भगवान बुध्द – नव्या प्रकाशाच्या शोधात आर.के.जुमळे.भाग ३

सिध्दार्थ गौतम उरुवेला सोडून गयेला आले. तेथे पिंपळवृक्षाखाली ध्यानस्थ बसले. ज्ञान प्राप्तीसाठी चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चौथ्या आठवडयाच्या शेवटच्या दिवशी, वैशाख पौर्णिमेच्या रात्री बोधिवृक्षाखाली दु:खाच्या विषयावर ध्यान करीत असताना त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्या; आणि हे दु:ख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या. याप्रमाणे शेवटी, चार आठवडे चिंतन केल्यावर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्यांना एक नवा मार्ग दिसला.
नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी सिध्दार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसला, तेव्हा त्यांच्या मनावर महर्षी कपिलांच्या सांख्य तत्त्वज्ञानाची पकड होती. महर्षी कपिलांनी दु:खाचे अस्तित्व मान्य केले होते. जगातील व्यथा आणि दु:ख ही एक निर्विवाद वस्तुस्थिती आहे असे त्यांनी मान्य केले. परंतू दु:ख कसे नाहीसे करावे ह्या प्रश्नाचा विचार सांख्य तत्त्वज्ञानाने केला नाही. म्हणून दु:ख कसे नाहीसे करावे या प्रश्नावर सिध्दार्थ गौतमांनी आपले चित्त केंद्रित केले. त्यांनी स्वत:ला पहिला प्रश्न विचारला की, “व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणार्या दु:खाची व कष्टाची कारणे कोणती?” त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की, “दु:ख नाहीसे कसे करता येईल?” या दोन्हीही प्रश्नाचे उत्तरे त्यांनी शोधले. दु:खाचे उगम कसे होते आणि त्यातून मुक्त कसे व्हायचे याचा शोध फक्त बुध्दांनी लावला. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा या चार आर्यसत्याचा शोध भगवान बुध्दांनी लावला.
भगवान बुध्दांच्या काळात अनेक मतप्रणाली अस्तित्वात होत्या. ह्या मतप्रणाली साधारणत: दोन भागात विभागल्या जातात. एक उच्छेदवादी व दुसरे शाश्वतवादी. सर्व काही संपणारे आहे म्हणून खा, प्या आणि मजा करा अशी उच्छेदवादी विचारसरणी होती. आत्मा शाश्वत आहे म्हणून ‘हे माझे’, ‘ते माझे’ असे शाश्वतवादी विचारसरणी होती. भगवान बुध्दांनी या दोन्हीही विचारसरणीला नाकारले.
भगवान बुध्दाने प्रथमत: पाच परीव्राजक म्हणजे कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक यांना सारनाथ येथे धम्माचा उपदेश केला व त्यानंतर त्यांचा धम्म संपूर्ण जगात पसरला.
भगवान बुध्द या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की, जीवनाचे आत्यंतिक असे दोन टोके म्हणजे खा, प्या आणि मजा करा, आणि सर्व वासना मारुन टाका. कारण ते पुनर्जन्माचे मूळ आहेत. या दोन्हीही टोकांना नाकारुन जो उपभोगाचा नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही असा मध्यम मार्ग त्यांनी स्विकारला. याच मध्यम मार्गाची शिकवण भगवान बुध्दांनी दिली. तेव्हा हे मध्यम मार्ग दुसरे-तिसरे काही नसून चार आर्यसत्यच आहेत. हाच मार्ग मानव मुक्तीचा आहे. ईश्वर, आत्मा वगैरे काल्पनिक गोष्टीला स्थान न देता त्यांनी ‘माणूस आणि माणसाचे या जगातील नाते’ याला प्राध्यान्य देऊन आपला धम्म सांगितला. म्हणूनच त्यांच्या धम्माला ‘एहि पस्सिको’ म्हणजे ‘या आणि प्रत्यक्ष पाहा’ असे म्हटले आहे.
याच सुत्तात ते पुढे म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरनोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.
भगवान बुध्दांचा प्रथम धम्मचक्र प्रवर्तनापासून तर आतापर्यंत आणि भविष्यात सुध्दा जे कोणी धम्म सांगतील ते दुसरे-तिसरे काही राहणार नसून ते चार आर्यसत्याचाच सार राहील असे ठामपणे म्हणावे लागेल. भगवान बुध्दांने याला उत्तम शरण असे म्हटले आहे.
भगवान बुध्द धम्मपदाच्या एकशेएकान्नव व एकशेब्यान्नवव्या गाथेत म्हणतात –
दु:ख दुक्खसमुप्पादं दुक्खस्स च अतिक्क्मं ।
अरियञ्चग्ङिकं मग्गं दुक्खूपसगामिनं ॥
एतं खो सरणं खेमं एतं सरण्मुत्तमं ।
एतं सरणमागम्म सब्बदुक्खा पमुच्चति ॥
याचा अर्थ, जो चार आर्यसत्यांना योग्य प्रकारे प्रज्ञेने पाहतो व दु:ख, दु:खाची उत्पत्ती, दु:खाचा विनाश व दुःखाचे उपशमन करणारा आर्य अष्टांगिक मार्ग याचे शरण ग्रहण करणे हेच कल्याणकारी आहे, हेच उत्तम शरण आहे. या शरणाला ग्रहण करुन मनुष्य सर्व दु:खातून मुक्त होतो. परंतु यासाठी तुम्हीच प्रयत्न केले पाहिजे, असे भगवान बुध्द म्हणतात.
तुम्हेहि किच्चं आतप्पं अक्खातारो तथागता ।
याचा अर्थ, तुम्हीच प्रयत्न केले पाहिजे. तथागत केवळ मार्गदाता आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर करीत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत