मुख्य पान

ते दिवस आता कुठे ?

दादासाहेब रूपवतेंनी सांगितलेली घटना आहे.
बाबासाहेबांच्या एका मोर्चामध्ये ते सामिल झाले होते. हा मोर्चा एका गावाशेजारून जात असताना अचानक परकर पोलका नेसलेली एक आठ दहा वर्षाची पोरगी त्या मोर्चात घुसली आणि रूपवतेंच्या बाजूला असणाऱ्या एका माणसाचा सदरा खेचून म्हणू लागली, 'बापा, घरी चल ना ! तीन दिस झाले, घरात चूल पेटली न्हाय. मी, भावड्या अन माय; आमी सगळेच उपाशी आहोत, बापा घरी चल ना !' पण तो माणूस त्या पोरीचे काही एक एेकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तो एका हाताने आपल्या पोरीला बाजूला करायचा आणि चालता,चालता घोषणा द्यायचा. पण पोरगीसुध्दा जिद्दी होती. ती पुन्हा आपल्या बापाचा सदरा खेचून त्याची विनवणी करायची. असे एक दोन वेळा झाल्यावर तो माणूस थांबला आणि आपल्या पोरीला म्हणाला, 'न्हाय चूल पेटली तर नको पेटू दे. दोन चार दिस उपाशी राहिलात तर काय आभाळ कोसळत न्हाय. हे तर आपल्या पाचवीलाच पुजलं हाय.तू घरी जा. तुला कळत न्हाई काय? अगं मी बाबासाहेबांच्या मोर्चात हाय. ते सोडून मला येता येणार न्हाय'. असे म्हणून त्या माणसाने आपल्या पोरीला दूर ढकलून दिले आणि तो घोषणा देत पुढे निघाला. ती चिमुरडी पोर त्या मातीत बसून स्फुंदत-स्फुंदत रडू लागली. दादासाहेब रूपवतेंनी हे पाहिलं. त्यांना राहावले नाही.त्यांनी तिथल्या तिथे चार पाच कार्यकर्त्यांकडून थोडेफार पैसे गोळा करून त्या मुलीच्या हातात कोंबले आणि तिला म्हणाले की, 'पोरी, या पैशातून काहीतरी खायला घरी घेवून जा. मोर्चा संपला की आम्ही तुझ्या बापाला घरी पाठवून देतो'. मग ती चिमुरडी जड पावलाने आपल्या घराकडे निघाली. या असल्या निष्ठावान कार्यकर्त्यांमुळेच बाबासाहेब गल्लीपासून दिल्लीपर्यंतची लढाई जिंकू शकले. तीन दिवस अन्नाचा कणही शिजलेला नाही, बायका पोरं उपाशी मरताहेत पण याची कसलीही पर्वा न करता बाबासाहेबांच्या आंदोलनात सहभागी होणारी ही माणसे आज कुठेच दिसत नाहीत. जे सिध्दार्थ विहार काही महिन्याभरापूर्वी उध्वस्त करण्यात आले. तिथे मिलिटरीचा राजीनामा देवून आलेला पँथर कवी मनोहर अंकुश रहायचे. पायाला भिंगरी लावून सभा मोर्चे आंदोलन करणारे असंख्य कार्यकर्ते राहायचे. ही माणसे कसलाही नोकरीधंदा न करता चोवीस तास चळवळीसाठी काम करायची. कारण यांच्या जगण्याची व्यवस्था करण्याची दानत त्यावेळी आंबेडकरी समाजाकडे होती. आज ही दानत आपल्याकडे राहिलेली नाही आणि त्यामुळेच चळवळीसाठी चोवीस तास काम करणारी माणसेसुध्दा कुठेच दिसत नाहीत.
भायखळ्याच्या रिचर्डसन क्रूड्रासमध्ये जयंतीनिमित्ताने विठ्ठल उमप व गोविंदराव म्हशिलकरांचा कव्वालीचा सामना होता. रात्रभर हा सामना चालू होता. प्रत्येक गाण्याच्यावेळी गोविंदराव खकारा काढून थुंकायचे आणि खांद्यावरच्या उपरण्याने तोंड साफ करायचे.शेवटी पहाटे गोविंदरावांनी आईचे ह्रदय गाऊन सर्वाना रडविले.कार्यक्रम संपल्यावर आम्ही कुतूहलाने गोविंदरावांना पाहण्यासाठी स्टेजजवळ गेलो तर समोर रक्ताच्या बेडक्यांचा खच पडला होता. म्हणजे गोविंदराव रात्रभर रक्त थुंकून बाबासाहेबांचे गाणे गात होते. कलेसाठी आणि चळवळीसाठी आपल्या प्राणाची बाजी लावणारे कलावंतही आता कोठे आहेत?

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!