राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर भीम जयंती साजरी होत आहे.- अशोक सवाई

(भीम जयंती) आज १४ एप्रिल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस. याच दिवशी म्हणजे १४ एप्रिल १८९१ रोजी माता भीमाबाई व सुभेदार रामजी मालोजीराव सकपाळ यांनी भारतातील मध्य प्रदेशात इंदौर शहरा जवळील एका महू गावात अशा एका नररत्नाला जन्म दिला की, त्यांच्या विचाराने साऱ्या जगाला भारावून टाकले. भारत सरकारने सन १९९० ला या नररत्नाला मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. धन्य ती माता भीमाई अन् धन्य ते रामजी बाबा.
१४ एप्रिल हा दिवस देशात सर्वात मोठा सण उत्सव मानला जातो. मानला जातो काय आहेच. आडमुठ्या विचारांचे काही मूठभर लोक सोडले तर या उत्सवात देशातील सारे लोक न्हाऊन निघतात. या निमित्ताने देशातील बहुतेक मान्यवर लेखक मंडळी या विषयावर लिहितात किंवा लिहित राहतील. त्यांनी लिहायला ही पाहिजे डॉ. बाबासाहेबांचे विचार भारतीय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचायला पाहिजे. जे लिहित नाहीत त्यांनी लिहते झाले पाहिजे. जे बोलत नाहीत त्यांनी बोलते झाले पाहिजे. सुरवातीला जमणार नाही अडचणी येतील. पण एकदा का लेखणी संहिता व वाणी संहिता कळली की प्रयत्न करणाऱ्यांना यात नक्कीच गती प्राप्त होईल. जेवढे जास्त लिहाल/बोलाल तेवढा बाबांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होईल. आणि तो झालाही पाहिजे.
भारतात १४ एप्रिल हा उत्सव साजरा होत असताना साऱ्या आया माया त्यांचे चिलेपिले, चिल्यापिल्यांचे बाबा त्या बाबांचे बाबा आई यांच्या उत्साहाला पारावर उरत नाही. कारण या सर्वांच्या म्हणजेच भारताच्या बाबांचा जयंती उत्सव असतो. साऱ्या देशभर रोषणाई असते. वाद्य संगीताचा गजर असतो. कारण या दिवशी भीम जयंती असते. या दिवशी बाबांचे कित्येक कोटींचे विचारधन विकले जाते. या दिवशीच नव्हे तर एप्रिल महिना संपेपर्यंत व्याख्यते/व्याख्याता आपल्या व्याख्यान मालेतून भारतीय समाजात बाबासाहेबांचे विचार पेरत राहतात. भारताच्या कानाकोपऱ्यात त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. ‘जयभीम’ या जयघोषात अशी काही अद्भुत शक्ती आहे की, साऱ्या भारतीयांना एक प्रकारचे स्फुरण चढते. साऱ्या देशभर चैतन्यमय वातावरण निर्माण होते. आणि याच शक्तीमुळे व बाबांच्या संविधानामुळे आज सारा भारतीय समाज अखंडित आहे. असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
१४ एप्रिलचा उत्सव आता फक्त राष्ट्रीय उत्सव राहिला नसून तो जागतिक स्तरावरील उत्सव झाला आहे. जे परिघाच्या बाहेरचे राष्ट्र आहेत ते आता या उत्सवात हळूहळू सामिल होते आहेत. आज अमेरिका, इंग्लंड, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, फ्रान्स अशा प्रगत देशात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होतोच शिवाय व्हिएतनाम, थायलंड, म्यानमार, दक्षिण आफ्रिकेतील छोट्या छोट्या देशात तसेच इस्लामी आखाती देशात देखील डॉ. बी. आर. आंबेडकर जयंती साजरी होते. एकंदरीत पाहिले तर जगातील १५० च्या वर देशात भीम जयंती उत्सव साजरा केला जातो. एवढेच नव्हे तर संयुक्त राष्ट्र संघाच्या (UNO = Uniited Nation organization) कार्यालयात सुध्दा बाबासाहेबांचा जन्म दिवस मोठ्या थाटात साजरा केला जातो. वरील कित्येक देशांच्या ग्रंथ संग्रहालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान ठेवले आहे. त्यांचे लिखित संविधान, व इतर ग्रंथ त्यांच्या देशाच्या भाषेत भाषांतरित करून त्यांच्या वाचनालयात ठेवले आहेत. खास करून The Problem of Rupees (रूपयांची समस्या) हा ग्रंथ. कित्येक देशात बाबांच्या प्रतिमा/मुर्त्या आहेत. जगात सर्वात जास्त पुतळे असतील तर ते आहेत बाबासाहेबांचे. जगातील देशाच्या युनिव्हर्सिटीत, माध्यमिक,
प्राथमिक शाळेत बाबासाहेबांना शिकवले जाते. जेव्हा वरील देश बाबांची जयंती साजरी करतात तेव्हा त्यामागे त्यांचा कोणता ना कोणता उद्देश असतो. कुणी हा दिवस समानता दिवस तर कुणी ज्ञान दिवस पाळतात. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेबांच्या मुर्तीच्या चबुतऱ्यावर कोरून ठेवले गेले. The symbol of knowledge (ज्ञानाचे प्रतीक) अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा तेव्हा म्हणाले होते की, ‘जर डॉ. बी, आर. आंबेडकर आमच्या देशात जन्मले असते तर आम्ही त्यांच्या नावाला सूर्याचे नाव दिले असते’. अमेरिके सारख्या महाशक्तीच्ता एका राष्ट्राध्यक्षाचे हे उद्गार आहेत साहेब… हा बाबासाहेबांचा उच्च कोटीतील सन्मान आहे. त्यासोबतच आपल्या देशाचा सुद्धा. महाशक्तीच्ता राष्ट्राध्यक्षांनी जगातील कोणत्याही नेत्याला व भारतातील कोणत्याही दुसऱ्या नेत्याला एवढा उच्चतम दर्जाचा सन्मान दिला नसेल जो बाबासाहेबांना दिला. डॉ बाबासाहेबांच्या नावाला सूर्याचे नाव देणे अमेरिकेला शक्य झाले नसले तरी अमेरिकेच्या नासा NASA = National Aironotics & Space Administration (नॅशनल एरोनॉटिक्स & स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) या संस्थेने आकाशातील सूर्या जवळील एका तेजस्वी ताऱ्याला डॉ. बी. आर. आंबेडकर असे नाव दिले आहे. आकाशात जोपर्यंत तो तारा चमकत राहिल तोपर्यंत साऱ्या जगभर बाबांचे नाव व त्यांचे विचार चमकत राहतील यात शंका नाही. यावरून विचार करा वाचक हो…. बाहेरच्या जगातील देश बाबासाहेबांच्या विचारांना किती महत्त्व देतात हे आमच्या भारतीयांनी मनात कोरून ठेवले पाहिजे. जगातील कित्येक देशात तेथील संस्थांना/शाळांना, ग्रंथालयांना डॉ. बी. आर. आंबेडकर असे नाव देण्यात आले आहे. बौद्ध राष्ट्रें तर बाबासाहेबांना बोधिसत्व मानतात. त्यांच्या राष्ट्रीय वैचारिक मंचावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतल्या शिवाय त्यांचे वैचारिक मंथन पूर्ण होत नाही.
आपला देश इंग्रजांच्या गुलामीत होता. डॉ. बी. आर. आंबेडकर आपल्या गुलाम देशाचे एक नागरिक आहेत म्हणून इंग्रज किंवा त्यांच्या देशाने बाबासाहेबांना संकुचित दृष्टीने कधीही पाहिले नाही. उलट ते त्यांना एक महान अर्थ तज्ञाच्या रूपात पहात होते, आजही त्यांना त्याच दृष्टीने पाहतात व आपल्या देशासाठी त्यांच्या विचारांचा उपयोग करून घेतात. म्हणूनच त्यांच्या विद्यापीठात बाबासाहेबांना शिकवले जाते. त्यांच्याच नाही तर जगातील बहुतेक विद्यापीठात बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनातील अनेक विषय शिकवले जातात. हा जागतिक इतिहास बाबांनी घडवला आहे. बाबासाहेब जेव्हा इंग्लंडला शिक्षणासाठी गेले होते तेव्हा तेथे ते ज्या घरात रहात होते ते घर आता महाराष्ट्र सरकारने विकत घेतले आहे. इंग्लंडच्या सरकारने सहिष्णुता दाखवून त्या घराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला आहे. आपले भारतीय लोक जेव्हा इंग्लंडला जातात तेव्हा त्या स्मारकाला आवर्जून भेट देतात. डॉ. बाबासाहेब तेव्हाच्या अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावेत या मागणीसाठी ते तीन वेळा (१९३०/१९३१/१९३२) गोलमेज परिषदेत उपस्थित होते. तेव्हा त्यांच्या तर्कशुद्ध भाषणाने व बुद्धीमत्तेने परिषदेचे इंग्रज अध्यक्ष खूप प्रभावित झाले होते. त्यांच्याजवळ बाबासाहेबांच्या मागण्या मंजूर करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. हे लक्षात घेतले पाहिजे.
जगातील तरुणाई मोठ्या प्रमाणात बाबांच्या विचारांकडे वळली आहे/वळत आहे. त्यांना त्यांच्या विचारांचे आकर्षण वाटते आहे. बाबासाहेबांच्या जीवन संघर्षावर शोध निबंध लिहून डॉक्टरेट मिळवत आहेत. कित्येकांनी मिळवलेली आहे. अभ्यास करत आहेत. त्यासाठी अभ्यासक भारत दौऱ्यावर येतात. बाबासाहेब डी. बी. लॅपल कोट (डबल ब्रेस्ट लॅपल कोट) व डोक्यावर इंग्लिश हॅट असा सूटाबूटातील पेहराव करून ते जेंव्हा पाश्चिमात्य देशांमध्ये जात असत तेव्हा त्यांचे व्यक्तीमत्व तिथल्या सरकारला व नागरिकांना बाबासाहेब त्यांच्याच देशातील नागरिक असल्यासारखे वाटत असत. आजही इंग्लंड, अमेरिका यांच्या संग्रहालयात, ग्रंथालयात, विद्यापीठात इंग्लिश वेशभूषेतील बाबांचे छायाचित्रे आहेत. म्हणूनच तिथली तरुणाई त्यांच्या व्यक्तीमत्वाकडे आकर्षित होत असावी. बाबासाहेबांच्या विचारांमुळे सारे जग प्रभावित होत आहे. याच कारणांमुळे जग भारताकडे सन्मानिय दृष्टीने पहात आले/पहात आहे. भारत सरकारने तो त्याचा दृष्टीकोन अबाधित ठेवला पाहिजे. म्हणूनच कुणीतरी म्हटलेले आहे की, २१ वे शतक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे असेल. वरील सर्व कारणांमुळे बाबांना कदाचित विश्वरत्न म्हटले जात असावे. तळटीप: १) बाबासाहेबांनी जेव्हा म्हणजे ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक नावाचे पाक्षिक वार्तापत्र सुरू केले होते तेव्हा त्याच प्रिंटिंग प्रेस मध्ये बाबासाहेबांचे चरित्र लेखक चां. भ. खैरमोडे (चांगदेव भवानराव खैरमोडे) व त्यांचे मित्र बाबासाहेबांना, बाबासाहेब व माता रमाबाईंना रमाई म्हणू लागले. मग हळूहळू वक्ते सुद्धा आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणू लागले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील जनता बाबांना बाबासाहेब म्हणू लागली. असे होता होता बाबा आपल्या संपूर्ण देशाचे बाबासाहेब झाले व माता रमाबाई रमाई झाल्या… आज मोहन भागवत सुद्धा बाबांना बाबासाहेबच म्हणतात निदान त्यांच्या सार्वजनिक मंचावरून तरी. हा आहे बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा महिमा. जगासाठी बाबा डॉ. बी. आर. आंबेडकर आहेत परंतु आपल्यासाठी मात्र ते परमपूज्य बाबासाहेबच आहेत. आणि सदैव राहतील.
२) नागपूरच्या कामठी या उपनगरात बाबू हरदास एल. एन. (हरदास लक्ष्मण नगराळे) हे मागास वर्गातील गृहस्थ बाबासाहेबांच्या विचाराने व त्यांच्या सामाजिक कार्याने प्रेरित होऊन ते त्यावेळच्या अस्पृश्य लोकांसाठी काम करत होते. असेच एकदा बाबू हरदास यांच्या समोर दोन मुस्लिम व्यक्ती ‘सलाम वालेकू… वालेकू सलाम’ असे एकमेकांना अभिवादन करताना दिसले. त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन बाबू हरदास यांनी समोरच्याला ‘जयभीम’ म्हणावे व समोरच्याने जयभीम ला ‘बोल बलभीम’ असा प्रतिसाद द्यावा.
असे ते लोकांना प्रेरित करू लागले. पुढे बोल बलभीम मागे पडू लागले व जयभीमला प्रतिसाद जयभीमनेच येऊ लागला. हळूहळू जयभीम चा नारा देशभर पसरला. व देशातून पुढे हा नारा जगभर गेला. दक्षिण भारतीय निर्मिता, दिग्दर्शक व कलाकार यांनी ‘जयभीम’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. पाश्चिमात्य देशांत सुद्धा बाबासाहेबांंवर चित्रपट निघण्याच्य तयारीत आहे. आज १४ एप्रिलला म्हणजे बाबांच्या जन्म दिवसी जगभर ‘जयभीम’ चा नारा घुमतो आहे.
परमपित्याला नतमस्तक होऊन आमचे अभिवादन!
– अशोक सवाई.
91 5617 0699
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

