महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

मनुस्मृती : भामट्या नटाच्या अक्कलखाती

ज्ञानेश महाराव
( ज्येष्ठ पत्रकार- संपादक)

सामाजिक विषमतेचे आणि जातीभेदाचे संस्कार “मनुस्मृती”तून होत असल्याने, तो ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाहीरपणे जाळला. “तो वाचला असता, तर जाळला नसता,” असे शरद पोंक्षे सारखा “नाटकी नथुराम”च बोलू शकतो.

साप खातानाचा मोर ज्यांनी पाहिलाय, ते मोराच्या सौंदर्याचं कौतुक कधीच करणार नाही. त्याचप्रमाणे ज्यांना शतकानुशतकाच्या जातीय अस्पृश्यतेची आणि स्त्रियांच्या शोषणाची कारणं ठाऊक आहेत, ते “मनुस्मृती”चे समर्थन कधीच करणार नाहीत. हेच योग्य वर्तन असताना, “नथुराम”च्या नाटकी भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला नट- शरद पोंक्षे, अलीकडेच ‘सोशल मीडिया’तून प्रसारित झालेल्या भाषणात म्हणतो, “ज्यांनी मनुस्मृती जाळली; ती त्यांनी वाचली असती, तर जाळली नसती.” ह्यात त्याने कुणाचे नाव घेतले नसले तरी त्याचा रोख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिशेनेच होता.

   डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह झाला. ह्या तळ्यातील पाणी गुरं-ढोरं, कुत्री- मांजरं डुबक्या मारून पिऊ शकत होती. परंतु, त्या पाण्यास स्पर्श करण्यास वर्णव्यवस्थेनुसार शूद्र-अस्पृश्य ठरवलेल्यांना बंदी होती. ही बंदी तोडण्यासाठी डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या सहकारी- अनुयायांनी अनेक अडथळे पार पाडले. त्यानंतरच चवदार तळे सर्वांसाठी खुले झाले. अशाच प्रकारे नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली  २ मार्च १९३० रोजी झाला. हा लढा  दलितांना देवखुळे बनविण्यासाठी नव्हता. देवाधर्माच्या नावानं मागास ठरवलेल्या जातीतील लोकांना असमानतेची वागणूक देताना, कशाप्रकारे अपमानित केलं जातं, त्याचं जाहीर प्रदर्शन डॉ. आंबेडकर यांनी वरील दोन्ही लढ्यांमधून घडवलं होतं. ह्या दोन ऐतिहासिक लढ्यांच्या दरम्यान, २५ डिसेंबर १९२७ रोजी "मनुस्मृती दहन"ची ऐतिहासिक घटना महाड येथे घडली.

‌‌ महाडचा चवदार तळे सत्याग्रह यशस्वी झाल्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी महाड येथेच “विषमतेवर आधारित सामाजिक व्यवस्थेचा निषेध” करण्यासाठी २४,२५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी “महाड सत्याग्रह परिषद”चे आयोजन केले होते. त्यात त्यांनी वर्णव्यवस्थेच्या आधारे जातिभेद आणि सामाजिक विषमतेची मांडणी करणाऱ्या “मनुस्मृती” दहनाचा कार्यक्रम जाहीर केला होता. परिषदेत तसा ठराव डॉ. आंबेडकरांचे “ब्राह्मण सहकारी” बापूसाहेब तथा गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे यांनी मांडला. त्याला दलित नेते पा. ना. राजभोज यांनी पाठिंबा दिला. हा ठराव हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांनी आवाजी मताने मंजूर केला. त्यानंतर, २५ डिसेंबर १९२७ रोजी रात्री ९ वाजता परिषदेच्या मंडपासमोर तयार करण्यात आलेल्या खड्डयात डॉ. आंबेडकरांनी “मनुस्मृती” जाळली. ह्या दहन कार्यक्रमात गंगाधर सहस्रबुद्धे, सीताराम शिवतरकर यांच्यासह अनेक “सवर्ण”देखील सहभागी होते.
ज्या ग्रंथाने नाकारले होते,
शिवरायांना छत्रपतींचे आसन।
त्याच भूमीत जाळले
भीमरायाने मनुस्मृतीचे शासन॥
अशी कित्येक शतकांची गुलामी नाकारणारी ही ऐतिहासिक घटना रायगडाच्या पायथ्याशी घडली होती.

 ही "मनुस्मृतीची होळी" सहजासहजी झाली नव्हती. ह्याही कार्यक्रमाने सनातनींचे कारभारी अस्वस्थ झाले. त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. राजर्षी शाहूमहाराजांचे समाज परिवर्तनाच्या चळवळीतील साथीदार आणि सनातनी ब्राह्मण धर्माचे कठोर टीकाकार बॅरिस्टर भास्करराव जाधव यांनाही "मनुस्मृतीचे दहन" हे कठोर कृत्य वाटले होते. "मनुस्मृतीतील सर्वच तरतुदी एकसारख्या अन्यायकारक नाहीत," असे त्यांचे म्हणणे होते. ते खरेही आहे.

  "मनुस्मृती" हा १२ अध्यायांचा आणि २,६८३ श्लोकांचा हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे. हा ग्रंथ लिहिणारे "मनु" नावाचे कुणी ऋषी- महर्षी होते की नाही, ह्याची खात्री देण्यासाठी शंकराचार्यांनी तोंड उघडले तरी ते तोंडावर आपटतील. कारण ती पुराणातली ("वांगी" नाही-) वानगी म्हणजे कथा आहे. शतपथ ब्राह्मण, मत्स्यपुराण, भागवत पुराण ह्या ग्रंथात मनु आणि त्याच्या माशाची कथा येते. (त्याचा तपशील रंजक आहे.  लेख-विस्तार भयास्तव इथे देत नाही.) असो. "मनुस्मृती"चा कर्ता मनु हा इसवी सनानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातील असावा. असे संशोधक मानतात. "मनुस्मृती"च्या १२ अध्यायांत पुढील विषयांचा समावेश आहे.

१)ब्रह्मदेवाची उत्पत्ती, स्वर्ग, भूमी आदींची उत्पत्ती.
२) धर्माचे सामान्य लक्षण.
३) गृहस्थाश्रम, विवाह प्रकार, नित्यश्राद्ध, आतिथ्य.
४)संतोष प्रशंसा, अनध्याय, स्वाध्याय.
५)भक्ष्य-अभक्ष्य निर्णय, स्त्री धर्म, पातिव्रत्य, अशुभ विचार
६) वानप्रस्थ, अतिथिचर्या, ध्यानयोग.
७)राजधर्म, राजप्रशंसा, दंडप्रशंसा, राजकृत्ये.
८)व्यवहार, साक्षीदार, १७ प्रकारचे दान.
९) स्त्री रक्षण, स्त्री स्वभाव, अपराधांसाठी दंड.
१०) वर्णसंकर, व्रात्य, दस्यू (गुलाम वा दासीपुत्र), चांडाळ, प्रायश्चित्त.
११) स्नातकाचे (उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी) प्रकार , सोमयागाचे अधिकारी, पंचमहापातके.
१२) शुभ- अशुभ कर्म, मानस कर्मे , त्रिविध शारीर कर्मे.
ह्यात भास्करराव जाधव सांगतात, तशी सुवचने आहेत. उदाहरणार्थ, “मनुस्मृती”च्या दुसऱ्या अध्यायातील २३९ व्या श्लोकात म्हटले आहे –
विषादप्यामृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम्।
अमित्रादपि सद्‌वृत्तममेध्यादपि काञ्चनम्॥
अर्थात, “विषातील अमृत घ्यावे. चांगला विचार एखाद्या लहान मुलाने मांडला तरी त्याच्याकडूनसुद्धा तो घ्यावा. शत्रू असला तरी त्याच्यातील चांगल्या गोष्टी स्वीकाराव्या. अगदी घाणीत असलेली सुवर्णसुद्धा स्वीकारावी!”
आणखी काही उदाहरणे –
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।
यत्रैतास्‌ तु न पूज्यन्ते सर्वास्‌ तत्राफलाः क्रियाः॥ (३.५६)
अर्थात, “जेथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात. जेथे अशी पूजा होत नाही, तेथे सर्व धर्मक्रिया विफल होतात.”

चक्रिनो दशमिष्ठस्य रोगिनो भारिनः स्त्रियः।
स्नातकस्यच राज्ञश्च पन्था देयो वरस्यच॥ (२.१३८).
वाहनावर आरूढ झालेल्याने (चक्रिनः) रस्त्यावरून चालणाऱ्या पुढील व्यक्तींना म्हणजे, ९० ते १०० वर्षांचा वृद्ध (दशमिन्‌), रोगी, स्त्री, ओझे वाहणारा (भारिन्‌), विद्वान (स्नातक) व राजा (राज्ञः) यांना याच क्रमाने अग्रक्रम द्यावा.

  आणखी काही सुवचने आहेत.  तथापि, ही सुवचने "शेणातले शेंगदाणे" ठरावीत, अशी भरपूर कुवचने "मनुस्मृती"मध्ये आहेत. त्यातील काही नमुने -

१) सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरुषांस दूषित करणे, हा स्त्रियांचा स्वभावच आहे. म्हणून ज्ञानी पुरुष स्त्रियांबाबत कधी बेसावध राहात नाहीत.” (अध्याय २: श्लोक १३)
२)माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरुषाने एकांतात बसू नये.” (२:१५)
३) ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील, त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत. (३:८)
४) भाऊ नसलेल्या स्त्रीशी शहाण्याने विवाह करू नये. (३:११)
५)पिता, पती, पुत्र यांच्यापासून वेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस बदनाम करते. (५: ४९)
६)पती रागावलेला असला तरी स्त्रीने प्रसन्न मुद्रेने, गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत. (५:१५०)
७)लग्नात वधूचे दान केले जाते. त्यामुळे आपण पतीच्या मालकीची वस्तू आहोत, हे पत्नीने कायम ध्यानात ठेवावे. (५:१५२)
८)पती सदाचारशून्य असो; तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो; विद्येने तो गुणशून्य असो; तो कसाही असला तरी पत्नीने त्याची कायम देवाप्रमाणे सेवा करावी. (५:१५४)
९)पतीची सेवा, हेच पत्नीचे व्रत आणि तोच तिचा यज्ञ! पतीच्या आज्ञेत राहाणे, हाच तिचा स्वर्ग ! (५:१५५)
१०)स्त्रियांनी पहिला पती वारला तरी दुसरा नवरा करू नये. (५: १६२)
११)पहिली पत्नी वारली तर, तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे. (५:१६८)
१२) स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह यांच्याद्वारे जी आपल्या पतीची कायम सेवा करते, तिलाच स्वर्ग प्राप्ती होते. (५:१६६)
१३) पिता, पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या अधीन (कंट्रोलमध्ये) ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास, त्यास आपल्या वश करून घ्यावे. (६: २)
१४) विवाहाच्या पूर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने स्त्रीचे रक्षण करावे. कारण, स्त्री स्वातंत्र्यास पात्र/योग्य नाही. (६/३)
१५) पुरुष किती वयाचा आहे? तो सुरूप की कुरूप आहे? ह्याचा विचार स्त्री करीत नाही. तो कसाही असला तरी तो पुरुष आहे, एव्हढ्याच कारणाने स्त्री त्याचा भोग घेते. (९: १४)
१६) पुरुषाला पाहाताच संभोगाविषयी अभिलाषा उत्पन्न होणे, हा स्त्रीचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावतः स्नेहशून्य असतात. (९:१५)
१७)व्यभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे.” (९: १९)
१८)नवऱ्याने बायको सोडली किंवा विकली, तरी त्याची त्या बायकोवरची मालकी कायम राहते. (९:४६)
१९) स्त्रियांना वेदांचा- स्मृतींचा – धर्माचा अधिकार नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतात. (९:१८)

  अशाच प्रकारची "तुच्छता तरतूद" वर्णव्यवस्थेने अस्पृश्य ठरवलेल्या शूद्र लोकांसाठी "मनुस्मृती"मध्ये आहे.

१) शूद्रांस उष्टे अन्न व जीर्ण वस्त्रे द्यावीत. त्याला मेहनताना म्हणून धान्याचा कोंडा व जुने अंथरूण पांघरूण द्यावे. (१०: १२५)
२) धनार्जन करण्यास समर्थ असलेल्या शूद्राने माता-पिता व कुटुंबाच्या गरजेपुरताच आणि पंचयज्ञ करण्यास लागणाऱ्या द्रव्यापुरताच धनसंचय करावा. अधिक धनसंचय करू नये. असा धनसंचय झाला की, शूद्र ब्राह्मणास पीडा देऊ लागतो. (१० : १२९)
३) शूद्राने वरिष्ठ तीन वर्णांच्या स्त्रीशी व्यभिचार केल्यास, त्याचे लिंगविच्छेदन करून, त्याची सर्व मालमत्ता जप्त करावी. हा अपराध सदर स्त्री त्याच्या संरक्षणाखाली ठेवली असताना घडला असेल, तर त्याला प्राणदंड द्यावा. ब्राह्मण स्त्रीशी शूद्राने संभोग केल्यास – मग तो खुशीचा असो वा नाखुशीचा – त्याला प्राणदंड द्यावा. (८:३६६)
३) ब्राह्मणाने ब्राह्मण स्त्रीवर बलात्कार केल्यास, त्याला हजार (नाणी) आणि व्यभिचार केल्यास पाचशे नाणी दंड. (८:३७८)
४) ब्राह्मणाने असंरक्षित क्षत्रिय वा वैश्य वा शूद्र स्त्रीशी संभोग केल्यास त्याला पाचशे नाणी दंड. (३:३८५)
५) शूद्र ब्राह्मणाला अपशब्द बोलला तर त्याला शारीरिक दंड. जीभ छाटणे. (८:२७०)
६) क्षत्रिय वा वैश्य ब्राह्मणास अपशब्द बोलल्यास अनुक्रमे १०० व १५० नाणी दंड. (८:२६७)
७) ब्राह्मण शूद्राला अपशब्द बोलला तर त्याला फक्त १२ नाणी दंड किंवा फक्त समज. (८:२६८)

  ह्या वर्णवर्चस्ववादी विसंगतीचा समाचार घेताना "प्रबोधन"कार के.सी. ठाकरे म्हणतात, "मनुस्मृती हे राष्ट्राचा जीव  घेणारे जालीम विष आहे. ते वरून शर्करागुंठित असल्याने कोणीही ते निमूटपणे गिळतो. ब्राह्मणांनी ते ब्राह्मणेतरांना  मनुस्मृती पुराणादी काढ्यांची सप्तके आस्ते-आस्ते

पाजून-पाजून त्यांना पूर्ण निर्विद्य अथवा बौद्धिक गुलाम बनवले आणि आपल्या वर्चस्वाचे टोलेजंग मनोरे सर्व हिंदुस्थानात उभारले!”

 "मनुस्मृती"चा असाच मर्मभेद महात्मा जोतिराव फुले यांनीही घेतला होता. त्यांनी आपल्या "गुलामगिरी" (प्रकाशन: १८७३) ह्या ग्रंथांतून मनुस्मृतीतील ब्राह्मणी वर्चस्व आणि जातीव्यवस्थेच्या कठोर शब्दांत चिंधड्या उडवल्या आहेत. "शूद्र, अतिशूद्र आणि महिलांना गुलामगिरीत ठेवणारा मनुस्मृती हा ग्रंथ जाळा," असे आवाहनही महात्मा फुले यांनी केले होते. त्याची पूर्ती महात्मा फुले यांना आपले वैचारिक मार्गदर्शक मानणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी केली.

  "मनुस्मृती दहन" झाल्यावर "स्वराज्य" नियतकालिकाच्या संपादकाने डॉ.आंबेडकर यांना पत्र पाठवले. त्यात संपादकांनी शरद पोंक्षे सारखाच मुद्दा उपस्थित करून आपल्या बावळटपणाचे प्रदर्शन घडवले होते. ज्यांनी केवळ ग्रंथासाठी घर बांधले; शेकडो छोट्या-मोठ्या पुस्तकांचे लेखन केले, अशा डॉ. आंबेडकरांच्या बाबतीत "ग्रंथवाचनाचा मुद्दा" उपस्थित करणे, हेच मुळी मूर्खपणाचे होते. त्या पत्राला उलट टपाली उत्तर देताना डॉ. आंबेडकर लिहितात, "आम्ही मनुस्मृतीचे वाचन केले आहे. त्यावरून आमची खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी, कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढवणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून, असमतेची धुळवड मात्र घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्त्व प्रस्थापित करण्यास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही. तो ग्रंथ अस्पृश्य वर्गासही मान्य नाही. एवढेच दर्शवण्याकरिता महाड येथे मनुस्मृतीची होळी करण्यात आली." (वाचा : रिडल्स इन हिंदुइझम : खंड ४, पृष्ठ १५८)

  'मनुस्मृती' जाळण्यामागे केवळ ग्रंथ जाळणे, एवढाच मर्यादित उद्देश डॉ. आंबेडकरांचा नव्हता. तर, त्या ग्रंथाच्या होळीच्या माध्यमातून लोकांच्या मनात रुतलेले उच्च-नीच जातिभेदाचे संस्कार त्यांना नष्ट करायचे होते. सामाजिक विषमता जोपासणारी सडकी मानसिकता त्यांना जाळायची होती. तसे झाले आणि सहजासहजी होणारही नाही;  ह्याचा अंदाज डॉ. आंबेडकरांना असल्यामुळेच त्यांनी "मनुस्मृती"चे विषारी आणि संसर्गजन्य रोपटे समूळ उपटण्यासाठी २६ जानेवारी १९५० पासून अमलात आलेले "भारतीय संविधान" लिहिताना समतावादी, मानवतावादी संवैधानिक शासन- प्रशासनाचा आग्रह धरला. त्याद्वारे त्यांनी देशाची एकता, अखंडता आणि एकात्मता मजबूत करण्याचे महान कार्य केले. संविधानाची ही ताकद "मनुस्मृती"वाद्यांना सलते; म्हणूनच ते "मनुस्मृती" समर्थनाची गरळ अधूनमधून टाकतात. असाच खोडसाळपणा सात-आठ वर्षांपूर्वी "दंगलखोर" संभाजी भिडे ह्याने केला होता. त्यावेळी त्याने "ज्ञानोबा- तुकोबा यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ आहे," अशी कळ काढून, लोकांचे भरपूर शिव्या- शाप खाल्ले होते. तशीच वेळ ह्यावेळी "मनुवादी" शरद पोंक्षेवर आली. त्याने आपल्या वक्तव्याबद्दल क्षमा याचना केली. पण त्यात कपटी उद्दामपणा होता. "माझ्या बोलण्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यांनी मला क्षमा करावी!" म्हणजे चुकीची कबुली देणार नाही आणि माफी मागण्याची तर गरजच नाही! नाटकी "नथुराम" आणि शरद पोंक्षे एकजीव झाले असल्याची ही साक्ष आहे. त्याने आपल्यातला "नथुरामी खोटेपणा" क्षमा याचनेतही दाखवलाय. तो म्हणतो, "डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिताना मनुस्मृतीचा आधार घेतला." हे साफ झूठ आहे. बाबासाहेबांनी "संविधान" लिहितानाच राखरांगोळी केलेल्या "मनुस्मृती"ला मूठमाती दिली होती. आचार्य अत्रे आज असते, तर म्हणाले असते, "असा भामटा नट दहा हजार वर्षांत झाला नाही. हरामखोर, पदरची वाक्य टाकतो!'

ज्ञानेश महाराव

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!