मुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन…

महात्मा फुले: आधुनिक भारताचे शिल्पकार !


डॉ. श्रीमंत कोकाटे

                               महात्मा फुले हे केवळ बोलके सुधारक नव्हते, तर ते प्रत्यक्ष कृती करणारे महामानव होते. त्यांनी आपल्या देशात सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घातला. शिक्षणाचे महत्त्व सांगणारे तृतीयरत्न नावाचे नाटक त्यांनी लिहिले. मुलींच्या शिक्षणाची सुरुवात आपल्या पत्नीला शिक्षित करून केली. महात्मा फुले यांनी १८४८ साली मुलींची आणि १८५१ साली मुलांची शाळा सुरू केली. तत्पूर्वी ब्राह्मण मुलींना देखील शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. सर्व वर्णातील स्त्रियांचे स्थान अतिशूद्रात होते. महात्मा फुले यांनी शाळा सुरू करण्यापूर्वी मोफत आणि सर्वांसाठी शिक्षण नव्हते. त्यांनी स्त्रिया, अस्पृश्य, मजूर, शेतकरी या सर्वांसाठी शाळा सुरू केली. महात्मा फुले यांच्या जन्मापूर्वी सुमारे वीस वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज प्रतापसिंह महाराज वयाच्या गादीवर आले. तेंव्हा दुसरा बाजीराव हा पेशवा होता. त्याने छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली. छत्रपती शिकला तर शहाणा होईल आणि शहाणा झाला तर तो आपल्या अंकित राहणार नाही, त्यामुळे त्यांना निर्बुद्ध ठेवण्यासाठी बाजीरावाने त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली होती. चोरून शिकवतील म्हणून त्याने गुप्तहेर नेमले. तेंव्हा प्रतापसिंह महाराजांच्या मातोश्री आनंदीबाई त्यांना मध्यरात्री शिकवायच्या. त्या करारी, बाणेदार आणि निर्भीड होत्या. आपला पुत्र अज्ञानी राहू नये म्हणून त्या छत्रपतींना चोरून शिकवायच्या. छत्रपतींची ही अवस्था तर अठरा पगड जाती बारा बलुतेदारांची काय अवस्था असेल? याची कल्पना करा. या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले आणि सावत्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केली ही आपल्या देशातील क्रांतिकारक घटना आहे.

                              राधाकृष्णन यांनी जन्मल्यानंतर देखील सर्वांसाठी आणि मोफत शाळा सुरू केली नाही. राधाकृष्णन यांचा जन्म १८८८ सालातील आहे, महात्मा फुले यांनी १८४८ रोजी शाळा सुरू केल्या, म्हणजे राधाकृष्णन यांच्या जन्मापूर्वी ४० वर्षे अगोदर फुले दांपत्याने प्रत्यक्ष सर्वांसाठी मोफत शाळा सुरू केल्या, याउलट राधाकृष्णन हे स्त्री शिक्षणाच्या विरुद्ध होते. ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. सत्तेत असताना सत्तेचा गैरवापर करून त्यांनी स्वतःचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली.

                               महात्मा फुले यांचे साहित्य आणि कार्य जेंव्हा महात्मा गांधीनी अभ्यासले, तेंव्हा गांधी म्हणाले की खरा महात्मा तर जोतीराव फुले आहेत. पारतंत्र्यात बंधने असतात तर स्वातंत्र्यात मुक्ती असते, असे सर्वज्ञ चक्रधर स्वामी म्हणाले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक पारतंत्र्य कायम आहे, हे स्पष्ट होते. म्हणूनच फुले, शाहू , आंबेडकर हे राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक स्वातंत्र्यासाठी आग्रह धरत होते. राधाकृष्णन यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणे, ही आपल्या देशातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक गुलामगिरी आहे.

                                 महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे एक  छायाचित्र समग्र सावित्रीबाई फुले समग्र वाड:मयात उपलब्ध आहे. हा फोटो आहे. हा फोटो जाणीवपूर्वक काढलेला नसून तो सहज काढलेला आहे. या फोटोत सावित्रीबाई या महात्मा फुले यांच्या उजव्या बाजूस आहेत. हा फोटो ठरवून काढलेला नाही. नकळत काढलेला आहे, पण यातून हे लक्षात येते की महात्मा फुले यांच्या केवळ जाणिवेतच नव्हे तर नेणिवेत देखील स्त्री ही पुरुषांपेक्षा उजवी म्हणजेच कर्तृत्ववान आहे, ती डावी म्हणजेच दुय्यय दर्जाची नाही, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांनी स्त्रियांचा आदर सन्मान केला. त्यांना स्वातंत्र्य दिले. त्याची सुरुवात त्यांनी कुटुंबापासून केली. फुले दाम्पत्याला अपत्य नव्हते पण त्याचा संकोच किंवा न्यूनगंड त्यांनी कधीही बाळगला नाही. महात्मा फुलेंचे व्यक्तिमत्त्व जसे जातीभेदाच्या पलीकडे गेले होते, तसेच लिंगभेदाच्या पलीकडे गेले होते. राधाकृष्णन हे स्त्री स्वातंत्र्याबाबत सकारात्मक नव्हते. त्यांनी पत्नीला स्वातंत्र्य दिले नाही. ते खूप सनातनी आणि कर्मठ विचारांचे होते.

                                महात्मा फुले यांनी प्रथमतः स्वतः च्या पत्नीला शिकवले. प्रथमतः मुलींची शाळा सुरू केली. स्त्री शूद्रांना शिकवतो म्हणून सनातन्यांनी वडिलांचे कान भरले. शिक्षणाचे काम बंद करण्यासाठी वडिलांनी घर सोडण्याचा इशारा दिला. महात्मा फुलेंनी घर सोडले पण शिक्षणाचे काम सोडले नाही.  मुलगी शिकली तरच सामाजिक परिवर्तन होईल, ही फुलेंची भूमिका होती. त्यांनी विधवांच्या केशवपणाला कडाडून विरोध केला. यासाठी त्यांनी नाभिकांची संघटना उभारली. बालविवाह या प्रथेला विरोध केला. विधवा विवाहाला चालना दिली. भ्रूणहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून महिलांना -भ्रूणांना जीवदान दिले. अशा प्रकारचे क्रांतिकार्य राधाकृष्णन यांच्या स्वप्नात देखील नव्हते.

                                महात्मा फुले हे महान साहित्यिक होते. ते चाकोरीबद्ध साहित्यिक नव्हते तर ते बहुआयामी साहित्यिक होते. ते नाटककार होते. त्यांनी तृतीय रत्न नावाचे नाटक लिहिले. नाटकाचा विषय जसा मनोरंजनाचा आहे तसाच तो प्रबोधनाचा विषय आहे, हे त्यांनी दाखवून दिले. ते शाहीर होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ९०८ ओळींचा पोवाडा लिहिला, तो त्यांनी गायला. म्हणजे ते शिवशाहीर होते. त्यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला. ते धर्मशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी धार्मिक चिकित्सा केली. त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड लिहून शेतकरी प्रश्नांना वाचा फोडली. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म लिहून मोठा धार्मिक पर्याय दिला. एक व्यक्ती एका आयुष्यात किती लेखन, संशोधन, प्रबोधन करू शकतो याचे हे क्रांतिकारक उदाहरण आहे.

                              महात्मा फुले यांनी जनमानसाची मराठी भाषा प्रथमत: साहित्यात आणली, असे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त डॉ. भालचंद्र नेमाडे म्हणतात. केवळ पुणेरी मराठी म्हणजेच प्रमाण भाषा आहे, असे नव्हे तर कष्टकरी, श्रमकरी, शेतकऱ्यांची मराठी भाषा साहित्यात आणून तिचा गौरव केला. विष्णुशास्त्री चिपळूणकर जेंव्हा म्हणाले की फुलेंच्या साहित्यात व्याकरण आणि शुद्धलेखन नाही. फुलेंनी त्यांना कृती करून उत्तर दिले. फुलेंच्या सहित्यात व्याकरण नसेल, पण त्यात जनमानसाचे अंतःकरण आहे. केवळ  सनातन्यांची भाषा हीच प्रमाण भाषा आहे,असा आग्रह धरून श्रमकरी वर्गात न्यूनगंडाची भावना निर्माण करणाऱ्याना म. फुले यांनी ग्रंथनिर्मिती करून सणसणीत उत्तर दिले व श्रमकऱयांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला. आपल्या देशातील महान क्रांत्या लोकभाषेतून झालेल्या आहेत. गौतम बुद्धांनी पाली भाषेतून, महाविरांनी अर्धमागधी भाषेतून, बसवण्णानी कन्नड भाषेतून, चक्रधर-नामदेव-तुकारामांनी मराठी भाषेतून, गुरू नानकांनी पंजाबी भाषेतून क्रांती केली. फुलेंनी देखील लोक भाषेतून क्रांती केली. महात्मा फुलेंचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. ते संस्कृतचे जानकार होते. पण क्रांतीसाठी लोकभाषाच त्यांनी वापरली.

                         महात्मा फुले यांनी १८६९ साली रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला. पुण्यात येऊन शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली. त्यांनी 908 ओळीचा शिवरायांच्या जीवनावरील आधुनिक काळातील पहिला महत्त्वपूर्ण पोवाडा लिहिला. जिजामाता याच शिवाजीराजांच्या गुरू आहेत, अशी मांडणी महात्मा फुले करतात. शिवचरित्राचा वापर विधायक कार्यासाठी महात्मा फुले यांनी केला. थोर समाजसुधारक भाई माधवराव बागल म्हणतात "शिवस्मारकाची कल्पना प्रथम महात्मा फुले यांचीच होती". आधुनिक काळात वास्तव शिवचरित्र घरोघरी पोचविणारे महात्मा फुले हे खरे शिवशाहीर आहेत. शिवचरित्राची अस्सल साधनं हाताशी नसताना वास्तव इतिहासाकडे कसे पोचावे, ही फुलेंची अन्वेषणपध्दती सांगते. महात्मा फुले हे संशोधकांचे दीपस्तंभ आहेत. भूमिपुत्रांच्या हक्कासाठी दिवसा रस्त्यावरची लढाई तर रात्री त्यांचा इतिहास शोधण्यासाठी पुस्तकांशी लढायचे असे महात्मा फुले यांचे कार्य होते. 

                                 धर्माच्या नावाखाली बहुजनांचे शोषण होत होते, त्याला पायबंद घालण्यासाठी महात्मा फुले यांनी "गुलामगिरी" या ग्रंथातून धर्मचिकित्सा केली. जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात "भारतीय मुक्ती समस्येचे उत्तर अचूक शोधणे शक्य व्हावे अशा रीतीने महात्मा फुलेंनी ती उभी केली हीच फुलेवादाची महत्ता आहे". महात्मा फुले यांच्या कार्यकर्तृत्वाचा व एकूण विचारधारेला तत्वज्ञानाच्या चौकटीत बसवण्याचे महान कार्य शरद पाटील यांनी केले आहे. फुले महान तत्वज्ञानी होते, यालाच शरद पाटील फुलेवाद म्हणतात. त्यांनी कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या हिताचे तत्वज्ञान मांडले.

                                       सामान्य जनमानसाला शिक्षण, आत्मविश्वास, वैज्ञानिक दृष्टीकोन, समानता याचे महत्त्व सांगणारे फुले हेच खरे देशभक्त आहेत, असे महर्षी वि. रा. शिंदे सांगतात. महर्षी शिंदे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर "सत्याचा पालनवाला । जोतीबा माझा।" या नावाचा पोवाडा लिहिला. महात्मा फुले यांनी संपूर्ण आयुष्यभर धोरणात्मक क्रांतिकारक कार्य केले. सन १८६३ त्यांनी भ्रूणहत्या रोखण्यासाठी विधवांच्या आधार केंद्राची स्थापना केली. १८६४ साली पुनर्विवाहाची प्रथा सुरू केली. १८७५ साली शेतकऱ्यांना गांजनाऱ्या सावकारशाही विरुद्ध लढा सुरू केला. पुढे इंग्रजांना त्याविरुद्ध कायदा करावा लागला. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी १८७५ साली दीनबंधू नावाचे नियतकालिक सुरू केले. १८७७ पडलेल्या दुष्काळात हजारो लोकांना अन्नदान केले. कामगारांना हक्क अधिकार वेतन सुरक्षितता सुट्टी मिळावी यासाठी १८७९ साली कामगार संघटनेची स्थापना केली व नारायण मेघाजी लोखंडे यांना अध्यक्षपदी नेमले. सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी १८८२ साली त्यांनी हंटर कमिशनपुढे साक्ष दिली. अशा प्रकारचे कार्य राधाकृष्णन यांच्या स्वप्नात देखील नव्हते. महात्मा फुले म्हणजे क्रांतिकारक कार्याचा सूर्य आहे.

                        महात्मा फुले यांनी १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. असत्य नाकारून सत्याचा पुरस्कार करणे. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ट प्रथा यांचा त्याग करणे. धार्मिक क्षेत्रातील दलाल नाकारून आपले धार्मिक कार्य आपणच करणे, यावर त्यांनी भर दिला. सत्यशोधक पद्धतीने विवाह करायला सुरुवात केली. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माचा पाया घातला. आधुनिक भारतात जनहिताचा धर्म त्यांनी दिला. त्यांनी आपला अनुबंध बळीराजा, जोतिबा, खंडोबा, बहिरोबा,शिवाजी महाराज अर्थात भारतीय संस्कृतीत आहे असे गुलामगिरीत मांडले. त्यांची मांडणी ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी अशी आहे.

                                महात्मा फुले श्रीमंत होते. ते जमीनदार होते. ते बांधकाम व्यावसायिक होते. खडकवासला धरण, अनेक पूल, कात्रजचा जुना बोगदा याचे बांधकाम महात्मा फुले यांच्या कंपनीने केलेले आहे. त्यातून मिळालेला पैसा महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी वापरला, म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. सावंत म्हणतात "शिक्षण आणि समाजपरिवर्तनासाठी या भूमीत कायावाचामने चंदनासारखा झिजलेला पहिला (आधुनिक काळातील) महापुरुष म्हणजे जोतीराव फुले आहेत". संपतीचा वापर केवळ व्यक्तिगत कुटुंबासाठी नव्हे तर सकल मानवी कल्याणासाठी करणारे फुले हे सामाजिक परिवर्तन क्षेत्रातील संत आहेत.

                                     महात्मा फुले यांचे विचार सडेतोड आहेत. ते क्रांती करणारे आहेत. महात्मा फुले यांनी लेखणीच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्या वैचारिक विरोधकांना  प्रत्युत्तर दिले. फुले हे तडजोडवादी नव्हते. त्यानी कधी आपल्या विरोधकांशी हातमिळवणी केली नाही, पण माणुसकी मात्र कायम जपली, त्यामुळेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "जोतीबा की नीति और उनका तत्वज्ञान यही लोकतंत्र का एक मात्र सच्चा मार्ग हे।". डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विद्वान होते. ते अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, इतिहासतज्ञ, घटनातज्ञ, जलतज्ञ, कृषितज्ज्ञ, धर्मशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी आपल्या आयुष्यात गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानले. यातूनच महात्मा फुले यांचे मोठेपण सिद्ध होते.

                                 महात्मा फुले यांनी शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करताना महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणतात "फुले हे भारताचे वॉशिंग्टन आहेत", तर शाहू महाराज म्हणतात "फुले हे भारताचे मार्टिन ल्युथर आहेत" महाराजा सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, कला, क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र क्रांती केली. त्यांनी जग पाहिले होते. महाराजा सयाजीराव गायकवाड हे अमेरिकेत झालेल्या दुसऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेचे अध्यक्ष होते, जर्मनीत झालेल्या ऑलिंपिकचे प्रमुख पाहुणे होते. ब्रिटिश लायब्ररीचे अध्यक्ष होते. लंडन येथे भरलेल्या पहिल्या मानवशास्त्र परिषदेचे अध्यक्ष होते. देशातील अनेक परिषदांचे ते अध्यक्ष होते. असे विश्वविख्यात विद्वान कर्तृत्ववान राजे सयाजीराव गायकवाड महात्मा फुलेंच्या कार्याची तुलना वॉशिंग्टनशी करतात. त्यांचा महात्मा फुलेंशी प्रत्यक्ष संबंध आला. महात्मा फुले यांच्या विचारांचा महाराजांवर प्रभाव होता. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रमाणेच कर्तृत्ववान राजे छत्रपती शाहूमहाराजांनी आपल्या राज्यात सत्यशोधक चळवळीला प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांनी महात्मा फुलेंच्या कार्याची तुलना मार्टिन ल्युथरशी केलेली आहे. यावरून स्पष्ट होते की महात्मा फुलेंचे कार्य वैश्विक स्तराचे आहे. राधाकृष्णन फुलेंच्या पासंगाला देखील पुरत नाहीत.

                          महात्मा फुले यांना ब्राह्मणद्वेष्टे ठरवणारांनी लक्षात घ्यावे की त्यांनी पीडित काशीबाई नातू या विधवा ब्राह्मण महिलेला आधार दिला. तिच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले व त्याला डॉक्टर बनविले आणि त्याचे आपल्या नात्यातील मुलीशी लग्न लावून दिले, इतके ते मानवतावादी म्हणजेच जातिव्यवस्थेच्या विरोधात होते. महर्षी कर्वेनी मराठा मुलींनादेखील शाळेत प्रवेश नाकारला. महर्षी वि रा शिंदे जेंव्हा बहीण जनाक्का शिंदे यांना प्रवेश घेण्यासाठी कर्वेंच्या शाळेत तेंव्हा कर्वेंनी नाकारला, महात्मा फुलेंनी ब्राह्मण मुलींना देखील शिक्षण दिले. कर्वेंना भारतरत्न मिळाला, पण महात्मा फुले यांना पुरस्कार मिळाला नाही. महात्मा फुले यांचा ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध वैचारिक संघर्ष होता, पण व्यक्तिगत द्वेष, आकस,कटुता त्यांनी कधीही बाळगली नाही. त्यांनी ब्राम्हणांचे अहित व्हावे अशी कधीही भूमिका घेतली नाही. ब्राम्हणांच्या हिताबरोबरच बहुजन समाजाचे हित व्हावे यासाठी त्यांचा संघर्ष होता. पण येथील अस्पृश्य, स्त्रियांचे कल्याण व्हावे यासाठी राधाकृष्णन यांनी संघर्ष केला नाही.

                                महात्मा फुले हे जात, धर्म, प्रांत, राष्ट्र या सीमा ओलांडून वैश्विक बंधुत्व निर्माण करणारे महापुरुष आहेत. संकुचित राष्ट्रवाद त्यांना मान्य नव्हता. एकमय समाज म्हणजे राष्ट्र, हा त्यांचा राष्ट्रवाद आहे. ते म्हणतात " ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी धरावे पोटाशी बंधुपरी" हा त्यांचा प्रगल्भ मानवतावादी वैश्विक विचार होता. स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला करून अस्पृश्यता निर्मूलनाची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. त्यांचा राष्ट्रवाद वैश्विक होता. त्यांचा राष्ट्रवाद वंश, धर्म किंवा भूगोल यावर आधारलेला नव्हता. विश्वातील सर्व मानवांचे कल्याण असा त्यांचा राष्ट्रवाद होता.

                                 महात्मा फुले निर्भीड होते. ते कणखर होते. त्यांनी संकटावर मात करून यश मिळविले. ते पलायनवादी नव्हते, तर ते लढवय्ये होते. कठीण प्रसंगी ते निराश-हताश होऊन बसले नाहीत. ते स्वाभिमानी होते, तसेच ते संवेदनशील मनाचे होते. ते जितके कर्तव्यकठोर होते, तितकेच ते विनयशील होते, परंतु विचाराबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. ते निस्वार्थी होते. ते प्रचंड कनवाळू होते. ते नीतिमान होते. राधाकृष्णन यांच्या नैतिकतेवर चर्चा करणे, हे अप्रस्तुत आहे असे मला वाटते.

                                     महात्मा फुले यांनी आपल्या देशात सर्वांसाठी मोफत शिक्षण सुरू केले, त्यामुळे त्यांच्या नावानेच आपल्या देशातला "शिक्षक दिन" झाला पाहिजे. राधाकृष्णन यांच्या जन्माअगोदार ४० वर्षांपूर्वी फुलेंनी सार्वजनिक आणि मोफत शिक्षण सुरू केले. राधाकृष्णन हे स्त्री शिक्षणाबाबत सनातनी विचारांचे होते. त्यांनी सनातनी विचारांचा पुरस्कार केला. महात्मा फुले यांचे साहित्य उस्फुर्त साहित्य आहे. राधाकृष्णन यांनी एका तरुण विद्यार्थ्याचा पीएच.डी. प्रबंध चोरून स्वतःच्या नावावर प्रकाशित केला. त्यांच्या विरुद्ध कलकत्ता न्यायालयात खटला चालला, पण सत्तेचा गैरवापर व दडपशाही करून तो खटला मागे घेण्यास भाग पाडले.

                                    राधाकृष्णन हे साहित्यिक चोर होते.  चोराच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणे हा शिक्षकांचा, विध्यार्थ्यांचा, शिक्षण क्षेत्राचा अर्थात आपल्या देशाचा अपमान आहे. तो अपमान दूर करण्यासाठी महात्मा फुले यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणे उचित आहे. त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणे, हीच महात्मा फुलेंप्रती कृतज्ञता आहे.

-डॉ. श्रीमंत कोकाटे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!