“रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आता या शहराशहराला आग लावीत चला..!”

ढसाळांच्या या दोन पंक्ती आठवल्या की नामांतराची 17 वर्षे चाललेली अस्मितेची लढाई आपसूकच डोळ्यांसमोर उभी राहते, अन आमच्यातला पॅंथर पुन्हा जागा होतो अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी.
अरे केवढं मोठं ते बलिदान, केवढी मोठी ती लढाई, केवढं मोठं ते आंदोलन.. अगदी घरादाराची राखरांगोळी होईपर्यंत ते आई बहिणींची आब्रू लूटेपर्यंतचा हा संघर्षरत लढा.
इथल्या प्रचंड क्रूर पाशवी धर्माच्या जात्यंध लोकांच्या असीम रानटीपणाचं जिवंत उदाहरण म्हणजे फक्त एका विद्यापीठाला त्या युगपुरुषाचं नाव देण्यात यावं इतकी साधी मागणी शांतपणे मागणार्या निष्पाप जिवांवर केलेली तुफान दगडफेक, रक्तबंबाळ झालेली शरीरं, दोन पिढ्यांची झालेली बरबादी, हजारो कुटुंबांना निर्दयपणे उध्वस्त करून कित्येकांचं आयुष्य बेचिराख केलं.
अरे तुमच्यासारखीच माणसं आहोत ना आम्ही , तरीही आम्हाला माणुसकीला पारखं का केलं जातं..इतकी क्रुरता येते तरी कुठून तुमच्यात ?? म्हणूनच आमच्या बापाने जीव कंठाशी आणून म्हणटलं होतं
“l have no homeland Mr. Gandhi”.
ज्या नांदेड जिल्ह्यात सगळ्यात जास्त अट्रोसिटी झाल्या सगळ्यात जास्त तीव्र चळवळ जिथे होती तो नांदेड जिल्ह्याच ह्या विद्यापिठातून मुद्दाम जाणीवपूर्वक वगळला आणि तिथे वेगळं विद्यापीठ दिलं, महाराष्ट्रला गलिच्छ राजकारणाची परंपराच आहे.
1972 साली दलित पँथरची स्थापना झाली. याच पॅंथरच्या झंजावातामूळे आंबेडकरी चळवळीला गति प्राप्त होत गेली. त्यावेळी पॅंथरचं साहित्य हे जाणिवा – नेणिवांना आतून बाहेरून धक्के देणारे क्रांतिकारी साहित्य ठरलं.
पँथरला निर्भेळ नामांतर हवे होते, अखेर नामांतराच्या १७ वर्षाच्या लढ्याला 14 जानेवारी 1994 साली यश आले. पॅंथरने आपल्याला काय दिले हे सांगायला नक्किच धाडस लागतं कारण पॅंथरचा लढा हा ज्वलंत आणि तितकाच भावनिक आहे.
जयभीम ????
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत