आर्थिकदेशमहाराष्ट्रमुख्यपान

||धर्मशास्त्राचे अर्थशास्त्र॥

धर्मशास्त्र शिंप्याला सांगते कि , देवाच्या मूर्तीला तू कपडे शिवून दे ! मग शिंपी देवाला कपडे शिवून देतो व देवाचा भक्त बनतो.

देवाला (म्हणजे पुजाऱ्याला) फुकट कपडे शिवून मिळतात. सामान्य माणसाला कपड्याची शिलाई परवडते कि नाही , या अर्थशास्त्राकडे शिंप्याचे (व पुजाऱ्याचेही !) दुर्लक्ष होते. जर ही शिलाई परवडली तर शिंप्याचा धंदा जोरात चालेल. जनतेला शिलाई न परवडल्यास शिंप्याची प्रगती खुंटते. परंतु देवभक्तीमुळे त्याला ते समजत नाही.

धर्मशास्त्र माळ्याला सांगते कि , तू देवाला हारतुरे दे !

मग माळी देवासाठी हारतुरे – फुले आणतो. देवासाठी फुले – हारतुरे आणता आणता देवभक्त होतो. देवाला म्हणजे पुजाऱ्याला फुकट हारतुरे – फुले भेटतात. माळी देवळासमोर एखाद्या टपरीवर हार-फुलांचा धंदा टाकतो. लोकांनी धार्मिक होऊन मजकडून फुले- हारतुरे घ्यावेत , हेच माळ्याचे अर्थशास्त्र ! देवळात जाणाऱ्या लोकांच्या समस्या अथवा नोकरीधंद्याचे प्रश्न सुटतात कि नाही , यांचे माळ्याला (व पुजाऱ्यालाही !) काही देणेघेणे नसते. हे प्रश्न न सुटल्यामुळे माळ्याची प्रगती खुंटते. परंतु देवभक्तीमुळे माळ्याला ते समजत नाही.

धर्मशास्त्र तेल्याला सांगते कि , तू देवाच्या पणतीसाठी तेलपाणी दे !

मग तेली देवळातील पणतीसाठी भक्तीभावाने तेलपाणी देतो. देवाला , म्हणजे पुजाऱ्याला फुकटचे तेलपाणी भेटते. मग आपला तेली देवळाच्या बाजूलाच तेल विकण्याचे दुकान टाकतो. लोकांनी माझ्याकडून भरपूर तेल विकत घ्यावे व देवाला अर्पण करावे , एवढेच अर्थशास्त्र तेल्याला समजते. परंतु तेल विकत घ्यायला लोकांकडे पैसे कुठून येणार ? हे अर्थशास्त्र तेल्याला (व पुजाऱ्यालाही !) माहित नसते. आपल्या मर्यादित अर्थशास्त्रामुळे तेली देखील मागासलेलाच राहतो. परंतु देवभक्तीमुळे त्याला ते समजत नाही.

देवाला नारळ , फळे , मेवामिठाई पुरवणाऱ्यांचे अर्थशास्त्र देखील असेच मर्यादित असते.

शिर्डी- तिरुपती यांसारख्या प्रसिद्ध देवस्थानी भाविकांना राहण्यासाठी हॅाटेल्स बांधली जातात , त्यांच्यासाठी खाणावळी उघडल्या जातात. त्यांना जाण्यायेण्यासाठी वाहनसुविधा पुरविल्या जातात. यांतून देखील एक वेगळे अर्थशास्त्र उभारले जाते. परंतु तिथे आलेले भाविक आर्थिकदृष्ट्या भक्कम असले तर हॅाटेल्स व इतर सर्व उद्योगधंदे भक्कम होतील, हे अर्थशास्त्र देवभक्तीमुळे कोणालाच कळत नाही.

देशाचा जीडीपी वाढावा , जीडीपीच्या सहा टक्के खर्च शिक्षण – आरोग्यावर करावा , अनुसूचित जाती- जमाती व ओबीसी यांना बजेटमध्ये लोकसंख्येप्रमाणे हिस्सा मिळावा, देशातील बेरोजगारी संपावी ; हे “अर्थशास्त्र” वेगळे ! खरे तर देवळाचे अर्थशास्त्र यांवरच अवलंबून असते. परंतु देवभक्तीमुळे ते कोणालाही कळत नाहीये !

*आजच्या काळात बहुजन समाजाला या देवळाच्या अर्थशास्त्रातून बाहेर काढून जीवनातील प्रश्न सोडवणाऱ्या अर्थशास्त्राकडे वळवणे गरजेचे झाले आहे. त्यातच बहुजन समाजाचे व देवळांतील पुजाऱ्याचेही भले आहे !*

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!