महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

रिपब्लीकनांनो आता भाकरी फिरवायची वेळ आलीय..

ॲड. प्रमोद कांबळे

‘रिपब्लीकन’ हा शब्द आजही ऐकला की छातीतले हृदय जरा जास्तच धडकू लागते. आत्ताच चालणे शिकलेल्या एखादया लहान पोराला पडता पडता आई सांभाळते तेंव्हा त्या लहानग्या पोराची जी विश्वासार्हता त्याच्या आईकडे पाहण्याची असते तीच विश्वासार्हता रिपब्लीकन या शब्दांवर आजही आमची आहे. परंतु रिपब्लीकन नेत्यांच्या वागणुकीमुळे ही विश्वासार्हता संपते की काय अशी भीती वाटू लागली आहे.
मी लहान होतो तेंव्हा ‘दलित पँथर’ हा शब्द ऐकायचो. त्यावेळी पँथर हा चित्त्याकरीता इंग्लीश शब्द आहे याची माहीती नव्हती कारण लहानपणी इंग्रजी शाळा नव्हती. रामदास आठवले या नेत्याचे दुसरे नाव पँथर असेल असा समज बालवयात होता. हा पँथर त्यावेळी गावोगावी फिरायचा. तेंव्हा पँथरकडे पत्र्याची पेटी असायची, मळलेले कपडे अन तुटक्या चपला असायच्या. या पँथरला समाजकार्य करता यावे याकरीता गावागावातून, वस्ती वाडयांतून लोक वर्गणी गोळा करीत. आमच्यासारखी लहान पोरं खाकी हाफ चडडया घालून पत्र्याच्या डब्यांमध्ये (पैसे साठवायच्या पुर्वीच्या पीगी बँक) वर्गणी गोळा करीत असत. त्याकाळी उरणच्या संजय गायकवाडांनी तर पँथरचे स्वागत बैलगाड्यांच्या मिरवणुकीने केले होते. या पँथरसोबत गवई, कवाडे आणि खुप मागाहून बाळासाहेब आंबेडकर समाजाचे पँथर किंवा नेते दिसू लागले. पेपरांत यांची नावे, फोटो, बातम्या आणि जयंत्यांमध्ये भाषणे होऊ लागली. चारही जण अधिकृत रिपब्लीकन समाजाचे नेते ओळखले जाऊ लागले. भाषणांत हे सांगू लागले की समाजासाठी मी हा त्याग केला मी तो त्याग केला, कोणी आपल्या बायकोचे कुंकू पुसून घराबाहेर पडला, तर कोणी म्हणे वारसा हक्क न सांगता चळवळीत आलो. काहीही असो रिपब्लीकन समाजाने त्यांच्यावर भरभरुन प्रेम केले. सत्तर आणि ऐंशीच्या दशकातले हे सर्व नेते आता वार्धक्याकडे झुकले. कोणी सत्तरीच्या उंबरठ्यावर आहे तर कोणी सत्तरी पार केली आणि कवाडे सरांनी तर ऐंशी पार केली. समाज गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्षे या नेत्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. कितीवेळा ऐक्य फुटले किती वेळा ऐक्य झाले तरीही समाज या नेत्यांच्या पाठीशी ठाम उभा होता. नेते चुकले तरी ऐक्याकरीता समाजाने उपोषणे केली परंतु नेतृत्व या चौघांनाच दिले. आजपर्यंत विश्वास टाकत राहीले. ‘रिडल्स’ बाबत आंदोलन झाले तरी समाज यांच्यावर प्रेम करत होता. आमच्यासारख्यांना मीसरुड फुटू लागले त्यावेळी रमाबाई नगर घाटकोपर येथे जनरल डायरपेक्षाही भयानक हत्याकांड घडले. भीमसैनीक शहीद झाले तरी समाजाने त्यांचे नेतृत्व हिरावून घेतले नाही. समाजाने झोडले, मारले पण नेतृत्व या चौघांनाच दिले. ऐक्यातून शंभर टक्के निकाल देऊन समाजाने चौघांनाही खासदार बनवले. खैरलांजी घडली तरी समाज यांच्याकडे आशेने बघतच होता. काय चुकलं समाजाचं मला समजतच नाही. या नेत्यांसाठी समाजाने आणि कार्यकर्त्यांनी किती आंदोलने केली, लाठया-काठया खाल्ल्या, नोक-या गमावल्या, भिकेला लागले, जेल भोगले, आणि याहूनही अधिक काही केले. या नेत्यांनी समाजातील तरुण, होतकरु, उच्चशिक्षितांना दाबून काढले, त्यांना पक्षाबाहेर काढले, जेणेकरुन उच्चशिक्षित आणि बुद्धिवंत कार्यकर्ता त्यांना भविष्यात अडचण ठरु नये म्हणून सोम्यागोम्याला पदाधिकारी केले. पक्षातील पैसेवाला कार्यकर्त्याला झुरळासारखे पक्षातून काढले. चाळीस चाळीस वर्षे कार्यकर्ता राहीलेल्या इमानदार पदाधिकाऱ्यांना एक दिवसात पक्षातून मनमानी कारभार करुन हुकूमशाहीने काढून टाकले. समाज हे बघत होता तरीही आशेने समाज पुन्हा पुन्हा यांच्यावरच विश्वास टाकत राहीला. तरी या नेत्यांना आमचा कोणता राग आला काय समजतच नाय. समाजाच्या प्रश्नांकडे नेत्यांनी पाठ का फिरवली. नेत्यांनी समाजाची फसवणुक का केली. याचे उत्तर शोधणे आता गरजेचे बनले आहे. ज्या बाबासाहेबांच्या नावाने नेत्यांनी त्यांची दुकाने सजवीली स्वतःला मंत्रीपदे, आमदारकी, खासदारकी मिळविल्या त्या बाबासाहेंबाची घटना बदलविण्याचा प्रयत्न करणा-या मनुवादी भाजपाकडे जवळजवळ सर्वच रिपब्लीकन नेते होते. समाजाचा विश्वासघात करुन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या नेत्यांनी भाजपालाच मदत केली. भारतीय जनता पक्षाने आरक्षण बंद व्हावे याकरीता सर्वात जास्त खाजगीकरण केले. मागासवर्गीयांचा निधी दुसरीकडे वळवीला, उच्च शिक्षण घेणा-यांच्या आणि परदेशी शिक्षण घेणा-या मागासवर्गीयांच्या सवलती बंद केल्या, आणि घटना बदलण्याची विधाने भाजपचे नेते करीत असताना देखिल हे सर्व भाजपासोबत का आठवले साहेब सॉरी पँथर हे गेली दहा वर्षे भाजपासोबत बीनबोभाटपणे आहेत. गवईंचा कोणताही मागमुसच उरला नाही, कवाडे यांनी तर नितीन गडकरींना निवडून आणण्याचे कंत्राटच घेतले होते. एवढेच नाही तर ज्या बाळासाहेब ठाकरेंनी एका सामान्य रिक्षावाल्याला मोठं बनवले त्या एकनाथ शिंदेनी त्यांच्याच मुलाच्या म्हणजचे उदधव ठाकरेंच्या पाठीत सुरा खुपसून मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवली. त्या सत्तापिपासू वृत्तीच्या, दगाबाज शिंदे गटाला कवाडेंनी पाठींबा दिला आणि समाजाची मान शरमेने झुकवली. कवाडेंच्या या युतीला कोणतीही नैतिकतेची धार नव्हती. बाळासाहेब आंबेडकरांविषयी बोलायचे झाले तर त्यांनी स्वतःच कित्येकदा कबुली दिलीय की, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे भाजपाला फायदा होणार आहे. बाळासाहेबांची गणिते आणि राजकीय चाली समजण्याइतपत कदाचीत मी प्रगल्भ नसेन पण बाळासाहेबांचे कार्यकर्ते हे टीका केली की लोकशाही विसरुन ठोकशाही वापरतात. त्यांना रिपब्लीकन नावाची ॲलर्जी का..? याचेही कारण कळत नाही. भाजपप्रणीत सर्व न्युजचॅनलवर बाळासाहेब आंबेडकर का चमकले, सर्व व्हॉटसअप व टवीटरवर ‘वंचित’ विषयीचे भरभरुन लेख कसे आले याचा देखिल विचार होणे अपेक्षीत आहे. कारण वंचितकडे भाजपासारखा आय टी सेल आहे का? तर नाही मग हे त्रयस्थांच्या नावाने लेख लिहून वंचित कशी बरोबर हे कोण सांगत होतं. कदाचीत या नेत्यांना कोणी विधानपरीषदेचे, राज्यसभेचे गाजर दिले असेल. कदाचीत आर्थिक देवाणघेवाण तर झाली नसेल ना अशा शंका कुशंका मनात घर करु लागल्या. सगळ्यात बेशर्मीची गोष्ट म्हणजे या लोकसभेच्या निवडणुकीला भाजप, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट असो की काँग्रेस, उदधव बाळासाहेब ठाकरे गट, शरद पवार गट असो सर्वांच्या स्टेजवर निळे झेंडे होते. एवढेच कमी की काय अपक्ष उमेदवारांच्या प्रचारात देखिल निळे झेंडे होते. म्हणजे ज्याला वाटेल त्या पदधतीने रिपब्लीकन पक्षांच्या दुकानदारांनी त्यांची त्यांची संधान बांधली होती. स्टेजवर भाषणे करायला मिळाली म्हणून कोणी खुष होते तर कोणी नुसते स्टेजवर मागच्या रांगेत बसायला मिळाले म्हणून खुष होते. ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना..’ अशी गत सर्वच ठिकाणी होती. आता या मुख्य नेत्यांवर नाराज होउन काही रिपब्लीकन पक्षाच्या उपनेत्यांनी स्वतःचे पक्ष काढले. वाटले निदान हे तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरतील परंतु तसे न करता त्यांनी देखिल याला त्याला पाठींबा देण्यात धन्यता मानली. अक्षरशः मेंढयांच्या कळपाची अवस्था रिपब्लीकनांची झाली. पहील्या मेंढीने शेण तुडवले, खडडयात गेली की सर्वजण शेण तुडवत खडडयात जातात. तसेच मुख्य रिपब्लीकन नेत्यांचा अनुयय करणेच सर्व उपनेत्यांनी पसंत केले.
या निवडणुकीतील खुपच निराशेची गोष्ट म्हणजे रिपब्लीकन नाव असलेला एकही ठोस उमेदवार नव्हता, रिपब्लीकन पक्षाची कोणत्याच न्युज चॅनेलवर चर्चा नव्हती, रिपब्लीकन नेत्यांना उमेदवारी मिळाली नाही. आजपर्यंत असे घडले नव्हते. रिपब्लीकन पक्षाच्या नेत्यांना साधी उमेदवारी नाही अशी परीस्थीती आतापर्यंत आलीच नव्हती. राजकीय पटलावरुन रिपब्लीकन हे नाव कायमचे मिटून जाते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कदाचीत या सर्व रिपब्लीकन नेत्यांनी समाजाच्या हिताकरीता काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षाला मदत केली असती तर कदाचीत लोकसभेचे आजचे चित्र उलटे असते. काँग्रेस व मित्रपक्षाला यामुळे कदाचीत अजून दहा ते बारा जागा अधिक मिळाल्या असत्या. रिपब्लीकन पक्षाला उमेदवारी मिळाली असती. रिपब्लीकन हे नाव टीकून राहीले असते. कोणी बचाव घेईल की कॉग्रेसने आम्हाला विचारलेच नाही. परंतु हा बचाव चुकीचा ठरेल. कारण सर्व रिपब्लीकन नेते एकत्र आले असते तर कॉग्रेसच काय सर्वच पक्षांना त्यांना विचारात घेणे भाग पडले असते. परंतु या जर तर च्या गोष्टी आहेत. या निवडणुकीत उत्तर प्रदेशमधून नगीना मतदारसंघातून चंद्रशेखर आझाद निवडून आले. अनेक रिपब्लीकन कार्यकर्त्यांनी व्हॉटसअप स्टेटसवर त्यांचा फोटो ठेवला आणि समाधान मानले. काहीनी कॉग्रेसच्या वर्षाताई गायकवाडांचे फोटो ठेवून ‘भीमाची वाघीण’ संसदेत असे स्टेटस ठेवले. परंतु वस्तुस्थीती वेगळी आहे. या दोघांचाही रिपब्लीकन पक्षांशी कोणताही आणि कसलाही संबंध नाही. रिपब्लीकन विचारधारा ते मानीत नाहीत. रिपब्लीकन परीवाराशी त्यांचा कोणताही कधीही संबंध आलेला नाही. केजरीवाल देखिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात म्हणून ते रिपब्लीकन विचारांशी जुळणारे आहेत का? नाही. रिपब्लीकन हा विचार आहे, रिपब्लीकन हा परीवार आहे, रिपब्लीकन हे अन्यायाचे आंदोलन आहे, रिपब्लीकन कांती या महाराष्ट्राने देशाला दिली आहे. मायावतींचा बीएसपी हा आमची दाई बनू शकला परंतु आई मात्र आमचा रिपब्लीकन पक्षच असू शकतो. आम्ही आमची आई बदलू शकत नाही. रिपब्लीकन टीकला तर संविधान टिकेल, आणि संविधान टिकले तर देश टिकेल. डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले आहे की सर्वप्रथम देशाला प्राधान्य दया. देश आहे तर तुम्ही आहात. शेवटी देशप्रेम श्रेष्ठ. म्हणून आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. भाकरी फिरवली नाही तर ती करपणार आहे. या स्वार्थी आणि विश्वासघातकी नेत्यांना आता बदलायची वेळ आलीय… गावोगावी रिपब्लीकन बचावचा जागर घालू या. यापुढे या रिपब्लीकन नेत्यांना त्यांची जागा दाखवून समाजातील तरुणांनी आणि तरुणींनी पुढे येण्याची गरज आहे.

आज नही तो कभी नही.

रिपब्लीकन आईची इज्जत ही आता केवळ तुमच्या हाती भीमसैनीकांनो ! तुम्हाला तुमच्या आईची शप्पथ। चला एक होऊ या आणि लढू या….!

जय भीम !

निळा सलाम !

ॲड. प्रमोद कांबळे
पेण, रायगड

9881491221

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!