देशमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

युवाशक्ती पुढे मोदींना झुकावे लागले !

16 मे पासून शिक्षण व्यवस्थेत मूलभूत सुधारणा व्हाव्यात, बेरोजगारी यासारख्या शिक्षण क्षेत्रातील प्रश्नावर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली एक अभियान सुरू केले त्याचाच एक भाग म्हणून नीट पेपर फुटीच्या संदर्भात चौकशी होऊन दोषींना शिक्षा व्हावी आणि याची जबाबदारी म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आणि ही मागणी शेवटपर्यंत लावून धरली.  परंतु ही मागणी प्रतिष्ठेची बनवून सरकारने ही मागणी फेटाळून लावली व सर्व शक्तीनिशी या मागणीला विरोध दर्शवला. परंतु विद्यार्थ्यांनीही त्यांना जुमानले नाही व आपल्या या मागणीवर ते ठाम राहिले शेवटी मोदी सरकारला झुकावे लागले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आजवर लढा देणाऱ्या आंदोलकांनी आपल्या विजयांचा आंदोलन स्थळावरच जल्लोष केला. जय भीम इन्कलाब जिंदाबाद नाऱ्याने तो परिसर दुमदुमला. 

वास्तविक पाहता गेल्या दहा वर्षात 150 पेक्षा अधिक वेळा पेपर फुटीचे प्रकार झाले होते. त्याचा प्रत्यक्ष फटका 7.5 लाख कोटी मुलांना व त्यांच्या कुटुंबाला बसला होता. आणि विशेष म्हणजे या प्रकरणातील फक्त दोघांना दोषी ठरवण्यात आले होते. काहींचे तपास सुरू आहेत असे दाखवून त्यातून गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता. दुसऱ्या बाजूला दलित, गरीब होतकरू आणि शेतकरी कुटुंबातूनच आलेल्या मुलांचा या परीक्षेवरील विश्वास उडाला होता. त्यांच्यात प्रचंड नैराश्य आले होते. या नैराश्यातून अनेक मुलांनी आत्महत्या केल्या अशा गंभीर विषयावर सी जी पी ने आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनातूनच त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. खरंतर त्याच वेळी त्यांचा राजीनामा घेतला असता तर सरकारवर आकाश कोसळले नसते. उलट हा प्रश्न इतका चिघळला नसता. परंतु मग्रुर, अहंकारी सरकारच्या फाजील आत्मविश्वासामुळे तसे ते केले नाही. उलट न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या युवा विद्यार्थ्यांवर अमानवी पोलीस कारवाई केली.  यामध्ये त्यांनी विद्यार्थी, मुलींनाही सोडले नाही. तरीही विद्यार्थ्यांनी संयम राखला. आणि हे सर्व घडल्यानंतर सरकारला आत्मसाक्षात्कार झाला. व आपले मौन सोडत प्रधानमंत्री मोदी मनाने की, देशातील तरुणांचे हित त्यांचे भवितव्य याहून काहीच महत्त्वाचं नाही. असे म्हणाले पण प्रधान यांचा राजीनामा घ्यायला तयार नव्हते. याउलट त्यांच्या सरकारने उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून नाट्यमयरीत्या हलवले आणि त्यांचे उपोषण सोडवण्यात यशस्वी झाले.

सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर आपण आता जिंकलो या अविर्भावात सरकार होते. परंतु अभिजीत दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान हे जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे घोषित केले तेव्हा सरकारने आंदोलकावर आणखी दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यातच काही हिंदू रक्षक येणार व आंदोलकांना उठवणार अशा अफवा पसरवून भीती दाखवण्याचेही प्रयत्न झाला. परंतु याचा आंदोलकावर काहीच परिणाम झाला नाही. थोडक्यात आंदोलकांनी सरकारचे सर्वच अंदाज चुकवले व आपला लढा निष्ठेने व निर्धाराने चालूच ठेवला. परिणामी त्यांच्या मागणीला यश आले धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. 

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आंदोलकावर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष कारवाई केली त्यापेक्षा सरकार पक्षातील काही नेत्यांनी आंदोलना संदर्भात दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय वेदनादायी होत्या. त्यांच्या बुद्धीची किव करावी अशा होत्या. या आंदोलनाच्या संदर्भात एक महिला खासदार म्हणाल्या ” इथे हिंदू धोक्यात आहे आणि तुम्ही नीट परीक्षेच्या चिंतेत आहात जर हिंदूच राहिले नाहीत तर नीट परीक्षा कोण देणार” ? 

उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय म्हणतात जंतर-मंतर जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन नाही तर देशद्रोह याचे प्रदर्शन सुरू आहे. भाजपचेच एक नेते ठाकूर हरिभूषण म्हणाले की, हे विद्यार्थी नाहीत तर नेपाळी, बांगलादेशी आहेत. भाजपचे प्रवक्ते प्रोफेसर महेश वर्मा एका चैनल वर बोलताना म्हणाले आंदोलकांनी यावेळी पाकिस्तानी झेंडे दाखवले अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समाज माध्यमावरून देण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्रातील ही काही विद्वान आमदारही होते. या आंदोलनाच्या संदर्भात खोत म्हणाले की, आंदोलन करणारे अतिरेकी असावेत व प्रधानांनी राजीनामा देऊ नये. मुंबईतील भाजपचे एक विद्वान प्रवक्ते बन तर असे म्हणाले की, पेपर फुटीचा संबंध थेट पाकिस्तानशी आहे. आपल्या देशात गुणवत्ताधारक डॉक्टर निर्माण होऊ नये म्हणून हे कृत्य केले आहे याचा अप्रत्यक्ष फायदा पाकिस्तान आणि चीन सारख्या देशाला होणार आहे. या आंदोलनात सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते त्यांची कुचेष्टा करताना सागर नामक जैन धर्मगुरू समाज माध्यमावर व्यक्त होताना म्हणाले की, सोनम वांगचुक यांचे हे उपोषण नाही तर ‘रोजा’ आहे. दिवसा उपास आणि रात्री जेवण. भाजपचे अजितसिंह म्हणतात आंदोलन करणारे विद्यार्थी नाहीत तर पाकिस्तान कडून पैसे घेऊन आपल्या देशात उपद्रव्य पसरवणारे आहेत. समाज माध्यमावरील त्यांच्या या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर त्यांच्या विचार करण्याची पद्धतींची आणि बुद्धिमत्तेची किव येते. त्याचप्रमाणे यातून त्यांची अंधभक्ती व अज्ञान हा स्पष्ट होते. या प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तींपैकी काही व्यक्ती मालक आपल्याला आज ना उद्या सत्तेचा तुकडा टाकील या प्रकारात मोडतात. तर काहीजण मालकांनी टाकलेल्या सत्तेच्या तुकड्या प्रती इमान राखण्याचा भूमिकेतून केले आहे. 

परंतु या प्रतिक्रियेतून आणखीन एक गोष्ट अधोरेखित होते की 2014 मध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर भाजपा, संघ व त्यांची पिलावंळ वगळता सरकारला प्रश्न विचारणाऱ्यां व शासनाच्या धोरणाला विरोध करणाऱ्या लोकांना ते देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या नितीनुसारच ते काँग्रेसला पाकिस्तान धार्जिने मानतात. डाव्या पक्षांना नक्षलवादी ठरवतात. याच भूमिकेतून मुसलमानांना ते देशद्रोही ठरवतात. दलितांना आता ते अर्बन नक्षलवादी म्हणत आहेत. या भूमिकेतून भाजपा व त्यांचे अंधभक्त आपल्या हक्कासाठी सरकारविरुद्ध लढणाऱ्या विद्यार्थ्यांनाही देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. वास्तविक पाहता महाराष्ट्रातील एक तरुण देशातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यावर लढा देतो आहे ही गौरवाची बाब म्हणून महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधक यांनी या आंदोलनामागे उभा राहिला हवं होतं. त्याला सपोर्ट करायला हवा होता पण हे न करता त्यांच्या आंदोलनाला दहशतवादी पाकिस्तान धारजींने ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. याहून मोठे दुर्दैव कोणते असू शकेल. 

या देशात मोदी भाजपा, संघाचे असंख्य अंधभक्त आहेत. पण आपल्या मुलांच्या भवितव्यापेक्षा अंधभक्ती महत्त्वाची आहे का?  यांचाही विचार व्हायला हवा. ज्याप्रमाणे देवाचा अंधभक्त कधी कधी देवाला नरबळी देतात त्याचप्रमाणे हे अंधभक्त आपल्या अंधभक्तीतून आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यांचा बळी देत आहेत. हे कितपत योग्य आहे? याचाही विचार अंधभक्तांनी करायला हवा. 

थोडक्यात या आंदोलनाच्या विरोधात केवळ सरकार नव्हते तर असे अंधभक्त ही होते. अशा अवस्थेत या युवक विद्यार्थ्यांनी एकी दाखवत येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देत त्यांच्याशी संघर्ष करत केवळ हा लढा जिंकले नाहीत तर देशात आणखीन लोकशाही जिवंत आहे हे दाखवून दिले. या निमित्ताने त्यांनी सरकारलाही दाखवून दिल. विरोधकांना संपवणे सोपं आहे. आमदार खासदाराला खोके देऊन विकत घेणे सोपे आहे. ईडीची भीती दाखवून आपल्या पक्षात आणणं सोपं आहे. पण युवाशक्तीला विकत घेणं अवघड आहे. त्याचप्रमाणे युवाशक्ती जागी झाली तर लाठीचार्ज, अश्रुधुर, गोळीबारालाच काय तर मरणालाही घाबरत नाही हेच आंदोलकांनी सरकारला दाखवून दिलं. यासाठी त्यांनी फार मोठी किंमत चुकवावी लागली हे कटू सत्य नाकारता येणार नाही. पण या बदल्यात हुकूमशाही सरकारला देखील युवाशक्ती झुकायला भाग पडते हा संदेश ही आंदोलकांनी देशाला दिला. त्याचप्रमाणे हा विजय केवळ विद्यार्थ्यांचा नाही तर हा विजय लोकशाहीचा आणि संविधानाचा आहे.

डॉ. सुरेश वाघमारे 

लातूर 

मो. 9403060555

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!