देशदेश-विदेशमुख्यपान

युद्ध एक चिंतन..

आपण पहात आलो आहोत रामायण, महाभारत काळापासून म्हणजेच मानवी उत्पत्ती नंतर ही भांडणे(युद्धे, लढाया )सुरू झालेली आहेत. मी मोठा की तू मोठा यामधून स्पर्धा सुरू होते स्पर्धेतून नितीमत्ता सोडून लोक अनीतीच्या मार्गाने पुढे सरकायला लागतात खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे. प्रत्येकाने स्पर्धेत जरूर उतरावे सत् सत् विवेक मार्गाने केवळ जिंकण्यासाठी. इतरांना हरविण्यासाठी नव्हे, तरच स्पर्धा चांगली होऊ शकते जिंकल्यानंतर आनंद ही होऊ शकतो. लढाई जरूर करावी पण न्यायासाठी, सर्वांच्या हक्कासाठी. पण काही वेळा लढण्याची वेगळीच कारणे समोर येताना दिसतात तिथे ही खरी कारणे समोर येतीलच असे नाही. जगाला युद्ध दिसते लोकांना नुकसान दिसते. प्रत्येकाला वाटते माझ्यापेक्षा कोणी वरचढ असता कामा नये. जर कोणी वरचढ दिसलाच तर याची त्याची मदत घेऊन नको तिकडे हस्तांदोलने, गळाभेटी, जवळचे संबंध वाढवून आपल्या शेजार्यापेक्षा आपण कसे मोठे दिसू असे प्रयत्न लोकांचे देशांचे चालू असतात आहेत. जरी एका आईची लेकरे असली तरी पंख फुटल्यावर आकाशी भरारी घेतांना दिसतात. आपला पाठचा, म्होरचा भाऊ ही हळू हळू दिसायचा बंद होतो आणि तटस्थपणा वाढतो हे मात्र खरे, प्रत्येक जण सवता सुभा मांडू लागतो.तसे पाहिले तर मुहम्मद घोरी अफगाणिस्तान च्या घोर प्रांतातील त्यानेच मुस्लिम वंशाचा पाया घातला (११४९-१२२६) दिल्लीचे सशक्त राजा पृथ्वीराज चौहान यांच्या शब्दभेदी बाणाने मारले गेले म्हणतात.तर असेही आहे की ११९२ च्या तराइन च्या युद्धात पृथ्वीराज चौहान, घोरी ला सापडले ते कन्नोज चा राजा जयचंद यांच्यामुळेच असे म्हणतात.पण पुढे ते ही घोरी कडूनच ११९४ च्या युद्धात धारातीर्थी पडले. घोरी ने पृथ्वीराज यांना गझनी ला नेले तेथेच त्यांचा शेवट झाला. इतिहास तसा दुजोरा देत नाही.मुगल साम्राज्याचा संस्थापक जहिरूद्दीन मोहम्मद बाबर चा काळ (१४८३-१५३०) १५०५,१५१९आणि शेवटी १५२६ ला पानीपत च्या युद्धात इब्राहिम लोदी चा पराभव करून मुगल साम्राज्याचा पाया घातला.खरे म्हणजे इब्राहिम लोदी च्या राज्यात पंजाबचा गवर्नर म्हणून दौलत खान होता परंतु इब्राहिम लोदी कडून त्याला अनेक वेळा अपमानित व्हावे लागल्याने एक प्रकारे त्यानेच बाबर ला आमंत्रित केले होते व लोदीची सत्ता उलटवली. पुढे हे साम्राज्य बाबर ने सांभाळले. नंतर हुमायूं,अकबर,जहाँगीर,शहाजहाँ, औरंगजेब व शेवटी बहादूर शाह जफर असे मुगल साम्राज्य होय. सर्वसाधारण १४९० पासून ते १६३६ पर्यंत विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाहींचा काळ पहायला मिळतो.पुढे १६०८च्या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापार करायला आली पण पुढचा कारभार १८५८ पासून ब्रिटिश सरकारकडे गेला.छत्रपती शिवाजीमहाराजांनी (१६३० ते १६८०) या काळात आठरा पगड जातीतील मावळे उभे करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्य उभे केले. सामान्यांच्या रक्षणासाठी त्यांनी सर्व शक्ती उभी केली होती.

भारतात रामायण, महाभारत यामधील युद्धे समोर येतात. कैकयी ला आयोध्या चे राज्य आपल्या मुलाला भरत ला द्यायचे होते. जरी कौसल्या, कैकयी आणि सुमित्रा राजा दशरथाच्या तीन राणी होत्या. पण दोन नंबरची राणी कैकयी ने ती मागणी केली होती. नियमाप्रमाणे रामचंद्र थोरले होते त्यांचा हक्क होता. पण आई कैकयी ला त्यांनी नाराज केले नाही. त्यांनी कैकयी च्या वर मागणी प्रमाणे स्वत: चौदा वर्षाचा वनवास भोगणे पत्करले व निघून गेले. पुढे वनवास,रावणाची बहीण शूर्पणखाचे नाक कापणे यातून पुढे राम -रावण युद्ध. महाभारत मध्ये पांडुची पाच मुले युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव तर पांडुचा भाऊ धृतराष्ट्र ची शंभर मुले कौरव दुर्योधन, दुशासन म्हणजे कौरव-पांडव यांच्यात पांडु च्या मुलाना नकोच म्हणून शकूनी मामाच्या सहाय्याने दूत खेळात हरवून स्वत:च्या वहिनी ला द्रौपदी हरलेल्या पांडवांच्याकडून शेवटची संपत्ती म्हणून पणाला लावून तिथे ही जिंकल्यानंतर तीला भरल्या दरबारात ओढत आणून वस्त्रहरण करण्यापर्यंत मजल गेली. म्हणजेच त्यांची अर्थात भावांच्या संपत्तीवर आपला ह्क्क आहे ची मजल होवून पुढे कौरव पांडवात युद्ध झाले. छोटे छोटे अन्य राजे युद्धात उतरले शेवटी पांडव जिंकले पण हाती काहीच राहिले नव्हते विजय मिळवून काहीच फायदा नव्हता. भीष्मांनी कौरवांना साथ दिलेली होती. गुरू द्रोणाचार्य ही त्याच बाजूने लढले होते. या गोष्टींचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की मानव आणि युद्ध यांचा अतूट संबंध आहे. जवळचेच एकमेकांच्या विरोधात लढतांना दिसतात. लढले आहेत. मुस्लिम राजवटीच्या काळात धर्मावरून युद्धे होत नव्हती तर साम्राज्यवाद, स्वत:चे साम्राज्य वाढवायचे. विरोधक, दुश्मन, शत्रू असू नये असे विचार असायचे. सिकंदर जग जिंकण्याचा विचार करून आला होता. शेवटी हात चोळत निघून गेला. जग फार मोठे आहे व आपण फार लहान आहोत .जग जिंकणे शक्य नाही. मौर्य वंशीय राजा, सम्राट अशोक यांनी अनंग पद्मनाभन यांच्याशी कलिंग(आधुनिक ओडिशा) चे युद्ध केले त्यात जवळ जवळ अडीच लाख लोक मृत्युमुखी पडले चक्रवर्ती सम्राटअशोक जिंकले. पण झाले काय तर सम्राट अशोक चे हृदय परिवर्तन झाले त्यांना पश्चाताप झाला.त्यांनी जवळून रक्तपात पाहिला त्यामुळे अतिव दु:ख झाले, करूण भाव जागृत झाला आणि त्यांनी, ज्यांनी जगाला विश्वशांतीचा संदेश दिला त्या गौतम बुद्धांच्या धम्म विचारांना अनुसरून शस्त्रे खाली ठेवली.बुद्धांच्या धम्म विचाराचा प्रचार प्रसार करू लागले. म्हणजे युद्धातून हाती काय लागले तर मृत्युमुखी पडलेले लोक. जर लोकांच्या कला गुणांना, वैज्ञानिक दृष्टी चा विकसित होण्याची संधी दिली तर सोने पे सुहागा. क्षणिक राग माणासाला टोकाला घेऊन जातो .परंतु जीवन हे क्षणभंगुर आहे आज आहे उद्या नाही.पण किती आशा करावी. आजपर्यंत ही युद्धे झाली पण मिळाले काय तर क्षणिक आनंद आणि पश्चाताप फुलांच्या झाडावर कळ्या उमलल्यानंतर फुले आणि ते झाड ही अति छान सुंदर दिसते. पण फुले गळून पडल्यावर सर्वच कसे विरान दिसते. लोक असतील तर जग अति सुंदर दिसते पण तेच नाहीसे झाल्यावर कसे सुनसान भयावह वाटू लागते.

जगात पहिले विश्व युद्ध हे १९१४ च्या काळात सुरू झाले ते जवळ जवळ चार ते सवाचार वर्षे सुरू राहिले त्यात एका बाजूला मित्र राष्ट्रे ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया तर हळू हळू इटली,अमेरिका व दुसर्‍या बाजूला केंद्रीय शक्ती जर्मनी, ऑस्ट्रिया आणि हंगेरी. बल्गेरिया युद्धाचे कारण होते ऑस्ट्रियाच्या आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनंड यांची झालेली हत्या.यातूनच हे सुरू झाले आणि नंतर आपले मित्र व्यापारिक संबंध यातूनच युरोपियन राष्ट्रातील अन्य शेजारील राष्ट्रे सामिल होत गेली यातून काय मिळाले काहीतरी नुकसान ठरलेलेच असते. प्रत्येक जण आपल्या क्षमते प्रमाणे लढत असतो. देश छोटा की मोठा हे न पाहता लढत राहतात शेवटी कोणीतरी कमी पडू लागल्यानंतर अंतर्गत वाटाघाटी सुरू होतात जसे सध्या सुरू असलेल्या अमेरिका इजराइल-इराण युद्धात ट्रम्प तात्यांची झालेली द्विधा अवस्था. देश किती ही मोठा असला तरी देशातील नागरिक हे शंभर टक्के अध्यक्ष, पंतप्रधान यांच्या पाठीशी असतात असे नाही दबक्या आवाजात काहींना ते नको ही असते. पहिल्या महायुद्धात शेवटी केंद्रीय शक्तींचा पराभाव झाला .म्हणजे लढायचे नुकसान होऊ लागले की पूर्ण विराम देण्याच्या दृष्टीने वाटचाल करायची. नंतर मनात राग खदखदत राहतो बदल्याची भावना बळावत राहते. किंवा हरलेल्या देशात जिंकलेले देश आपल्या मताची सरकारे आणतात व आपला जास्तीत जास्त अधिकार त्या देशावर ठेवतात.तर पुढे १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले एका बाजूला जर्मनी, जपान(साम्राज्यवादी) आणि इटली (फॅसिस्ट) होते.जर्मन नाझी चे अडाल्फ हिटलर हे म्होरक्या राहिले. तर दुसर्‍या बाजूला ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन,अमेरिका यातून हाती काहीच नाही ६ ते ८ कोटी लोग मारले गेले .मित्र राष्ट्रे जिंकली. याला ही फारसे जिंकले म्हणता येत नाही. अमेरिकेने अनुबाँब चा वापर केला जपानची दोन शहरे बेचीराख झाली आणि यातूनच युद्धाला पूर्णविराम मिळाला. हे युद्ध जवळ जवळ सहा वर्षे चालले भारताला ही ब्रिटिश सरकारच्या सोबत रहावे लागले आणि पुढे १९४७ ला ते भारतातून निघून गेले पण शेजारील चीन ने १९६५ मध्ये कुरघोडी केली. तसेच जो आपल्यातूनच पाकिस्तान म्हणून स्वातंत्र्य मिळविलेला १९७१पासून काश्मीर ला समोर ठेवून अधून मधून कुरघोड्या करतोय थांबतोय. यामध्ये काही परकीय शक्ती छुप्या पद्धतीने त्यांना सहकार्य करत राहतात. वरून तुम्हाला वाटते विश्वशक्ती आमच्या सोबत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी दोन शेजार्यात भांडणे सुरू झाल्यानंतर अजूबाजूचे लोक छुप्या आवाजात दोघांनाही एकमेकाच्या विरोधात भडकवून सोडत असतात. यासाठी जनतेचे हित लक्षात घेऊन दोघांनी सावध राहून आपला विकास साधला पाहिजे. युद्धांच्या, भांडणांच्या मुळाशी जाऊन विचार केला तर आर्थिक देवाण घेवाण, व्यापार, कच्या मालाचा अधिक पुरवठा, एकाला देणे एकाला न देणे, कोणी कोणाच्या अति जवळ जाणे, एखादा मोठा होत असेल नवीन रिसर्च झाले असतील.कोणी आपला धर्म श्रेष्ठ आहे असेच म्हणून लढत असतो. अंतर्गत वाद. जसे दुसर्‍या महायुद्धात अनुबाँब ची दहशत घेतली. आता यापेक्षा मोठी शक्ती कशात आहे तर ती आहे युरेनियम परमाणु हत्यारे. जो कोणी याबाबतीत मोठा होण्याचा प्रयत्न करेल त्याच्या विरोधात शांततेच्या नावाखाली त्याला कमकुवत करत राहणे त्याच्याविरुद्ध सरळ सरळ लढणे, व्यापारिक बंधणे लादून आपल्यापेक्षा कोणालाही मोठे होऊ न देण्याचा प्रयत्न करणे. इजराइल-हमास लढाई, यातून कितीतरी निरपराध लोक मरतात निर्जीव वस्तु सारखे.युद्ध छेडणारे सुरक्षित बंकर मध्ये, प्रसंगी डमी वापरून एकाधिकार शाही नांदवत असतात. युक्रेन-रशिया ही असेच चालू आहे युद्ध कोणी ही पाठीमागे सरकत नाही झेलेन्स्की आणि पुतीन. माघार कोणी घेत नाही. नुकसान होत आहे पण त्याच्यावर कोणी फार बोलत नाही. स्वत:सुरक्षित. मरेनात का मरणारे होऊ दे काय नुकसान जे व्हायचे ते छुप्या पद्धतीने यात छोट्यांना कोणीतरी शस्त्रे विकून पैसा मिळविण्याचे काम चालू असते. म्हणजे कोणाचे युद्ध कोणाचा व्यापार हे जगात चालू असते.

युद्धातून शेवट काय तर घरे, मोठ्या इमारती, कारखाने, उद्योगधंदे यांचे आतोनात नुकसान, निरपराधी लोकांची जीवित हानी, महागाई, बेकारी, करोडो रूपयांचे आर्थिक नुकसान, डेटासेंटर, अमेझाॅन, पेट्रोल, डिझेल साठवणूक सेंटर, सैन्य तळ अशावर लक्ष्य केंद्रित करून अचूक मारा करणे की जेणेकरून कसे कमकुवत होईल हे पाहिले जाते.त्यामुळे सदर देशातच नव्हे जगात त्या वस्तुंचा तुटवडा. अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर, शेतीचा कस कमी होणे , लढणाऱ्यांचे नुकसान तर आहेच पण न लढणाऱ्या शेजार्यांना वाहतुकीवर परिणाम अडचणी, जीवनावश्यक वस्तूंचा अपुरवठा, गॅस, पेट्रोल अन्य कच्च्या मालाचा पुरवठा थांबणे त्यामुळे कारखाने उद्योगधंदे बंद होणे रोजगार न मिळणे. प्रामुख्याने आयात-निर्यात थांबणे यातून शेती मालाचे प्रचंड नुकसान फळे, भाजीपाला लोकांना न पोहचणे,साठेबाजी ला उत आले की महागाई वाढणे, सरकार जनतेला अन्य कारणे सांगून महागाईचे समर्थन करू लागते. पर्यावरण, खनिज,जंगली दुर्मिळ वनस्पती ,प्राणी, जलचर जीव ,मासे,यांचे नुकसान. हवाई प्रदूषण यामुळे जिवंत असणारांना जगण्याचा ,व जगात जन्माला येणाऱ्यांना ही धोका निर्माण होतो.कोणतीही गोष्ट उभी करण्यास खूप कष्ट घ्यावे लागतात,शेकडो वर्षे, प्रचंड पैसा खर्च करावा लागतो पण विनाश करावयास खूप वेळ लागत नाही .म्हणजेच अत्याधिक नुकसान होते. जग जिंकण्याची, आपल्या कवेत घेण्याचे स्वप्न सहजासहजी साकार करता येत नाही व होत ही नाही.युद्धात आपल्या जवळच्या मित्र देशांनी भाग न घेतल्याने, सहायता न केल्याचा मनात राग राहणे या गोष्टी वाढतात. जग फार मोठे आहे व आपण फार छोटे आहोत हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.एकमेकाशिवाय आपला विकास शक्य नाही. आपण आपल्या गरजा भागवू शकत नाही यासाठी स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत.पुढे राज्यकर्त्यांच्या नावाने वाद सुरू होतात, मग उपसमार अशा गोष्टीना सामोरे जावे लागते.मनात नसतांना ही काही देशांना प्रसंगी युद्धात उतरावे लागते . निमित्त कोणीतरी होते . कोणाचा तरी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू होतो. अर्थात चारी बाजूने घुसमटून जातो. यासाठी केवळ महासत्तेच्या वल्गना करणे योग्य नसते तर जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत जास्तीत जास्त कसे स्वावलंबी होता येईल हे पाहिले पाहिजे. तरूण पिढी च्या हाताचा,बुद्धीचा योग्य वापर करून त्यांच्या गरजा आपल्या पातळीवर पूर्ण करून र्आर्थिक व वैज्ञानिक प्रगती बरोबर देशांच्या चौफेर सीमांच्या रक्षणासाठी योग्य शस्त्र साठा हवाई, जल,व जमिनीवरील लढाईत कसे अग्रेसर राहता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. व ते साध्य करावयास हवे.सध्या अमेरिका इजराइल-इराण या युद्धात एका बाजूला एकटाच इराण आहे. जर दोन बड्या शक्ती एकत्र येऊन हल्ला करू लागल्या तर निश्चितच एकट्याचे बळ हे कमी पडू शकते. आणि यातून मिळालेला विजय हा फार मोठा असू शकत नाही. मात्र यातून इराण ला धाडसीच देश म्हणावा लागेल. एकटा असून झुंझतोय माघार घ्यायला तयार नाही महिना होऊन गेला. यातून तिघांचेही नुकसान होणार हे मात्र सत्य व इतरांची मुस्कटदाबी होत राहणार.

प्रा. डॉ. दिलीपकुमार कसबे
कराड

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!