राम राम ते जय श्रीराम !

हिंदूंनी त्यांचा देव आणि स्वतः यामध्ये कधीही अंतर ठेवले नाही. देवाला आईच्या ठिकाणी, बापाच्या ठिकाणी, मित्राच्या ठिकाणी, सख्याच्या ठिकाणी बघितलं आहे. संत जनाबाईंनी देवाला प्रेमाने शिव्याशाप दिलेले आहेत आणि आपल्या घरी दळणकांडण करायला बोलावूनही घेतलं आहे.
बहुतेक हिंदू मुलामुलींप्रमाणे मलाही शाळेमध्येच राम भेटला. रामरक्षा, मनाचे श्लोक मराठी माध्यमांच्या शाळातून पाठ करून घेतले जायचे. जय जय रघुवीर समर्थ म्हणून जेवायला प्रारंभ व्हायचा. थोडसं मोठं झाल्यानंतर सर्व हिंदू विशेषतः ब्राह्मण घरोघरी गीत रामायण ऐकले जायचे त्याप्रमाणे माझे घर नास्तिक असले तरीसुद्धा गीतारामायण ऐकले जायचे.
कॉलेजला असताना ज्याच्याशी प्रेम विवाह केला होता त्या टीपीकल कुलकर्णी बुवाचे घरंच राम मंदिराच्या आवारात होते आणि त्याच्या वडिलांकडे त्या मंदिराचा पुजाअर्चा करण्याचा अधिकार होता.तो मात्र पक्का नास्तिक होता. मी गमतीने जेव्हा त्याला ‘आपण आपल्या मुलांला वेद शाळेत पाठवू या का ? तो नागबळी वगैरे बरीच व्रत वैकल्ये लोकांसाठी करून भरपूर श्रीमंत होईल. ‘ असं सुचवलं होतं तेव्हा त्याचा भयानक संताप झाला होता. माझा मुलगा उपाशी राहून टाचा घासून मेला तरी चालेल पण लोकांना उल्लू बनवून स्वतःची तुंबडी भरायचा उद्योग तो कधीही करणार नाही असं त्याने बजावलं होते. माझा कुलकर्णी बुवा केव्हाच रामाघरी चालता झाला आहे. पण त्याचे सख्खे सावत्र असे दोन्हीही लेक अट्टल नास्तिकतेचे व्रत पुढे नेत आहेत.
माझ्याकडे एक लाल रंगाच्या मुखपृष्ठाचे ‘ बालकासाठी संपूर्ण रामायण ‘ नावाचे पुस्तक शाळेत असताना होते. मी अनेकदा त्याची पारायणं केली आहेत.त्यामधील बालपणी आकाशीचा चंद्र मागणारा राम, शरयू नदी ओलांडून वनवासाला निघालेला राम व जमलेले
अयोध्यातील शोकाकूल लोक , छाती फाडून राम दर्शन घडवणारा हनुमान , घायाळ झालेला जटायू, अशोक वनातील सीता,
लंकेकडे जाणारा पूल बांधायला मदत करणारी छोटी खारुताई आणि तिला प्रेमाने कुरवाळणारा राम, पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील राज दरबारातील राम सीता लक्ष्मण आणि पायाशी बसलेला हनुमान ही सारी चित्रं डोळ्यासमोर आहेत. माझ्या अनेक दुपारी लहानपणी मी मंदिरामध्ये खेळण्यात घालवल्या आहेत. गाभाऱ्यातील कापूर उदबत्ती फुलांचा गंध मला प्रिय आहे. त्यामुळे रामाच्या बाबतीत मी नोस्टालजीक आहे.
पार साठीची झुळूक लागल्यानंतर मला वेगळाच राम दिसू लागला. शूद्र असून ज्ञानार्जन करतो म्हणून शंबूकाचा वध करणारा राम, वालीला कपटाने मारणारा राम, आपल्या गर्भवती बायकोला घराबाहेर काढून वनवासात पाठवणारा राम, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अग्निपरीक्षा द्यायला लावणारा राम. उगीच का खेड्यातील बायका म्हणतात …
‘ ‘सीतामाई हिरकणी राम हालक्या दिलाचा ‘
जेथे मी राहते त्या नाशिक जनस्थानची राणी शूर्पणखा होती. राम लक्ष्मणाने तिचे नाककान कापून तिला विटंबित केल्यावर ती तक्रार घेऊन आपला भाऊ रावणाकडे गेली. बहिणीच्या विटंबनेचा सूड घ्यायला रावणाने सीता हरण केले.त्राटिका, शूर्पणखा या राण्यांचा रामाने केलेला नायनाट म्हणजे स्त्रीसत्ता नष्ट करून पुरुषसत्तेची रामाने रोवलेली मुहूर्तमेढ !
९ एप्रिल १९३० च्या रामनवमीला सत्याग्रही व सवर्ण यांच्यात समझोता झाला की रामाचा रथ स्पृश्य अस्पृश्यांनी एकत्रितपणे ओढावयाचा. डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांसह तेथे उपस्थित होते. पण अस्पृश्यांनी रथाला हात लावण्यापूर्वीच पूर्वनियोजित कटानुसार स्पृश्य हिंदूंनी तो रथ दुसरी कडून पळवला आणि डॉ.आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर दगडफेक सुरू झाली. आंबेडकरांसह अनेक त्यांचे सहकारी जखमी झाले. असं हे रक्तरंजित काळ्या रामाचे मंदिर.
पंचवटी कॉलेजमधे नोकरी करत असताना माझा पत्ता २ एशियाड, कृष्ण मंदिराजवळ, टकले नगर, पंचवटी नाशिक ३ असा होता. काळाराम मंदिरासमोर माझा थोरला रोज सवाई गंधर्व विद्यालयाची शाखा असणाऱ्या ठिकाणी हार्मोनियम आणि संगीत शिकायला जायचा. मी तेथून घाटावर भाजी आणायला जायचे.पण या रक्त रंजित इतिहासामुळे कधीही त्या राम मंदिरात पाऊल ठेवावं असं मला वाटलं नाही.
प्रभू रामचंद्राला दुसऱ्या धर्मीयांचे प्रार्थनास्थान नष्ट करून स्वतःचे उभारले जावे असे कधीही वाटले नसते.कैफी आजमी यांची कविता आहे की बाबरी मशीद नष्ट केल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणाले –
“छह दिसंबर को मिला दुसरा बनबास मुझे.”
गुगल वरती भारतात ‘ जय श्रीराम ‘ म्हटले नाही म्हणून
मॉब लिंचिंग ( जमावाने केलेली हत्या ) केलेल्या मुस्लिमांची यादी आणि छायाचित्रे आहेत.
” राम राम पाहुणं बर आहे ना? “या मधील राम लोप पावून ‘जय श्रीराम ‘असा जयजयकार करायला लावणारा हिंसक फॅसिस्ट शक्तींचे प्रतिनिधित्व करणारा राम माझा नाही.
चलाख भक्त रणनीती म्हणून भक्तीचा वापर करतात .साधे भोळे भक्त या रणनीतीला बळी पडतात. अयोध्याला राम जन्मभूमी दर्शनासाठी मोफत प्रवास सत्तेत येण्यासाठी चलाख राजकारणी आज घडवत आहेत. आपण ठरवायचे आहे की याला बळी पडायचे की नाही !
पुराणकथा या सामूहिक नेणीवेतून पिढ्यानपिढ्या वाहत येतात. पुराणकथेतील राम, कवितांमधील, गीतांमधील, कथा कहाण्यांमधील राम मला आजही भुरळ घालतो. बंदुकीच्या गोळ्यांचा राम बनवणाऱ्या आक्रमकतेचा संदेश देणाऱ्या नाशिक नगरीमध्ये राहून सुद्धा मी तो जाईजुईच्या झेल्याहूनही मृदू असणारा राम मनामध्ये जपला आहे !
- लीना पांढरे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत