संत ज्ञानेश्‍वरांच्या ज्ञानेश्‍वरीत निस्सीम भक्ती पाहितलीय, निरागसता पाहितलीय, हरिनामाचा महिमा अनुभवलाय, जगद्गुरू संत तुकोबांच्या गाथेने उभ्या महाराष्ट्राला सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानलीये नाही बहुमता म्हणण्याचा सिद्धांत दिला. नामस्मरण, किर्तन, ईश्‍वराचे जागरण यांना पैशात तोलू नका ही शिकवण संतांनी दिली. कथा करोनिया द्रव्य देती घेती । तयां अधोगति नरकवास ॥ रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची ॥ असे तुकोबांनी म्हटले. परंतू आता देशभरात ईश्‍वराच्या नामस्मरणासाठी अनेकांनी दुकाण थाटले, आम्ही जेव्हा संत ज्ञानेश्‍वर आणि तुकोबांकडे पाहतो तेव्हा ईश्‍वराच्या जवळ जाण्याचा मार्ग आम्हाला ज्ञानेश्‍वरी आणि गाथेत दिसतो. आज अनेक ठिकाणी मठ होतायत, संस्कार केंद्रे उभे राहत आहेत, गड उभे राहत आहेत, त्याला स्वत:ची नावे दिली जात आहेत. आम्हाला एवढंच म्हणायचंय तुकोबांचा महिमा किती होता,
तुकोबांना वाटलं नसलं का
मठ उभा करावा?
जेव्हा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब पुणे परगण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती सोन्याचा नांगर देण्यात आल्यानंतर तिथे वस्त्या विसावल्या, उभ्या राहिल्या आणि हळूहळू स्वराज्य उभारत गेलं. त्याचवेळी जगद्गुरू संत तुकोबांचा महिमा देहू आळंदी पुणे परगना परिसरामध्ये गावागावात पहायला मिळत असेल त्यांच्या अभंगाने किर्तनाने जो तो विठ्ठल भक्तीत गुंग झाला असेल, तुकोबांचे गावागावात नाव झाले असेल तेव्हा तुकोबांना वाटले नसेल का आपला छान मठ स्थापन करावा. शिष्यसंप्रदाय मेळवावा. जलदिव्याचा चमत्कार तर सर्वामुखी झाला होताच. शिष्यांकरवी अशा आणखी काही कथा पसरवाव्यात. सत्संग भरवावा. कीर्तनाच्या सुपार्‍या वाजवून घ्याव्यात. संपत्ती जमवावी. दारी हत्ती-घोडे झुलवावेत. भक्तांच्याच देणग्यांतून कोठे देवळे स्थापावित, भक्तनिवास उभारावेत, पाणपोया बांधाव्यात. अशी तेव्हाचीही रीत होतीच. हे केले असते तर तुकारामांचे केवढे तरी मोठे संस्थान उभे राहिले असते आणि मग त्यांच्या दर्शनासाठी राजे-महाराज-जहागिरदारांचीही रीघ लागली असती. पण हे तुकोबा आम्ही किंकर संतांचे दास्। संत पदवी नको आम्हांस्।्।’ असे म्हणत होते. नरस्तुती आणि कथेचा विकरा। हें नको दातारा घडों देऊ ।्।’ हे त्यांचे मागणे होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबा यांची भेट घडली होती की नाही हा वादविषय आहे. तुकोबांच्या सर्व पारंपरिक चरित्रकारांनी अशी भेट झाल्याचे रंगवून सांगितले आहे. इतिहाससंशोधक वा. सी. बेंद्रे यांच्या मते मात्र तशा (म्हणजे शिवाजी-तुकोबांच्या भेटीच्या) प्रसंगाची परिस्थिती तुकोबांच्या निर्याणापर्यंत नव्हती.’ गाथ्यात मात्र शिवाजी राजे यांनीं स्वामींस अबदागिरी, घोडा, कारकून असे न्यावयास पाठविलें, तें अभंग’ येतात. त्यातून तुकोबांच्या वैराग्यवृत्तीचेच दर्शन घडते.
दिवटया, छत्री, घोडे। हें तों बर्‍यांत न पडे।्।
आतां येथे पंढरीराया। मज गोविसी कासया।्।
मान दंभ चेष्टा। हें तो शूकराची विष्ठा।्।’
पुढे ते म्हणतात,
तुमचें येर वित्त धन। तें मज मृत्तिकेसमान।्।
कंठी मिरवा तुळसी। व्रत करा एकादशी।्।’
याचा अर्थ तुकाराम प्रपंचातून पूर्ण विरक्त झाले होते आणि बायको-पोरे, घर-संसार त्यांनी अगदी वार्‍यावर सोडला होता असा नाही. तुकाराम अखेपर्यंत प्रपंचात होते हे विसरता येणार नाही. माणसाला जगण्यासाठी सतराव्या शतकातही पैसे लागतच असत. पण त्यासाठी भिक्षा मागणे त्यांना मंजूर नव्हते. भिक्षापात्र अवलंबणें्। जळो जिणें लाजिरवाणें’ हा त्यांचा बाणा होता. जोडोनिया धन उत्तम वेव्हारें्। उदास विचारें वेंच करीं्।्।’ हे त्यांचे सांगणे होते. तेव्हा त्यांना गोमांसासमान कोणते धन वाटत होते, ते कथेचा विकरा करून मिळालेले तथाकथित मानधन. स्वत:स हरीचे दास म्हणवून घेणार्‍यांसाठी तुकारामांनी घालून दिलेला हा फार मोठा धडा आहे.
अगदी एकविसाव्या शतकापर्यंतचे दिसत होते किंवा त्यांच्या काळीही कीर्तन या माध्यमाचा गैरवापर करणार्‍या भ्रष्ट भोंदूंचा सुळसुळाट झाला होता. अशा भोंदूंबद्दल बोलताना तुकोबांच्या वाणीला तलवारीची धार चढताना दिसते. ते बजावतात-
कीर्तनाचा विकरा मातेचें गमन।
भाड खाई धन विटाळ तो।्।
हरिभक्ताची माता हे हरिगुणकीर्ति।
इजवर पोट भरिती चांडाळ ते।्।
अंत्यज हा ऐसें कल्पांतीं करीना।
भाड हे खाईना जननीची।्।
तुका म्हणे त्यांचें दर्शन ही खोट्ें।
पूर्वजासि नेटें नरका धाडी।्।’
कीर्तनासाठी बिदागी घेणारा हा मातृगमनी, भाडखाऊ. कारण हरिगुणाची कीर्ति ही तर हरिभक्ताची माता. तिच्यावर पोट भरणारा मातेची भाड खाणारा चांडाळच म्हणावा लागेल. अशाचे दर्शनही खोटे.
या अभंगाची एक गंमत आहे. तो देहूसंस्थानच्या गाथ्यात आहे. पंडिती गाथ्यात आहे. जोगांच्या गाथ्याने मात्र तो नेमका क्षेपक मानला आहे! पण त्याने काही बिघडत नाही. अन्य एका अभंगात त्यांनी पुन्हा हेच सांगितले आहे. –
उभ्या बाजारांत कथा। हें तों नावडे पंढरीनाथा।्।
अवघें पोटासाठीं सोंग्। तेथें कैंचा पांडुरंग्।्।
लावी अनुसंधान। कांहीं देईल म्हणवून।्।
काय केलें रांडलेंका। तुला राजी नाहीं तुका।्।’
एखादे आख्यान बिदागीच्या आशेने लावायचे हे फक्त पोटासाठीचे सोंग आहे. तेथे पांडुरंग नाही. अशा कीर्तनकाराला संतप्त तुकोबा रांडलेका’ अशी शिवी देऊन सांगतात, बाजारात अशी कथा आणणे मला अजिबात अमान्य आहे.
त्यांनी त्यासाठीची एक नियमावलीच घालून दिलेली आहे.-
जेथें कीर्तन करावें्। तेथे अन्न न सेवावें्।्।
बुका लावूं नये भाळा। माळ घालूं नये गळां्।्।
तट्टावृषभासी दाणा। तृण मागों नये जाणा।्।
तुका म्हणे द्रव्य घेती। देती तेही नरका जाती।्।’
ज्या ठिकाणी कीर्तन करायचे आहे, तेथे मोठा हरिनामसप्ताह सुरू असेल, गावजेवण असेल, यजमान मोठा पुढारी असेल, तरी तेथील अन्नाला हात लावू नये. फार काय, त्या ठिकाणचा फुकटचा बुक्का कपाळी लावू नये की माळ गळ्यात घालू नये. तुकोबांच्या काळी वाहतुकीचे साधन म्हणजे घोडे, तट्टे किंवा बैलगाडया. कीर्तनकार घोडयावर बसून येवो की बैलगाडी घेऊन, त्याच्या इंधनाचा खर्चही त्याने घेऊ नये. तट्टे आणि बैलांसाठी गवताची काडीही मागू नये.
आणि कीर्तनकाराने, कथेकर्‍याने मागितली, तरी यजमानाने त्याला ती देऊ नये. कारण- तुकोबा वारंवार बजावत आहेत –
तुका म्हणे द्रव्य घेती।
देती तेही नरका जाती।्।’
कथा करोनियां द्रव्य देती घेती।
तयां अधोगति नरकवास्।्।’
कथा करोनियां मोल ज्यापें घेती।
तेही दोघे जाती नरकामध्यें्।्।’
बिदागी घेणारा कीर्तनकार आणि त्याला ती देणारा अशा दोघांनाही नरकवास ठरलेला आहे.
तुकोबांच्या लेखी हरिदास म्हणजे वीर विठ्ठलाचे गाढे’, देवाहूनि बळी’. पण स्वत:ला हरीचे दास म्हणणारे, वार करतो तो वारकरी अशी व्याख्या सांगणारे, सत्तेपुढे मात्र झुकताना दिसतात. तुकोबा अशांना उद्देशून विचारतात-
म्हणवितां हरिदास कां रे नाहीं लाज्।
दीनासी महाराज म्हणसी हीना।्।
काय ऐसें पोट न भरेसें झालें्।
हालविसी कुले सभेमाजीं्।्।’
अरे हीन मनुष्या, कोणासही महाराज म्हणतोस, सभेमध्ये, कीर्तनामध्ये ढुंगण हलवून नाचतोस. पोटाची खळगी अन्य उपायांनी भरत नाहीत काय?
तुकारामांच्या या सवालामध्ये सात्त्विक संताप आहे, जनसामान्यांचे आध्यात्मिक शोषण पाहून पेटून उठलेले मन आहे.
भक्तीसारखा सोपा मार्ग सोडून लोकांना आडवाटेकडे ओढू पाहणार्‍या धर्ममरतडांचा, धर्मपंथांचा सुळसुळाट झालेला ते पाहात होते. धर्माच्या नावाखाली कशा प्रकारचा भ्रष्ट व्यवहार चालतो याची त्यांना जाणीव होती. त्याची झळ त्यांनी सोसली होती. त्यावर कोरडेही ओढले होते. तसेच प्रकार वारकरी संप्रदायातही घुसू पाहात असतील तर ते त्यांना मान्य होणे शक्यच नव्हते. त्यांच्या नजरेसमोर एका नैतिक समाजाचे स्वप्न होते. म्हणून ते आपल्या अभंगांतून कळकळीने सांगत होते –
आतां तरी पुढे हाचि उपदेश्।
नका करूं नाश आयुष्याचा।्।
सकळांच्या पायां माझें दंडवत।
आपुलालें चित्त शुद्ध करा।्।’
महाराष्ट्राच्या संतांचे हेच सांगणे.
मुळात अभंगरुपातून उदाहरण आणि पुरावे देण्याचा खटाटोप आम्ही एवढ्यासाठीच केला, चाकरवाडीत हे गोरगरिब भक्तांचं, श्रमिकांचं, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांचं श्रद्धेचं स्थान, भक्तीचं स्थान इथं माऊली महाराजांनी कधी धनाचा विषय काढला नाही, महादेव महाराजांनी कधी पैशाचा हिशोब बघितला नाही. हे निर्गुण निराकार मायेची माऊली आहेत. मग आज तिथे धनाचा लोभ कोण आणतं, धनाचा लोभ आणू पाहणार्‍यांना तिथं स्थान का दिलं जातं? तिथं केवळ माऊली महाराजांचा, जगद्गुरू संत तुकोबांचा, संत नामदेव, संत ज्ञानेश्‍वर, विठ्ठल नामा गजर व्हायला हवा. हर हर महादेव, जय सियारामचा नाम जप व्हायला हवा.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!