महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

डॉ. भदन्त आनन्द कौसल्यायन ●लेखक :- डॉ. भदन्त सावंगी मेधंकर…

संदर्भ :-
डॉ. भदन्त आनन्द कौसल्यायन जीवन दर्शन, संक्षिप्त

मराठी अनुवाद :-
अरविंद भंडारे (पालि रिसर्च इन्स्टिट्यूट, मुंबई)

साभार :-
बुद्धसासन त्रैमासिक : १२ वा अंक
(एप्रिल ते जून २०२१)

बौद्ध वाङ्गमयाला जनसामान्यात पोहचविणारे, बुद्ध धम्माचे प्रकांड पंडीताच्या रुपात ओळखले जाणारे डॉ. भदन्त आनन्द कौसल्यायन यांचा जन्म ५ जानेवारी १९०५ साली लाला रामशरणदास आणि फुलवंती देवी यांच्या घरी सुहाना गांव, अंबाला येथे झाला.

त्यांच्या लहानपणी त्यांचे नाव हरीनामदास असे ठेवण्यात आले होते. त्यांचे वडील शाळेत मास्तर होते. ते ज्या हिन्दु मोहमेडन शाळेत शिकवत असत त्याच शाळेत हरीनामदास यांचे नाव दाखल करण्यात आले. ते आपल्या वडीलांसोबतच शाळेत जात. त्यांची आई जास्त दिवस जगू शकली नाही. ती त्यांच्या लहानपणीच वारली.

हरीनामदास आणि त्यांचे भाऊ हरीदास आपल्या मामाकडे राहू लागले. वयाच्या १५ – १६ व्या वर्षी त्यांनी मॅट्रीक पास केली व कॉलेजात प्रवेश केला. परंतु ते जास्त दिवस कॉलेजात जाऊ शकले नाहीत. तो काळ राष्ट्रीय आंदोलनाचा होता. भारताच्या स्वातंत्र्याची लढाई सुरु होती. विद्यार्थ्यांनी इंग्रजांच्या शाळा व कॉलेजांवर बहिष्कार घातला होता व स्वतंत्रतेच्या लढाईत सैनिक बनू लागले होते. काही दिवसानंतर हरीनामदास यांचे वडील ही वारले. १९२४ साली वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण केली. लहान असताना ते मोठे होऊन वकील बनण्याचा विचार करत. पदवीधर झाल्यानंतर ते परिपक्व झाले. त्यांनी आपल्या भावी जिवनासंबंधी विचार केला. अन् देश भक्त धनाचा संग्रह न करता जसा आपला चरितार्थ चालवतात त्याचप्रमाणे त्यांना ही आपला चरितार्थ चालवायचा होता. त्यांना असा उदरनिर्वाह निवडायचा होता ज्यात समाजाला अधिकाअधिक देऊन समाजाकडून कमीत कमी घेतले जाईल. त्यांनी आजीवन अविवाहीत राहून देश सेवा करण्याचे व्रत स्विकारले व उपजिविकेकरीता परिव्राजक किंवा साधूचा पेशा स्विकारण्याचा निर्णय घेतला. कारण या पेशात समाजाकडून रोटी, कपडा घेऊन त्याच्या सेवेत तत्पर राहीले जाऊ शकेल.

त्यानंतर भन्तेजींनी लिहायला सुरुवात केली. उपदेशक, सरस्वती, देशके सारख्या वृत्तपत्रांत लिहता लिहता मद्रास काँग्रेस मधून भन्तेजी डॉ. राजेंद्र प्रसाद आणि काही लोकं श्रीलंकेत गेले. राहुलजी (रामोदार साधु) यांनी त्यांच्या राहण्याची फिरण्याची व खाण्याची व्यवस्था केली. श्रीलंकेत ५ जानेवारी १९२८ ला विद्यालंकार पिरिवेण येथे त्यांची प्रवज्जा झाली. विद्यालंकार पिरिवेण येथेच भन्तेजींचे अध्ययन झाले. श्रीलंकेच्या यात्रेत राहुल सांकृत्यायन (रामोदार साधू) यांच्या प्रभावामुळेच भन्तेजी बौद्ध भिक्षू झाले. त्यांचे जीवन व विचारधारेचा भन्तेजींच्या जिवनावर प्रभाव पडला होता. रामोदार साधू (राहूल जी) यांची प्रवज्जा तिबेट वरुन परतल्यानंतर १९३० साली झाली होती.

भन्तेजी एक सुधारणावादी बौद्ध भिक्षु होते. त्या काळात श्रीलंकेत काही तररुण श्रामणेर भिक्षु कर्मकांड, परंपरा विरोधी, क्रांतिकारी सुधारणावादी होते. भन्तेजी त्यांचे अनुमोदन करत असत. त्यांच्यात ‘वालपोल राहुल’ श्रामणेर प्रमुख होते. श्रामणेर राहुल शाळांमध्ये, विहारांत तसेच अन्य सभांत जात त्यावेळी ते रुढीवादी कर्मकांड, जातिवाद व दैववाद या विरुूद्ध व्याख्यान देत. श्रीलंकेत त्यावेळी प्रत्येक विहारासह देवालय सुद्धा असत. तेथे उपासक तेथे जाऊन पूजा करत व मन्नत मागत असत. पुजारी असत. ज्याला ‘कपुकार’ म्हटले जात. या प्रकारच्या विचारांच्या विरोधात एका भिक्षुने ‘बुद्धगुणालंकार’ नामक काव्य लिहीले होते. ज्याचा भन्तेजींनी हिन्दीत अनुवाद केला आहे.

श्रीलंकेत भन्तेजींना दोन वर्ष झाले होते. त्या दिवसात भन्तेजींना धम्मदेसना देण्यासाठी निमंत्रण येत. विहारांत विशेष दिवशी जसे की पैर्णिमा विहाराचा वार्षिक उत्सव विशेष सण किंवा विशेष भिक्षुंचे उपदेश ऐकण्याकरीता मोठे आयोजन केले जात असत. जसे राहुलजी लंकेत ‘दम्बद्विप पण्डितुमा’ या नावाने ओळखले जात तसेच भन्तेजी ‘करूरहे आनन्द’ या नावाने ओळखले जात. श्रीलंकेत लोकांचा विश्वास आहे की कुरुराष्ट्र देशांतील लोकं बुद्धिमान असतात. याच कारणाने भगवान बुद्धांनी ‘सतिपट्ठान’ सारख्या कठीण सूत्रांचा उपदेश कुरूदेशाच्या लोकांना दिला. काही दिवसांतच राहुलजी आणि आनन्दजी श्रीलंकेत बरेच प्रसिद्ध झाले होते. त्याचप्रमाणे भारतातही त्यांची कीर्ती पसरत चालली होती. मासिक वृत्तपत्रांतून दोघांचे लेख प्रसिद्ध होत होते. महाबोधी सभेच्या पदाधिकार्यांनी एकमताने दम्बद्विप आणि आनन्दजींना युरोपात धम्मदूत नेमून पाठविण्याचा निर्णय घेतला. खास करून अनागरिक धर्मपाल यांनी आनन्दजींना लंडन मध्ये पाठविण्याचा आदेश दिला.

युरोपात फ्रांसला रवाना झाल्यानंतर समुद्री यात्रेत भन्तेजींना खूप त्रास झाला. भन्तेजी शुद्ध शाकाहारी होते आणि जहाजावर शाकाहारी जेवण मिळणे कठीण होते. लालसागर सुएज कालवा आणि भूमध्य सागर पार करत त्यांचे फ्रांसीसी जहाज २३ जुलै रोजी फ्रांन्सच्या मारमोई बंदरावर पोहचले. त्यानंतर ट्रेनने पॅरीसला पोहचून तेथे दोन दिवस काही प्राच्यविद्याना भेटले, तेथील काही स्मारकांना ही भेटी दिल्या. पॅरीसला ट्रेन व जहाजाची सफर करून आनन्दजी व राहुलजी लंडनला पोहचले. त्यावेळी भन्तेजींचे वय २७ वर्षे ७ महिने व २२ दिवस इतके होते. तर राहुलजी यांचे वय ३९ वर्षे ३ महिने १८ दिवस इतके होते. महाबोधि सभेचे बौद्ध मिशन, रिजेंट पार्क, ४१ ग्लास्टर रोड, लंडनचे निवास नव्या धम्मदूतांच्या स्वागतासाठी सुसज्ज होते. आता पर्यंत तिकडे जे धम्मदूत होते. ते लंकेस परतले होते. काही जुने विद्यार्थी होते तर काही लंकेतून नवीन विद्यार्थी आले होते. त्या सर्वांमध्ये खूप उत्साह होता. त्याठिकाणी खूप शोभा होती. सर्वात खाली तळघरात बौद्ध मिशनच्या मॅनेजरचे कार्यालय होते. जे स्वयंपाक घराच्या जवळ असल्याकारणाने थंडीच्या दिवसात उबदार राहत असे. ते केवळ आगीच्या गरमीनेच नाही तर लोकांच्या उपस्थितीमुळे सुद्धा. खाली दरवाजा समोर पायऱ्यांना लागून एक विहार होते. एका खोलीत मेणबत्ती आणि फुलांच्या प्रकाशात भगवान बुद्धांची मूर्ती विराजमान होती. सर्दीमुळे क्वचितच कोणी एखादा तास त्या खालीत जाऊन बसत असे. जेव्हा थंडी नसे त्यावेळी विहारात जाऊन बसणाच्यांची संख्या वाढत असे. विहारासोबत तेथे एक हॉल होता. ज्याचे नाव १९ व्या, २० व्या शतकातील सर्वात मोठे धर्म प्रचारक ‘अनागरिक धर्मपाल’ यांच्या नावावरून ‘धर्मपाल’ असे ठेवण्यात आले होते. त्या हॉलमध्ये आठवड्यातून तीन चार वेळा मिटींग होत असे. रविवारची मिटींग विशेष असे. सायंकाळी ६ वाजता इग्लंडचे स्त्री – पुरुष ज्यात काही भारतीय तसेच सिंहली सुद्धा असत. त्या सर्वांना तिसरण पंचशील दिले जात असत, वंदना व व्याख्यान होत असत. धार्मिक प्रवचन दिले जात असत दोन्हींच्या शेवटी प्रश्नोत्तर होत. २ जुलै, १९३३ ला भन्तेजी कुमारी डालके आणि श्रीयुत आस्टर यांच्या निमंत्रणावरून जर्मनीस गेले व तेथे त्यांनी बौद्धगृहात तीन महिने वर्षावास केला.

युरोपात जाण्यापुर्वी १९३० – ३१ मध्ये एके दिवशी राहुलजींनी भन्तेजींना सांगितले आम्ही तिपिटकाला हिन्दीत आणण्याची पंचवार्षिक योजना बनविली आहे. तुमच्यासाठी ‘अंगुत्तर निकाय आणि जातकाचा अनुवाद करण्याचे कार्य दिले आहे. ४ भाग अंगुत्तर निकायाचे व ६ खंड जातकचे जवळ जवळ तीन चार हजार पृष्ठ. सर्व प्रथम त्यांनी महावंस चा पालितून हिन्दीत अनुवाद केला. नंतर जातकाला हात लावला. हे काही सोप्पं काम नव्हतं. परंतु त्यांनी हिंमत हारली नाही. सकाळी नाष्टा झाल्यावर १०.३० वाजल्यापासून ते ११.०० वाजेपर्यंत अध्ध्या तासात आंघोळ, ११.३० वा. भोजन, एक तास आराम पुन्हा १.०० वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लिखाण. ६ ते ७ वाजेपर्यंत शतपावली ७.३० वा. एक ग्लास दूध पिऊन ८ ते १२ वाजेपर्यंत पुन्हा अनुवादाचे कार्य, पुन्हा सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत शतपावली या प्रकारे रोज १२ तास जातकाचे अनुवाद करत असत. याच मध्यात त्यांना पिनांग, मलेशिया येथे वर्षावास करण्याचे निमंत्रण मिळाले.

सन १९२८ ते १९३५ पर्यंत भन्तेजी अनेक ठिकाणी फिरत होते. अधिक दिवस एकाच जागी राहू शकले नाहीत. महाबोधी सभेचे सेक्रेटरी आयु. देवप्रिय वलिसिंह यांचा आग्रह होता की, भन्तेजींनी सारनाथला राहून तेथील काम त्यांनी पाहावे व भारतात धम्मदूत चे कार्य करावे. सन १९३५ च्या आरंभी ते सारनाथला राहू लागले. याचवेळी महाबोधि तर्फे ‘धर्मदूत, मासिक प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. संपादकाच्या जागी भिक्षु धर्मज्योतिजी यांचे नाव छापले जात. परंतु सर्व संपादनाचे कार्य भन्तेजी पाहत. ‘धर्मदूत, मासिकात भिक्षुचे पत्र यात योगेंद्र नावाच्या काल्पनिक जिज्ञांसूंच्या प्रश्नांना उत्तर दिले आहेत. यांत कठीणातील कठीण विषय सुद्धा साध्या सोप्या पद्धतीने समजावला आहे.

श्रीलंकेतून परतल्यावर त्रिमूर्ति राहुल सांकृत्यायन, भदन्त आनन्द कौसल्यायन आणि जगदीश काश्यप यांनी एक कॉफ्रेन्स करून भारतात बुद्ध धम्माच्या प्रचारांचे काम वाटून घेतले. जगदीश काश्यप म्हणाले, मी संस्था निर्माण करुून पालि साहित्याचे प्रकाशन करून बुद्ध धम्माचा प्रचार करणार, आनन्द भन्तेजी म्हणाले मी गावागावांत, शहरा शहरांत फिरून भाषणांद्वारे प्रवचनाद्वारे बुद्धांच्या शिकवणूकीचा जनतेत प्रचार करेन. राहुलजी म्हणाले, मी पालि साहित्य हिन्दीत अनुवादीत करून त्याद्वारे बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करेन. तिघेही एका संस्थेप्रमाणे होते. तिघांनी इतके काम केले जे तिनशे भिक्षु मिळून सुद्धा करू शकत नाहीत. जगदीश काश्यप यांनी नवनालंदा महाविहाराची स्थापना करतून त्याद्वारे पालि पिटक साहित्याचे प्रकाशन तथा संपादन केले. राहुल सांकृत्यायन यांनी विशाल साहित्य निर्माण केले व आनंद भन्तेजींनी निरंतर फिरून प्रवचने व भाषणाद्वारे बुद्ध धम्माला जनसामान्यांपर्यंत पोहचवले याप्रकारे तिघांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली.

भन्तेजींनी सन १९४० – ४१ या वर्षात मौलिक लिखाण आणि अनुवादाचे कार्य भरपूर प्रमाणात केले. हिन्दी साहित्य सम्मेलनाच्या वतीने जातकाचा प्रथम भाग प्रसिद्ध झाला होता. त्याचसोबत काही छोटी परंतु महत्वपूर्ण पुस्तकं सुद्धा तयार झाली होती. काही प्रकाशित सुद्धा झाली होती. त्या दिवसांत भन्तेजी हिन्दी साहित्य सम्मेलन व नागरी प्रचारणी सभा, काशीसह खूप जोडले गेले होते. जातकाचा दूसरा भाग नंतर सम्मेलनाने प्रकाशित केला. धम्मपद, बुद्ध और उनके अनुचर भिक्षुंचे पत्र, बुद्ध वचन आणि यह छूत छात प्रकाशित झाले होते. भदन्त आनन्द कौसल्यायन यांना राष्ट्रीय भाषा प्रचार समिती. वर्धा चे मंत्री म्हणून निवडण्यात आले होते.

१९५४ सालाच्या शेवटी बर्मा येथे झालेल्या तिसऱ्या बौद्ध सम्मेलनात भन्तेजी कलकत्ता येथून रंगूनला गेले होते. १९५० मध्ये श्रीलंकाची राजधानी कोलम्बो येथे विश्व बौद्ध सम्मेलनाचे पहिले अधिवेशन झाले. १९५२ साली निप्पोन (जपान) ची राजधानी टोकीयो व क्योतो येथे दूसरे अधिवेशन झाले. बर्मामध्ये तिसरे अधिवेशन समाप्त झाले. या तिन्ही देशात भन्तेजींना संम्मेलन पाहण्याची संधी मिळाली. त्यात सर्वात महत्वूपर्ण भाग त्यांना बर्माचा वाटला.

१९५६ च्या दिक्षा समारंभात भन्तेजी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यासमयी ते भारताबाहेर होते. भन्तेजी १९६८ पासून नागपूरात स्थायिक झाले. इथे ते काहि दिवस दिक्षाभूमीत राहिले. नंतर कामठी रोड स्थित बुद्ध भूमीत १९८३ पासून स्थायिक झाले. भिक्षु निवास दिक्षाभूमी येथे राहत असताना त्यांनी अनेक महत्वपूर्ण पुस्तकाचे लेखन, प्रकाशन व संपादन केले. भन्तेजी स्थायी नागपूर मध्ये असत परंतु ते सतत भ्रमंती करत.

दिक्षाभूमीवर राहत असताना स्मारक समिती सोबत भन्तेजींचे संबंध बिघडले. जेव्हा संबंध जास्तच बिघडू लागले तेव्हा त्यांनी एक वेगळे स्वतंत्र विहार बनविण्यासंबंधी विचार केला. यासाठी जागेची शोधशोध सुरु झाली. कामठीचे वामनराव डांगे एके दिवशी भन्तेजींना कामठी छावनी येथे दादाभाई झाल यांना भेटावयास घेऊन गेले. ८.३० एकर जागा देणे त्यांनी मंजूर केले. नंतर त्या जागेचे नामकरण ‘बुद्ध भूमि’ ठेवण्यात आले. सन १९७७ साली ‘बौद्ध प्रशिक्षण संस्थान’ ची स्थापना केली गेली. भन्तेजी त्यांचे अध्यक्ष होते.

५ जानेवारी १९८५ ला भन्तेजींचा ८० वा वाढदिवस होता. त्याचसमयी विहाराचे उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले. याकरिता पहिल्यापासूनच भन्तेजींनी परमपावन दलाई लामांची तारीख घेऊन ठेवली होती. ५ जानेवारी १९८५ ला ठरल्याप्रमाणे दलाई लामांच्या हस्ते विहाराचे उद्घाटन झाले. भन्तेजींचा ८० वा वाढदिवस जोरदारपणे संपन्न झाला.

त्यानंतर भन्तेजींचे वास्तव्य बुद्ध भूमिवरच राहिले. २२ जून १९८८ ला मेयो हॉस्पीटल मध्ये भन्तेजींचे महाप्रयाण झाले. त्यांच्या निधनाने शहरात दु:खाची लहर पसरली. त्यांचा अंतिम संस्कार बुद्धभूमीवरच करण्यात आला. त्यांचे निधन हिन्दी साहित्य जगत, बुद्ध धम्माचे वैचारिक जगत आणि समतावाद्यांच्या समतावादी जगातील न भरून निघणारी हानी आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!