चीफ जस्टिस यांचे घरी पंतप्रधानांची गणपती आरती आणि आचारसंहितेची ऐशी तैशी.

सुरेश खोपडे
न्यायाधीश, लोकप्रतिनिधी, मीडिया आणि नोकरशहा हे लोकशाहीचे चार खांब समजले जातात. त्यापैकी तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील हे खांब कसे काम करतात हे मी जवळून पाहिलेले आहे. हे चारही खांब ऑफिशिअली, फॉर्मली, एकत्र येतात किंबहुना त्यांना एकत्र यावेच लागते. उदा. 15 ऑगस्ट 26 जानेवारी सारख्या राष्ट्रीय सणाच्या, कार्यक्रमांच्या वेळी. यापैकी लोकप्रतिनिधी, नोकरशाही,मीडिया हे खाजगी, सामाजिक, धार्मिक,वैयक्तिक दृष्ट्या ही एकत्र आलेले पाहिलेले आहेत व त्यामुळे लोकशाहीच्या कार्यपद्धतीवर फरक पडेल असे जाणवले नाही. पण न्याय व्यवस्थेतील अधिकारी असे जाहीरपणे सामील झालेले पाहिलेले नाहीत आणि ते एकत्र आले असले तरी त्यांनी ते जाहीर केलेले ऐकलेले, पाहिलेले नाही.
या केस मध्ये पंतप्रधान चीफ जस्टिस यांच्या घरी महाराष्ट्रातील लोक घालतात अशी टोपी घालून गेले व ते खूप पद्धतशीर पणे शूट करून जनतेपुढे आणले गेलेले आहे. याला दोघांपैकी कोणीही ऑब्जेक्शन घेतलेले नाही याचा अर्थ दोघांनी संमतीने ते जाहीर केलेले आहे.
महाराष्ट्रातील सरकार पाडण्यामागे महाशक्ती होती असे एकनाथ शिंदेंनी जाहीर केले. न्यायाधीशांच्या गणपतीची आरती करणारी हीच ती महाशक्ती. या शक्तीचा लोकशाहीवर विश्वास आहे का? मुळीच नाही! कारण अमेरिकेसारख्या देशाने त्यांना बंदी घातली होती. उज्वल निकम म्हणतात त्या प्रमाणे त्यांच्या डोक्यात सेक्युलॅरिझम चा कोणता किडा असावा त्या साठी त्यांनी गोध्रा घटनेनंतर घेतलेली भूमिका जरूर अभ्यासावी.
अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस प्रमुख म्हणून मी काम केले पण कोणाही जिल्हा सेशन जजने आपल्या घरी पालक मंत्र्याला बोलावून त्यांची बातमी वर्तमान पत्रात दिल्याचे आढळले नाही . रायगड जिल्ह्यामध्ये नेमणुकीस असता एका मित्राने घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता त्याला अनेक मित्रांना बोलविले होते स्थानिक जुडिशन मॅजेस्ट्रेट असलेल्या एका मित्राला मी खास आग्रह केला. कोण कोण येणार याची त्यांनी चौकशी केली. स्थानिक आमदार येणार म्हटल्यावर त्यांनी नम्रपणे आपला नकार कळविला. या न्यायाधीशाला अशी मॅच्युरिटी होती ती चीफ जस्टीस मध्ये का दिसली नाही?तालुका, जिल्हा, राज्य, देश यामधील प्रशासकीय प्रमुखाच्या खाजगी वर्तनाचा त्याच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर मोठा परिणाम घडवून आणते. अमुक एक माणूस पोलीस अधीक्षक यांच्या जवळचा आहे असे इतरांना नुसते दिसले तरी तो पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टर वर योग्य अगर अयोग्य प्रभाव पाडतो. इथे तर देशाचे पंतप्रधान चीफ जस्टीस यांचे घरगुती मित्र आहेत व ते त्याचे जाहीर प्रदर्शन करतात हे पाहिल्यावर कितीही नाही म्हटले तरी देशातील अनेक न्यायाधीशावर त्याचा प्रभाव पडू शकतो आणि तो पंतप्रधानांना सोयीचा असेल असाच पडू शकतो. आणि हा माणसाच्या अबोध मनातील परिणाम आहे. त्यासाठी इतरांना लेखी अगर तोंडी सूचना देण्याची गरज पडत नाही. माननीय चंद्रचुडजी यांना पंतप्रधानांना घरी बोलविण्याची व तसे जाहीरपणे दाखवण्याची गरज का भासली असावी?
एक कारण असे दिसते की कांहीं निर्णयामुळे चीफ जस्टिस खूप ट्रोल झाले होते. धमक्या देण्यात आल्या होत्या. सामान्य माणसाला कल्पना नाही पण सर्व थरातील लोकांना साम, दाम, दंड, भेद वापरून आपला हेतू साध्य करण्यासाठी या ब्राह्मणी व्यवस्थेने आपले काम चालू ठेवलेले आहे.त्याला घाबरून त्यांनी तह केलेला दिसतो. अश्या धमक्या राममंदिरा बद्दल बोलणाऱ्या एका शंकराचार्यांना देण्यात आल्या होत्या.पण ते शेरास सव्वाशेर निघाले. शिवरायांच्या भुमि जवळ जुन्नर परिसरात वाढलेला कायदेपंडित डगमगलेला दिसतोय . खर काय ते त्यांनीच जाहीरपणे सांगितले पाहिजे . त्यांच्या इभ्रतीसाठी, राज्य घटनेच्या पावित्र्यासाठी आणि लोकशाहीच्या अस्तित्वासाठी!
सुरेश खोपडे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत