आर्यअष्टांगिक मार्ग भाग २८
आर्यअष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी अशा आठ अंगाचा अंतर्भाव होतो.
आर्यअष्टांगिक मार्गाचे दृष्टिमार्ग आणि भावनामार्ग असे दोन प्रमुख भागात विभाजन केलेले आहे. दृष्टिमार्गात अंतिम सत्यतेच्या प्रथम अनुभवाचा किंवा अंतिम सत्यतेच्या अंतर्दृष्टिचा समावेश होतो. भावनामार्गात सत्यतेच्या या दृष्टिनुसार किंवा अनुभवानुसार आपल्या व्यक्तित्त्वाच्या आणि जाणिवेच्या सर्व बाबतीत आणि सर्व पातळ्यावर आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा समावेश होतो. म्हणून आर्यअष्टांगिक मार्गातील हा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक मोठा व अधिक गुंतागुंतीचा आहे. कारण की, अष्टांगिक मार्गाच्या या दोन भागापैकी पहिल्या भागात केवळ सम्यक दृष्टीच्या एका अंगाचा समावेश होतो. मात्र दुसर्या भागात सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी अशा सात अंगाचा समावेश होतो.
आर्यअष्टांगिक मार्गातील प्रत्येक मार्गाला पायरी असे म्हणता येत नाही. कारण पायरी म्हटले की, जस-जसे आपण एक एक पायरी ओलांडून वर वरच्या पायरीवर जातो तस-तसे मागच्या पायर्या सोडत जात असतो. आर्यअष्टांगिक मार्गामध्ये सर्वच मार्गाचे पालन करावयाचे असते. कोणताही मार्ग सोडायचा नसतो. म्हणून प्रत्येक मार्गाला पायरी न म्हणता ‘अंग’ किंवा ‘अवयव’ किंवा ‘शाखा’ असे म्हणता येईल. आर्यअष्टांगिक मार्ग याचा अर्थ आठ निरनिराळ्या मार्गाचा किंवा आठ पृथक टप्प्यांचा मार्ग असा होत नाही. तर त्याचा अर्थ आठ अंगाचा किंवा आठ अवयवाचा किंवा आठ शाखांचा असा होतो.
आर्यअष्टांगिक मार्गाचे पालन करताना आपण आपल्या अस्तित्वाची आणि जागृतीची उच्चतम स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतो. आर्यअष्टांगिक मार्ग हे एक धार्मिक जीवन असून ती मानवाच्या विकासाची, जीवन फुलत जाणारी एक प्रक्रिया आहे. एखाद्या वृक्षाप्रमाणे त्याची वाढ होत जाते. एखादे रोपटे जमिनीत लावल्यानंतर त्याला ऊन, वारा, पाणी, खते इत्यादी पोषक द्रव्ये मिळाल्यावर काही काळानंतर त्याचे रुपांतर वृक्षात होत जाते. त्याला फुले, फळे लागतात. त्या वृक्षांच्या फुला-फळांचा व सावलीचा आस्वाद सर्व प्राणी घेत असतात. असाच काहीसा प्रकार आर्यअष्टांगिक मार्गाचे पालन करताना अनुभवाला येत असतो. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधीच्या पालनामुळे आपल्या अस्तित्वाची निरनिराळे अंगे बदलून जात असतात. आर्यअष्टांगिक मार्गाच्या अनुसरनामुळे भावना बदलतात, श्रध्दा बदलते, दृष्टी बदलते, वाणी बदलते, कर्म बदलतात, जीवनयापनाची पध्दत बदलते, मनाला उत्तम वळण लावते, सतत जागृतीत राहण्याची सवय लागते, मनाची एकाग्रता वाढवते. म्हणूनच मानवाच्या सर्वोत्तम कल्याणाचा मार्ग सुकर होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २२ प्रतिज्ञेचे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यांनी अकराव्या प्रतिज्ञेत सांगितले की, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन.”
अष्टांगिक मार्गाचे प्रज्ञा, शील व समाधी असे तीन विभाग पडतात.
प्रज्ञा
१) सम्यक दृष्टी
२) सम्यक संकल्प
शील
३) सम्यक वाचा
४) सम्यक कर्मांत
५) सम्यक आजीविका
समाधी
६) सम्यक व्यायाम
७) सम्यक स्मृती
८) सम्यक समाधी
शील, समाधी आणि प्रज्ञा याबाबतीत भगवान बुध्द म्हणतात-
सीले पतिपठठाय नरो सपञ्ञो
चितं पञ्ञंच भावयं।
आतापि निपको भिक्खु
सो इमं विजटयो जटं ॥
जो मनुष्य प्रज्ञावान आहे, वीर्यवान आहे, पंडित आहे, भिक्खु आहे तो शीलांचे आचरण करीत असताना चित्त (समाधी) आणि प्रज्ञा यांची भावना करुन ह्या जटांना (जगातील दु:खाच्या प्रश्नाला) सोडवू शकतो.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१०.१.२०२४
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत