पोरकटपणा सोडा… डॉ. बाबासाहेबांची मिरवणूक एकच काढा !
१४ एप्रिल… हा दिवस केवळ जयंती नाही तर तो विचारांचा, स्वाभिमानाचा आणि एकतेचा जागर आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रेरणेने सुरुवातीच्या काळात जयंती सर्व समाज एकोप्याने साजरी होत होती. १४ एप्रिलपासून सप्ताह पाळून विविध गुणदर्शनाचे, समाजप्रबोधनाचे कार्यक्रम व्हायचे आणि सप्ताहाच्या शेवटी शहरात डॉ. बाबासाहेबांचे तैलचित्र, फोटो घेऊन भव्य मिरवणुकीने सांगता व्हायची.एकच मिरवणूक, एकच विचार, एकच भावना होती.
६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली आणि अवघ्या एका वर्षातच त्यात फूट पडली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड गट आणि बापू चंद्रसेन कांबळे (बी. सी. कांबळे) गट असे दोन प्रवाह तयार झाले. सोलापूर शहरातही त्याचे पडसाद उमटले आणि जयंती सुद्धा दोन गटांत विभागली गेली.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड गटाचे नेतृत्व डी. व्ही. फडतरे, बी. वाय. सरवदे गुरुजी, भाऊसाहेब नागटिळक, आर. एस. रणशृंगारे, भीमराव तळभंडारे, इराप्पा इंगळे, सुभद्राबाई उटगी, ऐदाळे बाई, तुळसे वकील, भीमराव सरवदे गुरुजी, केरू रामचंद्र जाधव, लक्ष्मण आबुटे इत्यादी नेते करत होते; तर बी. सी. कांबळे गटाचे नेतृत्व सि. गुं. सोनकांबळे, दि. नी. माने, तुकाराम जावळे (सावंत), एल. टी. सोनवणे, रामभाऊ ताकपेरे, बसप्पा रामा कांबळे, लोकप्पा दोडयानूर, मारुती कांबळे, ए. टी. दावणे, खोब्रागडे गटाचे सुभनजी बनसोडे असे अनेक नेते करत होते. ही सर्व नावे त्या काळातील नेतृत्वाची आणि संघर्षाची साक्ष देणारी आहेत.१४ एप्रिलला दोन्ही गटांच्या सायकल प्रभातफेऱ्या निघायच्या. अशोकचक्रांकित निळे झेंडे फडकवत. गायकवाड गटाची प्रभातफेरी डॉ. आंबेडकर हायस्कूलच्या मैदानात विसर्जित व्हायची, तर कांबळे गटाची न्यू बुधवार पेठ, रमापती चौकात. रात्री महिलांचे पाळणा गीत, त्यानंतर प्रत्येक वस्तीत मैदानी खेळ, भीमगीत स्पर्धा, वक्तृत्व, निबंध, आकर्षक सजावट, आंबेडकरी जलसे मनोरंजनातून लोकशिक्षणाचा मोठा उत्सव साजरा व्हायचा. सप्ताहाची सांगता मंगळवारी व्हायची, कारण कापड गिरण्यांना त्या दिवशी सुट्टी असायची म्हणून सर्वसामान्यांचा सहभाग वाढायचा.
मिरवणुकीत अबालवृद्ध, महिला, तरुण सगळे सहभागी व्हायचे. लेझीम, मर्दानी खेळ, मल्लखांब, दांडपट्टा, तलवारबाजी…. गगनभेदी जयघोषात शहर दुमदुमायचं. इतर समाजातील लोकही फुले, चुरमुरे, चिल्लर उधळून या उत्सवात सहभागी व्हायचे. दोन मिरवणुका असल्या तरी केवळ अर्धा किलोमीटर अंतर आणि दोन्हींच्या केंद्रस्थानी एकच आदर्श व्यक्तिमत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर !
दरम्यान, समाजातील वाढती दुफळी आणि त्याचवेळी ग्रामीण भागातील दलितांवरील अत्याचार, बहिष्कार, छळ यामुळे तरुणांच्या मनात संताप उसळला. समाज एकसंध करण्यासाठी दयानंद कॉलेजमधील बाबू सितासावंत, श्रीमंत कोरे, अशोक जानराव, एस. आर. गायकवाड, भारत सुतकर, बाबुराव चंदनशिवे, मुरलीधर वाघमारे, भालचंद्र गवळी, राजेंद्र लोंढे, जनार्दन शिंदे, नारायण सोनवणे, भास्कर गायकवाड, एन. के. कांबळे, प्रकाश शिवशरण, कुमार शिवशरण, कबीर तात्या गायकवाड, काशिनाथ थोरात, बी. एस. बनसोडे, राजा तळभंडारे, भारत सुतकर या पॅंथर व विद्यार्थ्यांनी ठरवलं…. मिरवणूक एकच काढायची. सन १९७८ चा काळ होता…
प्रस्थापित नेत्यांना समजावलं… नाही ऐकल्यास संघर्ष केला. मिरवणुकीच्या दिवशी २००-२५० तरुण काठ्या घेऊन उभे राहिले आणि येईल ती बग्गी, टांगा, बैलगाडी, ट्रक एकत्र सलग मिरवणुकीत जोडू लागले. कडाक्याचे वाद झाले पण शेवटी एकच सलग मिरवणूक निघाली….एकतेचा ऐतिहासिक विजय झाला..!
आज पुन्हा आपण त्याच वळणावर आलो आहोत. भीम जयंतीसाठी दोन मध्यवर्ती मंडळे, दोन वेगवेगळ्या दिवशी मिरवणुका….रविवार आणि मंगळवार ! हा कोणता वारसा? संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रेरणेतून ज्या समाजाने संघर्ष करून एकता, समता मिळवली, तोच समाज पुन्हा विभागणीकडे का?
मिरवणूक म्हणजे श्रेय आणि शक्तीचं प्रदर्शन नाही तर ते समाजाच्या एकतेचं दर्शन आहे. डॉ. बाबासाहेबांचा फोटो पुढे आणि एकसंध समाज मागे….हीच खरी ओळख आहे!
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते…
वाणीत भीम आहे, करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते….
गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते….
तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते…
सदभाव एकतेचे जर अंतरात असते
चुकले कुणीही नसते सारेच एक असते… या महाकवी वामनदादा कर्डक यांच्या ओळी आठवतात….
त्यामुळे पोरकटपणा सोडा… इतिहासाने दिलेला धडा विसरू नका… एकच दिवस रविवारी , एकच मिरवणूक ठरवा… आणि पुन्हा दाखवा…आंबेडकरी समाज एक आहे… एक होता आणि एकच राहील…! हीच ऐक्यवादी जनतेची अपेक्षा आहे…. जय भीम…!!
— लेखक अशोक जानराव
( कामगार नेते/ माजी नगरसेवक )

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत