” महर्षी चार्वाक….ईश्वर आणि वेद ह्यांना नाकारणारा पहिला बंडखोर.!”

सध्या माणसाचे जीवन इतके धावपळीचे व धकाधकीचे झाले आहे की, तो घड्याळ्याच्या काट्याप्रमाने धावतो आहे. आणि त्यातूनही जे
काही निवांत क्षण, त्याच्या वाट्याला येतात. त्यावर मोबाईल व टेलिव्हिजनने कब्जा केला आहे. लोकांना ह्या दोन गोष्टींनी इतकं झपाटून टाकले आहे की, जणू काही अन्न, वस्त्र, निवारा ह्या
अत्यावश्यक मूलभूत गरजांसह ह्याही दोन गोष्टी गरजेच्या झाल्या असल्याचे दिसून येते. ह्या सर्व परिस्थितीत वाचन संस्कृती जवळजवळ लोप पावली आहे. नाहीतर पूर्वी रस्तोरस्ती असलेली वाचनालये बंद पडली नसती. आज आपण पाहतो की, आपल्याला शिकवला गेलेला इतिहास हा काही लोकांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला आहे. त्यामुळे तुकाराम महाराज विमानातून स्वर्गस्थ झाले की त्यांचा खून झाला ? शिवाजी महाराजांची सार्वजनिक जयंती साजरी करण्याची प्रथा कोणी सुरू केली? महात्मा फुलेंनी की टिळकांनी. तसेच त्यांच्या जन्मतारखेचा घोळ निर्माण करून त्यांच्या दोन जयंत्या साजऱ्या केल्या जातात. त्यांचे गुरू कोण ह्यावर ही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नामदेव, बसवेश्वर ह्यांचे खून करण्यात आले की, ते समाधिस्त झाले ह्यावरही वाद आहेत. झाशीची राणी स्वतः रणांगणावर लढली की झलकारिबाई? असाही प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. शालेय शिक्षणात भगवान बुध्द राज्यामध्ये फेरफटका मारीत असताना त्यांना एक भिकारी, आजारी, म्हातारा,व प्रेत दिसले म्हणून त्यांनी संसाराचा त्याग केला. असे शिकवले जाते .आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, एखादी व्यक्ती एक मुलाचा पिता होईपर्यंत त्याला ह्या गोष्टी माहिती असू नये. हे कसे शक्य आहे? पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ” बुध्द आणि त्यांचा धम्म” या ग्रंथात भगवान बुध्दांच्या गृहत्यागाचे नेमके कारण सांगितले आहे. कदाचित माहितीच्या अभावी , किंवा चुकीच्या माहितीमुळे भविष्यात वाद निर्माण होऊन काही अघटीत घडू नये म्हणून ह्या माध्यमातून योग्य माहिती देता आली तर ती चांगली गोष्ट आहे .असे मला वाटते. परंतु ती माहिती देताना संदर्भ देणे आवश्यक आहे.आता हेच पहा ना, वेद प्रामाण्यवादी लोक महर्षी चार्वाक ह्यांच्यावर कठोर टीका करतात. सहाजिकच उत्सुकता निर्माण होते की, ते त्यांच्यावर टीका का करतात? तेव्हा आपण चार्वाक कोण होते व त्यांच्यावर हे लोक टीका का करतात ? ते पाहू या.
भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे तत्वज्ञान (दर्शने) सांगितले असून, त्यातील नऊ प्रमख आहेत. त्यापैक सहा वेद प्रामाण्य ( षड दर्शन) म्हणजेच देवाचे अस्तित्व मानणारे आहेत. त्यांना आपण आस्तिक म्हणतो. जैन, बुध्द,व चार्वाक ही तीन दर्शने वेदप्रामाण्य नाकारतात म्हणजेच देवाचे अस्तित्व अमान्य करतात म्हणून त्यांना आपण नास्तिक म्हणतो.
चार्वाक (दर्शन) तत्वज्ञानाचे स्वतःचे असे ग्रंथ , साहित्य नसून जैन, बुध्द, व अन्य ग्रंथातून आलेल्या चर्चेतून त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुळात महर्षी चार्वाक कोण होते ? हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. चार्वाक हे दुसरे तिसरे कुणी नसून ,देवांचे गुरु सर्वज्ञानी, आदरणीय ब्रहस्पती हेच चार्वाक आहेत. चारू हे ब्रहस्पतीचे नाव असून, चारूमधील ऊ शब्दाचा लोप पावला आहे. वाक हे त्याच्या पत्नीचे नाव आहे, म्हणून त्याना चार्वाक म्हणतात. त्यांनीच वेदप्रामाण्य नाकारून, ईश्वराचे अस्तित्व नसल्याचे ठामपणे सांगितले. म्हणूनच त्यांच्या सांगण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्या ब्रहस्पतिने वेदाचे ज्ञान देवाना दिले ,त्याच त्यांच्या गुरूने वेद नाकारून ईश्वराचे अस्तित्व अमान्य करावे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. वेद आणि ईश्वर या संबंधी त्यांना पूर्ण ज्ञान असल्यामुळे त्यानी त्यावर अतिशय खोचक टीका केली असून, बहुजन समाजाने योग्य प्रकारे कसे जगावे ? कशावर विश्वास ठेवावा ? , कशावर ठेऊ नये ? तसेच आयुष्य कसे जगावे हे देखील सांगितले आहे . ह्यालाच चार्वाक दर्शन किंवा लोकायत म्हणतात .
कौटिल्या सारख्या महान पंडिताने आपल्या अर्थशास्त्राच्या सुरुवातीला ब्रहस्पतीला प्रणाम केला आहे. शिवाय त्याने लोकायताचा समावेश असलेल्या आंविक्षिकी विद्येला, सर्व विद्याची चिकित्सक विद्या मानले आहे. यावरून त्यांची महानता लक्षात येते.
एक तर ते देवांचे गुरु असल्यामुळे, त्यांच्यावर उघडपणे टीका करणे देवाना शक्य नव्हते. म्हणून त्यांनी खोटी कथा रचली. इंद्राला असूरांची खूप भीती वाटू लागली म्हणून त्याने आपली अतिशय सुंदर मुलगी जयंतीला असुरांचे गुरु शुक्राचार्य ह्यांच्यावर मोहिनी घालण्यासाठी पाठविले. त्याप्रमाणे तब्बल दहा वर्षे शुक्राचार्य जयंतीच्या मोहपाशात अडकून पडले. त्यादरम्यान देवांनी ब्रहस्पतीना शुक्राचार्य बनवुन असुरांमध्ये पाठविले. त्यांनी असुरांना उलटे ज्ञान शिकवले. म्हणजे वेद , ईश्वर नाकारणे. वगैरे. थोडक्यात नास्तिक तत्वज्ञान पसरविण्याचे काम त्यांनी केले.
परंतु खरी गोष्ट अशी आहे की, ब्रहसप्तीच्या पत्नीला द्विजांचा राजा सोम ह्याने यज्ञ सुरू असताना पळविली. ब्रहस्पतीने खूप धावपळ केली परंतु कुणीही देव त्यांच्या मदतीला धाऊन आले नाही. मग त्यांनी असुरांची मदत मागून, त्यांच्या साहाय्याने सोमाशी युद्ध करून पत्नीची सुटका केली. तेव्हापासून ते देवांचे विरोधक होऊन, असुरांचे मित्र बनून त्यांच्या बरोबर राहू लागले. सहाजिकच विचारांची देवाणघेवाण झाली. त्यामुळे असुरांचे तत्वज्ञान व त्यांचे स्वतःचे चिंतन यांच्या समन्वयातून “लोकायत ” विचारधारा निर्माण झाली. त्यांनी ऋग्वेदाच्या १०.१०९ व १०. ७१ या सुक्तांमधून पत्नीच्या अपहरण प्रकरणाविषयी संताप व्यक्त केला आहे. ब्रहस्पती असुरांच्या संपर्कात येण्यास अनेक कारणे आहेत. परंतु त्यांचा या ठिकाणी
उहापोह करणे अनावश्यक आहे.
सूर म्हणजे देव आणि असुर म्हणजे राक्षस हे जे आपल्या डोक्यात इतिहासकारांनी भरवले आहे. ते सपशेल खोटे असून , सुर म्हणजे बाहेरून आलेले आर्य व असुर म्हणजे इथल्या सिंधू संस्कृतीचे निर्माते , मूळचे भारतीय आहेत. बऱ्याच वेळा त्यांचा उल्लेख द्रविड म्हणूनही केला जातो. सिंधू संस्कृतीचे उत्खननामध्ये, जे अवशेष सापडले आहेत , त्यावरून असे दिसते की , ती अतिशय प्रगत व उच्च दर्जाची संस्कृती होती. ते लोक शेती, व्यापार, पशुपालन, उद्योगधंदे करून शांततेत जीवन व्यतीत करीत होते. त्यांचे राजे बाणासुर, बळी, प्रल्हाद, विरोचान हे प्रजाहितदक्ष, न्यायी, पराक्रमी, व प्रजेचा पुत्रवत सांभाळ करणारे होते. म्हणूनच तर लोक आजही म्हणतात की, इडा पिडा टळो,अन बळीचे राज्य येवो! इतके ते प्रजेची काळजी घेणारे होते.
हे लोक शांततेने आयुष्य व्यतीत करत होते , परंतु आर्यांनी म्हणजेच सुरांनी त्यांच्यावर हल्ले करून त्यांचा पराभव केला. आर्य किंवा सुर लढवय्ये होते. ते असुर लोकांच्या इतके प्रगत
नव्हते परंतु ते असुरांमध्ये मिसळले. त्यांच्याच लोकांना फितूर करून लबाडीने व फसवणुकीने ज्ञान प्राप्त करून घेतले. आणि त्यांच्यावर राज्य केले.
चार्वाक दर्शनात असे सांगितले आहे की , जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्यावर विश्वास ठेवा. त्यांनी वेदप्रामाण्य नाकारून ईश्वराचे अस्तित्व अमान्य केले. ईश्वर, स्वर्ग, नरक हे कुणीच पाहिले नाही ,म्हणून त्यांनी ते नाकारले आणि प्रत्यक्ष राजालाच देव मानले. अर्थात तेव्हाचे राजे तसे असावेत. म्हणूनच बळीची म्हण अस्तित्वात आली. स्वर्ग, नरक हे खोटे असून यज्ञयागावर त्यांनी कडाडून टीका केली आहे. यज्ञात दिलेले बळी जर स्वर्गात जात असतील तर, आई बापाला यज्ञात टाकून सरळ स्वर्गात का पाठवीत नाहीत ? असा खडा सवाल ते विचारतात. काही झाले तरी , ते देवांचे गुरु होते, त्यामुळे वेद व ईश्वर याबद्द्ल त्यांना अधिक ज्ञान असल्यामुळे काही गोष्टी ते ठणकावून विचारतात. त्यांनी वेदात सांगितल्या प्रमाणे, माणसांमधील असमानतेला नाकारून, समानतेचा पुरस्कार केला आहे. त्यांनी पूर्वजन्म, तसेच पुनर्जन्म नाकारला असून , ह्या पृथ्वीतलावर एकदाच जन्म घेता येतो असे सांगून , त्याचा यथायोग्य उपभोग घेण्यास देखील सांगण्याचे ते विसरले नाहीत. त्यासाठी वेळप्रसंगी कर्ज देखील काढायला ते मोकळीक देतात. कारण कर्ज फेडता येते परंतु झिजलेल्या शरीराला पुन्हा झळाळी प्राप्त होत नाही. असे ते सांगतात. इथे उपभोग म्हणजे व्यभिचार नव्हे, तर योग्य मार्गाने मिळवलेल्या धनाचा सुखासाठी केलेला वापर. बरं,ते धन कमवताना चोरी, लबाडी, फसवणूक, दरोडा, जबरदस्ती असे मार्ग वापरू नका. हे ही ते सांगतात. त्यांनी राजालाही बंधने घालून दिली आहेत. राजा हा प्रजाहितदक्ष असायला पाहिजे. त्यांनी प्रजेची सर्वोतोपरी काळजी घेऊन, त्याचे रक्षण केले पाहिजे. त्याला लोकमान्यता असली पाहिजे.तसेच तो व्यसनी, दुराचारी, व्यभिचारी, जुलमी, अत्याचारी असता कामा नये. सूत्रबद्ध समाजाचा विकास करण्यासाठी, कोणत्याही अदृश्य शक्तींची आवश्यकता नाही . ह्या सर्व गोष्टी वेदांच्या विरोधी होत्या. वेद सांगतात की, सकाळी राजाने ब्राह्मणांचे पाय धुवून, त्याची पूजा करून, त्याच्या सल्ल्याने राज्यकारभार करावा. तसेच त्याला धन, धान्य दान करून समाधानी ठेवावे. ते वेद हे ईश्वरनिर्मित असून स्वर्ग,
नरक, पुनर्जन्म, पाप, पुण्य या गोष्टींवर विश्वास ठेवतात. या व अशा अनेक गोष्टी आहेत की , ज्या चार्वाकानी नाकारल्या. त्यावर घणाघाती टीका केली.
वेदांमध्ये स्त्रीला कुलटा ,व्यभिचारी ठरविली आहे. ह्यावर चार्वाक दर्शनात , ती एकटी व्यभिचारी कशी असू शकते? असा थेट प्रश्न करून तिच्या बरोबर पुरुष असल्याशिवाय ती व्यभिचार करू शकत नाही. मग ती एकटीच दोषी का? तिच्यासह पुरुषाला देखील दोषी समजले पाहिजे .असे ठासून सांगितले आहे. त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला आहे. तसेच चातुर्वर्ण्य, वंशशुद्धी वर देखील घणाघाती टीका करून स्त्रीच्या मानसन्माननाची चर्चा केली आहे.
ज्या काळात वेद हे सार्वभौम , इश्र्वरनिर्मित समजले जात होते ,त्यावेळी चार्वाक दर्शनाने वेद नाकारून एक प्रकारे क्रांती केली व वैदिक संस्कृतीत सर्वश्रेष्ठ मानला गेलेला मोक्ष, हा सर्वश्रेष्ठ नसून, स्वातंत्र्याला श्रेष्ठत्व दिले आहे. यावरून त्यांचे विचार हे काळाच्या कितीतरी पुढे असल्याचे दिसून येते. हे सर्व विचार बुध्द, जैन विचारांशी मिळतेजुळते असल्यासारखे दिसतात.
जय भीम.
अरुण निकम.
9323249487
मुंबई.
दिनांक…30/08/2026.
संदर्भ..चार्वाक दर्शन
लेखक..डॉ. आ. ह.साळुंखे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

