दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपान

राजा ढालेंच्या समक्ष माईंच्या संतापाचा स्फोट झाला तेव्हा…

■ अरुण निकम

डॉ माईसाहेब आंबेडकर यांच्या वाट्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणानंतर होरपळ,ससेहोलपट, अज्ञातवास आला होता. त्याबद्दलची माईंची कैफियत त्यांच्या ‘डॉ आंबेडकरांच्या सहवासात’ या आत्मचरित्रातून जगासमोर यायला १९९० साल उजाडावे लागले. म्हणजे त्यांच्या यातना, दुःख तब्बल ३४ वर्षांनंतर लोकांपर्यंत पोहोचले.

पण माईंवर झालेल्या घोर अन्यायाची कथा आणि त्यांच्या शोकांतिकेचे खरे कारण त्यांच्याच मुखातून पँथर नेते राजा ढाले आणि त्यांच्या पत्नी दिक्षाताई ढाले यांच्यासमक्ष मला ऐकता आली होती. विशेष म्हणजे, मी विचारलेल्या सवालानंतर माईंच्या संतापाचा स्फोट झाला होता. त्यांचा अश्रूंचा बांध फुटला होता. ही गोष्ट आहे १९७४ सालातली. त्यावेळी माईंनी सांगितलेली कैफियत ऐकून आम्ही सारे जण नि:शब्द झालो होतो.

स्थळ होते दादर ( पूर्व) येथील ‘अमीन मेन्शन’ मधील डी. डी. बाविस्कर यांचे घर. राजा ढाले हे नागपूरला लग्न झाल्यानंतर नवपरिणीत वधुसह मुंबईत नुकतेच परतले होते. ते नवविवाहित जोडपे तिथे आले होते. आम्ही सर्वांनी त्या वधू- वराचे अभिनंदन करत त्यांना शुभेछा दिल्या.

बावीस्कर म्हणजे आंबेडकर घराण्याचे अत्यंत विश्वासू व्यक्तिमत्त्व. भय्यासाहेब आंबेडकर यांचे ते निकटवर्तीय होते. बाविस्करांची आणखी एक ओळख इथे सांगावी लागेल. बऱ्याच वर्षांपूर्वी बाबासाहेबांचा कोट टायमध्ये, काठीवर हात ठेवलेला व बाजूला बुद्धांची मूर्ती असलेला एक फोटो बऱ्याच घरांमध्ये हमखास दिसायचा. तो फोटो काही लोकांच्या घरात अजूनही सापडू शकेल.तो फोटो बाविस्कर यांनीच प्रकाशित केला होता. त्याच्या खाली त्यांचे नावदेखील आहे.

बावीस्कर , माझे मित्र वसंत साळवे,व साहेबराव पानपाटील हे तिघे नेव्हल डॉकयार्ड मध्ये एकत्र कामाला होते. साळवे- पानपाटील यांच्यामुळे बाविस्कर यांच्याशी माझा परिचय झाला होता. तेव्हा मी माटुंगा लेबर कॅम्पातील गोल्डन स्पोर्ट्स क्लबचा अध्यक्ष व क्रीडा मंडळ ऐक्य समिती या १४ मंडळांच्या एकत्रित समितीचा सरचिटणीस होतो. आमचे क्रीडा क्षेत्रातील काम पाहून बाविस्कर हे खूप प्रभावित झाले होते. ते वारंवार आमच्या मंडळात येत असत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर माईसाहेब आंबेडकर यांना रिपब्लिकन नेतृत्वाच्या कुटील राजकारणामुळे अज्ञातवासात जावे लागले होते. त्यांच्या वाट्याला उपेक्षा, तिरस्कार आणि एकांतवास आला होता. बाबासाहेबांच्या महानिर्वानानंतर दीर्घकाळ त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांत दिसल्या नव्हत्या.

त्या पार्श्वभूमीवर, बाविस्कर यांच्या घरी आम्ही सारे माईसाहेब यांना पहिल्यांदाच पाहिले. त्यावेळी तिथे माझ्यासोबत वसंत साळवे, विनायक केदारे, उत्तम बनसोडे, साहेबराव पानपाटील हे मित्र होते. तसेच राजा ढाले त्यांच्या पत्नी दीक्षाताई सोबत तिथे उपस्थित होते.

बाविस्कर यांनी सर्वप्रथम माईसाहेबांशी आमची ओळख करून दिली. आम्ही सगळेच स्तब्ध झालो. एतिकडे आमच्या उद्धारकर्त्याच्या पत्नीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे पुण्य लाभत होते तर दुसरीकडे ‘बाबासाहेबांना विष देऊन मारले गेले’ ही बालपणी कानावर पडलेली गोष्ट आठवून मनात माईसाहेब यांच्याविषयी तिरस्कारही दाटून आला होता.

आम्ही आशा संभ्रमित अवस्थेत असतांना माईंनी बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची आपण कशा प्रकारे सेवा केली, हे सांगण्यास सुरुवात केली. त्याबरोबर मी त्यांना मध्येच थांबवून सरळ प्रश्न केला की,आमच्या तर कानावर आले आहे की, “तुम्हीच बाबासाहेबांना विष पाजून मारले.” माझ्या प्रश्नानंतर सगळे एकमेकांकडे पाहू लागले.

माझ्या सवालावरून माई कमालीच्या चिडल्या होत्या. त्यांच्या संतापाचा स्फोट झाला होता. त्यांचा अक्षरशः तिळपापड झाल्याने शरीर थरथरत होते. नंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. बावीस्करांनी त्यांना पाणी देऊन शांत केले. मग मात्र त्यांनी स्वतःला सावरले. आणि आपली बाजू विस्तृतपणे सांगायला त्यांनी सुरुवात केली.

माई सांगू लागल्या की, बाबा ज्या डॉक्टरांकडे नियमित औषधोपचार घ्यायचे, त्या ठिकाणी मी सहायक असल्यामुळे त्यांची सर्व तपासणी मीच करीत होते.त्यातून आमचा परिचय वाढला.त्यानंतरच बाबांनी माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण तेव्हा जातीयवाद पराकोटीचा होता. त्यातच मी ब्राह्मण. त्यामुळे प्रचंड विरोध असतांना देखील मी बाबाशी विवाह करण्याची हिम्मत दाखवली.त्याचा मला आणि माझ्या कुटुंबाला काय त्रास झाला हे तुम्हाला सांगून समजणार नाही.

बाबांशी लग्न केल्यानंतर मी नोकरी सोडून फक्त त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचेच काम केले. त्यामुळे बाबांचे आयुष्य वाढले आणि तसे बाबांनी त्यांच्या हयातीत लिहून देखील ठेवले आहे. मग हा गैरसमज कुणी पसरवला? आणि त्यानंतर त्यांनी बाबांच्या पश्चात कशाप्रकारे राजकारण खेळले गेले. त्यांना हेतुपुरस्सर बदनाम करून चळवळीपासून दूर जाण्यास भाग पाडले. हे माईंनी विस्तृतपणे सांगितले.

त्यावेळच्या आमच्या पिढीला दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे मी माईंविषयी पसरवण्यात आलेल्या संशयाचा मी त्यांच्यादेखत पुनरुच्चार करून बसलो होतो. त्यावेळच्या रिपब्लिकन पुढाऱ्यांनी केवळ नेतृत्व मिळावे, म्हणुन माईंना बदनाम करत त्यांना बाद करून टाकले होते. त्या कट कारस्थानांची कहाणी माईंच्या मुखातून सर्वात आधी ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभले. त्या दिवशी बाविस्कर यांनी आम्हाला खाऊ घातलेले गोड जेवणह कडू लागल्या सारखे वाटत होते.

हा प्रसंग घडून तब्बल ५० वर्षे उलटून गेली आहेत. मधल्या काळात माईसाहेब, राजा ढाले, डी.डी. बाविस्कर, माझे मित्र साहेबराव पानपाटील हे सर्वजण काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्याचे साक्षीदार असलेले माझे जुने मित्र विनायक केदारे, उत्तम बनसोडे, व वसंत साळवे हे आजही हयात आहेत.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!