उपवर्गीकरणाच्या खांद्यावर आरएसएसची लाठी !

मुंबईमध्ये २० मे २०२५ रोजी “अंत्योदय वादी” भाजपा आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रायोजित आरक्षण उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी “सकल (?) मातंग मेळावा” झाला. भव्य मंडपामध्ये झालेल्या या मेळाव्यास महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मेंढरं हाकून आणणाऱ्या नेत्यांना अजिबात बोलू देण्यात आले नाही. शेवटी-शेवटी तर भाऊबंदकीची स्पर्धा हातापायावर यायला लागल्यावर फडणवीसांच्या पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला ! उपस्थित भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांसमोर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. अर्थात , सर्व उपस्थितांच्या तोंडाला पाने पुसून मार्गस्थ केले. परतीच्या प्रवासात सोशल मिडीयावर उपस्थितांनी आपली फसवणूक झाल्याची टीका केली खरी; पण आता वेळ निघून गेली आहे, तुम्ही फसला आहात !!
भाजपामध्ये आता दिलीप कांबळेंच्या जागी अमित गोरखेंचे नेतृत्व उभे करण्यात आले आहे. ‘हा मेळावा उपवर्गीकरणासाठी नसून नेतृत्व लादण्यासाठी होता’ हेही आता लपून राहिलेले नाही.
भाजपाची सत्ता असली तरी उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे आहेत. शासनाने एकतर्फी निर्णय घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला प्रचंड मोठा विरोध होऊ शकतो, हे सरकारला माहित आहे. याचा अर्थ आरक्षणाचे समन्यायी वितरण व्हायला नको का ? तर झाले पाहिजे. पण भाजपा किंवा अन्य कुणी प्रस्थापित पक्षांनी त्यामध्ये न पडता दलितांमधील सर्व जातींनी एकत्र येवून आरक्षणाचा आढावा घेतला तर ते व्यवस्थित होईल. त्यासाठी खूप मोठी चर्चेची घुसळण होण्याची गरज आहे. अशा प्रकारची कोणतीही चर्चा न होता हा निर्णय न्यायालयाने दिला असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत असंख्य अडथळे आहेत. याला खूप वेळ लागेल, हे या समाजातील अनेक पुरोगामी कार्यकर्ते आता बोलून दाखवत आहेत.
१) या प्रश्नामध्ये भाजपाचा हेतू स्वच्छ नव्हता व नाही , हे स्पष्ट झाले आहे. या प्रश्नाला पुढे करुन भाजपाला महार – मांग संघर्ष उभा करायचा आहे, हे अनेकांच्या लक्षात आले आहे.
२) आंबेडकरी चळवळीतल्या काही जणांनी उपवर्गीकरणाच्या न्यायालयीन निर्णयाला स्पष्ट विरोध केला असला तरी अनेक कार्यकर्त्यांनी हा प्रश्न दलितांतर्गत चर्चेतून सोडवता येवू शकतो व त्यात अन्य कुणाचा हस्तक्षेप नको, अशी भूमिका मांडत सर्व दलितांसोबत संवाद करायला सुरुवात केली आहे.
३) मातंग समाजाच्या मागासपणाची सामाजिक/आर्थिक कारणे जात वर्गीय शोषण व्यवस्थेत न शोधता ज्यांच्याकडे आजही कोणत्याही साधनसंपत्तीची मालकी नाही त्या नवबौध्दांना शत्रू म्हणून उभे करणे ही “आरएसएस – भाजपा” ची खेळी आहे , हे लक्षात आल्याने अनेक उपस्थितांनी मेळाव्यानंतर तीव्र प्रतिक्रीया दिल्या आहेत.
४) सत्ताधाऱ्यांनी उभ्या केलेल्या जात अस्मितांच्या चळवळींचे नेतृत्व सत्ताधारीच उभे करत असतात. मातंग समाजाचे नेते सत्ताधारी वर्गानेच नियंत्रित केल्याचे दिसते. हे काँग्रेस व भाजपा दोन्हींच्या काळात घडले आहे
आता उपवर्गीकरणासाठी भाजपाच्या गोटात शिरलेल्या एका कार्यकर्त्याने पूर्वी ” मांग पुढाऱ्यांची अवसानघातकी चळवळ” या शीर्षकाची पुस्तिका लिहिली होती. त्यात १९६७ साली मातंग समाजाचे ६ आमदार निवडून आले होते असे मांडले आहे.त्यानंतर दोनच वर्षांनी १९६९ साली कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे निधन झाले. वैश्विक साहित्याची निर्मिती करणाऱ्या या महान लेखक/नेत्याला मातंग समाजाने या काळात अडगळीत टाकले होते व प्रस्थापितांनी नियंत्रित केलेल्यांचे नेतृत्व स्वीकारले होते. या समाजाची ही दारुण शोकांतिका आहे ! ‘गल्लीबोळात अण्णाभाऊंचे पुतळे आणि नेतृत्व मात्र सत्ताधारी पक्षातील नेत्याचे’ अशा दुविधेत जगणाऱ्या समाजातील कार्यकर्त्यांनी खरेतर आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. ‘आपल्या मागासपणाचा संबंध नवउदारमतवादी आर्थिक रचनेत न शोधता आपल्याच जागृत भावांशी जोडणे’ यातून या समाजाची मोठी हानी होणार आहे.
२० मे २०२५ च्या सकल (?) मेळाव्यात नाईलाजाने महापुरुषांच्या घोषणा दिल्या जात होत्या , तरी “सत्यशोधक” मुक्ता साळवे यांची घोषणा देण्यात आली नाही. मुक्ता साळवे यांनी १८५५ साली लिहिलेल्या निबंधाचे शीर्षक होते “मांग-महारांच्या दु:खाविषयी..” याचा अर्थ या काळापर्यंत या दोन्ही जातींची सामाजिक/आर्थिक/ शैक्षणिक स्थिती यामध्ये फारसा फरक नव्हता. महात्मा जोतीराव फुलेंनी अस्पृश्यांकरीता काढलेल्या शाळेत लहुजी साळवे व रानबा महार यांनी आपापल्या जातींची मुले शाळेतआणण्यासाठी परिश्रम घेतल्याची नोंद फुले वाड्:मयात आहे.
एकेकाळी फुलेंचा सत्यशोधक वारसा सांगणारे सत्तालोलुप जेव्हा हेडगेवार व आंबेडकर यांचे विचार एक होते असा संघीय प्रचार करतात , त्यावेळी उपवर्गीकरणाच्या खांद्यावर संघाची लाठी आहे, हे आता किमान काही जणांच्या लक्षात आले असेलच !
तूर्त इतकेच.
महादेव खुडे , नाशिक
२३ मे २०२५
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत