दिन विशेषदेशदेश-विदेशभीम जयंती २०२६विचारपीठ
हिंदू कोड बिल आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

१४ एप्रिल हा दिवस भारतात च नव्हें तर संपूर्ण जगात एक अद्वितीय दिवस म्हणून गणला जातो. याच दिवशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आणि दलित समाजच नव्हे तर अखंड मानव जातीला माणुसकीचे भान करून देण्याचे काम या महामानवाने केले. भारतात केवळ दलित उद्धारक,घटनेचे शिल्पकार असे म्हणणारे लोक आहेत परंतु डाॅ. आंबेडकर हे जगप्रसिद्ध किर्ती चे सर्वज्ञ विद्वान होते म्हणूनच त्यांचा जन्म दिवस जगातील किमान दोनशे तरी देश साजरा करतात. असे म्हणावे लागते. कारण भारतीय समाज हा वर्णव्यवस्था,जातीय व्यवस्था यात बरबटलेला असल्यामुळे प्रत्येक मजल्यावर राहणारा समाज व त्या समाजात असणाऱ्यां अठरापगड जाती या जेथे, ज्या वर्गात आहेत तेथेच राहू शकतात हे हिंदू संस्कृतीने सांगून दिलेले होते.म्हणजे कोणी कसे जगायचे, कशी कामे करायची, कोणी कोठे रहायचे.त्यामुळे कोणाला ही मरेपर्यंत ते मजले बदलता येत नाहीत. यामुळे शुद्रातीशुद्रांना अवर्ण,अस्पृश्य, दलित शेड्युल कास्ट अशा चष्म्यातून पाहिले जाते. तो आर्थिक प्रगती करू शकतो पण ती करत असतांना ही काही मर्यादा राहिलेल्या आहेत. त्यामुळे भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर ही तो समाज उपेक्षित म्हणूनच गावकुसात तरी आज ही जगतांना दिसतो आहे. त्याच्याकडे उत्पन्नाची तुटपुंजी साधने ती ही नसल्यासारखीच होती. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उच्चविद्याविभूषित होते परंतु जातीव्यवस्थेच्या अगदी खालच्या शेवटच्या मजल्यावर राहत असणाऱ्यां जातीत जन्माला आलेले असल्यामुळे वरील जवळ जवळ चार मजल्यावरून झिरपून मिळाले तरच वाट्याला येण्याची स्थिती त्यांच्या वाटेवर आलेली होती. त्या समाजाला उदरनिर्वाहा ची पुरेशी साधने नव्हती हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जवळून पहात होते. त्यांचे मूळ गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे, की जे मंडणगड पासून पाच ते सात मैलावर आहे. वडील रामजी मालोजी सपकाळ यांनी बालपणापासून डोंगर उतारातील गावांची दशा पाहेलेली असल्याने ब्रिटिश भारतीय लष्करात सेवेत गेल्यानंतर .लष्करात सैनिकी शिक्षक, मुख्याध्यापक अशा पदापर्यंत त्यांनी काम केले. या काळात त्यांना ज्या ज्या ठिकाणी बदली होईल त्या त्या ठिकाणी जावे लागले आणि त्यामुळे या भीमाचा जन्म १८९१ साली मध्यप्रदेशातील महू या ठिकाणी झाला. आपल्या बालपणापासून जातियतेचे चटके याच भारतीय भूमित जन्माला येऊन सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा हक्क च जणूकाही इथल्या हिंदू संस्कृतीने हिरावून घेतलेला आहे हे पदोपदी त्यांना जाणवत होते. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या मंडळीनी मनुस्मृति मधील नियमानुसार जगून इथली स्त्री, मग ती कोणत्याही मजल्यावरील असो तीला पुरूष जी वागणूक देईल त्याप्रमाणेच तीने जगायचे तीला कोणत्याही प्रकारचा ह्क्क नव्हता. बालवयातच लग्ने व्हायची व जरा चांगली समज, कळतापणा येतोय न येतोय तोच आपल्या सासरच्या घरी येऊन चूल मूल या दोनच गोष्टीत गुरफटून जायचे पुरूषाच्या बरोबरीने नव्हे तर दासी सारखे जगायचे. तीला शिक्षणाचा, संपत्ती कमवायचा किंवा पतीच्या उत्पन्नातील हक्क नसायचा. घरातील पडेल ती कामे तीनेच करायची घरातील सर्वांना हवे ते पोहोच करायचे, स्वयंपाक बनवायचा सर्वांना जेवायला घालायचे. सर्वजण जेवल्यानंतर तीने जेवायचे.जेवणानंतर झाडलोट, भांडीकुंडी, स्वच्छता, सर्वांची अंथरूणे टाकायची आणि शेवटी जिथे आपली जागा असेल तिथे जाऊन झोपायचे आणि पुन्हा सकाळी पहाटे उठून पुन्हा कामात जुंपून जायचे. अशी व्यवस्था तत्कालीन समाज व्यवस्थेत होती.स्त्री ला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते.घराचा उंबरठा ओलांडून बाहेर येण्याची अजिबात परवानगी नव्हती. कोणी पाहुणे, मित्र मंडळी घरी आली तरी दरवाजाच्या आडून त्यांना बोलावे लागत असत. तर दलित अस्पृश्य वर्गाची तर खूपच वाईट अवस्था होती. मोकळा श्वास मिळत नव्हता. म्हणजे एकूणच हिंदू समाजातील स्त्री व दलित यांचे होणारे शोषण डाॅ.बाबासाहेब जवळून पहात होते अनुभवत होते.
सवर्ण आणि दलित या दोन्ही समाजामध्ये ज्यांचे शोषण होत राहिले त्या अखिल स्त्री जातीच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिल संहितेच्या माध्यमाने केला. कुठेतरी माणूस म्हणून तीला जगण्याचा हक्क मिळावा म्हणून ते झुंजत राहिलेले दिसतात.महात्मा फुलेंच्या चळवळीमध्ये बहुजन समाजातील स्त्रियाबरोबर ब्राम्हण समाजातील विधवांना ही आधार मिळाला होता.त्यातच फुलेंनी सावित्रीबाई फुलें च्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचे केलेले प्रयोग ही त्यांनी अभ्यासलेले होते.१९०७ साली ते मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला तेव्हा रमाबाई ०९ वर्षाच्या होत्या.१९१२ मध्ये ते पदवीधर झाले तर २ फेब्रुवारी १९१३ ला रामजी बाबांना न्यूमोनिया झाला त्यातच त्यांचे निधन झाले. डाॅ.आंबेडकर सारखे शिक्षणासाठी परदेशी जायचे त्यामुळे रमाबाई यांना खूप कष्ट सोसावे लागले . डाॅ.बाबासाहेब विचार करत असत. मानवी समाजात स्त्री आणि पुरुष हे दोघे संसाररूपी रथाला ओढणारे असतात पण स्त्रियांना गुलामासारखी वागणूक मिळत असते. हे पाहूनच त्यांचे मन उद्विग्न व्हायचे.पुरूषाला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य होते. सर्व प्रकारच्या सवलती पुरूषांना व सर्व प्रकारची बंधने पाळण्याची जबाबदारी स्रियांवर टाकण्यात आलेली होती.पुरूषांना एक पत्नी विवाह हा एकच प्रकार संस्कार या कल्पनेशी सुसंगत आहे पण विविध कारणे देऊन पुरूषांना अनेक विवाह करण्याची परवानगी देण्यात आलेली होती. स्त्रीला मात्र पुरूषांच्या मृत्यूनंतर ही दुसरा विवाह करण्याची परवानगी नव्हती.तर दलितांना सांगील ते काम करून बहिरे मुके म्हणून जगावे लागत होते. म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी१९२० साली "मूक नायक "हे वार्तापत्र सुरू करून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केलेली होती.आंबेडकर यांचे परदेशी प्रवास सुरू झाले की घरची सर्वस्वी जबाबदारी रामू वरती असायची १९२१ ला त्यांनी "रूपयाचा प्रश्न" या विषयावर संशोधन करून लंडन विद्यापीठाची एम.एस्सी ही पदवी संपादन केली आणि १९२२ ला इंग्लंड मध्ये ते बॅरिस्टर ही झाले. अमेरिकेत असतांना त्यांनी कोलंबिया विद्यापीठाकडे भारताच्या प्रांतिक शासनाच्या अर्थ व्यवहारा संबंधी एक प्रबंध सादर केला होता. आक्टोंबर १९२३ ला त्यांचा प्रबंध मान्य होऊन कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डी.एस्सी. ही सर्वोच्च पदवी बहाल केलेली होती. अर्थात च अशा पदव्या संपन्न करत असतांना एक प्रकारे त्यांचा सर्वांग अभ्यासच सुरू झालेला होता. पुढे २० जुलै १९२४ ला त्यांनी "बहिष्कृत हितकारिनी सभा" या संस्थेची स्थापना करून भारतीय समाजात स्त्री आणि दलित हे कसे बहिष्कृत आहेत म्हणून त्यांनी रात्रींच्या शाळा आणि वाचनालये सुरू केली.पुढे मूक नायक बंद पडल्यावर त्यांनी "बहिष्कृतभारत" हे पाक्षिक सुरू केले होते. अशाप्रकारे त्यांचा हा सामाजिक अभ्यास पाहून सरकारने त्यांना १९२७ मध्ये मुंबई विधिमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले होते.२० मार्च १९२७ ला महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. १९२६ ते १९३४ या काळात सरकार ने बाँबे काॅन्स्टीट्युंअट असेम्बली वर नेमले.पुरूषाप्रमाणे स्त्रियांनाही संघटित आणि जागृत केले पाहिजे असे त्यांना वाटत होते. म्हणून १९४२ मध्ये नागपूर येथे 'दि.शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना करून दलित स्त्रियांचा मेळावा ही भरविला होता. त्यात त्यांनी सांगीतले होते आपण दुर्गुणापासून दूर रहा, तुम्ही मोठेपणा मिळवू शकाल. न्यूनत्वाची भावना काढून टाका, मुलांना शिक्षण द्या, लग्न करण्यास घाई करू नका. मुलींनी नवर्याशी मित्रत्वाने आणि बरोबरीच्या नात्यांने वागावे, त्याची दासी होऊ नये. जर तुम्ही या उपदेशाप्रमाणे वागलात तर तुम्हाला सन्मान आणि वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. १९३७ साली त्यांनी "स्वतंत्र मजूर पक्ष" उभारला.
पुढे २ जुलै १९४२ मध्ये व्हाईसरॉय यांच्या कार्यकारी मंडळात भारतीय सभासद घेण्याचे ठरविले व बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती गवर्नर जनरल च्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिल वर झाली. त्यांच्याकडे मजूर खाते सोपविले आणि २ जुलै १९४२ ला महिला समाजाने मुंबई दादर ला राजगृह या ठिकाणी त्यांचा सत्कार केला. पुढे १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले याच काळात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विधी शास्त्रातील प्रचंड विद्वत्ता व १९२८ ला त्यांनी गवर्नमेंट लाॅ काॅलेज मध्ये प्राध्यापक म्हणून व १९३५ ला ते त्याच काॅलेज मध्ये प्राचार्य म्हणून ही कार्य केलेले होते. यामुळे पुढे नेहरूंच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे कायदामंत्री म्हणून जबाबदारी आलेली होती. याच संधीच्या माध्यमातून स्त्री आणि दलित विकास यांच्यासाठी काही तरी केले तरच देशाच्या विकासात या शक्तींची ही भर पडेल असे त्यांना वाटत होते. कारण या दोन्हीं घटकांचे भारतीय समाजात आतोनात शोषण होत होते, केले जात होते. दलित म्हणून त्यांना ही अनेक बाबींना सामोरे जावे लागत होते. याच भूमीत जन्माला येऊन कुत्र्यां मांजरापेक्षा हीन जीवन जगावे लागत होते हे ते अनुभवत होते.पुढे स्टॅफोर्ड क्रीपस् यांनी भारतीयांना राज्यघटना बनविण्यासाठी एक घटना समिती व हंगामी मंत्रीमंडळ बनविण्याचा निर्णय घेतला पण काँग्रेस ने या मंडळात ते कसे येणार नाहीत हे पाहिले होते. पण जे नियतीने ठरविले होते ते घडणार च होते. बंगालच्या विधान सभेत डाॅ.आंबेडकरांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन पक्षाचा जोगेंद्र नाथ मंडल हा एकमेव आमदार होता. याशिवाय २५ दलित आमदार काँग्रेस कडून निवडून आलेले होते. ४ दलित आमदार अपक्ष होते, बरेच आमदार मुस्लिम लीग चे होते. आमदार जोगेंद्र नाथ मंडल यांनी त्या सर्व आमदारांना एकत्रित आणून मुस्लिम लीग चे सहाय्य घेऊन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पहिल्या फेरीतच निवडून आणले. शरदचंद्र बोस हे पराभूत झाले. विरोध असतांनाही डाॅ.आंबेडकर हे बंगालच्या खुलना मतदारसंघातून विधानसभेतून घटना समितीवर निवडून आलेच. शेवटी घटना समितीतील डाॅ.आंबेडकर यांचे,शिक्षण अनुभव, कार्य, मजूर मंत्री, कायदामंत्री, दलित उद्धार कार्य हे सर्व लक्षात घेता त्यांच्या उच्च प्रतीच्या कार्याला मुकू नयेत म्हणून भारत पाकिस्तान विभाजनानंतर त्यांचा मतदारसंघ भारतात न राहिल्यामुळे ते घटना समितीत कसे येतील हे वाटू लागलेले होते. नंतर मुंबई प्रांतातून निवडून आलेले जयकरांनी राजीनामा दिल्यांने एक जागा रिकामी होती या जागेवर श्री.ग.वा.मालवणकर उर्फ दादासाहेब हे काँग्रेस मधून इच्छुक होते. पण सरदार वल्लभभाई पटेल व डाॅ.राजेंद्र प्रसाद यांच्या आदेशामुळे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना बिनविरोध निवडून आणून घटना समितीत घेतले गेले. म्हणजे काँग्रेस च्या लक्षात आले होते डाॅ.आंबेडकर हे घटना समितीत हवेत. ते उच्च दर्जाचे घटनातज्ज्ञ होते. यातूनच सात सदस्यीय घटना मसूदा समितीच्या अध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आलेली होती. ही निवड ही काहीना रूचली नव्हती त्यांना वाटत होते. डाॅ.आंबेडकर हे गांधीचे कट्टर विरोधक असतांना असे कसे झाले. पण पटेलांनी त्या सर्वांना सांगीतले "या कार्यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सापडणे शक्य नाही, आम्ही सर्वश्रेष्ठ व्यक्तीची निवड केली आहे.खरे म्हणजे एवढी मोठी जबाबदारी येईल असे डाॅ. आंबेडकर यांना वाटले नव्हते पण नियतीने त्यांचे कार्य पाहून योग्यच न्याय दिला होता हेच म्हणावे लागते. (१)अल्लादी कृष्ण स्वामी आय्यर, २)एन.गोपाल स्वामी ३)अय्यंगार,के.एम.मुंशी, ४)सय्यदमोहम्मद सादुल्ला, ५)बी.एल. मित्तल, ६)डी.पी.खेतान आणि मसूदा समितीत सल्लागार म्हणून बी.एन.राव) पुढे घटनासमितीचा अधिकांश भार तब्येत स्वास्थ्य चांगले नसतांना ही १८-१८ तास बसून डाॅ.आंबेडकर यांनी ते काम पूर्ण केले.३९५ कलमे,२२ भाग आणि १२ अनुसूचित भाग अशी भारतीय राज्यघटना तयार केली. व २६ नोव्हेंबर १९४९ ला ती सोपविण्यात आली आणि २६ जानेवारी १९५० पासून ती लागू करण्यात आली. की जी जगात अप्रतिम अशी राज्यघटना तयार करण्यात आलेली होती. कारण इथे डाॅ.आंबेडकरांना केवळ दलित घटक समोर ठेवून काम करायचे नव्हते तर संपूर्ण देश, इथे राहणारे सर्व जाती धर्मांचे पंथाचे त्यांच्या भौगोलिकता त्यांच्या चालीरीती, रूढी, परंपरा या सर्वांना समोर ठेवून सर्वसमावेशक घटना तयार करण्याची ही मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. ती पाहूनच अनेकांनी त्या वेळी स्तुती सुमने ही उधळलेली होती. डाॅ.आंबेडकर त्यावेळी म्हणाले होते "संविधान किती ही चांगले निर्दोष असले तरी ही हे संविधान अंमलात आणणारे नालायक व निरूपयोगी असतील तर तेच वाईट ठरेल. तसेच संविधान किती ही वाईट असले तरी राबविणारे चांगले असतील तर ते चांगले वाटेल."
घटनातज्ज्ञ डाॅ.आंबेडकर स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असतांना स्त्री पुरूष समानता प्रस्थापित करण्यासाठी १९३७ ला स्वातंत्र्य पूर्व काळापासून हिंदू स्त्रियांची नाकेबंदी, शोषण लक्षात घेऊन पित्याच्या मालमत्तेत हक्क, विवाह विषयक कायद्यात दुरूस्ती, पोटगी याबाबत विधेयके मांडली होती पण जीर्ण मतवादी लोकांचा प्रखर विरोध होत रहायचा. शेवटी त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले व ९ एप्रिल १९४८ रोजी सभागृहासमोर चर्चेसाठी सादर केले, त्याच्यावर १९ डिसेंबर १९४९ च्या हिवाळी अधिवेशनात एक दिवस चर्चा करण्यात आली .पण १९५० मध्ये यावर अजिबात चर्चा झालीच नाही. पुरूषी अहंकारांनी बरबटलेले अधिकतर सदस्य असल्याने व मनुवादी धारणेने हे बिल कुजत पाडण्याचाच प्रयत्न चालू होता. श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणायचे इथे हिंदू धर्माचे मोठ मोठे शास्त्री असतांना सुद्धा डाॅ.आंबेडकरांनी हे हिंदू कोड बिल कसे तयार केले.? कोणाला विचारात न घेता हिंदू स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हिंदू कोड बिलाला विरोध च होत राहिला. हे कार्य यशस्वी होत नव्हते. नेहरूंचा पाठिंबा होता पण निवडणूका समोर ठेवून त्यांनी ही विरोध केला.डाॅ.राजेंद्र प्रसाद यांची ही तीच भूमिका समोर आल्यांने डाॅ.आंबेडकर नाराज झाले मंत्री असून ही हे शक्य होत नाही म्हणून शेवटी त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला.त्यावेळी पं नेहरू म्हणाले "आपण थोडा, धीर धरावयास हवे होते".पण त्यांचा राजीनामा म्हणजे एका मंत्र्यांचे मंत्रिमंडळाविरूद्ध बंड होय आणि हे बंड नेहरू यांना फारच हानिकारक होणार आहे.अशी बातमी अमेरिकेच्या 'न्यूयॉर्क हेराल्ड ट्रिब्यून' मधून प्रकाशित झाली, 'टाईम्स ऑफ इंडिया' मधून ही बातमी आली की "भारताच्या मंत्रिमंडळात बुद्धिमतेचा प्रकाश झोत टाकणाऱ्या व्यक्ती फारशा नाहीत आणि अशा परिस्थितीत डाॅ.आंबेडकरासारख्या स्वयंप्रकाशित पंडिताला मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले." पुढे एक स्त्री समिती शांतिदेव चिटणीस यांनी, अखिल भारतीय महिला संघाचे आमरण उपोषण सुरू केले. यामुळे शांतीदूत पं नेहरूंनी शेवटी काही गोष्टींना मंजूरी दिली .भारतीय समाजात पुरूष किती ही विवाह करू शकत होते. पण स्त्री विधवा, घटस्फोटित झाली तरी तीला विवाह करण्याचा अधिकार नव्हता. बायकोला पुरूष टाकून देत होता. पुरूष विधूर झाला तरी लवकरात लवकर दूसरा विवाह होत असे, स्त्री ला पोटगीच नव्हे तर वडिलोपार्जित हिस्यात ही अधिकार नव्हता. तीने फक्त रहायचे एवढेच. त्यामुळेच याच्यावर विचार करूनच डाॅ.आंबेडकर तीला कसा न्याय देता येईल व स्त्री- पुरूषात कशी समानता हक्क आणता येतील या विचारात होते. म्हणून तर हिंदू कोड बिल मांडून त्यातून तीला हक्क कसे प्रस्थापित होतील हे पहात होते .मात्र हे घडत नाही तीला आपण कायदा मंत्री असून सुद्धा न्याय देऊ शकत नाही अशा कारणांमुळेच शेवटी त्यांनी राजीनामा दिलेला होता. ते गेल्यानंतर या कार्यास गती येत गेली म्हणून तर आज स्त्रियांना पुरुषांबरोबर चे हक्क प्रस्थापित झालेले दिसतात. आज ती कोणत्याही क्षेत्रात कार्यरत आहे देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळात, वेगवेळ्या ठिकाणी स्वाभिमानाने अधिकार पदे,अध्यक्ष पदे भूषवितांना दिसत आहेत हे मात्र खरे. याच्या पाठीमागे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग आहे हे विसरता कामा नये.त्यांचे स्वास्थ्य ठीक नसायचे यातूनच डाॅ.सविता कबीर यांच्याशी त्यांनी १९४८ ला विवाह केला होता. केवळ त्यांची सेवा करण्याची संधी डाॅ.या नात्याने मिळते आहे म्हणून च सविता कबीर उर्फ नंतर डाॅ.सविता आंबेडकर उर्फ माई या शेवट पर्यंत शेवटी त्यांच्या सोबत राहिल्या पण डाॅ.आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानानंतर भारतीय समाजातील स्त्री प्रमाणे त्यांना ही उपेक्षित जीवनाला सामोरे जायला लागलेले दिसते. भारतीय समाजातील हिंदू धर्मात राहून दलित अस्पृश्य वर्गांना होत असलेल्या हाल अपेष्टा, त्यांच्याबाबतीत अन्यायिकता पाहूनच त्यांनी १४ आक्टोंबर १९५६ ला बौद्ध धर्मातील वैज्ञानिकता, प्रज्ञा, शील, करूणा अहिंसा या तत्वांना समोर ठेवून नागपूर या ठिकाणी आपल्या लाखो अनुयायासह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.सहायक ग्रंथ : १) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीमती डाॅ.सविता (माईसाहेब)आंबेडकर अनेकांच्या शब्दात-संजिवनी. शा.मुजुमदार
२) महाराष्ट्रातील आंबेडकर चळवळीचा इतिहास (ई.सन.१८९१ ते १९९४) डाॅ.अनिल सिंगारे, डाॅ.विठ्ठल घुले
प्रा.डाॅ.दिलीपकुमार कसबे, कराडसंपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

