मुख्य पान

भगवान बुद्धांची शिकवण

भाग ६८


सद्धम्म म्हणजे काय?

धम्म हा सद्धम्म होण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे

धर्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो.
ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही, असा ब्राम्हणी सिद्धांत होता. या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे. ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राम्हणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती; आणि त्यापैकीही ती फक्त या त्रैवर्णिकांतील पुरुषवर्गालाच होती. स्त्रिया ह्या ब्राम्हण, क्षत्रिय अथवा वैश्य असोत, त्याप्रमाणेच शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो त्या सर्वांना ज्ञानार्जनाचा काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. ब्राम्हणांच्या ह्या अन्यायकारक सिद्धांताविरुद्ध (atrocious doctrine) भगवान बुद्धांनी बंड उभारले.
ज्ञानमार्ग, मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, तो सर्वांना मोकळा असला पाहिजे, असे भगवान बुद्ध शिकवित असत.
पुष्कळ ब्राम्हणांनी त्यांच्या मताला विरोध केला.
लोहिच्च ब्राम्हणाबरोबर झालेला त्यांचा वादविवाद त्यांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राम्हणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहिच्च ब्राम्हणाचे मत होते.
बुद्ध म्हणाले, “जो कोणी श्रमण अथवा ब्राम्हण विद्या आणि ज्ञान स्त्री शुद्रांना देऊ नये असे म्हणतो त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकटनिर्माता ठरतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्री-शुद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्यांच्या मार्गात अडचणी निर्माण करतो. तो त्यांचा हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतीत नाही तो त्यांचा शत्रू ठरतो. आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवितो तो सिद्धांत गैर आहे.”

धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा त्याला सद्धम्मरूप प्राप्त होते

ब्राम्हण विद्या ही महत्वाची मानीत. माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पूजनीय मानीत. ते म्हणत की, राजाला स्वदेशी पुज्य मानतात. परंतु विद्या ही सर्वत्र पुजनीय समजली जाते. त्यांना सुचवायचे असे की, विद्धान हा राजापेक्षा थोर आहे.
तथागतांनी विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपण यांच्यातील भेद आहे. असेही कोणी म्हणेल की, ब्राम्हणही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत असत. ते कदाचित खरेही असेल. परंतु तथागतांची प्रज्ञा आणि ब्राम्हणांची प्रज्ञा याता महदंतर आहे.
अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात तथागत बुद्धांनी हा भेद फार चांगल्या पद्धतीने स्पष्ट केला आहे.
बुद्ध म्हणाले, “चार गुण माणसाच्या अंगी असले तर मी त्याला प्रज्ञावान मानतो. हे गुण म्हणजे प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजनहितरत आणि बहुजनसुखरत असला पाहिजे. स्वभावतःच रम्य आणि स्वभावतःच लाभदायक आहे अशा आर्य मार्गाचे त्यांने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनविलेले असले पाहिजे. ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे. आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवितो त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे. जे संकल्प मनात उत्पन्न व्हावे असे तो म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे. म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्णाधिकारी असला पाहिजे. त्याप्रमाणे उच्चत्तर विचारांशी (higher thought) निगडीत अशी जी चार ध्याने- ज्यात रममाण होणे ह्या जीवनातही सुखकर आहे, त्याला स्वछेने सहजपणे विनासायास साधता आली पाहिजेत. तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांचा (fetters) नाश करतो. अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमुळे लाभलेल्या ह्या विमुक्तीचा तो याच जन्मी उपभोग घेतो. मी सांगितलेले हे चार गुण ज्यांच्या ठिकाणी असतात त्याला मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो.” या ठिकाणी तथागत बुद्धांची प्रज्ञा आणि ब्राम्हणांची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात विशद केला आहे. या ठिकाणी तथागत बुद्ध प्रज्ञेला विद्येपेक्षा अधिक महत्वाची का मानतात हे त्यांनी स्प्ष्ट केले आहे.

धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील ह्यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता शिकवतो, तेव्हाच त्याला सद्धम्मरुप प्राप्त होते.

बुद्ध धम्माचे अधिष्ठान (foundation) काय? यासंबंधी काही अंशी मतभिन्नता आहे.
प्रज्ञा हीच केवळ बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे की, करुणा हीच त्यांच्या धम्माचे अधिष्ठान आहे.
या वादामुळे बुद्धानुयायांत दोन शाखा उत्पन्न झाल्या. एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. ह्या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत.
भगवान बुद्धांच्या शब्दांची कसोटी ह्या दोन्हीही शाखांना लावली असता त्या दोन्हीही शाखा चुकीच्या वाटतात.
प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे, याबद्दल मतभेद नाही. करुणाही त्यांच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे संशयातीत आहे. याचे समर्थन बुद्धवचनानेच करता येईल.
“या जगात जे गरीब आहेत, असहाय्य आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत मित्र आहे. जे शारिरीक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असोत त्यांची सेवा करण्यासाठी, जे दरिद्री, अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागतांचा जन्म आहे.”
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१८.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तृतीय खंड भाग पाचवा)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!