दिवाळीचा अकथित इतिहास..

समाज माध्यमातून साभार
दसऱ्यानंतर कोजागिरी पौर्णिमा येते. त्यानंतरच्या आमावस्येला दिवाळी येते. या निमित्ताने बहुतेकांच्या घरी साफसफाई – रंगरंगोटी केली जाते. गोडधोड बनवले जाते. रांगोळ्या काढल्या जातात, आकाश कंदील लावून दिव्यांची रोषणाई केली जाते.
*ब्राह्मणी परंपरेत आमावस्या हा अशुभ दिवस आहे तर श्रमण परंपरेत आमावस्या हा शुभ दिवस आहे. बौद्ध परंपरेत आमावस्या , पौर्णिमा व दोन्ही अष्टमी हे उपोसथ दिन म्हणून पाळण्याची प्रथा आहे. वर्धमान महावीर यांचे परिनिर्वाण कार्तिक आमावस्येला म्हणजे दिवाळीच्या दिवशी झाल्याचे जैन अभ्यासक सांगतात. भारतातील कर्मठ व्यापारी अजूनही दिवाळीपासून नवे वर्ष चालू झाल्याचे मानतात व दिवाळीच्या निमित्ताने हिशोबाच्या चोपड्यांची पूजा करतात. हा तर श्रमण परंपरेचा प्रभाव आहे. ‘आमावस्या शुभ आहे’ म्हणून श्रमण परंपरेत या दिवसाला एवढे महत्त्व दिले जाते , हे उघड आहे. कळीचा प्रश्न असा आहे कि, आमावस्येच्या या तथाकथित अशुभ दिनी ब्राह्मण्यवादाचा सगळ्यात मोठा सण दिवाळी साजरा का होतो ?*
भारताची आद्य संस्कृती ही सिंधू संस्कृती आहे. शेतीचा शोध या संस्कृतीच्या स्त्रियांनी लावला. म्हणून हा समाज मूलत: स्रीसत्ताक होता ! टोळीची प्रमुखा असणारी गणराणी ही तिला आवडणाऱ्या पुरुषांशी विवाह करु शकत होती. त्यात कोणाला काही गैरदेखील वाटत नसे. महाभारतातील कुंती व द्रौपदी म्हणजे अशा स्त्रीसत्ताक समाजाची ‘आठवण’ आहे !
तत्कालिन गण समाजात अन्नाचा प्रश्न हा शेतात पिकलेले अन्न दसऱ्याच्या दिवशी सर्व गण सभासदांना वाटून मिटवला जात असे. परंतु लैंगिकता हा मानव प्राण्याचा आणखी एक प्रमुख प्रश्न आहे. दसऱ्यानंतर येणाऱ्या आमावस्येच्या दिवशी टोळीची प्रमुखा असलेली गणराणी हा प्रश्न सोडवीत असे !
यासाठी दिवाळीत होणारी भाऊबीज जरा निरखून पाहायला हवी. भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला ओवाळते व तो तिच्या ओवाळणीत साडी चोळी असे काही तरी टाकतो. परंतु स्त्रीसत्ताक समाजात सहोदर भाऊ – बहिण हे नातेच नव्हते. गणराणीच्या मुली , तिच्या बहिणी व बहिणींच्या मुली हेच मुख्य नातेसंबंध होते.
*तथागत सम्यक संबुद्ध प्रणित अनित्यता सांगते कि, स्त्रीसत्ताक समाज सदासर्वदा एकाच अवस्थेत राहू शकत नव्हता. हा समाज मातृसत्तेचे वळण घेऊन पुरुषसत्तेकडे आला आहे. या दरम्यानच्या काळात बहिण भाऊ विवाह हा एक अपरिहार्य टप्पा होता !*
भाऊ-बहिण या शब्दांचा अर्थ एकाच मातापित्याची विशेषत: सहोदर मुले मुली असा आजच्या संदर्भानुसार घ्यायचा नाही. कोणे एके काळी टोळीतील सर्व स्त्रीपुरुष हे एकमेकांचे बहिण भाऊ समजले जात. आजच्या काळातील संदर्भ व अर्थ जुन्या काळावर लादणे तसेच जुन्या काळातील संदर्भ व अर्थ आजच्या काळावर लादणे म्हणजे इतिहासाची प्रतारणा करणे ! अशी प्रतारणा करण्यात ब्राह्मण्यग्रस्त पटाईत आहेत. आपण या अवगुणांपासून अलिप्त राहायला हवे.
*त्यामुळे भाऊ बीज या शब्दाचा मूळ अर्थ, टोळीतील पुरुष सभासदाचे बीज टोळीतील स्त्री सभासदाच्या शेतात टाकण्याचा विधी असा घ्यायला हवा. भाऊबीज या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे ! हा विधी दिवाळीच्या वेळेसच का होई ? तर स्त्रीसत्ताक समाजापासून चालत आलेली रुढी म्हणून मातृसत्ताक समाजात बहिण भाऊ विवाह दिवाळीत होत असावा, हे जास्त स्वाभाविक आहे. भाऊबीज हा मराठी शब्द देखील निदान मातृसत्ताक समाजाइतका जुना असावा. नाणेघाटातील शिलालेखाच्या आधारे मराठी भाषा प्राचीन आहे , असे कालवश संशोधक विद्वान प्रा हरी नरके यांनी सिद्ध केले आहे. भाऊबीज या शब्दाच्या आधारे मराठी भाषेचे प्राचीनत्व थेट वेदपूर्व काळापर्यंत जाते ! रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य व कोलिय यांच्या गणदासांचा वाद झाल्यावर कोलिय गणदासांनी शाक्य गण सभासद आपापसात बहिणभावाप्रमाणे विवाह करतात , अशी टीका केली. इथे गणांतर्गत विवाह अभिप्रेत आहे. तात्पर्य , दिवाळीचा सण हा मुळात लग्नाचा विधी होता ! या दिवशी टोळीची प्रमुखा असणारी गणराणी स्वत: निवडलेल्या पतीशी विवाह करीत असे. गणराणीच्या विवाहाचे अनुकरण गणसभासद करीत असावेत. मानवी समाजातील लैंगिकतेचा प्रश्न सोडविणारा हा दिवस गण समाजात आनंदाने साजरा होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. आजही ग्रामीण भारतात लग्नाचा ‘सिझन’ दिवाळीनंतर चालू होतो.*
अशा तऱ्हेने दिवाळी हा मुळात सिंधू संस्कृतीतील लग्नाचा विधी आहे ! त्याचा ब्राह्मणी धर्माशी वा ब्राह्मणी परंपरेशी काहीएक संबंध नाही !
या संदर्भात नरक चतुर्दशी समजून घ्यायला हवी. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराला मारले , असे ब्राह्मणी परंपरा सांगते. असुर म्हणजे ब्रह्मन (ब्राह्मण नव्हे !) म्हणजे गणराणीचा पती ! म्हणजे या दिवशी गणराणी आपल्या जुन्या ब्रह्मनला म्हणजे जुन्या पतीला विधी म्हणून मारुन टाकीत असे ! जुन्या असुराला म्हणजेच जुन्या पतीला मारल्यानंतर गणराणीचा नव्या असुराशी म्हणजे नव्या ब्रह्मनशी म्हणजे नव्या पतीशी विवाह होत असे.*चंद्र म्हणजे पुरुष हे समीकरण लक्षात घेतले तर आमावस्येच्या दिवशी चंद्र न दिसणे म्हणजे चंद्राचे मरण ! याच लाक्षणिक अर्थानुसार या दिवशी जुन्या पतीला विधीपूर्वक मारुन टाकले जाई !* अगदी नरकासुर वधाच्या कथेतही श्रीकृष्ण स्वत: नरकासुरास मारीत नाही तर आपली पत्नी सत्यभामा हिच्या सहाय्याने नरकासुरास मारतो. सत्यभामा या स्त्रीच्या हातून नरकासुर मारला जाणे हा स्त्रीसत्ताक समाजात असुराला (पतीला) मारण्याचा अवशेष आहे !
*स्रीसत्ताक समाज हा बुद्धिमान व रसिक होता. आमावस्येच्या रात्री चंद्र दिसेनासा होतो, पृथ्वीवर अंधार पडतो. म्हणून गणराणीच्या लग्नाप्रीत्यर्थ दिव्यांची आरास करुन अंधार दूर करण्याची सुंदर कल्पना याच समाजात जन्माला आली. या कल्पनेचे नाविन्य सर्वांना भावले. ‘अंधारात दिवा लावून प्रकाश देणे’ ही संकल्पना पुढे सर्वत्र वापरली गेली. नवनिर्माणाचे सृजनत्व प्राप्त झालेल्या बौद्ध परंपरेनेदेखील ‘अत्त दिप भव’ स्वीकारले !*
पुरुषसत्ताक व पशुपालक आर्यांनी भारतात प्रवेश केल्यावर त्यांनी दिवाळीचे ब्राह्मणीकरण केले. बळीराजाची कथा ही या ब्राह्मणीकरणाच्या प्रक्रियेचा एक भाग असावी. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबर रोजी बाबरी मशीद पाडणे हा देखील 6 डिसेंबरचे ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न आहे. घाम गाळण्यातून – मेहनत करण्यातून सृजनत्व जन्मते. अंधश्रद्धायुक्त पुजापाठाच्या निरर्थक पोपटपंचीचे निष्फळ कर्मकांड करणाऱ्यांकडे सृजनत्व असूच शकत नाही. ते केवळ कपटकारस्थाने व चोऱ्यामाऱ्या उचलेगिरी करू शकतात. दसरा दिवाळीपासून चालू झालेली ही “चौर्य” परंपरा आता ‘ताजमहाल आमचा आहे’ येथपर्यंत पोहोचली आहे. 6 डिसेंबरचा उल्लेख केलेलाच आहे. *मुळात भटक्या आर्यांची रानटी संस्कृती व सिंधू संस्कृतीतील स्त्रीसत्ता प्रधान सुसंस्कृत संस्कृती यांत जमीन अस्मानचा फरक होता. सिंधू व श्रमण संस्कृतीतील चांगले ते उचलून ते आपल्या नावाने खपवण्याचे ब्राह्मणी उद्योग काही काळ चालले खरे, परंतु ते सदासर्वदा कसे चालतील ? तथागत सम्यक संबुद्ध यांनी प्रतिपादन केलेली अनित्यता ब्राह्मणी परंपरेलाही लागू आहेच ना !*
तर आमावस्येच्या तथाकथित अशुभ दिवशी येणाऱ्या शुभ दिवाळीचा अकथित इतिहास हा असा आहे. म्हणून दिवाळीच्या निमित्ताने जनतेतील अज्ञान नष्ट करण्यासाठी प्रबोधनाचा दिवा लावून ब्राह्मणी अंधकार दूर करु या !
सर्वांना सुखसंपत्ती प्राप्त होवो !
सर्वांचे मंगल होवो ……
Reposted
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



