समतेचा उजेड घेऊन निघालेली माणसं..!

अस्पृश्यता विषमता हा या देशाला लागलेला दुर्धर रोग आहे; तर अज्ञान अंधश्रद्धा धर्मांधता या देशाला मिळालेला शाप आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर या देशात संविधान आले. या संविधानात अंधश्रद्धा, अस्पृश्यतेला नकार दिला तर विषमतेला घालवण्यासाठी समता आणली पण संविधान निर्मितीच्या नंतर 75 वर्षानंतरही माणसांच्या मनात जात आहे. जातीची उच्च नीच कल्पना आहे, जातीचा अहंकार आहे, जातीव्यवस्था आहे. जाती व्यवस्थेतून आलेली अस्पृश्यता आजही पूर्णपणे गेलेली नाही. अशा अवस्थेतच 2014 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसत्तर भाजपा सरकार सत्तेत आलं. सत्तेत भाजप असले तरी या सत्तेची सूत्रे नागपूरच्या रेशीम बागेतूनच हलतात हे नाकारण्यात अर्थ नाही त्यामुळे या सरकारला धर्मनिरपेक्षतेची ऍलर्जी आहे. “सर्वधर्मसमभाव” यावर विश्वास नाही. त्यांना ‘समता’ नको समरसता हवी आहे आणि हे सर्व तत्त्व टिकवून ठेवण्यासाठी बहुमतांची सत्ता हवी आहे आणि अनेक वर्षांनी हाती आलेली सत्ता सोडण्याची त्यांची इच्छा नाही त्यामुळेही कोणत्याही परिस्थितीत आलेली सत्ता हातातून जाऊ नये म्हणून ते सदैव दक्ष आहेत आणि या भूमिकेतूनच त्यांनी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याची मानसिक तयारी ठेवली आहे. या भूमिकेतूनच पहिल्यांदा त्यांनी माणसा-माणसात धर्म व इतर घटकांच्या आधारे द्वेष निर्माण करायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा त्यांनी हिंदू-मुस्लिम अशी द्वेष भावना पसरवली, ख्रिश्चन धर्मियांना लक्ष केले, त्यानंतर महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा-ओबीसी असा संघर्ष लावून दिला. त्यानंतर उपवर्गीकरणाच्या आधारावर बौद्ध-मातंग असा वाद निर्माण करून दिला. या सर्व घटकांचा परिणाम म्हणून आजवर भारतीय माणसाने मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेल्या जातीय विषमतेला वाट मिळाली. सरकारच्या भूमिकेमुळे आजवर मनात साठलेलं विष निर्भयपणे बाहेर टाकण्याच धैर्य मिळालं आणि मनात असलेली जात, जातीय द्वेष रस्त्यावर आला. शिकलेली प्राध्यापक, डॉक्टर मंडळी शिवराय, फुले-शाहू- आंबेडकरांचे नाव घेऊन जातीची समर्थक बनली व अप्रत्यक्षरीत्या जात भक्कम करण्याचं काम करू लागले. जातीला ‘समाज’ हे गोंडस नाव देऊन जातीच जातीसाठीच करू लागले आणि जाती समाजाचे नेते म्हणून मिरवू लागले त्याचप्रमाणे हे नेते, विचारवंत, प्रख्यात वक्ते म्हणून मिरवू लागले. व्यासपीठावर महापुरुषांचे नाव घेणारे व्यवहारात जातीच्या दावणीला बसून रवंथ करू लागले. थोडक्यात अप्रत्यक्षरीत्या ही मंडळी जाती, जातीव्यवस्था भक्कम करण्याचे काम करू लागली.
दुसऱ्या बाजूला प्रस्थापित सरकारला अशा बुद्धीहीन बुद्धिवंताची सत्तेत राहण्यासाठी गरज वाटू लागली. सत्तेसाठी मतांची गरज असते ती गरज पूर्ण करण्यासाठी जात्यांध, धर्मांध नेत्यांना जवळ करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर अशा धर्मांधावर हिंदू धर्माच्या रक्षणाची जबाबदारी दिली.
दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धेविरुद्ध लढणारे, रोजगार, बेकारी यावर बोलणारे समतेची भाषा करणारे या विरुद्ध लढणाऱ्यांना देशद्रोही, नक्षलवादी, शहरी नक्षलवादी आणि आता ‘दिमागी नक्षल’ ठरवण्यात आले. सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षतेला कचऱ्याची टोपली दाखवली. याचा परिणाम म्हणून भारतीय समाजातील माणसा-माणसातील सलोखा हरवून गेलेला दिसून येतो. विषमतेच्या अंधारात तसंच चाचपडत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. अशा विषमतेच्या अंधारात समतेचा मूठभर उजेड घेऊन काही माणसं निघणं ही निश्चित महत्त्वाची बाब म्हणावी लागेल. शिक्षणाचा पॅटर्न असलेल्या शहरात डॉ. सुरेश वाघमारे व एड. मंचक डोणे, प्रा. डॉ. कॅप्टन बाळासाहेब गोडबोले यांच्या पुढाकारातून मराठा, धनगर, माळी, मुस्लिम, बौद्ध व मातंग या समाजातील काही उच्चशिक्षित लोकांना एकत्रित करून ‘सम्यक समाज संघ’ नावाचं छोटसं रोपट लावलं. त्यानंतर इंजि. शीलरत्न सूर्यवंशी, वन अधिकारी जी. एस. साबळे, बँक अधिकारी रामकृष्ण धायगुडे, बँक अधिकारी वाघमारे, पोलीस निरीक्षक अरुण तलवार, शिक्षक शेख शफी, विमा अधिकारी श्रीमंत वाघमारे या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी तन मनाने सहकार्य केल्याने तसेच प्राचार्य दुष्यंत कटारे, प्रा. जयद्रथ जाधव, एड. लहू सुरवसे, प्रा. वागलगावे, श्री. विजय जागळे आणि प्रा. डॉ. राहुल डोंबे यासारख्या असंख्य सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे सम्यक समाज संघाचे रोपट आता बळ धरू लागल आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पाच वर्षांपूर्वी हे संघटन करण्यात आलं. या संघटनेद्वारे आज
अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र , राजर्षी शाहू व्याख्यानमाला आणि दलित अत्याचार निवारण समिती या समितीच्या द्वारे संविधान जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन कार्याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे याशिवाय महापुरुषांच्या जाती निर्मूलनाचा विचार, समतेचा विचार लोकात रुजवण्याचे काम ही संघटना करते.
आज देशात दिसणारी लोकशाहीच्या नावाने चालत असलेली हुकूमशाही, धर्मांधता आणि विषमतेने दाटलेल्या अंधारात समतेचा मूठभर उजेड घेऊन निघालेली ही माणसं मला भावली म्हणून यावर लिहिण्याचा मोह मला आवरला नाही.
एड. मंचकराव डोणे
लातूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत


