हे नवे ‘सेनानी’ कोण ?

🌻रणजित मेश्राम लेखक जस्ट ज्येष्ठ साहित्यिक अभ्यासक विचारवंत आहेत
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या ताज्या बैठकीने 'लोकतंत्र सेनानीं'चे मानधन दुप्पट केले. आतापावेतो महिना ११ हजार मिळत असत. आता दुप्पट होतील. २२ हजार.
स्वातंत्र्य सैनिक , Freedom Fighter ठाऊक होते. हे नवे कोण ? अनेकांना प्रश्न पडतोय. हे म्हणे , कालचे मीसाबंधक. आणीबाणीचे तुरुंगवासी. लोकशाही बचावणारे 'शूरवीर' ! मीसाबंधक म्हणजे Maintenance of Internal Security Act अन्तर्गत येणारे. १९७५ च्या Emergency तील तुरुंगवासी ! ते असे गौरवान्वित होत आहेत. महाराष्ट्र यात पुढेपुढे आहे.
भाजपशासित राज्यांत या गौरवान्विततेची 'होड' लागलीय. काल राजस्थानने २० हजार केले. महाराष्ट्र २२ हजार करतोय. मंत्रीपद हुकलेले सुधीर मुनगंटीवार यावर रेटून बोलले. मीसाबंदीत संघाचेच अधिक आहेत. मुनगंटीवारांना चांगले ठाऊक आहे.
तसे स्वातंत्र्य सैनिक व लोकतंत्र सेनानी या दोन्ही संज्ञा अगदीच वेगळ्या ! चरित्रही वेगळे ! स्वातंत्र्य सैनिक या संज्ञेला देशभर मान्यता. ती पक्षनिहाय नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी तुरुंगवास भोगला ते सारे यात येतात. स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली. आता स्वातंत्र्य सैनिक हयात असणे ? क्वचितच !
स्वातंत्र्य संग्राम सैनिक ही गौरविता सर्वमान्य होती. आहे. अशांना कालांतराने सन्माननिधी मिळाला. वैद्यकीय सुविधा , शासकीय योजनांत आरक्षण मिळाले. आक्षेप कोणाचाच नव्हता. ती लोकेच्छा ठरली. कर्तव्यपूर्ती वाटली. तीच लोकभावना या मीसाबंदींविषयी आहे काय ? एकदा तपासावे. त्याआधीच कोडकौतुक ?
लोकशाहीत सत्ता ही हुकूमत नसते. बहुमत म्हणजे विरोध संपला , असे नव्हे. आणीबाणीला खलनायिका ठरविले गेले. पण सर्वांनी नव्हे. सत्ता गेल्याबरोबर ज्या योजना बंद होतात. त्या कां ? स्वातंत्र्य सैनिकाबाबत असे कधीच घडले नाही. सरकारे बदलली. ती कायम राहीली.
मीसाबंदीसन्मान उध्दव ठाकरे काळात बंद झाला होता. का ?
नंतर भाजप सरकार आले. पहिली सही याच फाईलवर झाली. ते गौरवाने सांगितले गेले. मीसाबंदीसन्मान पुन्हा सुरू झाले. लोकतंत्र सेनानी अशी दवंडी झाली. थकित रकमेसह भुगतान निघाले. अर्थात , सारे 'अरिअर्स'सह मिळाले. लाखांत आकडा गेला.
सारे तुरुंगवास देशगौरव असतात काय ? तुरुंगवास व धरपकड फरक असतोच. २०-२५ वर्षांनंतर पिढी बदलते. नवे टाकणे , काढणे सोपे जाते. सोयीचे होते. अलीकडे देशात हेच सुरुय. नवनव्या तुष्टीकरणाचे रोज प्रत्यंतर दिसतेय.
महाराष्ट्र याहीबाबतीत पूढेच ! सत्ताबदल हा केवळ खुर्चीबदल नसतो. तो यामुळेच.
उगाचच एक शेर आठवतो.
जो खानदानी रईस है
वो मिजाज रखते है नर्म अपना
तुम्हारा लहजा बता रहा है
तुम्हारी दौलत नई नई है
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत