दिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

ज्येष्ठ पौर्णिमा

जून महिन्यात येणारी ही पौर्णिमा, अर्हत महेन्द्र स्थविर यांनी बौद्ध धम्माला श्रीलंकेत स्थपित केल्याच्या स्मरणार्थ साजरी केली जाते. श्रीलंकेच्या बावीसशे वर्षांच्या इतिहासात हा एकमेवाद्वितिय असा दिवस आहे की, ज्याने श्रीलंकेच्या जनतेच्या मनात कधीही न पुसली जाणारी अशी अमीट छाप पाडली आहे. बुद्धाचा मौलिक उपदेश आणि बुद्ध शासनाची सुरुवात श्रीलंकेत कायमची केली. श्रीलंकेतील लोकांची जीवन शैली व विचारधारा बुद्धाच्या उपदेशांनी, धम्माने बदलल्या गेली. म्हणूनच हा दिवस, ही पौर्णिमा श्रीलंकेच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना होय.

सम्राट अशोकांच्या छत्रछायेखाली, अर्हत मोग्गलीपुत्त तिस्स यांच्या अध्यक्षतेखाली जी तृतीय धम्मसंगिती झाली त्यात विदेशात धम्मदूत पाठविण्याचा निर्णय झाला. अर्हत महेन्द्र, सम्राट अशोकाचा मुलगा व मोग्गलीपुत्त तिस्स यांचा शिष्य. याला या कार्यासाठी पाठविण्याचा निर्णय झाला. त्यावेळी महेन्द्र केवळ बत्तीस वर्षांचा होता. त्यांच्या सोबत इत्थिय, उत्तिय, संबल आणि भद्दसाल या अर्हतांना तसेच श्रामणेर आणि सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा आणि जावई अग्गिब्रह्म जे पुढे दीक्षित होवून अर्हत झाले, यांना पाठविण्यात आले. विदिशा देवीचा पणतु अनागामी साधक भंडुक हा देखील सोबत होता.

धम्मासोक (सम्राट अशोक) याने अनेक उत्तुंग कामे केली. मात्र धम्मसंगीति भरवून

त्यात बुद्धधम्म विदेशात रुजावा यासाठी त्याने केलेले कार्य सर्वात महत्त्वाचे होय. धम्मासोक याने पुढाकार घेवून जर हे कार्य केले नसते, तर आज आपणास संसारातून दुक्खमुक्त होवून निर्वाणाचा साक्षात्कार करणारा मार्ग व त्या मार्गावर आरूढ असलेले साधक दिसलेच नसते. महेन्द्र आणि संघमित्रा यांना धम्मात प्रतिष्ठित होण्याची प्रेरणा कशी मिळाली आणि कोणत्या परिस्थितीच्या अनुषंगाने मिळाली हे पाहणे यथोचित होईल.

भगवान बुद्ध हयात असताना देखील सम्राट अशोका सारखे दातृत्व असलेला अनुयायी त्यांना मिळाला नाही. ८४,००० धम्मसुत्तांच्या संख्ये एवढे त्याने स्तूप बांधले. राजधानी पाटलीपुत्र येथे अशोकाराम बांधला. बुद्धसासनाचा उत्तराधिकारी व्हावे ही सम्राट अशोकाची तीव्र इच्छा होती.

याप्रमाणे बुद्धशासनाचा उत्तराधिकारी झाल्यानंतर अशोकाने जवळच असलेल्या आपल्या प्रिय पुत्राला व पुत्रीला संघात प्रविष्ट होण्याबद्दल पृच्छा केली. “संघात प्रवेश करणे हे सर्वात मोठे पुण्य होय.” पित्याचे शब्द ऐकून मुले म्हणाली, “पिताश्री, आम्ही आजच संघात प्रवेश करण्यास उत्सुक आहोत. आमचा संघात प्रवेश करणे आम्हासाठी व तुमच्यासाठी देखील आनंददायक ठरेल.” त्यांनी आपली राजवस्त्रे उतरवून संघात प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वीच अशोकाचा भाऊ तिस्स आणि जावई अग्गिब्रह्म यांनी दीक्षा घेतली होती. संघमित्रेचा पुत्र सुमन याने देखील दीक्षा घेवून संघात प्रवेश केला. या प्रकारे अशोकाने स्वतःच्या मुलांना, नातेवाईकांना, राज्यातील लोकांना महा-कारूणीकाच्या शासनात प्रतिष्ठित केले.

इ.स. पूर्व ३०८ साली महान अर्हत महेन्द्र आणि इतर स्थविर अर्हत ज्येष्ठ महिन्यात मिहींतले या ठिकाणी पोहोचले. ज्येष्ठ हा पावसाचा महिना आहे. आणि श्रीलंकेत त्याला ‘पोसोन’ या संज्ञेने ओळखले जाते. पोसोन ‘पसवति’ या शब्दाचा अपभ्रंश होय. निसर्ग यावेळी फूले, फळे प्रसवितो आणि अशा वेळी अर्हत महेन्द्राचे आगमन झाले.

श्रीलंकेचा राजा देवानामप्रिय तिस्स मिहींतले परिसरात शिकारीच्या निमित्ताने आला. तेथे अर्हत महेन्द्राचे धीर गंभीर आणि पवित्र रूप पाहताच आश्चर्यचकित आणि किंचित भयचकित झाला. महेन्द्राने राजाला नाव घेऊन जवळ बोलाविले. “तिस्स, तिस्स येथे ये.” राजाने हे ऐकले आणि ‘पितवस्त्रधारी मुंडन केलेली व्यक्ती मला नाव घेऊन बोलावते आहे,’ कोण असावे बरे? असा विचार त्यांच्या मनात आला. ‘हा मनुष्य आहे अथवा यक्ष?’ तेव्हा महेन्द्राने उत्तर दिले. “आम्ही सन्यासी / श्रमण आहोत. सत्याचे पूजारी. केवळ तुमच्या प्रति वसत असलेल्या करूणेपोटी आम्ही जंबुद्विपातून येथे आलो आहोत.” अर्हताचे हे आश्वासक शब्द ऐकून राजाच्या मनातील भिती निघाली आणि त्याला त्याच्या मित्राचे भारत सम्राट धम्मासोकाच्या संदेशाचे स्मरण झाले. त्याने बुद्ध. धम्म आणि संघाला शरण गमन केले आहे. आणि तुम्ही देखील तसे करावे अशी पृच्छा केली आहे. आता त्याला खात्री पटली की, आपल्यासमोर असलेला सन्यासी भारतातून

सम्राट अशोकाने पाठविलेले धम्मदूत आहेत. त्याने वाकून वंदन केले व आदराने बाजूला बसला. अर्हताने त्याला काही प्रश्न विचारले.

हे राजन तुम्हाला काही नातेवाईक असतील?”

“पुष्कळ आहेत भन्ते.” “त्यांची संख्या खूप आहे महाराज.”

“तुमचे नातेवाईक असलेले आणि नसलेले याव्यतिरिक्त आणखी कोणी आहेत ?

“मी स्वतः महाराज.”

‘फार छान तुम्ही चतुर आणि हजरजबाबी आहात” यानंतर अर्हताने छोटासा धम्मोपदेश दिला. हत्तीच्या पाऊलांचे रूपक सांगितले. या धम्मोपदेशानंतर राजा आणि त्याच्या चाळीस हजार सहकाऱ्यांनी त्रिशरण गमन केले. (महावंस)

हत्तीच्या पाऊलखुणांचे रूपक

श्रीलंकेतील लोकांना ते रूपक सांगावे हा काही पहिलाच योगा-योग नव्हे. हत्ती हा प्राणी बुद्ध जीवनाशी निगडीत आहे. बौद्धांच्या सामाजिक आणि संस्कृतिशी निगडीत आहे. राणी महामायेला स्वप्न पडले होते की, तुषीत लोकांमधून बोधिसत्त्व पांढऱ्या शुभ्र हत्तीच्या स्वरूपात तिच्या कुशीत शिरले आहेत. पारिलेय्यच्या शालवनातील जंगलात बुद्धाचे रक्षण हत्तीनेच केले होते. बुद्धाच्या अंगावर चालून जाणारा व नंतर बुद्धचरणी नतमस्तक होणारा नालागिरी हत्तीच होता. बौद्ध लोकांनी काढलेली बुद्ध शोभायात्रा हत्तीविना अधूरी असते. बुद्धाचे पवित्र अवशेष पाठीवर घेऊन कँडी (श्रीलंका) च्या रस्त्याने झूलत जाणारा हत्ती हे एक उदाहरण होय.

धार्मिक महत्त्व

उपरोक्त रूपकाचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहेच, पण तात्त्विक आणि धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. बुद्ध, धम्म आणि संघाचे स्पष्ट आणि सजीव चित्रण त्यात आहे. बुद्धाच्या धम्मदेसनेमुळे व्यक्तीत कसे परिवर्तन होते आणि तो भिक्खु होतो. गृहस्थांचे जीवन हे संघर्षाने भरलेले, कठीण आणि गरजांनी भरलेले, तर श्रमणाचे जीवन मुक्त आणि मोकळ्या आकाशासारखे आहे. मुक्त जीवनात येणाऱ्या आध्यात्मिक अनुभवांनी श्रमणाचे जीवन कसे असते याविषयी या उपदेशात मार्गदर्शन आहे. आपल्या मार्गातील पाच अडथळयांना दूर सारून निर्वाणाप्रत श्रमण प्रगती करतो. भगवान बुद्धाने या अवस्थेची तुलना, गंभीर व्याधीतून सुटका झालेल्या व्यक्तीशी, कर्जमुक्त झालेल्या व्यक्तिशी तुरूंगातून सुटलेल्याशी, गुलामीतून मुक्त झालेल्या व्यक्तीशी केली आहे.

ध्यान

पाच अडथडे दूर सारल्यानंतर श्रमणाला अतीव सुखद आणि शांत अवस्था प्राप्त होते. त्याला प्रथम ध्यानाची अवस्था म्हणतात. मनाच्या उच्चतर पातळ्यांची ही पहिली पायरी होय. सतत आणि सफल प्रयत्नांनी हे साध्य होते. मनाला आनंदीत करणाऱ्या भौतिक वस्तूंच्या किती तरी पटीने अधिक आणि निराळी अशी ती आनंदी अवस्था

असते. चित्ताला ज्ञानाचे साधन बनवून इंद्रियांपलीकडे मन जाते. ध्यानाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अवस्था सफलातापूर्वक पार झाल्यावर सुख-दुःखाच्या पलीकडे मन जाते. या अवस्थेत साधक पूर्णतः जागृत आणि समतेत स्थित असतो. अस्तित्वाच्या सत्यापर्यंत आपल्या प्रज्ञेने साधक येवून पोहोचतो. तो आता ‘शुद्ध’ ‘एकवटलेला’, दृढ, अडथळे रहित अविचलित अशा अवस्थेत असतो. मनाच्या या अवस्थेची तुलना बुद्ध स्वच्छ, पारदर्शक सरोवराशी करतात, ज्याचे पाणी स्थिर आहे. काठावर उभा राहून माणूस त्या सरोवरातील शंख, शिंपले, मासे वनस्पति इत्यादी व्यवस्थित पाहू शकतो. त्याचप्रमाणे साधक आपल्या चित्ताद्वारे पाहू शकतो, हे दुःख आहे, हे दुःखाचे मूळ (कारण) आहे, हा दुःख निरोध आहे आणि हा मार्ग आहे, जो दुक्खमुक्त करतो. या प्रमाणे साधक भवचक्रातून मुक्त होतो आणि निब्बाण प्राप्त करतो. (दीघ निकाय, मज्झिम निकाय, अंगुत्तर निकाय)

भगवान बुद्धाचा मौलिक उपदेश या सुत्तात आहे. हे सुत्त राजाला सांगण्याचा उद्देश, बुद्धाच्या उपदेशाची मौलिकता आणि महत्ता पटवून देणे तसेच संघाचे आदर्श जीवन कसे असते आणि राजाने त्यांच्या या अतिथीशी कशी वागणूक करावी, हा होता. या उपदेशाचा परिणाम इतका दृढ झाला की, राजा आणि त्याच्याशी संबंधीत चाळीस सहस्त्र व्यक्तींनी धम्मदीक्षा घेतली.

कर्म आणि पुर्नजन्म

दुसऱ्या दिवशी पेतवत्थु आणि विमानवत्थु यावर आधारित उपदेश अर्हत महेन्द्र यांनी राजघराण्यातील स्त्रियांसमोर दिला. मूलभूत स्वरूपाचा उपदेश निवडून त्याचे निरूपण सर्वांना भावले. सत्कर्माचा परिणाम अतीव सुखात होत असतो हे त्यांनी स्पष्ट केले. आणि दुष्कर्माचा परिणाम अतिशय दुःखद असतो हे सुत्तांच्या आधारे सांगितले. शीलाचरणाचे महत्त्व, सत्कर्मांचे महत्व, कुशल कर्माचे महत्त्व, जे बुद्धाच्या शिकवणीचा मूलभूत आधार आहे, हे आपल्या प्रासादिक आणि परिणामकारक भाषेत अर्हत महेन्द्राने राजस्त्रियांच्या मनावर बिंबविले. तत्पूर्वी त्या राजस्त्रिया मृतात्मे आणि भूत प्रेत यांचे अस्तित्वावर विश्वास ठेवत होत्या. कुशल कर्म आणि अकुशल कर्म यांची वैज्ञानिक पद्धतीने फोड करून सांगितल्यावर राजस्त्रियांच्या मनाची तार छेडल्या गेली. आणि जागृतीच्या थोड्या फार पातळीवर त्या आल्यावर त्यांना चार आर्य सत्यासंबंधी देसना दिली. (सच्चसंयुत्त सुत्त) संसारातील अस्तित्व कसे दुःखदायक आहे आणि त्यावर कशी मात करता येते याविषयी देसना दिली. प्रज्ञेचा प्रकाश, हळूहळू त्यांचा अज्ञानाचा अंधःकार मिटवू लागला आणि त्या श्रोतापन्न झाल्या.

यानंतरच्या देसना, उपदेश व्यक्तींच्या मनाच्या ठेवणीनुसार, कुवतीनुसार, आकलन शक्तीनुसार, स्वभावभेदानुसार वर्गीकृत करून दिल्या. मज्झिम निकायातील देवदत्त सुत्त खुप मोठ्या जमावाला उपदेशिले. लोकांनी विध्वंसक वृत्तीचा त्याग करून नैतिक वृत्ती जोपासावी हा त्यामागील उद्देश होता. या सुत्तात नाटकीय जीवनाचे वर्णन आढळते. आजच्या युगात जगणाऱ्या आणि मृत्युनंतरच्या जीवनाविषयी संशय

असणाऱ्या बौद्धांना या उपदेशाची गरज आहे.

मज्झिम निकायातील बालपंडित सुत्ताचा उपदेश अर्हत महेन्द्र स्थविर यांनी काही विशिष्ट लोकांसमोर दिला. अविद्येमुळे, अज्ञानामुळे, अविचारामुळे काही व्यक्ती काया, वाचा, मनाने अशा कृती करतात की, ज्यामुळे इहलोकी आणि परलोकी त्यांना तिव्र दुःख भोगावे लागते. त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यानाही दुःख भोगावे लागते. परंतू विचारी आणि शहाणी माणसे जाणीवपूर्वक अशी कृती / कर्म करतात की, ज्यामुळे मन शांत आणि समाधानी होईल आणि सुख प्राप्त होईल. अशी व्यक्ती इहलोकी आणि परलोकीसुद्धा सुखी राहाते. हे सुत्त सांगण्यामागील मुख्य उद्देश हा होता की, चांगले जीवन, नैतिक जीवन जगल्याने सुख, समाधान मिळतेच. महेन्द्र थेराच्या या उपदेशाने लोकांमध्ये चांगले जीवन जगण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यातील काही लोक श्रोतापन्न झाले.

तिसऱ्या दिवशी महेन्द्र स्थविर यांनी अनमतग्गिय सुत्तावर (अंगुत्तर निकाय)

प्रवचन दिले. या सुत्तात संसारातील, जन्म मरणाच्या चक्रामुळे ओढवणारे दुःख, अनंत जन्मांपासून भोगत असलेले दुःख, या पासून सुटका करता येते. कर्म आणि पुनर्भव, दुःख आणि दुःखाचे कारण, त्रास आणि संताप यापासून सुटण्याच्या उपायाची चर्चा अनेक प्रासंगिक उदाहरणे देऊन सांगितली.

चवथ्या दिवशी अग्गिखंदोपम सुत्त (अंगुत्तर निकाय) यावर प्रवचन दिले. भिक्खूने विनयाचे पालन करून जगावे अन्यथा कोणकोणते दुष्परिणाम ओढवतील याचा उहापोह या सुत्तात केला आहे. आजच्या युगात देखील हे सुत्त भिक्खूंना मार्गदर्शक आहे. बुद्ध शासनाची उज्ज्वल आणि गौरवशाली परंपरा कायम ठेवण्यासाठी भिक्खूंनी या सुत्ताप्रमाणे विनयाचे आचरण करणे अत्यंत आवश्यक आहे.

सुप्त अवस्थेत असणाऱ्या आध्यात्मिक ओढीला अर्हत महेन्द्र स्थविर यांच्या धम्मोपदेशामुळे चालना मिळून अनेक लोक स्रोतापन्न झाले आणि अनेक लोक चांगले जीवन, नैतिकतेने जगण्यास प्रतिज्ञाबद्ध झाले.

श्रीलंकेतील या पवित्र द्विपावरील लोकांचे इतके मतपरिवर्तन झाले, दूरगामी परिणाम झाले, असे काय असावे बुद्धाच्या शिकवणीत? रूवणवेली सॅय, थूपाराम, अभयागिरी यासारखी उत्तुंग आणि आश्चर्यकारक बांधकामे करण्यामागे निश्चितच खूप मोठी प्रेरणा आहे. श्रीलंकेत सर्वत्र आढळणारे दागॅब, बुद्ध प्रतिमा कोरण्यामागे वास्तूशिल्पींना लाभणारी प्रेरणा खरोखर आश्चर्यकारक आहे.

निःस्वार्थपणे सेवा करणे, करूणा, संयम, उत्साह आणि उदार मानवता, संस्कृती आत्मसात करण्याची नम्रवृत्ती ही बुद्धाच्या शिकवणीतील उदात्त तत्त्वे होत. त्यामुळे लोकांना अजरामर कृती करण्याची प्रेरणा मिळाली. ही तत्त्वे त्यांच्या जीवनाचा अभिन्न भाग बनली आणि त्यामुळे ह्या व्यक्ती उत्तुंग कामगिरी करू शकल्या.

सिंहली लोकांच्या जीवनावर आणि विचारांवर अत्यंत खोल ठसा जर कोणी उमटविला असेल तर ती “मेत्ता भावना” होय, जी करणीयमेत्तसुत्त या नावाने प्रसिद्ध आहे.

नहि वेरेन वेरानि, सम्मन्तिध कुदाचनं । अवेरेन च सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो।। (धम्मपद)

मेत्ता भावनेचा प्राणच जणू उपरोक्त गाथेत ओतला आहे. पॉल कॅरस (Paul Carus) हा प्रसिद्ध अमेरिकन बौद्ध विद्वान म्हणतो “सिंहली लोक या पृथ्वीतलावर अतिशय कनवाळू म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा धर्म बौद्ध आहे. “करूणा” हे त्याचे प्रतिक होय”.

पालि वाङ्‌मयातील बौद्ध वाङ्‌मयाने त्यातील जातक कथांनी सिंहली लोकांना भूरळ पाडली आहे. गंगेच्या काठावरील बौद्धकालीन संस्कृतिची छाप सिंहली वाङ्‌मयावर पडलेली दिसते. सिंहली भाषेतील नव्वद टक्के शब्दभांडार पाली आणि संस्कृत या भाषांमधील आहे. बौद्ध संस्कृतिने श्रीलंकेतील वाङ्‌मय, स्थापत्यकला, चित्रकला, सामाजिक संस्कृती, विचारधारा यावर अमिट छाप सोडली आहे, हे बारकाईने निरिक्षण केल्यास दिसून येईल.

श्रीलंकेत जी बौद्धिक, नैतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रगति झालेली दिसते त्याकरिता सिंहली लोक बुद्धा प्रति कृतज्ञ आहेत. अर्हत महेन्द्र आणि त्यांचे सोबत आलेल्या बौद्धांनी श्रीलंकेतील लोकांची अत्यंत निस्वार्थी सेवा केली आहे, श्रीलंकेतील सर्वांगिण प्रगती करीता ते कारणीभूत ठरलेले आहेत. म्हणून सिंहली लोक अर्हत महेन्द्राला अनुबुद्ध (दुसरे बुद्ध) म्हणून गौरवितात व त्यांना पूजनीय मानतात. महेन्द्र स्थविराने जी बुद्ध धर्माची तत्त्वेचे, उपदेश येथे (श्रीलंकेत) आणले, त्याचे श्रीलंकेने, सिंहली जनतेने शुद्ध स्वरूपात रक्षण केले आहे. म्हणूनच या पवित्र द्विपाकडे बौद्ध जगत अध्यात्मिक प्रेरणास्त्रोत म्हणून पाहते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!